आपल्याला पाऊस माहीत असतो तो ‘नेमेचि’ येणारा. ठरलेले दिवस पडणारा आणि नंतर गायब होऊन चातकासारखी वाट बघायला लावणारा. अरुणाचल प्रदेशात मात्र पाऊस जवळजवळ रोजच पडतो.

पाऊस यायच्या आधीपासून ‘लोकप्रभा’ मध्ये सुरू झालेले ‘मान्सून डायरी’ हे सदर दरवर्षीप्रमाणेच वाचनीय होते. यंदा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा वेध घेतो आहे. त्याबद्दलचे प्रज्ञा शिदोरे यांचे लेख वाचले. तुम्हा-आम्हा सामान्य पर्यटकांना श्रीनगर, काश्मीर, राजस्थानमधील उदयपूर, जयपूर, दक्षिणेतील मदुराई, रामेश्वर, कन्याकुमारी; उत्तर प्रदेशातील आग्रा, मथुरा, वाराणसी, प्रयाग; कर्नाटकमधील बंगलौर, म्हैसूर, उटी अशा विविध स्थळांची खूप माहिती, आकर्षण आहे. पण ईशान्येकडील सात राज्ये पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम, सिक्कीम, मेघालय व अरुणाचल प्रदेश याबद्दल बहुतेकांना खूपच कमी माहिती असते. या लेखांमुळे मला मी काही काळ अरुणाचल प्रदेशामध्ये वास्तव्याला होतो आणि तिथला पाऊस अनुभवला होता, त्याची आठवण झाली.
माझे वय आता ८२च्या आसपास आहे. त्यातील १७ वर्षे मी भारतीय विमानदलात चाकरी केली. माझ्या दृष्टीने आयुष्यातील सर्वात ‘फ्रुटफूंल’ आनंदी, भरपूर समाधान देणारा असा हा काळ होता. त्यातील्ां दोन वर्षे मी ईशान्येकडील मेघालय, आसाम व अरुणाचल प्रदेशातील खूप-खूप दुर्गम भागात काढली. ही दोन वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सोनेरी वर्षे. १९६६ मध्ये मथुरेहून माझी बदली थेट ‘नेफामध्ये’ म्हणजे अरुणाचल प्रदेशात जाण्याकरिता प्रथम शिलाँग येथे झाली. शिलाँगमधील माझ्या काही विलक्षण आठवणींचा प्रत्यय आजही तुम्ही-आम्ही वेगळय़ा तऱ्हेने अनुभवत आहोत. शिलाँगमध्ये खासी जमातीचे प्राबल्य फार. त्या टोळीतल्या मंडळींना फार पूर्वीपासून स्कॉटिश ख्रिश्चन मिशनरी मंडळींनी गाठले. त्यांच्या भाषेत व रोमन लिपीमध्ये बायबलची पुस्तके छापून आपलेसे केले. त्यामुळे १९६६ सालामध्ये शिलाँगच्या बसमध्ये बसताना आमच्या शेजारी आम्ही जणू काही ‘अछूत आहोत’ अशा भावनेने बसायचे, टाळायचे. त्या काळात आम्ही हिंदुस्थानी त्यांना परके वाटायचो. त्या सात पूवरेत्तर राज्यांमध्ये अजूनही उर्वरित भारतीयांबद्दल प्रचंड अविश्वास, राग व संताप याचे प्रत्यंतर आपणाला वारंवार येते.
शिलाँगमधल्या बाजारात सर्वत्र स्त्री साम्राज्य; पुरुष विक्रेते अपवादात्मक! पुरुष ‘तीर’ नावाचा मटका खेळण्यात भूषण मानायचे. सायंकाळी एका मोकळय़ा मैदानात दोन तिरंदाज गट थोडय़ा अंतरावरून तीर मारणार व जितके तीर त्या फळय़ावर घुसून टिकतील तसा तो ‘ओपन-क्लोज’ असा आकडा सट्टय़ाकरिता निघायचा. आमच्या कँपमधून जुगार खेळणारी मंडळी रोज येऊन प्रथम सट्टय़ांचे तिकीट चार आणे ते रुपया इतक्या किमतीचे घ्यायचे. चार आण्याच्या सट्टय़ाचे तिकीट आमच्या एका मित्राला चांगलेच फळले. त्याचा नंबर बरोबर लागला; त्याला १६०० रुपये मिळायचे होते. म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर दोघे जण सुरक्षेकरिता गेलो. शिलाँगच्या बाजारात भरगच्च गर्दीत मळक्या कपडय़ात तो सट्टेवाला बुकी बसला होता, आम्ही त्याच्या हातात तो कागदाचा छोटा तुकडा दिला. त्याने आमचेकडे वर-खाली पाहिले; आणि तुकडय़ाच्या चिंध्या करून खाली टाकल्या. आम्हा तिघांना क्षणभर काही सुचेनासे झाले; पण क्षणात त्या बुकीने जवळच्या खणातून १६०० रु. काढले. आमच्या हातात ठेवले. त्या वेळचा आमचा चेहरा काही विलक्षणच होता. जुगारात ही अशी सचोटी लागते, असा त्या शहराचा लौकिक होता! टोळीवाल्यांचा हा तीर नावाचा जुगार शासनमान्य होता, असो.
शिलाँगजवळ चेरापुंजी येथे अधूनमधून आमची ट्रिप घेऊन विमानदलाची गाडी जायची. चेरापुंजी हे देशातील प्रचंड पर्जन्यमानाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. एवढा प्रचंड पाऊस पडूनही त्या छोटय़ाशा गावात पिण्याच्या पाण्याची बोंब होती. चेरापुंजी गावाला लागूनच बांगला देशाची सरहद्द होती. त्या सरहद्दीवरून दिवस-रात्र चिनी वस्तूंची स्मगलिंग जोरात व्हायची. एक रुपयामध्ये हवाई चप्पल, हजारोंनी त्या चौकीतून बिनधास्त यायच्या. आम्हा मंडळींना घराकडून या स्वस्त हवाई चपलेच्या ऑर्डरी असायच्या. चिनी कापड मिळायचे. रोज सकाळी त्या सरहद्दीवरच्या चौकीतून बांगलादेशीय मजूर विनाचौकशी यायचे. रोजंदारी करून सायंकाळी परत जायचे. आपल्या भारतीय प्रशासनाच्या ढिलेपणामुळे बांगलादेशीय घुसखोरीची समस्या आपण खूपच अनुभवत आहोत. या समस्येचे मूळ बांगलादेशीय दारिद्रय़ात आहे, हे मी सांगावयास नकोच. शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी. शिलाँग व अप्पर शिलाँग असे या शहराचे दोन वेगळे भाग आहेत. मेघालय या राज्याच्या नावात ‘मेघ’ किंवा ढगाचे का नाव आहे ते कळायला ‘अप्पर शिलाँगमध्ये’च पावसाळय़ाच्याा काळात जाऊन राहायला हवे. अप्पर शिलाँग येथील भारतीय विमानदलाच्या रडार युनिटमध्ये काम करणाऱ्या वायू सैनिकांकरिता एक मोठी बरॅक होती. त्यात आम्ही चाळीस पंचेचाळीस जण राहायचो. या प्रचंड बराकीला दोन्ही बाजूला तीन-तीन याप्रमाणे सहा दरवाजे व बारा मोठय़ा खिडक्या होत्या. खूप-खूप थंडी, गार वाऱ्यामुळे दरवाजे बंद असत. पण खिडक्या उघडय़ा असत. आकाशात ढग जमू लागले की या खिडक्यातून खूप मोठमोठाले ढग आमच्या बराकीत एका खिडकीतून यायचे, दुसऱ्या खिडकीतून निघून जायचे. ही ढगांची प्रचंड मोहक आयात बघणे म्हणजे एक विलक्षण सौंदर्यानंद होता. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात पांढराशुभ्र कपडे घातलेला सांताक्लॉज कसे आनंददायी दर्शन देतो! तसे हे ढग आमच्या डोळय़ासमोर रोज सकाळ-दुपार वा सायंकाळी ये-जा करायचे. त्या वेळेस आत्तासारखे कॅमेरे नव्हते याचे शल्य आता वाटते. कवी मंगेश पाडगावकर यांच्या विलक्षण कवितेचा उल्लेख करण्याचा मला मोह होत आहे.
घन बरसत बरसत आले
वनी मोरांचा षड्ज
झाडातून मल्हार जागला
मन चकित, सुगंधी जाहले
घन बरसत बरसत आले।
घन बरसत बरसत आले
शिवधनुष्य गडगडले वरती
सुखावली आशेने धरती
खग तोरण धरीत उडाले..॥
मी शिलाँगमध्ये होतो तेव्हा माझ्या मित्राच्या शिलाँगमधील निवासात अधूनमधून चक्कर मारायचो. या भागात काही वेळा महाप्रचंड थंडीमुळे भर दुपारीसुद्धा शून्य अंश डिग्री तपमान असायचे. शिलाँगमध्ये त्या काळातील सर्व घरांत; आपल्याकडे दगडी फरशा असतात, त्याऐवजी तेथे लाकडी जाड-जाड फळय़ांचा वापर केलेला असे. शिलाँगमध्ये वर्षांतील आठ महिने प्रचंड पाऊस व महाभयंकर थंड हवामान व अनेक दिवस सूर्यप्रकाश पूर्णपणे गायब. यामुळे घरच्या जमिनीवरील लाकडी फळय़ांना प्रचंड बुरशी यायची. ही बुरशी घासून घासून रोज काढून टाकणे, यात या तेथील महिलांचे रोज तास-दोन तास जायचे.
शिलाँग येथून माझी दोन वर्षांकरिता अरुणाचल प्रदेशातील ‘तेजू’ या ए.एल.जी.- अ‍ॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड अशा अत्यंत दुर्गम ठिकाणी बदली झाली. त्या काळात भारतीय विमानदलाची अतिदुर्गम भागात अरुणाचल येथे सहा ए.एल.जी. ठिकाणे होती. त्यांची थोडी गमतीदार नावे पुढीलप्रमाणे हायलाँग, इनकियांग, डाफरजू, जिलाँग. असो. या सगळय़ांचे हेडक्वार्टर आसाममधील शेवटच्या दिब्रूगड रेल्वे स्टेशनच्या अलीकडील छबुआ विमानतळावर होते. प्रथम त्यामुळे मला छबुआ येथे जावे लागले. त्या काळात आसाम मेल हे रेल्वेचे प्रवासाचे साधन होते. आपण त्या भागातील विविध दहशतवाद्यांच्या कथा- ‘युद्धस्य कथा रम्य:’ या न्यायाने वाचतो. मित्रहो, त्या काळातही आसामची राजधानी गुवाहट्टी येथून दिब्रूगडचा रेल्वेचा एकमार्गी प्रवास काही भागात खूप धोक्याचा असे. रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूला महाप्रचंड, प्रचंड वृक्षांचे घनदाट जंगल, मानवी वस्तीचा जवळपास पूर्ण अभाव! अशा वेळेला क्वचित सायंकाळी व रात्री रेल्वे बंद पडली तर आमच्यासारख्या सैनिकांचाही धीर सुटायचा. असे एकदम शांत शांत रात्रीचे वातावरण मी दोनदा अनुभवले आहे. यात नेहमीचा जोराचा पाऊस आला की मग बघायलाच नको. आपण ब्रह्मपुत्रा नदीबद्दल नेहमी वाचतो. ब्रह्मपुत्रेचा एकूण पसारा महाराष्ट्रातील तथाकथित मोठय़ा नद्यांच्या दसपट आहे. दिब्रूगड व आसपासच्या परिसरात अशा दुथडी भरून वाहत असलेल्या नद्यांचे व आसपासच्या विलक्षण हिमालयीन वृक्षराजी, असंख्य झाडेझुडपे यांना कॅमेऱ्यात साठविण्याकरिता, आमच्यासारख्यांचा तोकडा पगार कसा पुरणार होता? असो.
छबुआ येथून या ए.एल.जी. युनिटला आम्हाला ने-आण करायला छोटे हेलिकॉप्टर किंवा बारीक विमानच असायचे. या आमच्या छोटय़ा तळांना जमिनीच्या मार्गाने जायला कदाचित महिना-पंधरा दिवसही लागले असते, इतका तो प्रचंड अवघड डोंगराळ प्रदेश-अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल या प्रदेशावर आपला तथाकथित शेजारी, पण खूप-खूप विस्तारवादाची हाव असणाऱ्या चीनचा या प्रदेशावर सतत डोळा आहे.
१९६६-६८ या काळात या भागात मानवी वस्ती अभावानेच होती. इथे पहाटे चार वाजता सूर्योदय व्हायचा, तर सायंकाळी चार वाजता श्रीभगवान सूर्यनारायण मावळायचे. अंधकार सुरू व्हायचा. मी राहत असलेल्या तेजू या परिसरात तेजू नावाची एक नदी वर्षभर प्रचंड वेगात खळखळत्या पाण्याने वाहणारी मोठी आकर्षक नदी होती. ब्रह्मपुत्रेच्या तुलनेत ही नदी खूप छोटी होती. पण आपल्या मुळा-मुठा नदीच्या तुलनेत खूपच मोठय़ा विस्ताराची होती. ब्रह्मपुत्रेच्या या छोटय़ा उपनदीला आणखी छोटय़ा उपनद्या, ओढे, ओहोळ होते. हे छोटे ओढे, ओहोळ केव्हा वाहतील, केव्हा नाहीसे होतील आणि पुन्हा केव्हा उगम पावतील याचा अंदाज नसे. आमच्या या छोटय़ाशा युनिटमध्ये अधिकृत स्टाफची संख्या पंधरा असली तरी आम्ही सात-आठ जणच तेथे राहायचो. सोबत त्या भागातील एक तथाकथित स्वयंपाकी, दोन्ही वेळचा एकदाच स्वयंपाक करण्याकरिता असे. त्याची एक विलक्षण आठवण सांगण्याचा मोह मला आवरत नाही. एक दिवस दुपारी ११-१२ वाजता तो स्वयंपाकी जेवण करत होता, त्याच्या समोरच आम्ही जेवण तयार होण्याची वाट पाहात होतो. एवढय़ात आमच्यासमोरून एक बेडकासारखा प्राणी सरपटत जाताना दिसला. त्याला बघताच तो स्वयंपाकी पटकन उठला, त्याने तो प्राणी आपल्या हातात पकडला; अहो भयानक आश्चर्यम्! त्याने गपकन तो प्राणी अख्खाच्या अख्खा तोंडात टाकला. आम्ही पाच-सहा जण हादरलो. आमच्यातील मेडिकल असिस्टंट या वायूसैनिकाला घामच फुटला. ‘या स्वयंपाकी माणसाला असा बेडकासारखा प्राणी खाण्यामुळे काही कमी-अधिक झाले तर मी काय करू?’ तो स्वयंपाकी मोडक्यातोडक्या हिंदी, इंग्रजीत बोलला. ‘‘आप लोग यहा आये, इस लिये ये रोटी चावल खा रहा हूँ; रोज तो हम ऐसे ही छोटे छोटे प्राणी खा के, अपना पेट भरते है.’’ असो.
या तेजू परिसरात, जवळपास वर्षांचे आठ ते दहा महिने खूप खूप पाऊस पडायचा. त्याचे तीन दिवसांचे चक्र असायचे. एक दिवस दिवसभर प्रचंड पाऊस पडायचा, दुसऱ्या दिवशी प्रचंड गारठा व्हायचा व तिसऱ्या दिवशी कडक ऊन पडायचे. त्या कडक उन्हामुळे पुन्हा पाऊस, थंडी व कडक ऊन असे अखंड चक्र चालायचे. मला या युनिटमध्ये आकाशातील विमानांशी व मुख्य युनिटशी वायरलेसवरून संपर्क ठेवण्याचे सोपे काम होते. त्याकरिता त्या काळातील गमतीदार ट्रान्समीटर- रिसिव्हर चालू करण्याकरिता व्ही इंजिन व एका इलेक्ट्रिक पंपाची जॅपसेटची मदत लागे. सकाळी एकदा तो पंप किंवा इंजिन सुरू करून टीआर ५०४३ ची टेस्ट; केंद्राशी ‘हॅलो हॅलो’ करून घेतली की माझी दिवसभराची डय़ूटी संपत असे. दिवसभर अन्य काहीच काम नाही. आम्ही ७-८ जण कसातरी दिवस काढायचो. आपण ईशान्येतील घनदाट जंगलांच्या कथा ऐकतो, वाचतो पण इथे आमच्या दुर्दैवाने सर्वत्र फक्त बोराची आणि बोरांचीच लहान-मोठी झाडी होती. तेथे नव्याने आलेला माणूस दोन-चार दिवस मोठय़ा आवडीने बोरे खायचा, नंतर कंटाळायचा. क्वचित एखादा माणूस सुट्टीवर जाताना गंमत म्हणून थोडी बोरे न्यायचा.
माझ्या दिनक्रमात सकाळी दहा वाजता जवळच्याच कुठल्या तरी ओढा वा ओव्हळावर जाऊन मस्त आंघोळ करायची, तिथेच कपडे धुवायचे, वाऱ्यावर वाळवायचे व तासाभराने परत यायचे, असा दिनक्रम असे. या नाले- ओढय़ांची एक मजेशीर गंमत मी तुम्हाला सांगतो. इथे एखाद्या मोठय़ा ओढय़ाकडे जाताना वाटेत एखाद-दुसरा छोटा ओहोळ ओलांडायला लागायचा. आंघोळ, कपडे धुणे व कपडे वाळवणे यानंतर आपण परत फिरताना तो छोटा ओहोळ एकदमच गायब झालेला असायचा. त्या महाप्रचंड निर्मनुष्य परिसरात रस्ता चुकल्यासारखे वाटायचे. खूप खूप लांबवर नजर टाकून आमचा दोन तंबूंचा निवास दृष्टीस पडला की एकदम हुश्श व्हायचे. तुम्ही ‘काले घना, काले घना’ ही पावसाची कविता ऐकली असेल, मोठय़ा श्रद्धेने म्हटली असेल. ‘तू बरसत ये, बरसत ये’ असे आपण आजही पावसाला मोठय़ा आतुरतेने आवाहन करतो. नेफा या परिसरात; तेजूसारख्या लहान-मोठय़ा डोंगरदऱ्यांतही पाऊस हा रोजचाच सोबती. तो नुसता नेहमी एकटा एकटा येत नसे. तो आपल्याबरोबर असंख्य छोटय़ा-मोठय़ा मैत्रिणींना घेऊन यायचा. त्या मैत्रिणी म्हणजे असंख्य गारा. गारांचा वर्षांव! एक दिवस नेहमीप्रमाणे पहाटे पहाटे गारांचा वर्षांव सुरू झाला. सकाळच्या पहिल्या गारा शेंगदाण्याएवढय़ा होत्या; पुन्हा दहा वाजता लिंबाएवढय़ा गारांचा वर्षांव झाला. त्यामुळे मी दुपारी दोन वाजता आंघोळ व कपडे धुण्याकरिता बाहेर पडलो, ते उरकतो न उरकतो तो आंब्याएवढय़ा गारा सुरू झाल्या. मी शंभर मीटर स्प्रिंट अशा वेगवान शर्यतीपेक्षाही वेगात धावत झोपडीकडे पळायला लागलो. अंगावर तेच ओले कपडे असूनही, जो गारांचा मारा खाल्ला, त्याची आठवण झाली की मन भयभीत होते. रात्री पुन्हा आंब्याएवढय़ा गारांचा वर्षांव झाला. पुढे दोन दिवस संपूर्ण परिसर न वितळलेल्या त्या गारांनी सर्वत्र अतिशय विलोभनीय छोटय़ा-मोठय़ा गारांचा होता. वाचकहो, आम्ही पाच-सात जणांनी दुसऱ्या दिवशी खूप खूप गारा गोळा करून आमच्या पुढील काही दिवसांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून, जमा केल्याची आठवण आजही ताजी आहे.
या लांबलेल्या लेखात त्या भागातील पाण्याचे शुद्ध स्वरूपाचे एक उदाहरण सांगण्याचा मोह मला आवरत नाही. आमच्या वायरलेस युनिटकरिता व्ही इंजिन व जॅपसेटकरिता लेड अ‍ॅसिड अ‍ॅक्युमिलेटर अशी बॅटरी लागायची. या बॅटरीज् नीट चालण्याकरिता डिस्टिल्ड् वॉटर आवश्यक असते. महिना-पंधरा दिवसांनी येणाऱ्या हेलिकॉप्टरने आमचे जेवणाचे आवश्यक धान्य कसेबसे यायचे. त्यामुळे आम्ही अत्यावश्यक असे डिस्टिल्ड् वॉटर न मागवता रोज पडणाऱ्या त्या जलदेवतेने दिलेल्या अतिशुद्ध पाण्याचा वापर बिनधास्त करायचो. आमच्या या तेजू परिसराच्या बाराकोस परिसरात क्वचितच एखादा स्थानिक उंच, धिप्पाड खूप खूप दाढी, केस वाढविलेला माणूस भेटायचा. आंघोळीला जाताना असा माणूस भेटला की एकदम ‘भ्यां’ वाटायचे. कारण त्याच्या कंबरेला एक रुंद जंबीयासारखे हत्यार असायचे. कंबरेच्या वर कधीही न धुतलेला कपडा असायचा. खाली फक्त एक लंगोटी. पण या अती अती आदिवासी माणसांच्या जगात आम्हाला कधीच काही त्रास झाला नाही.
या प्रदेशातील ४६-४८ वर्षांच्या मागे जातानाच्या आठवणी खूप खूप सुखावह आहेत. आमच्याजवळ बा जगाशी संपर्काकरिता, त्या काळात सुरू झालेला छोटासा ट्रॅन्झिस्टर सेट’ असायचा. त्या सेटवरील ऑल इंडिया रेडिओवरच्या बातम्या, हेच आमचे मोठे करमणुकीचे साधन होते. खूप वेळा चीन आपली रेडिओ वाहिनी आपल्या खरखर संदेशांनी जाम करून पाहायचा. मला तेव्हाही वाटायचे व आजही वाटते की या विरळ लोकवस्तीच्या प्रदेशात सरकारने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व भरपूर लोकसंख्या पण खूप लहान भूप्रदेश असलेल्या केरळमधील वाढत्या वाढत्या गरजू तरुणाईला येथे आणावे. त्यांच्या छोटय़ा मोठय़ा वस्त्या उभ्या कराव्यात. त्यांना पुरेसे स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत. त्यामुळे कदाचित खूप खूप भूप्रदेशाची हाव असणाऱ्या चिनी राजकर्त्यांना आपले भावी आक्रमणाचे डाव गुंडाळावे लागतील!
तुम्ही-आम्ही मराठी माणसे ‘परशुराम’ या अवताराबद्दल खूप खूप कथा ऐकत आलो आहोत. परशुरामाने त्याला एक अलौकिक वर मिळाल्यामुळे सर्व पृथ्वी व्यापून टाकली आहे. तो आपल्या निसर्गरम्य कोकणात तर आहेच. पण इथे अरुणाचल प्रदेशातही ‘परशुराम कुंड’ म्हणून एका निसर्गरम्य परिसरात कायमचे वास्तव्य करून आहे, अशी कथा सांगितली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या निमित्ताने महाप्रचंड यात्रा भरते. या परशुराम कुंडात शेजारी शेजारी खूप गरम व खूप गार पाण्याचे दोन प्रवाह एकत्र येतात. संक्रांतीच्या अगोदर आसपास एकही माणूस वा चिटपाखरू दिसत नाही. पण एकदम १२/१३ जानेवारीपासून एखाद्या प्रचंड संख्येच्या मुंग्यांच्या वारुळासारखी छोटी-छोटी माणसे लाखोंच्या संख्येने येथे येतात. यांची चेहऱ्याची ठेवण काही वेगळीच असते. ही मंडळी श्री परशुराम व
श्री शंकराला भेटण्याकरिता येतात. ‘‘फैला है वटपादप विशाल’’ अशा या भारतीय संस्कृतीचे रक्षण करू या! जय भारत!