बेल्जियमसारखा लिंबूटिंबू संघ आजघडीला भारतासमोर कडवे आव्हान उभे करीत आहे. उशिरा का होईना भारतीय संघाला अपयशाचे कारण कळले आहे.. पण, ही बाब समजण्यासाठी लागलेल्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे..

ऑलिम्पिक म्हटले, की आपल्यासमोर उभा राहतो तो मेजर ध्यानचंद यांचा सुवर्णकाळ.. ऑलिम्पिक म्हटले, की सहज आठवतो तो सुवर्णपदकांचा वर्षांव.. १९२८ ते १९८० (१९७६ चा अपवाद वगळता; ७ वे स्थान ) या ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला हॉकीने आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकून दिली.. त्यानंतर पदक तालिकेतून भारत हा हळूहळू नाहीसा होऊ लागला.. सुवर्णपदक काय असते, कसे असते हे जणू आपण विसरलोच.. २००८ च्या बीिजग ऑलिम्पिकमध्ये..जवळपास २८ वर्षांनंतर.. ६ ऑलिम्पिक स्पर्धानंतर.. नेमबाज अभिनव बिंद्रा याने भारताला नव्याने सुवर्णपदकाची ओळख करून दिली.. या इतक्या वर्षांच्या बदलाच्या वाऱ्यात भारतीय हॉकी काहीशी गायबच झाली. बीिजगमध्ये तर हॉकी संघाला प्रवेश मिळालाच नाही.. भारतासाठी ही नाचक्कीची बाब होतीच, तसेच पुनर्विचार करायला लावणारा गंभीर विषयही होता. एके काळी जगाला आपल्या हॉकि स्टिकवर नाचवणारा भारत आज स्वत: त्या स्टीकच्या तालावर चालणारा बाहुला बनला.. मेजर ध्यानचंद, लेसीस क्लाउडीअस, बलबिर सिंग (वरिष्ठ), गुरबक्ष सिंग, अशोक कुमार.. आदी दिग्गजांचे नामस्मरण करून किती काळ आपण इतिहासात रमण्यात धन्यता मानणार आहोत? ती आपली वृत्तीच.. इतिहासाच्या सुवर्ण अश्वावर स्वार होऊन आपली छाती अभिमानाने दसपट फुगवणाऱ्या भारतीयांना वस्तुस्थितीची जाण थोडय़ा उशिरानेच होते हे खरे.. १९२८पासून अगदी २००४ पर्यंत भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला, परंतु या १८ ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे १९२८ ते १९८० (१९७६ चा अपवाद वगळता; ७ वे स्थान) हा काळ भारतासाठी स्वप्नवत होता. त्यानंतर भारत हळूहळू जेतेपदाच्या शर्यतीतून आणि नंतर स्पध्रेबाहेर कधी फेकला गेला हे कोणालाच समजले नाही.. याच दरम्यान ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या तुलनेने कमकुवत असणाऱ्या संघांनी आपली ताकद वाढवली आणि ते थेट अव्वल स्थानापर्यंत मजल मारू लागले. यामध्ये नेदरलँड आणि स्पेन यांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल. काळानुसार हॉकीत झालेले बदल समजून त्यांनी प्रगतीचा आलेख चढा ठेवला. बेल्जियमसारखा लिंबूटिंबू संघ आजघडीला भारतासमोर कडवे आव्हान उभे करत आहे.. उशिरा का होईना भारतीय संघाला अपयशाचे कारण कळले आहे.. पण ही बाब समजण्यासाठी भारताला लागलेल्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे.. तरीही ‘देर आये, दुरुस्त आये’ या हिंदी म्हणीनुसार आपण आपलीच पाठ थोपटून घ्यायला कमी करणार नाही.

हे सर्व सांगण्यास कारण असे की, रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या जागतिक हॉकी लीग अंतिम फेरी स्पध्रेच्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने बाजी मारली.. आणि नेहमीप्रमाणे स्वत:ला शाबासकी दिली. ही शाबासकी योग्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण प्रतिस्पर्धी संघ हा तुल्यबळ आणि गतविजेता नेदरलँड होता. त्यामुळे भारतीय संघाने केलेला खेळ कौतुकास पात्र ठरतो. १९८२ च्या चॅम्पियन्स चषक स्पध्रेनंतर भारताने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पध्रेत पदक पटकावल्याची किमया साधली. त्यामुळे त्यांचे कौतुक होईल तितके कमी.. या कौतुकांच्या पावसात न्हाऊन निघायचे की त्यातच घुटमळत बसायचे हे संघाने आत्ताच ठरवलेले बरे.. कारण आपल्या प्रथेप्रमाणे एखाद्या विजयानंतर त्यात रमणेच आपल्याला शोभते आणि पुढील ठेच लागेपर्यंत हे असेच सुरू असते.. हे वर्ष ऑलिम्पिकचे असल्याने या कौतुकवर्षांत रमून राहणे भारताला घातक आहे, हे वेळीच समजायला हवे. असो. आपण या स्पध्रेतील भारतीय संघाच्या एकूण कामगिरीबाबत बोलू या.. या स्पध्रेतील भारताची कामगिरी तितकीशी समाधानकारक झालेली नाही.. आघाडीपटू, मध्यरक्षक, आक्रमणपटू या सर्व आघाडय़ांवर भारताला दहापैकी ६ गुण मिळतील. कुणाचाही ताळमेळ दिसला नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने सामन्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटताना दिसला. याचा फटका पहिल्याच सामन्यात बसला.. अर्जेटिनाने अगदी सहजतेने भारताला नमवले.. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा एक स्थान वर असलेल्या अर्जेटिनाने (६) सर्व आघाडीवर सर्वोत्तम खेळ केला. ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीला १-१ असे बरोबरीत रोखून आपण शौर्य गाजवले खरे, परंतु पुढील सामन्यात नेदरलँडविरुद्ध शस्त्रे म्यान केली. सातत्यपूर्ण खेळाचा अभाव या सामन्यात प्रकर्षांने जाणवला. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारताला अजूनही अपयश येत आहे. प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण थोपवण्याची धमक असूनही भारत चाचपडत आहे, याचे कारण उमगायला मागत नाही. ग्रेट ब्रिटनविरुद्धचा विजय हा भारतासाठी निर्णायक होता. अपेक्षा नसतानाही भारताने २-१ असा विजय साजरा केला आणि उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला, परंतु येथे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्याचा’ कित्ता गिरवत बेल्जियमकडून मात खाल्ली. या स्पध्रेत आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग हे आघाडीपटू, तर रुपिंदर पाल सिंग (फुलबॅक), कर्णधार सरदार सिंग (हाफ बॅक), मनप्रीत सिंग (हाफबॅक) ही मोजकीच नावे चर्चेत राहिली. हॉकी हा सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नक्कीच नाही. त्यामुळे भारताकडे असलेल्या बलस्थानाचा पुरेपूर वापर केल्यास भारत आंतरराष्ट्रीय स्पध्रेत कडवे आव्हान उभे करू शकेल हे निश्चित. पेनल्टी कॉर्नर हा अजूनही भारतासाठी चिंतेचा विषय आहे. बचावातही अनेक त्रुटी आहेत आणि त्यासाठी बिरेंद्र लाक्रा, देवींदर वाल्मिकी, व्ही. रघुनाथ यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आणखी एक धोक्याची बाब भारतासमोर आहे आणि ती म्हणजे की गोलरक्षक पी. आर. श्रीजेशवर अवलंबून राहणे. श्रीजेशची बचावभिंत भेदण्यात भल्याभल्या प्रतिस्पर्धीना अपयश येत असले तरी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहणे भारतासाठी घातक ठरू शकते. पर्यायी गोलरक्षकांची फौज निर्माण करण्यावर कुणी भर देताना दिसत नाही. ऑलिम्पिक स्पध्रेत हाच हट्ट भारताच्या अंगलट येऊ शकेल. त्यामुळे वेळीच धोक्याचा इशारा समजून पर्याय तयार करा आणि त्याला पुरेशी संधी द्या.. जेणेकरून ऐन वेळी जबाबदारी आल्यास तो डगमगून जाणार नाही. त्यावर अजूनही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.. प्रशिक्षक रोलँट ऑल्टमन्स हे गेली कित्येक वष्रे भारतीय संघासोबत आहेत, परंतु प्रशिक्षकाची जबाबदारी ही त्यांच्यावर आत्ताच आली. त्यात त्यांनी आपले कौशल्य दाखवून संघात स्थिरता आणली, परंतु त्यांनाही पुढील आव्हानांची जाण आहे आणि त्यामुळे यशाची कैफ डोक्यात जाऊ न देता वस्तुस्थितीला धरून चालण्यात ते धन्यता मानतात. हे अनुभवातून आलेले शहाणपण भारतीय संघातील खेळाडूंमध्येही यायला हवे. कांस्यपदकाच्या लढतीत नेदरलँडवरील विजयात भारताने दाखवलेली चिकाटी आणि आत्मविश्वास हा कौतुकास पात्र आहे. मात्र वरकरणी पाहता आपण ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलो, रोमहर्षक सामन्यात गतविजेत्यांना नमवले, हे सर्व खरे असले तरी तो इतिहास झाला. रात गयी, बात गयी.. या स्पध्रेतील चुकांवर अभ्यास करून सुधारणा करण्यासाठी भारताकडे जवळपास सात महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे या स्पध्रेतील कामगिरीवर शेरा द्यायचा झाल्यास, ‘भारत ऑलिम्पिक पूर्वपरीक्षेत काठावर पास झाला’ असाच द्यावा लागेल.

स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com