प्रयोगशील भूमिका साध्या, सोप्या अभिनयाने साकारत नवाझुद्दीन सिद्दिकी हा अभिनेता प्रचंड लोकप्रिय झाला. मुंबईत १५ र्वष संघर्ष केल्यानंतर नवाझुद्दीनची पावलं यशाच्या दिशेने वेगात धावू लागली आहेत.

४ ‘मांझी- द माऊंटेन मॅन’ या चित्रपटाच्या तुमच्या प्रवासाबद्दल बोलू या. दशरथ मांझी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं का ठरवलंत?
– या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी मला चित्रपटाबद्दल एकच वाक्य सांगितलं. ‘एक माणूस त्याच्या प्रेमासाठी २२ र्वष एक डोंगर पोखरत होता’, हे ते वाक्य. तेवढय़ानेच मी त्या चित्रपटाकडे खेचला गेलो. एक सामान्य माणूस आणि त्याचं असमान्य असं प्रेम ही गोष्टच मला इतकी आकर्षित करून गेली की, मला असं वाटलं की, आपण दशरथ मांझी या माणसाच्या मनात शिरलंच पाहिजे. एखाद्यावर इतकं जिवापाड प्रेम करणं कसं असतं हेही मला त्याच्या माध्यमातून अनुभवायचं होतं. आजच्या काळात कुणी असं प्रेम करताना दिसत नाही. असं प्रेम ही आजच्या काळात फॅण्टसीच ठरू शकते. आपण बॅटमॅन, सुपरमॅनच्या बाता मारत राहतो. पण, दशरथ मांझी हा आजच्या काळातला खराखुरा सुपरमॅन आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही.
४ या चरित्रपटातील मांझी या व्यक्तिरेखेशी तुम्ही एकरूप कसे झालात? तुम्ही साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये तुम्ही स्वत:ला कसे बघता?
– दशरथ मांझी ही व्यक्तिरेखा साकारताना मला भावलं ते त्यांची समर्पणाची वृत्ती आणि निराश न होता आपलं काम करत राहणं हे त्यांचं आयुष्याचं तत्त्वज्ञान. मी स्वत:ला त्यात बघू शकलो कारण, मीसुद्धा अभिनेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा संघर्ष केला आहे आणि या सगळ्या काळात मीदेखील कधीही आशा सोडली नाही. हा संघर्ष कोणाही कलाकाराच्या प्रवासातला खूप महत्त्वाचा भाग असतो. मुख्य म्हणजे तो कधी संपेल ते कोणालाही सांगता येत नाही. संधी कधीही येऊ शकते. त्यासाठी कलाकाराला कायमच स्वत:ला तयार ठेवावं लागतं. मी माझे असे काही कलाकार मित्र पाहिले आहेत की हा संघर्ष करण्यातच मानसिक पातळीवर इतके थकून जातात की, जेव्हा संधी खरोखरच त्यांचं दार ठोठावते तेव्हा ते तिचा उपयोगच करून घेऊ शकत नाहीत. मला खूपदा प्रेरणादायी व्यक्तिरेखा साकारायला आवडतं ते याचसाठी. ती व्यक्तिरेखा काय सांगते ते अभिनेता म्हणून समजून घेतलं पाहिजे आणि नंतर मग तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ती व्यक्तिरेखा साकारली पाहिजे, असं मला वाटतं.
४ सिनेमा तुला कधीपासून आवडू लागला?
– मी उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर जिल्ह्य़ातील बुधाना या छोटय़ा खेडेगावातून आलोय. आमच्याकडचं सिनेमागृह म्हणजे नदीपार असलेली एक पत्र्याचं छप्पर असलेली अर्धकच्चं बांधकाम असलेली खोली. त्या सिनेमागृहात फक्त सी ग्रेड सिनेमेच लावले जायचे. ते सिनेमे बघतच मी मोठा झालो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेल्यानंतर माझी खऱ्या अर्थाने जागतिक सिनेमाची ओळख झाली. सिनेमाविषयी तेव्हा मला जो काही अभ्यास करायला मिळाला ती माझ्यासाठी खूप मोठी झेपच होती. त्यामुळे झालं असं की, सी ग्रेड सिनेमा आणि नंतर जागतिक सिनेमा पाहिल्यामुळे मी त्यामधला म्हणजे आपला बॉलीवूडचा सिनेमा फारसा पाहिलाच नाही. त्यानंतर अचानक असं काही झालं की, मला अभिनेता बनावं असं वाटेना. हा अचानक झालेला बदल होता.
४ असं ऐकलंय की, तुम्ही एक नाटक बघितलं आणि त्याचा तुमच्यावर इतका प्रभाव पडला की तेव्हा तुम्ही अभिनेता व्हायचं ठरवलंत.
– होय. मी मनोज वाजपेयी यांचं ‘उलझन’ हे नाटक बघितलं. त्या नाटकामध्ये मनोज वाजपेयी आणि प्रेक्षक यांच्यामधल्या केमिस्ट्रीने माझ्यावर एक प्रकारची जादूच केली होती. त्या नाटकात नायक रडत असेल तर प्रेक्षकही रडायचे आणि त्याने काही तरी वाईट कृत्य केलं की प्रेक्षक संतापायचे. एखाद्या अभिनेत्यासाठी नाटक करणं म्हणजे त्याच्या बॉडी स्कॅनिंगसारखंच असतं. प्रेक्षक त्याला आरपार बघू आणि अनुभवू शकतात. कोण कोणाचा मुलगा किंवा कोण कोणाचा नातू आहे याच्याशी प्रेक्षकांना काहीही देणं-घेणं नसतं. अभिनेता ज्या पातळीवरचा अभिनय करील त्याच पातळीवरचा प्रतिसाद त्याला मिळतो. मला ही सगळी प्रक्रियाच प्रभावित करून गेली. पण, एक मात्र नक्की होतं की, मला कधीच चित्रपटांमध्ये काम करायचं नव्हतं. आयुष्यभर मला रंगभूमीवरचं काम करायचं होतं.
४ मग तरी चित्रपटांकडे कसे वळलात?
– सात र्वष नाटक केल्यानंतर मी अक्षरश: कंटाळलो. पण, दुसऱ्या बाजूला मी अभिनयाच्या प्रेमात पडलेलो होतोच आणि मला ते सोडायचंही नव्हतं. मग मी असा विचार केला की, नाटक थांबवल्यामुळे भुकेने मरणार असेन तर ते मुंबईतच का होऊ नये? मुंबईत आल्यानंतर मला लगेच सिनेमात काम मिळेल, अशी मला अजिबातच आशा नव्हती. पण, त्याच वेळी माझ्याकडे गमवण्यासारखंही काही नव्हतं. टीव्ही माध्यमात मी माझं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण, आपल्याकडील मालिका फार चकचकीत होत्या. तिथे काम मिळणं शक्यच नव्हतं. मी काही सिनेमांमध्ये चुटपुटत्या भूमिका केल्या. उदाहरणंच द्यायची झाली तर; ‘सरफरोश’मध्ये माझी जेमतेम ४० सेकंदाची भूमिका होती. तेच ‘शूल’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ बाबतीतही झालं. काही जाहिरातींमध्ये मॉब सीनही दिले. पण, त्या वेळी मी कॅमेऱ्यापासून माझा चेहरा लपवायचो.
४ का?
– कारण, मला असं वाटायचं की, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आलेला एक अभिनेता मॉब सीन करतोय, असं कुणी म्हणायला नको.
४ मग, मुंबईत असताना तुमच्या या संघर्षांच्या काळात तुमचं आयुष्य बदलून टाकणारी घटना कोणती ठरली?
– मी अनुराग कश्यप यांना भेटलो तोच क्षण. ते खूप कलाकारांना प्रोत्साहन देत असतात. त्यांनीही मलाही प्रोत्साहन दिले. नुसतं प्रोत्साहनच नाही तर त्यांनी मला ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमाची ऑफर दिली. हा सिनेमा माझ्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरेल, असं मला वाटत होतं. पण, दुर्दैवाने या सिनेमावर बंदी आली. २००९ मध्ये माझे ‘पतंग’ आणि ‘मिस लव्हली’ हे दोन सिनेमे जगभर वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये दाखवले गेले. या वर्षांने माझं आयुष्यच बदललं. त्यानंतर ‘पिपली लाइव्ह’, ‘न्यूयॉर्क’, ‘कहानी’ या सिनेमांमुळे मला ओळख मिळाली.
४ तुम्ही आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली असं तुम्हाला वाटतं?
– माझ्या मते, ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधली फैजलची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली असावी.
४ तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांमधली तुमच्या मते अवघड भूमिका कोणती?
– ‘मांझी- द माऊंटमॅन’मधली मांझीची भूमिका. कारण या भूमिकेत मला २२ वर्षांच्या तरुणापासून ते ७० वर्षांच्या वृद्धापर्यंतचा प्रवास दाखवायचा होता. शारीरिक पातळीवर ते आव्हानच होतं. दुसरीकडे डोंगर फोडतानाच्या सगळ्या दृश्यांमध्ये मी खरी हातोडी वापरली. जर मी खरी हातोडी वापरली नसती तर डोंगर फोडतानाचा तो आवेश वाटला नसता आणि ते दृश्य खरं वाटलं नसतं. ‘मेथड अ‍ॅक्टिंग’मध्ये आम्हाला असं शिकवलं गेलं होतं की, एखाद्या दृश्यासाठीचं हत्यारसुद्धा त्या व्यक्तिरेखेच्या मेकअपचाच भाग असलं पाहिजे. ती हातोडी माझ्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग वाटली पाहिजे, असा माझा आग्रह होता.
४ तुम्ही साकारलेल्या व्यक्तिरेखांपैकी तुमची सर्वात आवडती व्यक्तिरेखा कोणती?
– मी एखादी व्यक्तिरेखा साकारली की, मला त्यांच्यापासून लांब पळून जावंसं वाटतं. त्या नकोशा वाटायला लागतात. कारण त्या व्यक्तिरेखा माझ्यामधून, माझ्याकडून इतकं काही काढून घेतात की मी रिता होऊन जातो. मांझीची व्यक्तिरेखा साकारताना जवळपास दीड वर्ष मी मांझीच बनून गेलो होतो. मात्र शूटिंग संपल्यानंतर स्वत:शीच म्हटलं, खड्डय़ात जाऊ दे, ही व्यक्तिरेखा. आणि मी जैसलमेरच्या एका खेडय़ात गेलो. तिथल्या स्थानिक लोकांबरोबर राहिलो आणि मांझीमधून बाहेर येत पुन्हा माझ्यामध्ये आलो.
४ आपण चांगला अभिनय करू शकतो, असं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कधी वाटलं?
– अजूनपर्यंत मला असं एकदाही वाटलेलं नाही.
४ असं कसं? तुमच्या कामाबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही वाचत नाहीत का?
– मी माझ्या कामाचं कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वाचतो तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे. हे सगळे लोक कसल्या तरी भ्रमात आहेत. त्यांना माझ्यातल्या कमतरता माहीत नाहीत. स्वत:ला स्क्रीनवर बघायला मलाच आवडत नाही. मी स्क्रीनवर फक्त माझ्या चुकाच बघू शकतो. स्क्रीनवरचं माझं दिसणं मी सहनच करू शकत नाही. त्यामुळे मी माझे सिनेमे प्रदर्शित होण्याआधी एकदाच बघतो. नंतर पुन्हा कधीच बघत नाही.
४ आपण अभिनय करू शकत नाही असं तुम्हाला वाटत असलं तरी, तुम्ही पडद्यावर कमाल केली आहे. ‘किक’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या तद्दन व्यावसायिक सिनेमांमधील तुमच्या अभिनयाचीसुद्धा प्रेक्षकांनी दखल घेतली. खरं तर सगळेच भारतीय अभिनेते इतके नशीबवान नसतात.
– याचं कारण त्या-त्या सिनेमांचे दिग्दर्शक आहेत. मग ‘किक’साठी साजिद नाडियावाला असो, ‘बजरंगी भाईजान’साठी कबीर खान असो किंवा आगामी ‘रईस’साठी राहुल ढोलकिया असो. आपल्या सिनेमासाठी नवाझुद्दीनच हवा, यावर ते ठाम होते म्हणूनच त्यांनी मला सिनेमात घेतलं. शेवटी कलाकार आणि दिग्दर्शक हे नातं विश्वासावर टिकून असतं. माझा दिग्दर्शक माझ्या क्षमतेचा गैरवापर करणार नाही आणि मला सांगितल्याप्रमाणेच ती व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली जाईल याबाबत मला दिग्दर्शकाची खात्री असणं आवश्यक असतं. दुसरीकडे मीच ती भूमिका करू शकेन अशी दिग्दर्शकाला खात्री असेल तरच तो माझ्याकडे येईल.
४ पण, अनेक व्यावसायिक सिनेमे नाकारले आहेत असं तुमच्याबद्दल म्हटलं जातं.
– होय. मला नावडणाऱ्या भूमिका करायला मी सहजपणे नकार देऊ शकतो. त्यात मी कधीच तडजोड करत नाही. मला पैसा किंवा प्रसिद्धीचा हव्यास अजिबात नाही. अगदी ‘मेरी जरुरतें कम है इसलिए मेरे जमीरमें दम है’ या ‘सिंघम’मधल्या डायलॉगसारखंच आहे माझं. मुख्य म्हणजे घराचे हप्ते भरण्याचं कोणतंही दडपण माझ्यावर नसल्यामुळे मी कोणत्याही भूमिकेला सहज नाही म्हणू शकतो.
४ मुंबईतल्या संघर्षांच्या काळाने तुम्हाला काय शिकवलं?
– मुंबईने मला जगायला, यश पचवायला शिकवलं. यश कधी सांगून येत नाही. ते येतं आणि जातं. त्यामुळे यशाचा किंवा अपयशाचाही आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही हे मला मुंबईने शिकवलं. जेव्हा माझे चांगले दिवस असतील तेव्हा माझे पाय जमिनीला टेकत नाहीत मी आकाशात असतो आणि जेव्हा माझे वाईट दिवस असतात तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गाडला जातो, हे माझ्याबाबतीत होत नाही कारण असं होता कामा नये हे मला मुंबईने शिकवलं आहे.
४ अलीकडे बघितलेल्या सिनेमांमधली अशी कोणती व्यक्तिरेखा आहे जी तुम्हाला करायला आवडली असती?
– ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ या सिनेमातली स्टीफन हॉकिंग ही व्यक्तिरेखा साकारायला आवडली असती. ‘द वुल्फ ऑफ वॉलस्ट्रीट’ या सिनेमातली लिओनार्दो डीकॅप्रिओने साकारलेली व्यक्तिरेखासुद्धा मला करायला फार आवडली असती. मी लिओनार्दोचे इतरही सिनेमे बघितले आहेत. पण या व्यक्तिरेखेइतकी दुसरी कुठलीच व्यक्तिरेखा मला आवडली नाही.
४ त्यात तो एखाद्या लबाड लांडग्यासारखा वावरलाय.
– तेच तर. ‘मेथड अ‍ॅक्टिंग’मध्ये आम्हाला असंही शिकवलं जातं की, एखादी व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही मनात एखाद्या प्राण्याचा विचार करा. मांझी ही व्यक्तिरेखा खूप आग्रही असल्यामुळे ती साकारताना मी वळूची प्रतिमा मनात धरली होती.
४ तुमच्या आत्मचरित्राची शेवटची ओळ काय असेल?
– ‘आणि तो गोंधळलेला होता.’
४ पण, तुम्ही म्हणालात की, तुम्ही सहजपणे एखाद्या गोष्टीला नकार देऊ शकता. मग, गोंधळण्याचा प्रश्न येतोच कुठे?
– ‘होकार’ आणि ‘नकार’ याबाबतीत माझा गोंधळ नसतो. इतर गोष्टींमध्ये मात्र मी गोंधळतो. (हसतो)
४ तुमच्या आयुष्यावर चरित्रपट बनवायचा ठरला तर तुमची भूमिका कोणी साकारावी असं वाटतं?
– दिलीप कुमार यांनी माझी भूमिका साकारावी असं मला वाटतं. ‘मुघल-ए-आझम’मध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेसारखी भूमिका साकारायला मिळावी, हे माझं स्वप्न आहे. काय अ‍ॅटिटय़ुड होता त्यांचा..! असं काही करण्याची मला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे.
(इंडियन एक्स्प्रेस ‘आय’मधून)
हरनीत सिंग – response.lokprabha@expressindia.com
अनुवाद : चैताली जोशी