आमच्या विलेपाल्रे येथील घरासमोरच माझ्या आजोबांनी बकुळीचे एक झाड लावले होते. त्याच्या नक्षत्रासारख्या सुवासिक फुलांचा सडा झाडाखाली पडायचा. रस्त्यावरून जाणाऱ्या स्त्रिया तेथे हमखास थबकत. त्या काळात ‘हे आमचे, ते तुमचे’ असा काही प्रकार नसल्याने त्यापकी अनेक जणी अंगणात शिरून बकुळफुले वेचून नेत. ही झाली माझ्या बालपणीची गोष्ट. मला लहानपणापासूनच झाडांवर चढायला आवडायचे. काहीही कारण काढून मी झाडावर चढत असे. आजीसाठी व आईसाठी ताजी, झाडावरचीच, बकुळफुले खुडण्यासाठी (त्यांनी नको म्हणून सांगितले तरीही) मी झाडावर चढत असे. बकुळीची फुले देठासकट तोडता येत असली तरी मी ती तशी कधीच खुडत नसे. फुलाखालील त्यांच्या देठाच्या फुगीर भागावर हलकेच दाबले की फूल अलगद देठापासून सुटून येई. हे असे करण्याचेही एक कारण होते. अशा प्रकारे फूल खुडताना बोटांना फुलातील मध चिकटत असे. बोटांना लागलेला हा गोड मध चाटायची एक मजाच असायची. या बकुळीच्या झाडावर संध्याकाळी शेकडो चिमण्या वस्तीला यायच्या. त्यांच्या चिवचिवाटाने परिसर भारून जायचा. त्यावरून मला एक बालपणीची कविता आठवायची. ‘कावळ्यांची शाळा भरे िपपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती’, अशी ती कविता होती. त्यांच्या विष्ठेने झाडाखाली पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी सतत रेखलेली असे. आणखी एक गंमत आठवते. दिवाळीत अगदी पहाटेच उठायचो; त्या वेळी चिमण्याही गाढ झोपलेल्या असायच्या. आमच्या फटाक्यांच्या आवाजाने त्या जाग्या होऊन, घाबरून चिवचिवाट करीत सरावैरा उडत जायच्या.आमच्या घरच्या बकुळवृक्षाला कधीच फळे लागत नसत; त्यामुळे बकुळीला फळे येतात हे मला माहीतच नव्हते. शाळेत असतानाच एकदा औरंगाबादला जाऊन तेथून बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला व अजिंठा-वेरूळ पाहावयाची संधी मिळाली. वेरूळ लेण्यांच्या पायथ्याजवळच घृष्णेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात एक बकुळवृक्ष होता. त्या वृक्षाला लगडलेली लालसर-नािरगी फळे मी प्रथमच पाहिली. ती फळे खाऊ शकतो असे तेथील पुजाऱ्याने सांगितले. फळे काही चविष्ट नसतात. फारच थोडा गर आणि वातड साल अशी ती फळे असतात. तेथून काही बिया जमवून मी त्यांपासून रोपे तयार केली होती. त्यातीलच एक रोप मी आमच्या बंगल्याच्या बागेत लावले होते आणि आजही ते तेथे आहे. पण गंमत अशी की त्या झाडाला आजपर्यंत कधीच फळे लागली नाहीत.बकुळीची अभिवृद्धी बियांपासून, गुटी बांधून आणि पाचर-कलमानेही करता येते. कलमी रोपे हल्ली बऱ्याच नर्सरींमधून मिळतात. अशी कलमी रोपे एक वर्षांतच फुले देऊ लागतात; आणि ती कुंडीतही वाढवू शकतो. अर्थातच कुंडीतल्या झाडाला खूप फुले धरण्याची शक्यता नसते. बकुळफुले सुकल्यानंतरही बरेच दिवस त्यांचा वास टिकून राहतो. या वृक्षाची खासियत म्हणजे त्याची नियमित छाटणी करून त्याला हवा तसा आकार देता येतो. राष्ट्रपती भवनसमोरील लहानखुरी, छत्राकार आकाराची एकजात झाडे बकुळीचीच आहेत. बकुळीची इतर भाषेतील नावे पुढीलप्रमाणे आहेत. कोकणी- वोवळ, िहदी- मौलसरी, गुजराती- बोलसरी, कन्नड- पगडे, तेलुगू- पोगडा, आसामी- गोकुल आणि मलयाळम- एलेंगी. या मल्याळम् नावावरूनच बकुळचे शास्त्रीय नाव ट्रे४२स्र्२ी’ील्लॠ्र असे दिले गेले आहे. बकुळ हा चिकूच्या कुळातीलच (रंस्र्३ूंींी) आहे.