01khadiwaleविविध प्रकारचे मसाले हा भारतीय पाककलेमधला महत्त्वाचा घटक. हे मसाले खाद्यपदार्थाची लज्जत तर वाढवतातच पण स्वतंत्रपणे पाहिलं तर ते आरोग्याच्या दृष्टीनेही बहुगुणी आहेत.

कारळे
खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.
कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील. कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

जवस
आजकालच्या पुणे-मुंबईसारख्या शहरी जीवनात नवीन पिढीला ‘जवस’ या मसाल्याच्या पदार्थाची क्वचितच ओळख आहे. एक काळ खेडोपाडी ज्वारीच्या भाकरीबरोबर जवसाची चटणी व कच्चा कांदा यामुळे कष्टकऱ्यांच्या, भरपूर श्रम करणाऱ्या कामकऱ्यांच्या जेवणाला वेगळीच रंगत येत असे. जवसाबरोबर कमी-अधिक प्रमाणात तीळ, शेंगदाणे कूट, किसलेले कोरडे खोबरे, अल्प प्रमाणात लसूण, चवीपुरते तिखट, मीठ अशी भन्नाट चटणी एकदा करून बघाच. एक भाकरी जास्त जाणार.

जिरे
जिथे स्त्री-पुरुषांच्या आर्तव, शुक्र व मूत्रसंबंधी विकारात तसेच जीभ, आमाशय, लहान आतडय़ाच्या विकारात उत्तम काम देते. रुची उत्पन्न करणाऱ्या पदार्थात जिरेचूर्ण श्रेष्ठ आहे. असे असूनही ते उष्णता वाढवत नाही. उलट पित्त कमी करते. सर्व प्रकारच्या गॅसवरच्या औषधात जिरे प्रमुख घटक आहे. जिरेचूर्ण ताजेच असावे. ताकाबरोबर घ्यावे.
स्त्रियांच्या पांढरे जाणे, धुपणी या तक्रारीत रात्री एक चमचा जिरे एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. पांढरे जाणे आठ-पंधरा दिवसांत कमी होते. जीरकाद्यारिष्ट हे तयार औषधही श्वेतप्रदरावर मात करते. पुरुषांच्या लैंगिक दुर्बलता, वारंवार स्वप्नदोष होणे, स्त्री-पुरुषांच्या मूत्रेंद्रियाची आग होणे, कंड सुटणे या विकारात याच प्रकारे जिरे-पाणी घ्यावे. जिरेपाक पौष्टिक आहे.

तीळ
सर्वेभ्यस्त्विह तैलेभ्यस्तिलतैलं विशिष्यते।
उष्ण प्रकृतीच्या व्यक्ती सोडल्या तर तीळ व तिळाचे तेल यासारखी; निरोगी, निकोप व दीर्घ आयुष्य जगू इच्छिणाऱ्यांकरिता रोज वापरू शकू अशी साधी, सोपी चीज नाही. आयुर्वेदात तेल म्हटले की फक्त तीळ तेलच अशीच प्रथा आहे. स्थूल माणसाला वजन कमी करायला तसेच कृश व्यक्तीचे वजन वाढवायला तीळ उपयुक्त आहेत. दर क्षणाला शरीराची झीज होत असेल. शरीरयंत्र चालवायला काहीतरी वंगणाची गरज आहे. असे वंगण तेल, तूप, मांस, चरबी यात असते. पण ते पचायला खायला सोपे आहे, परवडणारे आहे असे तिळाचे तेल आहे. शरीरात जिथे जिथे लहान सांध्यांची झीज होते तेथे बाहेरून मसाज करून व पेटात अल्पमात्रेत घेऊन सांधेदुखी कमी होते.
आधुनिक औषधीशास्त्राप्रमाणे तिळामध्ये लोह, कॅल्शिअम व फॉस्फरस आहे. ज्या मुलामुलींची पुरेशी वाढ होत नाही, सांधे, स्नायू थोडय़ाशाही श्रमाने थकतात त्यांनी नियमितपणे ‘तिळगूळ’ माफक प्रमाणात खावा. त्यामुळे कुपोषण टळेल. आजकाल खेडोपाडी सरकार गरीब मुलांकरिता दूध किंवा पौष्टिक आहाराचा विचार करताना दिसत आहे. नियमित तिळगुळाची वडी अधिक चांगली. फक्त वडी खाल्ल्यानंतर खळखळून चुळा भरणे दातांच्या आरोग्याकरिता आवश्यक आहे. ज्यांना कृमी आहेत त्यांच्या तिळगुळात थोडे वावडिंग किंवा मिरपूड मिसळावी. केसांच्या चांगल्या वाढीकरिता चमचाभर तीळ रोज चावून खावे.
जी लहान मुले अंथरुणात शू करतात त्यांच्याकरिता तीळ, हळद, आवळकाठी व ओवा असे चूर्ण नियमितपणे जेवणानंतर द्यावे. ज्यांचे दात हालतात, मजबूत नाहीत त्यांनी एक चमचाभर तीळ नियमितपणे सावकाश चावून खावे. ज्यांना तीळ चावून खाण्याचा कंटाळा आहे त्यांनी चमचा-दोन चमचे तेल रोज प्यावे. तीळ तेल प्यायल्याने कृश व्यक्तीचे वजन वाढते. तीळ तेल जंतावरही उपयुक्त औषध आहे. ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर पुरेसे दूध येत नाही त्यांनी दोन चमचे तिळाचे तेल रोज सकाळी प्यावे. स्त्रियांना अंगावर विटाळ कमी जात असेल त्यांनी तीळ नियमित खावेत किंवा तेल प्यावे. दुर्बल पुरुषांचं वीर्य बलवान होण्याकरिता तिळाचे लाडू खावे. ज्या स्त्रियांना अंगावर खूप जाते त्यांनी लोणी किंवा गाईच्या तुपाबरोबर तीळ सेवन केले तर फाजील आर्तव कमी होते.
अभ्यंगमाचरेत् नित्यं स जराश्रमवातहा!
असे आयुर्वेद सांगतो. त्याचा आधार तीळ तेलाचे गुण आहेत. तीळ तेलाचे नित्य मसाज सर्वागाला सकाळ-सायंकाळ केल्यास निकोप, निरोगी दीर्घायुष्य नक्कीच प्राप्त होणार. म्हातारपण लांब राहील. मसाज नियमित केला तर भूक चांगली लागते. शरीराचे थकलेले स्नायू पूर्ववत काम देऊ लागतात. कोणतेच श्रम जाणवत नाहीत. कोणीही माणूस सत्तर वर्षांपर्यंत तरुणासारखे काम करू शकतो.
ज्यांचा शुक्र धातू क्षीण आहे, मधुमेह नाही पण लघवीला वारंवार जावे लागते, हस्तमैथुनासारख्या खराब सवयीमुळे किंवा फाजील वीर्यस्खलनाने कमजोरी आली आहे त्यांनी नियमित तिळकूट खावे. चवीला खोबरे वापरावे. ‘एड्स’ या विकारात ओजक्षय होतो. या महाभयंकर शोष विकारात याचा उपयोग करून पाहायला हवा.
कोणी खाऊ नये : उष्ण प्रकृती, डोळ्यांची आग होणारे, हातापायांची आग होणाऱ्यांनी, लघवील तिडीक मारणे किंवा संडासवाटे, लघवीवाटे रक्त पडत असेल तर तीळ खाऊ नयेत. त्वचाविकार, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, कंड व मधुमेह या विकारात तीळ खाऊ नयेत.

दालचिनी
दालचिनी मसाल्याच्या पदार्थात अत्यावश्यक आहे. यात सिनॅमम नावाचे तेल असते. पाण्यापेक्षा वजनाने हे तेल जड असते. दालचिनी गुणाने तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, पित्तकर, वजन घटविणारी, चवीने मधुर व कडवट आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या दालचिनीत तेलाचे प्रमाण फार कमी असते. परदेशांत यापेक्षा चांगल्या दर्जाची गुणवान दालचिनी वापरतात. कोकाकोला या प्रसिद्ध पेयात दालचिनी तेल असते.
दालचिनी ही अपचन, अजीर्ण, मुरडा, आतडय़ाची सूज, पोटदुखी, ग्रहणी, आचके, आर्तवशूल, पित्ताच्या उलटय़ा, मलावरोध, शोष पडणे, वजन घटणे इत्यादी विकारात उपयुक्त आहे. त्वचेला वर्ण सुधारण्याकरिता दालचिनीचा विशेष उपयोग होतो. सर्दी दूर करण्याकरिता दालचिनीचा अर्क कानशिलाला चोळून लावतात.
अनेक प्रकारच्या वातविकारांत दालचिनीचे तेल बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. दालचिनीच्या तेलात बुडवलेला कापूस योनीमध्ये ठवून योनिभ्रंश कमी करता येतो. अंग गार पडत असल्यास दालचिनीचे तेल चोळावे, ऊब येते, दालचिनीचे चूर्ण व कात एकत्र करून घेतल्यास आमांशाची खोड मोडते. वरचेवर संडास होणे थांबते. दालचिनी व किंचित सुंठ चूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, व किंचित सुंठचूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, लवंग, सुंठ असा काढा सांज-सकाळ घ्यावा.
सुका खोकला, आवज बसणे, तोंडाला रुची नसणे, कफ सहजपणे न सुटणे, गायक व वृद्ध यांच्याकरिता दालचिनी चूर्ण व खडीसाखर हा उत्तम योग आहे. कडकी, जुनाट ताप, अग्निमांद्य, हाडी मुरलेला ताप याकरिता दालचिनी व वेलची व खडीसाखर चूर्ण असे मिश्रण लहानथोरांनी वापरून पाहावे. कोणत्याही साखरेपासून बनणाऱ्या मिठाईत स्वाद व पाचनाकरिता दालचिनी चूर्ण अवश्य वापरावे. सीतोपलादि या प्रसिद्ध चूर्णातील एक घटकद्रव्य दालचिनी आहे. आयुर्वेदातील अनेकानेक प्राश, अवलेह, विविध टॉनिक औषधांमध्ये दालचिनीचा मुक्त वापर, वेलदोडा, लवंग, तमालपत्र, नागकेशर अशांबरोबर केला जातो. दालचिनीच्या काढय़ांचा उपयोग विविध औषधांचा खल करताना ‘भावनाद्रव्य’ म्हणून केला जातो. दालचिनीमातेला अनेकानेक प्रणाम!

धने
ताज्या कोथिंबिरीच्या अभावी धने वापरावे. मात्र ते किडके नसावेत. धने अतिथंड आहेत. पण रुची उत्पन्न करतात. लघवीची आग, खूप घाम येणे, लघवी कमी होणे, खूप तहान लागणे, विषारी पदार्थाची अॅलर्जी, अंगाला खाज सुटणे, डोळ्यांची व हातापायांची आग अशा नाना विकारांत धनेचूर्ण पोटात घ्यावे. जेथे आवश्यक तेथे धने वाटून लेप लावावा किंवा डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर चूर्णाची पुरचुंडी ठेवावी. गोवर, कांजिण्या, तीव्र ताप, कडकी या विकारांत धने ठेचून पाण्यात कुसकरून त्याचे पाणी गाळून घ्यावे. डोळे येण्याच्या साथीत धन्याचे पाणी गाळून डोळ्यात टाकावे. लाली, चिकटा, स्राव कमी होतो.
तापामध्ये खूप स्ट्राँग औषधे घेऊन, खूप घाम आला असेल तर धनेपाणी प्यावे. म्हणजे थकवा कमी होतो. मूतखडा विकारग्रस्त रुग्णांनी एक चमचा धने रात्रौ ठेचून एक कप पाण्यात भिजत टाकावेत. सकाळी ते धने चावून खावे व वर तेच पाणी द्यावे. लघवीचे प्रमाण तात्काळ वाढते.

बडीशेप
बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोडय़ांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते. जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामथ्र्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे काम करते. पोटात वायू धरू देत नाही. तसेच आमांश किंवा चिकटपणा दूर करते. जेवणानंतर विडय़ाबरोबर किंवा नुसती बडीशेप खाण्याचा प्रघात हा अतिशय चांगला आहे. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे यांसारख्या अपचनाच्या सर्व तक्रारींत बडीशेप, बडीशेपेचा काढा किंवा अर्क उत्तम काम करतो.
काहींना सोनामुखी, एरंडेल किंवा जुलाबाची स्ट्राँग औषधे घेण्याची सवय असते. ही औषधे घेतली की पोटात कळ येऊन पोट दुखू लागते. अशा वेळी बडीशेप व चिमूटभर सुंठ घेतले की लगेच आराम पडतो. थोडक्यात, जिभेपासून पक्वाशयापर्यंतच्या अन्नवह महास्रोतसांचे आरोग्य राखण्याचे कार्य बडीशेपेसारखी लहान वस्तू करू शकते. पोट दुखून जुलाब होत असल्यास बडीशेप व खसखशीचा काढा प्यावा. जुलाब थांबतात.
लहान बालकांना दात येताना जुलाबाचा त्रास होतो. त्याकरिता त्यांना चुन्याच्या निवळीबरोबर बडीशेप चूर्ण द्यावे.
मानसविकारात, बुद्धिमांद्य, फिट्स येणे, उन्माद या तक्रारींकरिता बडीशेप काही प्रमाणात उपयोगी पडते. बडीशेप ही वीर्यवृद्धी करते, जिभेचा चिकटा दूर करते. त्यामुळे बुद्धी ज्यांना नेहमी तरतरीत ठेवायची आहे त्यांनी बडीशेप खावी. फिट्स विकारात गार्डिनाल, डिलान्टिन, मेझाटोल अशा नाना औषधांची जन्मभर सवय लागून माणसाचा मेंदू काम करेनासा होतो तेव्हा बडीशेप चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. स्मरणशक्ती सुधारते.
तापामध्ये शोष पडतो. अंगाची लाही लाही होते. आग आग होते. अशा वेळेस बडीशेपेचे उकळलेले पाणी खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे. उन्हाळय़ातील उलटय़ा, तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे, छातीतील जळजळ या तक्रारींकरिता बडीशेपेचा काढा थोडा थोडा घ्यावा. पोटात अन्न कुजत असेल तर निरनिराळे क्षार, पादेलोण, शिरका, व्हिनेगर अशा औषधांची सवय लागलेल्यांनी थोडी बडीशेप खावी. आतडय़ांची हानी टळते.

मिरची : खावी न खावी
मीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्यवहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी मिरी वापरतात. पण मिरची नाही असा स्वयंपाक सहसा होत नाही. दक्षिण भारतात विशेषत: आंध्र प्रदेशात मिरचीचा वापर फार. मिरचीमुळे भोजनास चव येते, स्वादिष्ट होते, तोंड स्वच्छ राहते, भूक राहते, लागते. मिरची आपल्या तीक्ष्ण, उष्ण व पित्तवर्धक गुणांमुळे रक्तवर्धक आहे. काही प्रमाणात कफ, आमांश, कृमी आमांशाची पोटदुखी, उदरवात या विकारांत उपयोग होतो. कॉलरा विकारात माफक प्रमाणातच खाल्ल्यास उपयोग होतो. सुकलेली मिरची वातनाशक आहे. ज्याचे शरीर गार पडते, ज्यांना उष्णतेचा किंवा रक्त पडण्याचा काही त्रास नाही त्यांना सर्दी झाली असल्यास मिरचीच्या बियांच्या चूर्णाचा उपयोग होईल. सर्दी, कफ यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोट दुखते, त्यांनी मिरचीच्या बियांचे उकळलेले गरम पाणी किंवा मिरच्यांचा अर्क घ्यावा. ज्यांना उष्ण पदार्थ चालत नाहीत त्यांनी हा प्रयोग करू नये. भाजलेल्या जागेवर तिखटाचे चूर्ण व गोडेतेल असे मिश्रण लावावे. त्वचा लवकर भरून येते. त्वचेत जखम होत नाही.
काहींना खूप मिरच्या खायची सवय असते. ती सवय सोडण्याकरिता मिरच्यांचा वापर चढउतार पद्धतीने म्हणजे तीन, चार, दोन, अडीच, दीड, दोन, एक, दीड, अर्धी अशा पद्धतीने करावा. पंधरा दिवसांत मिरची जास्त खाण्याची सवय सुटते.
मिरच्यांमधील बी हे शरीराचा दाह करणारे आहे. मिरच्यांचे बी काढून टाकावे. नुसत्या टरफलांचे चूर्ण करावे. हे चूर्ण कॉलरा, हगवण, आमांश या पोटाच्या तक्रारींत विविध अनुपानाबरोबर वापरावे. कांदा रस, हिंग, कापूर, डाळिंबाचे दाणे, चिंच, गूळ, आले, जिरे, पुदिना, लिंबू अशा विविध पदार्थाबरोबर आवडीनुसार मिरची चूर्ण वापरता येते. पूर्णपणे बंद झालेला अग्नी मिरचीच्या माफक वापराने पूर्ववत कामात आणता येतो. मिरच्यांमध्ये काही जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे त्वचेत किडा-मुंगी किंवा कुत्रा, कोळी यांची विषबाधा झाली तर जखमेत मिरची बी चूर्ण भरून लावावे. विषबाधा होत नाही. दारुडय़ा माणसाला भूक लागत नसल्यास मिरचीच्या तिखटाचा उपयोग होतो. मिरचीने पोटात आग पडत असल्यास मिरचीच्या तिखटाबरोबर थोडा चुना मिसळावा.
मिरचीने जेवढे रोग बरे होऊ शकतील त्यापेक्षा अनेकपट रोग मिरचीच्या कमी-अधिक वापराने होतात. असलेले रोग वाढतात. वाढलेले रोग बळावतात. मिरची तीक्ष्ण, उष्ण व अतिशय रूक्ष आहे. रक्तातील दाहकता मिरचीच्या वापराने वाढते. त्यामुळे रसधातूंतील स्निग्धपणा, सौम्यपणा, मिरचीच्या अधिक वापराने नाहीसा होतो. शरीरातील मृदू, कोमल, सौम्य अवयवांचा नाश मिरचीमुळे होतो. केस, डोळे, नाक, ओठ, जीभ, घसा, गळा, सर्व आशय उदाहरणार्थ अमाशय, ग्रहणी, लहान व मोठे आतडे, गर्भाशय, स्तन, किडनी, मूत्रेंद्रिय, त्वचा, गुद इत्यादी अवयवांचे स्वास्थ्य मिरचीच्या कमी-अधिक वापराने बिघडते.
अजीर्ण, आम्लपित्त, अल्सर, अॅलर्जी, डोळे, त्वचा, मूत्रेंद्रिय, गुद यांची आग होते. पोटात आग पडणे, आमांश, अंग बाहेर येणे, रक्तप्रदर, अत्यार्तव, उलटय़ा, कंडू, सांधेदुखी, कंबर, गुडघे व पाठदुखी, कान वाहणे, कावीळ, केस गळणे, पिकणे, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गांधी उठणे, डोळय़ांची लाली, तोंड येणे, त्वचाविकार, दंतविकार, नागीण, अनिद्रा, पांडू, भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, फिटस् येणे, रक्तक्षय, मुखरोग, हाडांचे विकार इत्यादी विकारांत मिरची चूर्ण वज्र्य करावे. तिखटपणा व पचनाकरिता आले किंवा मिरी यांचा वापर करावा. ज्यांना जेवणात तिखट हवे पण मिरचीचे दोष नकोत त्यांनी ढोबळी मिरची वापरून पाहावी. ‘ढोबळय़ा मिरचीचे पंचामृत’ ही वैद्य खडीवाल्यांची खास खास रेसिपी प्रसिद्धच आहे. त्याकरिता ‘नैवेद्यम’ पुस्तकाची मदत जरूर घ्यावी.

मिरी
त्रिकटू या संज्ञेने आयुर्वेदात ओळखल्या जाणाऱ्या सुंठ, मिरी व पिंपळी यांच्यातील भूक वाढविण्याच्या गुणात मिरी श्रेष्ठ आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सर्व रोगांचे मूळ कारण बहुधा अग्निमांद्य हे असते. अग्नीचे बळ वाढविण्याकरिता शेकडो पदार्थ, औषधे वा उपाय आहेत, पण एक-दोन मिरे चावून खाल्ल्याने जे काम लगेच होते ते इतर पदार्थाकडून होत नाही.
पित्तप्रकोपी तीक्ष्णोष्णं रूक्षं दीपनरोचनम्।
रसे पाके च कटुकं कफघ्नं
मरिचं लघु॥
मिरीच्या व्यावहारिक तपशिलात जाण्याअगोदर मिरीचा एक गमतीदार इतिहास व त्याची भारताच्या शोधाकरिता झालेल्या अनमोल मदतीची कथा खूपच वाचनीय, रोचक आहे. प्राचीन काळापासून युरोपात बहुसंख्य जनता मांसाहार करीत आलेली आहे. या मांसाहारात त्यांना मिरी ही ‘मस्ट’ असते. सतराव्या शतकात मध्य आशियात ख्रिश्चन-मुस्लीम धर्मयुद्ध झाले. त्या काळात भारताचा युरोपशी व्यापार ‘खुष्की’च्या मार्गानेच होत असे. हा मार्ग अचानक बंद झाला. ‘आपणास मिरी पुरवणारा हिंदुस्थान हा देश कुठे आहे, हे शोधण्याकरिता कोलंबस समुद्रमार्गाने निघाला. पण तो चुकून अमेरिकेकडे गेला. त्यानंतर इतरांनी ही चूक सुधारून भारत शोधला. असो. अशी ही ‘मिरी शोधार्थ समुद्रसफर’ कथा आहे.
मिरी ही शरीरात खोलवर पोहोचून शरीरातील सर्व वहनसंस्थांना, सर्व धातूच्या प्रमुख अवयवांना उष्णता पुरवते. त्या त्या भागात फाजील कफ साठू देत नाही. शरीरात सार्वदेहिक ऊब देण्याचे काम मिरी करते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तापात मिरी चूर्ण, पाणी, उकळून काढा, मध किंवा तुळशीच्या रसाबरोबर चाटण, मिरी व तूप अशा विविध प्रकारे मिऱ्याचा वापर होतो. ज्या तापात अरुची, मंद भूक कफ अशी लक्षणे आहेत, तेथे एकमेव मिरी उत्तम काम देईल. आजकाल वाढत चाललेल्या हिवतापावर, थंडी भरून येणाऱ्या तापावर मिरी तुळशीच्या रसाबरोबर दिल्यास तापाला उतार पडतो. भूक सुधारते. रुची येते. आयुर्वेदीय औषधी महासागरात अनेकानेक बल्य औषधे, टॉनिक आहेत. त्यातील वसंत कल्पात लघुमालिनी, मधुमालिनी, सुवर्णमालिनीमध्ये मिरी हे प्रमुख घटकद्रव्य आहे.
अरुची, तोंडाला चिकटा, घशात कफ या विकारांत ओली मिरी व लिंबूरस असे लोणचे वरदान आहे. एक-दोन मिरी लिंबूरसात कुस्करून ते चाटण खाल्ल्याबरोबर दोन घास अन्न जास्त जाते. अंगी लागते. आमाशयांत डब्बपणा होत नाही. ज्यांना एवढय़ा-तेवढय़ा जास्त जेवणाने अजीर्ण होते त्यांनी भोजनानंतर ताकाबरोबर किंचित मिरी चूर्ण घ्यावे. मलप्रवृत्तीला वेळ लागत असल्यास, घाण वास मारत असल्यास, जंत व कृमी यांची खोड मोडण्याकरिता जेवणात नियमाने मिरपूड वापरावी.
कृश व लहान बालकांकरिता विशेषत: वय तीन ते सात वर्षेपर्यंत मुलांची प्राकृत वा निकोप वाढ होण्याकरिता मिरी व मध असे चाटण नियमित द्यावे. खाल्लेले अंगी लागते. वेळच्या वेळी वजन वाढण्यास सुरुवात होते. सुतासारखे बारीक कृमी, संडासच्या जागेची सूज व त्यामुळे संडासवाटे रक्त पडणे याकरिता मिरी चूर्ण गरम पाणी व तुपाबरोबर द्यावे.
शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, चकंदळे, खाज या विकारांत बाहेरून लावण्याकरिता तूप व मिरेपूड असे मिश्रण घासून लावावे. तसेच औषध पोटात घ्यावे. सर्दी, कफ, दमा या विकारांत नेमाने मधाबरोबर मिरी चूर्णाचे चाटण घ्यावे. मासिक पाळी साफ होत नसेल, फाजील चरबी वाढली असेल तर मिरीचा काढा किंवा चूर्ण सकाळी रिकाम्यापोटी घ्यावे. दाढदुखी किंवा दातातून पू येणे, घाण वास मारणे या तक्रारींत मिरी उकळून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
रांजणवाडी या विकारात मिरी उगाळून त्याचे गंध बाहेरून पापणीला लावावे. रांजणवाडीची सूज कमी होते. जुनाट सर्दी, डोकेदुखी, नाक चोंदणे या विकारात प्रथम नाकात तूप सोडावे व त्यानंतर मिरी उकळलेले पाणी सोडावे. नाकाला इजा न होता नाक मोकळे होते.
मिरी ही योगवाही आहेत. मिरी ज्या ज्या पदार्थाबरोबर आपण वापरू त्या त्या पदार्थाचे व स्वत:चे असे दोन्ही प्रकारचे गुण शरीरात खोलवर पोहोचवते. मिरी भेदनाचे, शरीरातील फाजील दोषांचा संचय नाहीसा करण्याचे उत्तम काम करते. स्थूलपणा, फाजील चरबी कमी होण्याकरिता रोजच्या आहारात दोन-तीन मिरी हवीत. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी मिरी तारतम्याने वापरावी..