डॉ. किशोर कुलकर्णी - response.lokprabha@expressindia.com निमित्त आपल्याकडे २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. जनमानसात विज्ञानाविषयी जनजागृती करणं, विज्ञान क्षेत्रातील नवीन घडामोडींचा वेध घेणं, त्यांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे त्याची जाणीव करून देणं यासाठीचा हा दिवस. या दिवशी अनेक वैज्ञानिक संस्था, संशोधन संस्था तसेच राष्ट्रीयकृत संस्था अनेक उपक्रम राबवतात. साधारणपणे १९८७ पासून हे उपक्रम आपण राबवत आहोत. या उपक्रमाला एक वेगळी बठक असावी, अधिष्ठान असावं म्हणून घोषवाक्याची निवड केली जाते आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. २०१८ साली घोषवाक्य होतं, ‘सुसह्य़ जीवन आणि विकासासाठी विज्ञान - तंत्रज्ञानाचा उपयोग’. गेल्या वर्षीचं घोषवाक्य होतं, ‘लोकांसाठी विज्ञान आणि विज्ञानासाठी लोक’. तर या वर्षीचं म्हणजे २०२० चं घोषवाक्य आहे, ‘विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे योगदान- विमेन इन सायन्स’. भारताचा विचार केला तर आपण समजू शकतो की गेल्या वर्षांमध्ये विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये महिलांनी मोठं योगदान दिले आहे. परंतु तरीही विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात महिलांचा सहभाग म्हणावा इतका व्यापक नाही. एखाद दुसरं कार्य आणि एखादं दुसरं नाव सोडलं तर महिलांना खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अर्थात असं म्हणताना फक्त भारताचं चित्र काय दाखवतं? विज्ञान क्षेत्रात महिलांचे प्रमाण आहे केवळ २५ टक्के. विद्यापीठे, संशोधन संस्था, वैज्ञानिक संस्था आणि महाविद्यालयं यांचा विचार केल्यास आढळतं की एक जीवशास्त्र शाखा वगळता इतर शाखांमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. संशोधन आणि विकास संस्थांमध्ये असलेल्या दोन लाख ८० हजार वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञांमध्ये केवळ १४ टक्के महिला आहेत. म्हणजे ३९ हजार ३८९. तर याबाबतीत जागतिक प्रमाण आहे २८ ते ३० टक्के. आपल्या ‘इस्रो’मध्ये आठ टक्के महिला वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ आहेत. आयआयटीमध्ये महिलांचं प्रमाण दहा टक्के आहे आणि इंडियन अकॅडमी, इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स तसेच अॅग्रिकल्चर या संस्थांमधून फेलोशिपसाठी जे अर्ज केले जातात त्यात महिलांचे अर्ज असतात केवळ पाच टक्के. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या जगात २८.८ टक्के आहे. देश आणि खंड यामध्ये ही आकडेवारी विभागली गेली तर अरब राष्ट्रे ३९.८ टक्के. मध्य तसंच पूर्व युरोप ३९.५ टक्के मध्य आशिया ४८ टक्के, पूर्व आशिया आणि प्रशांत द्वीपसमूह २३.४ टक्के लॅटिन अमेरिका आणि कॅरिबीन देश २५.४ टक्के उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोप ३६.३ टक्के दक्षिण आणि पश्चिम आशिया १८.५ टक्के आणि सब सहारा आफ्रिका ३१.३ टक्के. ही आकडेवारी महिलांना उद्विग्न करणारी की प्रेरक हे काळच ठरवेल. नोबेल पारितोषिकांच्या यादीकडे पाहू या. २०१९ पर्यंत ५९७ नोबेल पारितोषिके दिली गेली. त्यातली केवळ ५३ पारितोषिकं महिलांनी मिळवलेली आहेत. सगळ्याच पारितोषिकांचा यांत समावेश आहे. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यक क्षेत्रातील केवळ २० पारितोषिके महिलांच्या वाटय़ाला आलेली आहेत. त्यातही वैद्यकशास्त्रातील १२, रसायनशास्त्रातील पाच आणि भौतिक विज्ञान यातील तीन पारितोषिके महिलांच्या वाटय़ाला आली. मारी क्युरी ही एकमेव वैज्ञानिक महिला अशी आहे की जिने दोन विभिन्न शाखेतील नोबेल पारितोषिकं मिळवली आहेत. भौतिक शास्त्रातील एक तिच्या पतीसमवेत आणि एक स्वतंत्ररीत्या रसायनशास्त्रातील मिळवलेले आहे. मारी क्युरी आणि तिची मुलगी आयरिन ज्युलीएट क्युरी या माता-पुत्रीने नोबेल मिळविले आहे. या प्रकारचं हे एकमेव उदाहरण आहे. आयरिन ज्युलीएट क्युरीने रसायन विज्ञानातील नोबेल पारितोषिक प्राप्त केलं. २००९ या वर्षी एकाच वेळी पाच महिलांना नोबेल पारितोषिकं दिली गेली. अशी वेळ एकदाच आलेली आहे. डोना स्ट्रिकलॅण्ड या वैज्ञानिक महिलेने भौतिकीशास्त्रामधलं २०१८ चं नोबेल मिळवलेलं आहे. या क्षेत्रातील आतापर्यंतची महिला वैज्ञानिक आहे. तसेच फ्रान्सेस अर्नोल्ड ही २०१८ मध्ये रसायन विज्ञानाचे नोबेल मिळविणारी ती अलीकडील महिला होय. वैद्यक क्षेत्रातील तू यो यो ही चिनी महिला सगळ्यात अलीकडची पारितोषिक विजेती महिला वैज्ञानिक ठरली आहे. तू यो योला २०१५ सालचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं. नोबेल पारितोषिकं ही जगभरातील वैज्ञानिकांसाठी दिली जातात. तसंच उत्कृष्ट आणि उपयोगी संशोधनाला दिलं जाणारं आपल्याकडचं प्रतिष्ठेचं उच्च पारितोषिक ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक’. दिल्लीस्थित विज्ञान-तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआरआयतर्फे ते दिलं जातं. या संस्थेचे संस्थापकीय संचालक होते शांती स्वरूप भटनागर. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९५८ सालापासून या पारितोषिकाला सुरुवात झाली. गेल्या वर्षी हे पारितोषिक नीना गुप्ता यांना गणित या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल देण्यात आले. २००० पासून आजपर्यंत गेल्या १९ वर्षांत दहा महिला वैज्ञानिकांनी हे पारितोषिक मिळवलेले आहे. २००४ मध्ये सुजाता रामदोराई, २००७ साली रमा गोिवदन अभियांत्रिकी विज्ञान, चारुसिता चक्रवर्ती रसायनशास्त्र, २०१० साली अनुक्रमे, शुभा टोळ- जीवशास्त्र, संघमित्रा उपाध्याय, अभियांत्रिकी विज्ञान आणि मिताली मुखर्जी वैद्यकीय क्षेत्र. २०१३ साली यमुना कृष्णन भौतिकी, २०१५ साली विदिता अशोक वैद्य वैद्यकीय आणि २०१८ या वर्षी आदिती सेन- डे यांना हे पारितोषिक मिळालेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अभियांत्रिकी क्षेत्र मिळून ‘इंडिया सायन्स अॅवॉर्ड’ हे भारतातील सर्वोच्च पारितोषिक दिलं जातं. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या पारितोषिकांची घोषणा केली होती. अति उच्च दर्जाचे संशोधन करणाऱ्या किंवा योगदान देणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक दिले जाते. या पारितोषिकाचे पहिले मानकरी ठरले डॉ. सी. एन. आर. राव; त्यांना २००६ च्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रदान केलं. ते पारितोषिक होतं २००४ चं. त्यानंतर आजपावेतो इतर कोणालाही ते मिळालेले नाही किंवा जाहीर झालेले नाही. एक महिला शास्त्रज्ञ हे पारितोषिक मिळवेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करू या. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांसाठी एक दूरदृष्टी मानचित्र २०१६ (विमेन इन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी - अ व्हिजन डॉक्युमेंट २०१६) तयार करण्यात आलेले असून त्यात म्हटलं आहे की ‘विकसनशील राष्ट्रांनी जी सामाजिक प्रगती केली ती महिला सबलीकरणातून. त्याचा शिक्षण, आरोग्य आणि आíथक स्वावलंबनावर फार मोठा परिणाम झाला आहे. म्हणूनच जगातील या ५० टक्के संसाधनांकडे डोळेझाक करून चालणार नाही.’ म्हणूनच ‘आपल्यासाठी हे जीवन फार सुखकर नाही. परंतु आपल्याकडे जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर आपल्या निसर्गदत्त देणगीचा वापर करून आपण समाजाचे उत्थान निश्चित करू शकू’ हे मारी क्युरी यांचं वाक्य प्रत्येक महिलेनं लक्षात ठेवायला हवं.