पुराणातली वांगी पुराणात असं आपल्याला म्हणायची सवय असते. महाभारत काही पुराण नाही, पण आजच्या काळाचा संदर्भ लावून बघितलं तर ते किती ताजं टवटवीत वाटतं..

महाभारत! भारतीय माणसाचा जीव की प्राण! यातील अनेक पात्रांना अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आदर्श मानत आले आहेत, पण त्यातल्या त्यात अर्जुन हा सर्वाना, विशेषत: तरुणांना नेहमीच हवाहवासा वाटलेला आहे. लाडका असणे ठीक आहे, पण आजच्या तरुणांसमोर तो आदर्श ठेवू शकेल? होय, अगदी नक्कीच ठेवू शकेल. सध्याच्या आíथक मंदीच्या काळात आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या तरुणांसमोर तर शब्दश: त्रिवार आदर्श ठेवू शकेल तो, त्याच्या जीवनातील तीन प्रसंगांमुळे.
सध्याच्या काळात सर्वच कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग हा परवलीचा शब्द झालेला आहे. एकाच माणसावर अनेक कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या टाकून पगाराचा पसा वाचवण्याची कंपन्यांनी लढवलेली ही शक्कल आहे आणि या युक्तीला भुलून ही तरुण मंडळी एकाच गोष्टीवर असाधारण एकाग्रता राखण्याच्या कौशल्याला कमी लेखू लागली आहेत. एका वेळी हजार गोष्टींच्या मागे लागून शेवटी कुठलीच नीटपणे पार पडत नाही व आपल्याला समाधान मिळत नाही हे ते विसरत चालले आहेत. शिवाय इंटरनेट, टीव्ही वगैरे सर्फिग करावयाच्या गोष्टी यात भर घालतातच. एखादी मॅच, एक सीरियल व एक-दोन सिनेमे असं सगळं एकाच वेळी पाहिल्याशिवाय यांना मजाच येत नाही. हे पाहिल्यावर आठवतो तो विद्यार्थिदशेतला अर्जुन. ‘पोपटाशिवाय.. नव्हे, पोपटाच्या डोळ्याशिवाय.. मला दुसरे काहीच दिसत नाही,’ असे म्हणून आपल्या गुरूची वाहवा मिळवणारा अर्जुन; पण त्या वेळचे द्रोणाचार्य जर आजच्यासारखे कुठल्या तरी आयआयएम-परशुराम आश्रममधून एमबीए झालेले मॅनेजमेंट गुरू असते, तर ते अर्जुनाला म्हणाले असते, ‘गधडय़ा, अरे, बाकीचे शिष्य बघ कसे मस्तपकी मल्टिटािस्कग करत आहेत! पोपट, झाडे, आजूबाजूचे शिष्य, मी, डोंगर इत्यादी सगळं एकाच वेळी पाहत आहेत ते. असं पाहिजे, सगळीकडे एकाच वेळी लक्ष देता आलं पाहिजे! नुसत्या पोपटाच्या डोळ्याला काय चाटायचं आहे?’
होय तरुणांनो, मला माहीत आहे की, ऑफिसमध्ये तुम्हाला या आधुनिक द्रोणाचार्याचं म्हणणं मान्य करावंच लागेल, पण निदान ऑफिसबाहेर, जीवनातील तत्त्व म्हणून तरी याला मान्यता देऊ नका. एखाद्या गोष्टीवर एकाग्र होऊन त्यात निष्णात होणं, हा माणसाला महान बनवणारा गुण आहे. त्याचा त्याग करू नका. मल्टिटास्किंग केल्यामुळे तुमचा तात्कालिक फायदा होईलही, पण जीवनात अत्युच्च पातळी गाठण्यासाठी, एकाच गोष्टीवर फोकस करणं, स्पेशलायझेशन करणं, हेच जास्त महत्त्वाचं आहे, हे अर्जुनाकडून शिका.
आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांच्या आता एक गोष्ट चांगलीच अंगवळणी पडली आहे, ती म्हणजे अधूनमधून प्रोजेक्ट नसणे. म्हणजे त्यांच्या भाषेत बेंचवर असणे. एवढंच नव्हे तर हल्लीच्या मंदीच्या काळात तर नोकरी जाणे, बराच काळ अनएम्ल्पॉइड असणे, हेसुद्धा बऱ्याच जणांना अनुभवायला मिळत आहे. हा अनुभव पांडवांनापण आला होता बरं का! कधी म्हणून विचारताय? त्यांचा १४ वर्षांचा वनवास हे एक प्रकारे बेकार असणे किंवा बेंचवर असणेच नव्हते का? १४ र्वष बेंचवर, कल्पनाही नाही करवत ना?
युधिष्ठिर, नकुल, सहदेवांनी चकाटय़ा पिटतच घालवला हा काळ. भीमाने अनेक राक्षसांशी द्वंद्वयुद्ध खेळून आपली शक्ती शाबूत ठेवली व युद्धाची सवय ठेवली, पण खऱ्या अर्थी या काळाचा सदुपयोग केला अर्जुनाने. शंकराच्या पाशुपतास्त्रापासून इंद्राच्या अमोघ शक्तीपर्यंत अनेक दिव्यास्त्रे प्राप्त करून घेण्यासाठी, थोडक्यात म्हणजे आजच्या भाषेत व्हॅल्यू अ‍ॅडिशनसाठी करून घेतला. योद्धा म्हणून अजिंक्य, अवध्य होण्यासाठी, बेस्ट ऑफ बेस्ट होण्यासाठी केला. हा आदर्श ठेवून आजचा तरुणसुद्धा कठीण काळात निराश न होता नवनवीन टेक्नॉलॉजीज, सॉफ्टवेअर्स शिकू शकतो, पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवू शकतो किंवा अगदी नोकरी करताना वेळ न मिळाल्यामुळे राहिलेले काही छंदही पूर्ण करू शकतो, ज्याचा आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो.
अशा प्रकारे बेरोजगार असलेला हा प्रोफेशनल, मग जी पहिली नोकरी मिळेल ती पत्करतो. कधी ती कमी पगाराची असते, कधी त्यात जॉब सॅटिस्फॅक्शन नसते, कधी त्याच्या इभ्रतीला साजेशी नसते. अशा वेळी आठवावा तो अज्ञातवासातील अर्जुन! तुम्ही थोडी कमी दर्जाची नोकरी पत्करलीत तरी ती नोकरी करणारी व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला बदलावं लागत नाही, व्यक्ती म्हणून तुम्ही तेच असता. भारतीय असणं, मराठी असणं, सुशिक्षित, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय माणूस असणं सोडून द्यावं लागत नाही, पण अर्जुन? त्याला अज्ञातवासात त्याचा क्षत्रियाचा, योद्धय़ाचा मानाचा व्यवसाय त्यागावा लागलाच, पण राजपुत्र असणं, प्रतिष्ठित राजघराणे इत्यादी सगळं विसरून पायात चाळ बांधावे लागले. याहीपुढे जाऊन, अगदी सगळ्यात बेसिक ओळख, ‘पुरुष असणे’ याचाही त्याग करावा लागला. संपूर्ण पुरुष अशी ओळख असलेल्या त्या जिवाचं काय झालं असेल खरंच त्या वेळी?
पण तरीही, वर्ष संपता संपता जेव्हा प्रसंग आला, तेव्हा हाती धनुष्य घेऊन एकटय़ाने सर्व कौरवांचा पराभव केला. त्या एका वर्षांत त्याच्या मनाचं खच्चीकरण का झालं नाही? कुठून आला हा आत्मविश्वास?
याचं कारण असं आहे की, बाहेरून जरी नपुंसकाचं जिणं जगावं लागत असलं तरी आपण खरे कोण आहोत हे तो एक क्षणही विसरला नव्हता. शमी वृक्षावर लपवलेल्या शस्त्रांचा विसर त्याला तिळमात्रही पडला नव्हता.
असंच आता काहींच्या बाबतीत होत असेल. आधीच्या नोकरीत तुम्ही टीम लीडर असाल, पण आता तुम्हाला प्रोग्रॅमरची नोकरी करावी लागत असेल. तरीही शमी वृक्षावर जपून ठेवलेल्या लीडरशिप क्वालिटीज, ते ज्ञान, ती विद्वत्ता, ते शिक्षण यांचा क्षणभरही विसर पडू देऊ नका. मग जेव्हा जेव्हा मुलाखतीसाठी जाल, तेव्हा टीम लीडरच्या आत्मविश्वासानेच जाल व ते पद परत एकदा मिळवाल.
या तीन प्रसंगांव्यतिरिक्त अर्जुनाच्या संपूर्ण आयुष्यालाच व्यापून उरलेली गोष्ट म्हणजे, त्याची श्रीकृष्णावर असलेली अपार श्रद्धा. वरील सर्व प्रसंगांतही ती लेशमात्रही कमी झाली नाही. त्याच्यासारखाच अढळ विश्वास परमेश्वरावर ठेवा, यश तुमचेच आहे. गीतेत म्हटलेच आहे-
यत्र योगेश्वर: क्रुष्णो
यत्र पार्थो धनुर्धर:,
तत्र श्रीर्वजियो
भूतिध्र्रुवा नीतिर्मतिर्मम.
आपले पूर्वज खरंच सांगत होते, महाभारत कधीच कालबाह्य़ होणार नाही. यात भर घालून मी म्हणेन, की अर्जुन कधीच म्हातारा होणार नाही!!!