lp35महाराष्ट्र राज्य असोसिएशनने महाकबड्डीचा घाट घातला खरा, पण त्यातल्या एकूण त्रुटी पाहता ‘आम्हीपण कबड्डीची लीग घेतली’ हा आनंद वगळता त्यातून नेमके काय साधले हा प्रश्नच आहे.

‘प्रो-कबड्डी लीग’च्या पावलांवर पाऊल ठेवून ‘महाकबड्डी लीग’चे शिवधनुष्य पेलण्याचा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने प्रयत्न केला खरा, परंतु गृहपाठ कमी केल्यामुळे त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही. महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धासाठी नेहमीच सुगीचे दिवस असतात. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बऱ्याच प्रमाणात होत असतात, तर भारतीय हौशी कबड्डी महासंघाशी सलोख्याचे संबंध नसल्यामुळे थोडय़ा प्रमाणात अखिल भारतीय स्पर्धा होतात. वर्षांतून एकदा ‘महाराष्ट्र शासनाची कबड्डीमधील गुंतवणूक’ असे बिरुद मिरवणारी छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धा होते. या ठिकाणी शासनाचे ५० लाख आणि आयोजक संघटनेचे आणखी काही असा लाखो रुपयांचा खर्च संयोजनासाठी केला जातो. महाराष्ट्रातील कबड्डी स्पर्धामधील एकंदर गुंतवणूक ही तशी कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणारी. त्यामुळे महाकबड्डी लीगचे आर्थिक गणित आखताना ‘पाहा, आम्हीसुद्धा लीग घेऊन दाखवली!’ या स्वप्नाळू दृष्टिकोनावरच संयोजकांनी धन्यता मानली. परंतु महाकबड्डी प्रत्यक्ष मैदानावर येताना आणि आल्यानंतरचे वास्तव हे विचार करायला लावणारे होते. त्यामुळे संयोजकांना खडबडून जाग आली. पण अखेरीस ऐलतीरावरून महाकबड्डीची नाव पैलतीरावर नेण्यात संयोजकांना यश आले. पहिल्यावहिल्या महाकबड्डीचे विजेतेपद ठाणे टायगर्सने पटकावले.
महाकबड्डी लीगचे आयोजन करावे, ही योजना तशी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडे अनेक वष्रे धूळ खात पडली होती. परंतु प्रो-कबड्डी लीगला गतवर्षी डोळे दीपवणारे यश मिळाल्यानंतर महाकबड्डी लीगला अखेर मुहूर्तमेढ लाभली. महाराष्ट्रातील कबड्डी प्रशासकांना मग दररोजच महाकबड्डीची सुवर्णस्वप्ने पडू लागली. पाहता पाहता कागदी आराखडे तयार झाले. महाराष्ट्रातील उद्योगपती, राजकीय नेते यांनी संघखरेदी केली. लिलाव झाले, लाखो रुपयांची बोली लागल्यामुळे तेही ‘लक्ष’वेधी ठरले. परंतु स्पर्धा अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचली असताना वेगाने धावणारी ही पावले मंदावली. अखेर पुण्यात मालक मंडळींची तातडीची बैठक झाली आणि पावलांना भक्कमपणा देण्यात आला. ईस्पित साध्य झाले, पुण्याच्या बालेवाडीत विजयाचा अध्याय लिहिला गेला.
१९७०च्या दशकात टीव्ही चॅनेलचा मालक कॅरी पॅकरने रंगीबेरंगी कपडय़ांत प्रकाशझोतात सामन्यांची टूम काढली होती. त्याच्या सामन्यांची ‘पॅकर सर्कस’ म्हणून हेटाळणी करण्यात आली. परंतु त्याचेच अर्थकारण मग क्रिकेट जगताला स्वीकारावे लागले. क्रिकेट सामने पाहण्यातून आणि खेळाच्या विपणनातून खूप पैसा मिळू शकतो, हे गणित पॅकरला ठाऊक होते. खेळाच्या यशाचे पहिले सूत्र म्हणजे थेट प्रक्षेपण. टीव्हीच्या माध्यमातूनच क्रिकेट हा खेळ गेली अनेक वष्रे देशातील तळागाळात रुजू शकला आहे. १९८३च्या विश्वचषक क्रांतीचा यात मोठा वाटा आहे. एखाद्या स्पध्रेचे रुपडे पालटण्याची क्षमता ही या थेट प्रक्षेपणातून सिद्ध होते. २००८मध्ये इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा भारतात सुरू झाली. ललित मोदीच्या योजनेने सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच जणू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मिळाली. कालांतराने अन्य खेळांमध्येसुद्धा ही लाट आली. पण कबड्डी प्रीमियर लीगचे अपयश विसरून मशाल स्पोर्ट्सने प्रो-कबड्डीच्या यशाचा विडा उचलला. स्टार स्पोर्ट्ससारखी जगातील अव्वल क्रीडावाहिनी कबड्डीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्यामुळे प्रो-कबड्डी हा क्रीडारसिकांमध्ये रुजवण्यात त्यांना यश आले. महाकबड्डी लीगच्या थेट प्रक्षेपणासाठी संयोजकांनी मोठय़ा वाहिन्यांकडे चपला झिजवल्या. परंतु अखेरीस कबड्डीशी निगडित एका राजकीय पुढाऱ्याच्या शब्दाखातर एका वाहिनीशी हा करार झाला. यासाठी मोठी आर्थिक किंमत मोजली ती संयोजकांनी. या वाहिनीला कबड्डीचा खेळ अजून चांगल्या पद्धतीने सादर करता आला असता. परंतु मे महिन्याच्या सुट्टीतील या स्पध्रेची पुरेशा प्रमाणातील जाहिरात ना संयोजकांनी केली, ना थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने. त्यामुळे उत्पादनाचे छानशा वेष्टनासह ब्रँडिंग होऊ शकले नाही. हे या स्पध्रेला चांगले यश न मिळण्याचे महत्त्वाचे कारण ठरले.
महाराष्ट्र शासन दरवर्षी छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धा घेते. या स्पध्रेवर ५० लाखांहून अधिक खर्च होतो. मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पध्रेच्या वेळी अनेक कबड्डीपटूंच्या परीक्षा सुरू असतात. त्यामुळे संघांच्या उपस्थितीवर परिणाम जाणवतो. याचप्रमाणे बलाढय़ संघांमध्येसुद्धा काही खेळाडूंना स्पध्रेत सहभागी होणे जमत नाही. त्यामुळे केवळ लक्षावधी रुपये राज्यातील संघांमध्ये वाटण्यासाठीच ही स्पर्धा असल्याचे दिसून येते. दोन्ही गटांमध्ये मोजक्या संघांमधील चुरस असते. त्यात आता भर महाकबड्डी लीगची पडली आहे. महाकबड्डी लीगचे दोन हंगाम एका वर्षांत घेण्याचे मनसुबे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आखते आहे. परंतु इतक्या मोठय़ा प्रमाणात स्पर्धाचे पीक येणे आवश्यक आहे का, हा प्रश्न मात्र कायम आहे. छत्रपती शिवाजी करंडक स्पर्धा एके काळी शिवशाही असताना अखिल भारतीय स्तरावर व्हायची. देशातील सर्वोत्तम संघ आणि खेळाडूंचे खेळ या स्पध्रेत पाहायला मिळायचे. परंतु आता फक्त स्पर्धा घेण्याचे वार्षिक सोपस्कार असतात. महाकबड्डीच्या संयोजकांनी प्रत्येक संघात अन्य राज्यांच्या एक किंवा दोन खेळाडूंना सहभागी करून घेण्याची एक मर्यादा ठरवली. तर महाकबड्डीचा दर्जा उंचावेल. परंतु महाराष्ट्राची स्पर्धा आहे, ती महाराष्ट्रापुरती येथील खेळाडूंसाठीच असणार आहे, ही मनोवृत्ती खेळाच्या विकासाला मर्यादा आणत आहे.
महाकबड्डीने काही चांगल्या गोष्टीसुद्धा या लीगच्या निमित्ताने अंगीकारल्या. वेळेत सामने सुरू करणे, हे थेट प्रक्षेपणामुळे क्रमप्राप्त ठरले. राजकीय नेत्यांची भाषणे, त्यांचे अवेळी येणे, हे सारे महाकबड्डीत दिसून आले नाही. त्यामुळे एरव्ही शहरात किंवा गावांत बक्षिसे किंवा स्पर्धाचा खर्च उचलण्यासाठी पैसे टाकणाऱ्या पुढाऱ्यांना महाकबड्डीच्या व्यासपीठावर स्थान नव्हते. महाकबड्डीचा प्रचार-प्रसार अधिक प्रमाणात झाला असता तर तिकीट विक्रीलासुद्धा त्याचा प्रतिसाद मिळाला असता. परंतु याचे महत्त्व संयोजकांना अखेपर्यंत कळले नाही. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या शहरांमध्ये महाकबड्डीचा हंगाम बहरला. परंतु या शहरात त्याची पुरेशा प्रमाणात जाहिरातबाजी झाली नाही. खेळाडूंना मोठेपण देणारे, त्यांची वैशिष्टय़ मांडणारे असे अभियान महाकबड्डी लीगसाठी राबवता आले असते. यानिमित्ताने सदर स्पध्रेत खेळणाऱ्या संघांच्या जर्सी आणि अन्य उत्पादनाचे ब्रँडिंग या खेळाच्या पथ्यावर पडू शकले असते.
प्रो-कबड्डी लीगच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील स्वत: व्यासपीठावर होते. परंतु तरीही त्यानंतर महाराष्ट्रात स्पर्धा झाली आणि आम्हाला पुरेशी विचारणा झाली नाही, अशा तक्रारींचा सूर राज्य कबड्डी असोसिएशनमधील काही पदाधिकाऱ्यांचा होता. त्यामुळे महाकबड्डी लीग घेताना प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. परंतु त्यामुळे खेळाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले, हे या मंडळींना मात्र अद्याप समजलेले नाही. वर्षभरात प्रो-कबड्डी लीग महिलांसाठीसुद्धा सुरू होईल. मग त्या खेळाडूंनाही तशाच प्रकारे वागवले जाईल. यातून संघटनेला नेमके काय सिद्ध करायचे आहे, हे मात्र कळत नाही. प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळलेले १५ पुरुष खेळाडू महाकबड्डीत दिसले नाहीत. पण रेल्वेसारख्या स्वतंत्र राज्य संघाचा दर्जा असलेल्या संघातील खेळाडू मात्र मोठय़ा संख्येने महाकबड्डी लीगमध्ये खेळले, याची ना खेद, ना खंत संघटनेला होती.
अर्जुन पुरस्कार विजेत्या शांताराम जाधव यांनी प्रो-कबड्डीचे धडे गिरवून महाकबड्डी लीगला यश मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अन्य पदाधिकाऱ्यांनी चार जिल्’ाांचे छान दौरे केले. यातील राजकारणाचा भाग लवकरच दिसून येईल. परंतु महाकबड्डी लीगच्या निमित्ताने अनेक उदयोन्मुख खेळाडू आणि प्रशिक्षक उदयास आले. महाराष्ट्राकडे दुसरी फळीसुद्धा समर्थपणे आहे, हे दिसून आले. तूर्तास, महाकबड्डीच्या पहिल्या हंगामाबाबत समाधान प्रकट करून वर्षांअखेरीस होणाऱ्या दुसऱ्या हंगामाची वाट पाहू!
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com