भारत-पाकिस्तान सीमेपासून केवळ ४० किलोमीटर्स अंतरावर असलेला गुरुदासपूर जिल्ह्य़ातील पठाणकोट हा भारतीय हवाई दलाचा तळ हा दहशतवाद्यांचे महत्त्वाचे लक्ष्य ठरू शकतो, हे सांगण्यासाठी खरे तर कोणत्याही ज्योतिषाची गरज कधीच नव्हती. गेल्याच वर्षी म्हणजे २०१५ सालच्या जुलै महिन्यात गुरुदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या जिल्ह्य़ातील महत्त्वाचा हवाई तळ असलेल्या पठाणकोटची सुरक्षा वाढवून ती कडेकोट करणे भारतीय सुरक्षा दलांसाठी आत्यंतिक गरजेचे होते. कारण या हवाई तळाला सीमेलगत असल्याने सामरिकदृष्टय़ा सर्वाधिक महत्त्व आहे. कारणही तेवढेच साहजिक आहे, पहिले म्हणजे जम्मू आणि काश्मीरला लागूनच हा परिसर आहे. शिवाय पाकव्याप्त काश्मीरमधील ज्या सिंध आणि पंजाब प्रांतांमध्ये दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्रे उघडली आहेत आणि तिथे त्यांचेच राज्य चालते; त्या भागात आतमध्ये घुसून कारवाई करायची झाल्यास याच हवाई तळाचा वापर भारताला सर्वाधिक करावा लागणार, हे सामरिक सत्य आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेणे खूप महत्त्वाचे होते. पण पठाणकोट हल्ल्याने आपले झालेले दुर्लक्ष उघडे पाडले आहे.

दुसरीकडे गेल्याच म्हणजे २०१५ सालच्या अखेरच्या आठवडय़ात संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानकडे गेले होते, त्याचे निमित्त ठरली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला दिलेली अचानक भेट. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा ६६ वा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्यांच्या नातीचे लग्न असा दुहेरी योग जुळून आला. या योगाला पार्श्वभूमी होती ती, २०१६ या नव्या वर्षांतील जानेवारी महिन्यात १४ व १५ तारखेला होऊ घातलेल्या भारत-पाक यांच्यातील सचिवस्तरीय सर्वात महत्त्वाच्या चर्चेची.  मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध जवळपास विकोपालाच गेले होते. त्यानंतर झालेल्या अनेक शांतता प्रयत्नांना यश आले नाही. मात्र मध्यंतरी अचानक चक्रे फिरली आणि भारत-पाक चर्चेची पहिली अनौपचारिक फेरी कुणालाही, कोणतीही फारशी कल्पना न देता या दोन्ही देशांमध्ये न होता, थेट वेगळ्याच तिसऱ्या देशात पार पडली. खरे तर ती अचानक नव्हती, मात्र त्याबद्दल विशेष गुप्तता पाळण्यात आली होती. या दोन्ही देशांनी शांतता चर्चेला सूर धरला की, त्याला विरोध हा ठरलेलाच असतो. दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कर त्यात खोडे घालण्याचे प्रयत्न नेहमीच आजवर करीत आले आहेत. त्याच्या अनेक उदाहरणांची जंत्रीच देता येईल. पाकिस्तानमध्ये खरी सत्ता चालते ती पंतप्रधानांची नव्हे तर लष्कराचीच, ही सत्याची दुसरी बाजूही तेवढीच कटू आहे. त्यामुळे त्या तिसऱ्याच देशातील चर्चेने दीर्घकाळ रेंगाळत राहिलेला शांतता चर्चेचा विषय पुढे सरकला. शिवाय दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये इतरत्र जगभरात विविध निमित्तांनी झालेल्या तीन-चार भेटींनी चर्चेसाठी एक व्यासपीठ तयार करण्याचे काम केले. त्या पाश्र्वभूमीवर गेल्या २५ डिसेंबर रोजी लाहोरला झालेली भेट ही म्हटली तर वैयक्तिक कारणाने झालेली भेट; पण भारताच्या दृष्टीने पाहायचे तर मोदींनी दाखविलेला तो धोरणात्मक शिष्टाईचाच भाग होता. साहजिकच होते की, दोन्ही पंतप्रधानांनी अशा प्रकारे जवळ येणे हे पाकिस्तानी लष्कराला आणि दहशतवाद्यांना आवडणारी घटना नव्हती. त्या भेटीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांची प्रतिक्रियाही संताप व्यक्त करणारीच होती. आजवरचा इतिहास असे सांगतो की, जेव्हा जेव्हा दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी शांतता प्रक्रिया पुढे नेण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे; तेव्हा तेव्हा पाकिस्तानी लष्कराने पोसलेल्या आयएसआय या त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणला आहे. म्हणूनच आताही भारताला अशाच प्रकारच्या कोणत्या तरी हल्ल्याचा सामोरे जावे लागेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरजच नव्हती. तर गरज होती ती, संरक्षण आणि हेरगिरीच्या पातळीवर सारे काही कडेकोट करण्याची! ..पण हे सारे माहीत असतानाही पठाणकोटच्या महत्त्वाच्या असलेल्या भारतीय  हवाई दलाच्या तळाच्या परिसरात घुसखोरी करण्यात दहशतवाद्यांना यश आले. मिग २१ बायसन किंवा एमआय २५ व एमआय ३५ या दोन्ही हेलिकॉप्टर्सपर्यंत पोहोचण्याआधीच दहशतवाद्यांचा खातमा करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले. या लढाऊ विमानांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असते तर भारतावर केवळ नामुष्कीच ओढवली नसती, तर जागतिक नाचक्कीलाच सामोरे जावे लागले असते. पण सुदैवाने तसे काहीही झाले नाही, पण ती नामुष्की रोखण्यापोटी आपल्या जवानांना शहीद व्हावे लागले ही देखील खचितच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यातही आपण लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अत्युच्च कारवाईसाठी प्रशिक्षित अधिकारी नाहक गमावला, हा देशासाठीचा सर्वात मोठा फटकाच आहे!

या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेकडे दोन पातळ्यांवर पाहावे लागते. त्यातील पहिला भाग म्हणजे देशांतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा आणि दहशतवाद्यांशी लढण्यासंदर्भातील आपली सज्जता. या तिन्ही पातळ्यांवर आपण कमीच पडतो आहोत, हे या पठाणकोट हल्ल्याने दाखवून दिले. हिवाळा सुरू असल्याने जम्मू आणि काश्मीरमधून घुसखोरी करणे ही तेथील पराकोटीचे वातावरण पाहता असंभव गोष्ट होती आणि जुलैमध्ये गुरुदासपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर पंजाबमध्ये शिरणे दहशतवाद्यांसाठी तुलनेने सोपे होते. हे माहीत असतानाही आपण कमी पडलो. कारण पंजाबमधील घुसखोरीबाबत आपण फारसे गंभीर नव्हतो.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे दिनानगर भागामधून दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी घुसखोरी केली. तिथे गस्तीवर असलेल्या आपले अपहरण केले असे स्थानिक पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांनी सांगितले. याप्रकरणाची सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. सिंग यांनी चौकशीदरम्यान असेही सांगितले की, मुक्तता झाल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यासंदर्भात संदेश पाठवला होता. पण एवढे असतानाही शनिवारी दहशतवाद्यानी हवाई तळावर केलेली घुसखोरी आपल्याला रोखता आली नाही. हा सर्व घटनाक्रम आपल्या सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटीवर बोट ठेवणारा आहे. अशाच प्रकारच्या त्रुटी आपल्याला २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेसही लक्षात आल्या होत्या. मात्र त्यातून आपण काहीच धडा घेतलेला दिसत नाही, हेच पठाणकोट हल्ल्याने दाखवून दिले.

या हल्ल्याला प्रथम सामोरे गेले ते डिफेन्स सिक्युरिटी कोअरचे जवान व अधिकारी. सैन्यदलातील निवृत्त अधिकारी या कोअरमध्ये कार्यरत असतात. ते या हल्ल्याला निधडय़ा छातीने सामोरे गेले खरे पण मुळात त्यांना दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचे अद्ययावत प्रशिक्षणच मिळालेले नव्हते. मात्र देशासाठी वाट्टेल ते करण्याचे मिळालेले सैन्यातील बाळकडू त्यांनी इथे पणाला लावले. पण मुळात आता दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण प्रत्येक महत्त्वाच्या तळावरील जवानांना देणे गरजेचे आहे, असे असतानाही आपण दाखविलेले हे अक्षम्य दुर्लक्षच होते!

आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो येत्या १४ व १५ जानेवारी रोजी दोन्ही देशांमध्ये सचिवस्तरावर होणारी शांतताचर्चेची बैठक. एका बाजूला देशाच्या सीमेवर आपले जवान मारले जात असताना भारताने पाकिस्तानशी अशी चर्चा करणे कितपत हितावह आहे, असा भावनिक अतिरेकापोटी विचारला जाणारा प्रश्न व तो विचारणाऱ्यांना अपेक्षित असलेले नकारात्मक उत्तर हे केवळ भावनिकच असून ते शहाणपणाचे लक्षण नाही. ही शांतताचर्चा आपण थांबविणे म्हणजे दहशतवाद्यांच्या हल्ल्याला मिळालेले यशच असेल. कारण या शांतताचर्चेमध्ये खोडा घालणे हाच तर त्यांचा या हल्ल्यामागचा प्राथमिक हेतू होता. त्यात त्यांना पूर्णपणे यश आले, असाच त्याचा अर्थ होईल.

एक चांगली बाब म्हणजे पाकिस्तान सरकारने या हल्ल्यानंतर लगेचच या दहशतवादी कृत्याचा निषेध केला. म्हणजे दाखवण्यापुरते तरी ते दहशतवाद्यांसोबत नाहीत, ही चांगलीच गोष्ट आहे. शिवाय पाकिस्तान सरकारही सध्या दहशतवाद्यांच्या तेथील सततच्या हल्ल्यांनी, बॉम्बस्फोटांनी वैतागलेले आहे. त्यामुळे भारतासोबतची शांतताचर्चा ही त्यांचीही गरजच आहे. त्यामुळे ही शांतताचर्चा पुढे नेण्यासाठी नेमकी हीच योग्य वेळ आहे, हे भारताने लक्षात घ्यायला हवे आणि पाकिस्तान सरकारने केलेला निषेध केवळ दिखाऊ नसेल तर त्यांनीही एका बाजूला भारताशी चर्चा सुरू ठेवून दुसरीकडे दहशतवाद्यांवर कडक कारवाई करत आपल्या भूमिकेमागील प्रामाणिकपणा सिद्ध करायलाच हवा! दरम्यान मोदींच्या ‘लाहोर शिष्टाई’नंतर झालेल्या या पठाणकोट हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर शांतताचर्चेच्या निर्णयाबाबत अविचल राहून दहशतवाद्यांना वेगळा संदेश देणे आणि त्याचवेळेस दुसरीकडे ‘जैश ए मोहमद’ आणि ‘लष्कर ए तय्यब’ या दोन्ही दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करण्यास पाकिस्तानला भाग पाडणे, अशी दुहेरी रणनीती असलेला शिष्टाईमागचा खरा बाणा भारताला दाखवावा लागेल.
01vinayak-signature
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
twitter – @vinayakparab