डॉ. महेश केळुस्कर यांच्या कथेवरील आणि जयप्रद देसाई या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘नागरिक’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. मराठीत दीर्घ कालावधीनंतर राजकीय चित्रपट या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट रसुल पुकुटी यांचे साऊंड डिझाइन, भानू अथय्या यांची वेशभूषा आणिमराठी नाटय़-चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी चित्रपटात केलेली भूमिका ही या चित्रपटाची काही खास वैशिष्टय़े.गेल्या काही वर्षांत मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होत असून त्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठी चित्रपट म्हणजे कौटुंबिक, तमाशा किंवा विनोदी चित्रपट असे स्वरूप असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती सुरू झाली आहे. चरित्रात्मक आणि सामाजिक विषय चित्रपटातून हाताळले जात आहेत. यात अपवाद आहे तो राजकीय चित्रपटांचा. मराठीत ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘सरकारनामा’, ‘वजीर’, ‘आजचा दिवस माझा’ असे काही अपवाद वगळता फारसे राजकीय चित्रपट तयार झालेले नाहीत. ‘नागरिक’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ही उणीव दूर होणार आहे. डॉ. महेश केळुस्कर यांच्या कथेवरील आणि जयप्रद देसाई या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘नागरिक’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. मराठीत दीर्घ कालावधीनंतर राजकीय चित्रपट या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट रसुल पुकुटी यांचे साऊंड डिझाइन, भानू अथय्या यांची वेशभूषा आणिमराठी नाटय़-चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी चित्रपटात केलेली भूमिका ही या चित्रपटाची काही खास वैशिष्टय़े आहेत.डॉ. महेश केळुस्कर यांची ‘यू कॅन ऑल सो वीन’ ही कादंबरी २००३ मध्ये ‘अक्षर’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. २००६ मध्ये ही कादंबरी पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली. ही कादंबरी तेव्हा अमेरिकेत असलेल्या जयप्रद देसाई यांच्या वाचनात आली आणि त्यांना या कादंबरीने झपाटून टाकले. त्यांनी केळुस्कर यांच्याशी संपर्क साधून या कादंबरीवर काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. देसाई भारतात परतल्यानंतर केळुस्करांबरोबर बैठका झाल्या आणि यातून ‘नागरिक’ आकाराला आला. ‘यू कॅन ऑल सो वीन’ या कादंबरीचा केवळ आधार घेऊन डॉ. केळुस्कर यांनी ‘नागरिक’ची कथा आणि संवाद लिहिले तर चित्रपटाची पटकथा स्वत: केळुस्कर व दिग्दर्शक देसाई यांनी लिहिली.‘नागरिक’विषयी ‘लोकप्रभा’ला माहिती देताना डॉ. केळुस्कर यांनी सांगितले, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी काही वर्षांपूर्वी ‘इंडिया विरुद्ध भारत’ अशी एक संकल्पना मांडली होती. एकाच देशात दोन वेगवेगळ्या आणि अत्यंत भिन्न परिस्थितीत नागरिक राहात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. आजही ही परिस्थिती बदललेली नाही. ‘नागरिक’ चित्रपटात एका विशिष्ट ध्येयाने वाटचाल करणाऱ्या पत्रकाराची गोष्ट मांडण्यात आली आहे. यात महाराष्ट्र आणि केंद्रातील सद्य राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक, प्रसारमाध्यमे, गुंड आणि समाजातील काही अन्य घटकांचे परस्परांशी असलेले ‘साटेलोटे’, यातून निर्माण झालेली परिस्थिती, सर्वसामान्यांची होणारी घुसमट याचा वेध चित्रपटातून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आपल्या तत्त्वानुसार आणि ध्येयानुसार चालणाऱ्या आणि इतरांसाठी ‘चक्रम’ ठरलेल्या ‘नागरिका’ची ही गोष्ट आहे.राजकीय-सामाजिक चित्रपटहा चित्रपट केवळ राजकीय चित्रपट नसून तो राजकीय व सामाजिक चित्रपट आहे. सर्व क्षेत्रांतील बरबटलेली परिस्थिती सुधारणे ही काही विशिष्ट व्यक्तींची किंवा कोणा एकाची जबाबदारी नाही, तर ती सर्व समाजाची जबाबदारी असल्याची जाणीव यातून करून देण्यात आली आहे. राजकारणाचा सर्वसामान्य नागरिकांवर आणि समाजावरही चांगला किंवा वाईट असा दोन्ही परिणाम कसा होतो, हे यात दाखविले आहे. सगळ्यांनाच झटपट यश पाहिजे असून त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रांत जो काही गलिच्छपणा आला आहे, एक प्रकारचे बरबटलेलेपण आले आहे, कोणाचे कोणावर निय्ांत्रण राहिलेले नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक ‘नागरिका’ची सदसद््विवेकबुद्धी आणि त्याचा सदसद्विवेक हाच यावरील नियंत्रणाचा उपाय आहे, असेही डॉ. केळुस्कर यांनी सांगितले.राजकारण आणि सद्यस्थितीचे चित्रअमेरिकेतील विद्यापीठातून लेखन आणि दिग्दर्शन या विषयात ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट’चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून तेथे काही काळ वितरण क्षेत्रात काम केलेले तरुण दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी ‘नागरिक’चे शिवधनुष्य पेलले आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन चव्हाण असून चित्रपटातील गीतलेखन व संगीत संभाजी भगत यांचे आहे. भानू अथय्या यांच्यासह पौर्णिमा ओक यांनी वेशभूषा केली आहे. आपल्या या चित्रपटाविषयी जयप्रद देसाई म्हणाले, गेल्या काही वर्षांत राजकारण पूर्णपणे बदलले आहे. नितिमत्तेची सीमारेषा खाली खाली येत चालली असून ‘नागरिक’ हा चित्रपट सध्याचे राजकारण आणि समाजातील सद्य परिस्थिती यावर भाष्य करतो. चित्रपटात समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे आहेत. चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर हा पत्रकाराच्या भूमिकेत असून त्याच्या एका बातमीने राजकीय भूकंप होतो आणि वेगाने सर्व घडामोडी घडत जातात. ‘सत्याचा शोध’ ही चित्रपटाची टॅगलाइन असून वास्तव आणि स्वप्न याचा शोध घेणारा पत्रकार यात दाखवला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यासह सचिन खेडेकर, नीना कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, हिंदीतील राजेश शर्मा आणि मिलिंद सोमण तसेच मराठी नाटय़-चित्रपटातील अनेक कलाकार लहान-मोठय़ा भूमिकेत आहेत. चित्रपटाची संपूर्ण गोष्ट मुंबईत घडणारी असून आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण केले असून ‘सिंक साऊंड’ हे तंत्र त्यासाठी वापरले आहे.आम्हाला तुम्हीच हवे आहातया वयात डॉ. लागू चित्रपटात काम करतील की नाही याविषयी शंका वाटत होती. मी त्यांना चित्रपटाची संहिता वाचायला दिली. चित्रपटातील या भूमिकेसाठी आम्हाला तुम्हीच हवे आहात, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी माझे वय आणि शारीरिक अवस्थेची तुम्हाला कल्पना आहे, असा प्रश्न केला. त्यावर संहिता वाचा, विचार करा आणि मग निर्णय द्या, अशी विनंती आम्ही त्यांना केली. काही दिवसांनी त्यांना विचारले तेव्हा, मी काम करायला तयार आहे, संहिता वाचतानाच माझ्या डोक्यात भूमिकेचा विचार सुरू झाला. मी आता नाही म्हणणार नाही, असे सांगून काम करण्यास होकार दिल्याचे जयप्रद देसाई यांनी सांगितले.