आपल्या आरोग्याच्या बाबतीत इतर सगळ्याच घटकांइतकेच किंबहुना त्याहूनही महत्त्व दातांना आहे. कारण अन्न नीट चावण्याची प्रकिया झाल्यानंतरच त्यांचं पचन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून दातांची नीट निगा राखणं गरजेचं आहे.

आपलं जीवन हसत, खेळत, आनंदाने जगण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी आपले दात चांगले राहिले पाहिजेत. परंतु जेवढा वेळ आपण चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधने (क्रीम, पावडर, काजळ, लिपस्टिक, सन स्क्रीन, फाउंडेशन इत्यादी इत्यादी..) लावण्यासाठी घालवतो, त्याच्या अर्धादेखील वेळ आपण आपले दात स्वच्छ करण्यासाठी किंवा वेळेवर तपासून घेण्यासाठी देत नाही. शिवाय चुकीच्या पद्धतीने दात घासणे व चुकीच्या पदार्थाच्या साहाय्याने दात घासणे, आपण घेत असलेला आहार आपल्या दातांवर कसा दुष्परिणाम करत असतो तेसुद्धा आपण तपासून घ्यायला हवे. आपण सुरुवातीला पाहूया आपल्या देशात दात घासण्यासाठी काय काय वापरतात.
१) मशेरी – अजूनही ग्रामीण भागात दात घासण्यासाठी मशेरीचाच वापर केला जातो. ती बऱ्याचदा तंबाखूजन्य पदार्थापासून बनवलेली असते. काही ठिकाणी तिच्यात काही इतर पदार्थही मिसळले जातात. शक्यतो तंबाखू भाजून तिची राख केली जाते व दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. शास्त्रीयदृष्टय़ा अशी तंबाखूमिश्रित मशेरी ही आरोग्यासाठी अत्यंत घातक असते व अशा मशेरीने दात घासण्याने कर्करोग होण्याचा धोका असतो. मशेरीचे व्यसन लागण्याचा धोकाही मोठय़ा प्रमाणात असतो, त्यामुळे मशेरीने व त्यातही तंबाखूयुक्त मशेरीने दात घासू नयेत.
२) दंतमंजन- बऱ्याचदा काळ्या रंगात उपलब्ध असणाऱ्या या दंतमंजनात इतरही अनेक घटकांचा समावेश केलेला असतो व बोटाने घेऊन दातावर हे घासून दात स्वच्छ केले जातात. दंतमंजनाचे शास्त्रीय मापदंड ठरलेले नसतात, त्याशिवाय स्टँडर्डायजेशनचे जे प्रमाणपत्र उपलब्ध करायला हवे त्याचे बंधनही पाळलं जात नाही, त्यामुळे दंतमंजन हे दात साफ करण्याचे प्रभावी व शास्त्रीयदृष्टय़ा वैध प्रमाणित प्रक्रिया होऊ शकत नाही.
३) मीठ- आपल्याकडे मिठाने दात घासणारे अनेक लोक आहेत. एक तर मीठ हे एक क्षार आहे आणि असे हे मीठ पोटात अतिरिक्त प्रमाणात जाणे हे आरोग्यासाठी हानीकारक असते, तसेच सतत मिठाच्या वापरामुळे मिठामध्ये असणाऱ्या खरखरीतपणामुळे दात लवकर झिजण्याची शक्यता जास्त असते. तसेच शास्त्रीयदृष्टय़ा मिठात असे कुठलेच गुणधर्मयुक्त पदार्थ नसतात ज्यामुळे दात स्वच्छ होतात. त्याहीमुळे दातांची झीजच जास्त होते, म्हणून दात घासताना व स्वच्छ करताना मिठाचा वापर करू नये.
४) राखुंडी- चुला किंवा तत्सम जळणातून जी राख शिल्लक राहते तिलाच राखुंडी म्हणतात. अशा राखुंडीने मोठय़ा प्रमाणात दात साफ केले जातात, परंतु ते पूर्णत: चुकीचे आहे. एक तर राख कुठल्या पदार्थाची बनलेली असते हे आपल्याला माहीत नसते, तसेच राखेने दातांच्या भोवतीच्या ज्या हिरडय़ा असतात त्या हिरडय़ांमध्ये राख जाऊन दात व हिरडय़ांमध्ये ही राख अडकून दाताला व हिरडीला इजा होण्याचा धोका असतो. बऱ्याचदा दाताला व हिरडीला डाग पडण्याची शक्यताही असते त्यामुळे राखुंडीने दात स्वच्छ करू नयेत.
५) कडुनिंबाची काडी अथवा लिंबू- अजूनही भारतातल्या काही भागांत ही परंपरागत पद्धत वापरली जाते. कडुनिंबाची अनेक गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. आयुर्वेदात कडुनिंबाचे स्थान महत्त्वाचे आहेच, परंतु केवळ त्याची काडी वापरून तोंडात थुंकीचे प्रमाण जास्त येईल. त्या थुंकीने दात स्वच्छ झाल्यासारखे वाटतात, परंतु प्रत्यक्षात दातांचा व हिरडय़ांचा सर्व भाग त्याने स्वच्छ होऊ शकत नाही. तसेच लिंबू कापून त्यांच्या साहाय्यानेही काही लोक दात स्वच्छ करतात. ही पद्धतसुद्धा आरोग्याला हानीकारक ठरू शकते.
वरील प्रकारांव्यतिरिक्त अजूनही काही परंपरागत पद्धती आहेत, परंतु आपण सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे की संशोधन करून शास्त्रीयदृष्टय़ा आरोग्याला हितकारक असणाऱ्या गोष्टीच दात स्वच्छ करण्यासाठी वापरल्या पाहिजेत.
वरील प्रकारासोबतच हल्ली आपण काय खातो व कसे खातो यालाही खूप महत्त्व आहे. गेल्या दोन दशकांमध्ये आपल्या आयुष्याचा वेग इतका वाढला आहे की, मागे वळून पाहताना आपण आपल्या संस्कृतीचा किती जलदगतीने ऱ्हास करतो आहोत हे लक्षात येईल.
यातून एक मोठा धोका या गतिमान जीवनातून आपल्या आयुष्यात आला आहे तो म्हणजे ‘फास्ट फूड’ची संस्कृती. अगदी कमी वेळात उपलब्ध होणारे हे ‘फास्ट फूड’ आपली किती हानी करतेय हे आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा या फास्ट फूडच्या जंक फूडच्या सवयीपायी आपल्या घरची भाजी-पोळी-डाळ-भात हे सात्त्विक अन्न आपण रोज घ्यायला हवे ते आपण घेत नाही आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूड किंवा फास्ट फूडच्या आहारी आपण जातो. या जंक फूडमध्ये असे बरेच घटक असतात जे आपल्या दातांमध्ये, हिरडय़ांमध्ये अडकून पडतात व त्यांना हानी पोहोचते.
वेगवेगळ्या वयात आणि आजारांच्या किंवा विशिष्ट परिस्थितीत दातांची काळजी कशी घ्यावी हा मुद्दादेखील नेहमीच दुर्लक्षित राहतो.
दातांची काळजी खरे म्हणजे गर्भधारणेच्या अवस्थेपासून घ्यायला हवी. अर्थात गर्भात असताना आपण ते करू शकत नाही. तसेच आपल्या जन्मापासून काही काळ तरी आपल्याला आपल्या आईवरच अवलंबून राहावे लागते, म्हणजेच आईने गर्भधारण अवस्थेत असताना स्वत:ची योग्य काळजी आणि योग्य आहार घेतला व योग्य औषधोपचार केले तर आपली व आपल्या बाळाजी आपसूकच काळजी घेतली जाते. येथे एक प्रसंग सांगावासा वाटतो की, काही दशकांपूर्वी ‘टेट्रासायक्लीन’ नावाचे प्रतिजैविक अत्यंत जास्त प्रमाणात वापरले जायचे. अगदी गर्भवती स्त्रियांनाही ही औषधं सर्रास दिली जायची, परंतु नंतर लक्षात आले की, या अवस्थेत स्त्रियांना ही औषधं दिल्यास होणाऱ्या मुलांच्या दातावर कधीही नष्ट न होणारे व काढता न येणारे डाग येतात व दातांची व शरीराच्या सौंदर्याची या प्रकारे हानी होते, परंतु हे लक्षात येईपर्यंत बऱ्याच बालकांना याचा फटका बसला. त्यामुळेच स्त्रियांनी गर्भवती अवस्थेत कुठलीही औषधे खूप काळजीपूर्वक घ्यायची असतात.
लहान मुलांना आपले दात स्वच्छ करण्याची सवय दात यायला लागल्यापासून करायला हवी. सुरुवातीला मूल आईची मदत घेऊन हे सर्व करू शकते. अर्थात आईलाही दात साफ कसे करायचे हे शिक्षण मिळायला हवं. साधारणत: सहा ते सात महिन्यांपासून दात येण्याला सुरुवात होते व २० वर्षांपर्यंत किंवा अक्कलदाढ येईपर्यंत ही प्रक्रिया चालू असते. येथे हेही लक्षात ठेवले पाहिजे की, मूल सहा-सात वर्षांचे असतानाच तोंडात एक पक्की दाढही येते ज्याकडे दुधाची समजून बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. ही दाढ वयाच्या ६०/७० वर्षांपर्यंत तोंडात राहते व जेवणाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून या दाढेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आजकाल बऱ्याच मुलांचे दात हे वेडेवाकडे यायला लागलेत असे वाटते किंवा हे पूर्वीही असावे, परंतु दातांच्या बाबतीत एवढी जागरूकता अगोदर नसण्याने आपण तिकडे दुर्लक्ष करीत असू. अर्थात हेही खरं आहे की, मुलांचे दात पडतात व नवीन येतात या काळात तोंडात बऱ्याच घडामोडी चालू असतात हे नैसर्गिक आहे व या काळात दात वाकडे दिसतातच, परंतु काही काळाने ते नैसर्गिकपणे आपआपली जागा घेतात. या अवस्थेला ‘वॠ’८ ४िू‘’्रल्लॠ’असेही म्हणतात. याच अवस्थेत विशेषत: पालकांनी काही बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे. कारण काही पाल्यांचे दात क्रॉस पद्धतीने येऊन म्हणजेच साधारणत: वरच्या जबडय़ाचे दात बाहेर असतात व खालच्या जबडय़ाचे दात आत असतात. अशा रचनेमध्ये क्रम उलटा झाला म्हणजेच एखादा वरचा दात आत गेला किंवा खालचा दात बाहेर असल्यास आपण त्वरित दंतवैद्यकाचा सल्ला घेतला तर या अवस्थेत लवकर उपचार मिळून कमी खर्चात आपल्या पाल्यांच्या दाताची होणारी पुढील हानी टळू शकते.
लहान असतानाच काही मुलांना अंगठा चोखणे, दाताने नखे कुरतडणे, ओठ चावणे, जीभ सारखी मध्ये आणून बोलणे, झोपेत दात खाणे, झोपेत दूध पिणे इत्यादी चुकीच्या सवयी लागतात व नंतर त्या सवयी बंद व्हाव्यात म्हणून खूप प्रयत्न करूनही यश अवघड असते म्हणून अशा सवयी लागण्याअगोदरच त्या न लागाव्या म्हणून सावध राहणे केव्हाही चांगले.
दुधाचे दात आपण पडल्यानंतर फेकून देतो. असे दुधाचे दात आपल्यासाठी वरदान ठरावेत असा एक शोध अलीकडच्या काळात लागला आहे तो म्हणजे डेन्टल स्टेम सेल. आपल्या पडणाऱ्या दुधाच्या दातातून आपल्याला मोठय़ा प्रमाणात स्टेम सेल मिळू शकतात. यास्टेम सेल्सची साठवणून करून भविष्यात आपल्याला काही दुर्धर आजार झालेच तर त्यावरील उपाय या स्टेम सेलच्या माध्यमातून करता येऊ शकतो.
जसजसे आपण बालपणातून किशोर अवस्थेत जातो, आपल्या दाताची वाढ होत जाऊन आपले दुधाचे सर्व दात पडून त्या ठिकाणी पक्के दात येतात. दुधाचे सर्व दात पडले, की पक्क्या दातांच्या जागा शक्यतो बदलत नाहीत. दुधाचे दात एकूण २० असतात तर पक्के दात ३२ असतात. त्यामुळे दुधाच्या दातांमध्ये जर फटी असतील तर त्या चांगल्या मानल्या जातात, कारण या अतिरिक्त जागेमुळे येणाऱ्या १२ नवीन दातांना जागा उपलब्ध होते व ते सरळ रेषेत येतात. अन्यथा नवीन येणारे दात वेडेवाकडे येण्याची शक्यता असते.
किशोर अवस्थेकडून आपण युवावस्थेकडे जातो तसतसे शरीरात अनेक बदल घडत जातात. आपला आवाज किंचित बदलतो. काही शारीरिक बदल घडायला सुरुवात होते, दातांच्या संबंधाने बोलायचे तर मुख्यत: जबडे – खालचा व वरचा दोन्ही काही प्रमाणात बदलतात त्यांची वाढ होते. ही वाढ अर्थात जे आस्तीचे १२ दात येणार असतात त्यांना सामावून घेण्यासाठीही असते.
या अवस्थेत सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे अक्कलदाढ. वयाच्या साधारणत: १८ वर्षे असताना ती येते. म्हणजेच आपण प्रौढावस्थेकडे जात असताना येते म्हणूनच तिला अक्कलदाढ म्हणतात हे सर्वाना माहिती आहेच. हल्ली बऱ्याच जणांना अक्कलदाढ येताना खूप काळ यातना होतात किंवा कमीअधिक प्रमाणात तिचा त्रास सतत होत असतो. याचं कारण, खरे म्हणजे अप्रत्यक्ष आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीतच दडलेले आढळते. आपल्याला रेडिमेड, फास्ट फूड, जंक फूड खायची इतकी सवय होत चाललेली आहे की, आपण आता दातांचा वापर कमी करतो आहोत. काही दात तर आपण उपयोगात आणतच नाही. अक्कलदाढ ही अशीच दाढ आहे जिचा वापर आपण नगण्य करतो आहोत. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार जो भाग आपण पिढय़ान्पिढय़ा वापरत नाही तो निसर्ग वगळून टाकतो त्याच न्यायाने आजकाल बऱ्याच जणांना अक्कलदाढ येतच नाही किंवा चार ऐवजी दोन येतात किंवा आल्या तरी अर्धवटच येतात व अशा दाढा आपल्यासाठी त्रासदायक ठरतात म्हणून त्या सर्जरी करून काढून टाकाव्या लागतात.
युवावस्थेतून प्रौढावस्थेत गेल्यानंतर आपल्याला फार बदलाना सामोरं जावं लागत नाही. अर्थात आपण या अवस्थेत दातांची योजनाबद्ध पद्धतीने काळजी घेतली नाही तर त्याचा त्रास आपल्याला वृद्धापकाळात होण्याची शक्यता असते. म्हणून हा काळ दातांच्या आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी आवश्यक असतो. याची सुरुवात जरी किशोरअवस्थेतून होत असली तरी आपल्याला योग्य जाण आल्यामुळे, आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंद झाल्यामुळे आपण स्वत:चे निर्णय योग्य तपासून आपल्या दातांच्या भविष्यासाठी आपण होऊन चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने आपण दात घासत राहीलो. खूप हार्ड ब्रश वापरत राहिलो. खूप अधिक काळ एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने दात घासत राहिलो तर दातांची झीज होते. दात कमकुवत बनतात. दातांना थंड व गरम पाण्याने, पदार्थाने अस वेदना होतात. थंड हवेत व एसीमध्ये दात दुखतात. या सर्व घटकांचा परिणाम होऊन वृद्धकाळात जिथे चांगल्या आरोग्यासाठी दातांची खूप गरज असते अशा काळात दात साथ देत नाहीत. त्यामुळे आपल्यावर सर्व दात काढण्याची वेळ येते. कवळी बसवावी लागते. काहींना कवळी बसवणे लज्जास्पद किंवा किळसवाणे वाटते. त्यांना मग फिक्स डेंटल इम्प्लांटने पक्के दात बसवावे लागतात. ज्यांचा खर्च लाखोंच्या घरात जातो. विज्ञानातील नवीन नवीन आश्चर्यकारक शोधामुळे दातांच्या उपचारांमध्ये आमूलाग्र क्रांती झाली आहे व ज्या रुग्णाच्या तोंडात एकही दात शिल्लक नाही अशा रुग्णांनाही एका तासात पूर्ण फिक्स/पक्के दात बसवता येतात. असं असली तरी नैसर्गिकपणे मिळालेल्या दातांचं संवर्धन करून ते दात जर काळजीपूर्वक सांभाळले तर खर्चीक उपचारांपासून आपली सुटका करून घेता येते.
आपल्या शरीराच्या इतर अवयवांबरोबरच दातांनाही आपण महत्त्व दिलं आणि वरील सर्व बाबींचा आपल्या नेहमीच्या दिनक्रमात गंभीरतापूर्वक समावेश केला तर आपण निरोगी राहू शकतो, निरोगी खाऊ शकतो, निरोगी विचार करू शकतो. निसर्गाने, निर्मिकाने ही बत्तीस रक्षकांची फौज आपल्या दिमतीला विचारपूर्वक दिली आहे. या बत्तीस रक्षकांचे रक्षण चांगले भक्षण करून करूया.