आपण मुलांशी बोलतो, त्यांचं कौतुक करतो, त्यावर मुलं जी प्रतिक्रिया देतात त्याकडे पालकांनी गंभीरपणे पाहिलं पाहिजे. मुळात फार नेमके शब्द कौतुक करताना वापरले पाहिजेत.किशोरवयीन मुलांशी संवाद कायम राखताना अगदी प्रेमळ, सजग पालकांनाही कधी कधी अडखळायला होतं. पालकांनी रागावलेलं त्यांना चालत नाही आणि ही मुलं मात्र त्यांच्यावर हरघडी रागावणार, रुसणार हे जसं एक वास्तव असतं तसंच पालकांना अडखळायला लावणारं आणखी एक किशोरवयीन मुलांच्या बाबतीतलं वास्तव असतं. रागावलेलं या मुलांना आवडत नाही म्हणून पालकांना वाटतं, की गोड बोलून, प्रसंगी त्यांना थोडं हरभऱ्याच्या झाडावर चढवून मुलांशी संवाद साधला तर गाडं रुळावर येईल. पण बरेचदा तो डावही फसतोच. कधी कधी अगदी मनापासून केलेलं कौतुकही या मुलांना अगदी मानभावीपणाचं वाटतं.मानसशास्त्र सांगतं, की पालकांनी वेळोवेळी दिलेल्या शाबासकीतून, त्यांनी केलेल्या कौतुकातून मुलांमधील आत्मसन्मानाची, सुरक्षिततेची आणि कर्तबगारीची जाणीव वाढीस लागते. जगाचा अफाट पसारा जाणवल्यानं भांबावून गेलेल्या या मुलांना आपणही काही छानसं करू शकतो हे ध्यानात आल्यानं खूप निवांत वाटतं. त्यांची उमेद वाढल्यानं त्यांची चिडचिड कमी होते, पण कधी कधी मात्र पालकांच्या स्तुतीनंही ही मुलं दुखावतात. त्यांच्या हरवलेपणात भरच पडते. पालक म्हणून आपण हे नीट लक्षात घ्यायला हवं, की नुसत्या कौतुकानं, प्रोत्साहन देईलशा स्तुतीनं जर सारं काही साधलं असतं तर अगदी प्रेमळ, आनंदी कुटुंबातली किशोरवयीन मुलं अनेकदा वैफल्यग्रस्त, अगदी कोमेजून गेलेली कशी दिसली असती? यातली मेख अशी आहे, की सामान्यत: मोकळ्या मनोवृत्तीची, आनंदी स्वभावाची मुलं पालकांच्या शाबासकीनं खूश होतात. पण उलटी प्रतिक्रिया व्यक्त करणारी मुलं ही बहुधा कुढी, अबोल बनलेली असतात. कुटुंबात, शाळेत, मित्रमंडळींत त्यांना स्वीकार, आपुलकी जाणवत नसतं. कुटुंब, शाळा, मित्रमैत्रिणी हा मुलांचा समाज असतो. घरी कर्मठ व बाहेरील पुरोगामी वातावरण, घरी प्रेमळ पालक पण शाळेत रागीट, बेजबाबदार शिक्षक अशा गोष्टी या मुलांना अगदी सतत बुचकळ्यात टाकत राहतात. विशेषकरून घरी एकत्र कुटुंबातील विसंवाद, वडिलांची व्यसनाधीनता, आईचा आत्मकेंद्रित, आततायी स्वभाव अशा कारणांपायी घरातलं मोकळेपण हरपलेलं असलं तर त्यातील विसंवादापायी या वयातील मुलांची प्रचंड गुदमर होते, ती कोशात जातात आणि कुढी बनतात. वडीलधाऱ्यांच्या वर्तणुकीतला चांगुलपणा त्यांना वरवरचा वाटतो. त्यामुळे त्यांच्याबाबत त्यांना विश्वास वाटत नाही. आई-वडिलांचा आधार भक्कम न वाटल्यामुळे ही मुलं प्रत्येकाच्याच चांगुलपणाकडे संशयी नजरेनं पाहतात.स्तुती आणि कौतुक हे दोन शब्द आपण अनेकदा समानार्थी समजून वापरतो. पण स्तुती म्हटली की थोडी अतिशयोक्ती आणि नकळत सांभाळलेली औपचारिकता मुलांना जाणवते. कौतुकातून त्यांना जाणवतं ते मिटलेलं अंतर आणि आपल्या पोटचा जिव्हाळा. या कारणामुळे या वयातील मुलांना स्तुतीपेक्षा आपण केलेलं कौतुक अधिक भावतं. सहज साधं आईनं म्हटलं की, ‘‘तू किती छान दिसतेस आता!’’ की लेक म्हणते, ‘‘उगीच फालतू बडबड नकोय मला.’’ ‘‘काय सुगरण आहेस गं’’ असं आईनं म्हणताच मुलगी म्हणणार, ‘‘हॅट! पुलाव एवढा नीट जमलेलाच नाही मला. उगीच हरभऱ्याच्या झाडावर नको चढवूस मला.’’ मुलांची ही अशी प्रतिक्रिया मायलेकीतल्या तुटलेल्या संवादाची निदर्शक आहेत. हा संवाद तुटलेला स्पष्टपणे जाणवतो तो आता, पण तो तुटक बनत जातो तो मुलांच्या बालवयापासूनच. पालकांनी यातली स्वत:ची चूक गंभीरपणे समजून घेतली पाहिजे. वरच्या उदाहरणातील मुलींच्या रागीट प्रतिक्रियेचं तात्कालिक कारण बहुधा असं असतं, की पालकांनी केलेलं कौतुक हे एखाद्या परीक्षकाच्या भूमिकेतून केलेलं मुलींचं मूल्यमापन आहे असं त्यांना वाटून त्यांचं दडपण मुलींना आलं. कधी कधी मुलांची स्तुती करताना आपण फार मोठय़ा चौकटीत त्यांना बसवू पाहतो. ‘‘तू अगदी लता मंगेशकरसारखी गातेस’’ किंवा ‘‘तू अगदी पुलंइतका विनोदी आहेस’’ असे आपले साधे शेरे त्यांना अवाजवी मोठय़ा फूटपट्टीसारखे भासतात व त्या तुलनेत आपण नगण्य आहोत या जाणिवेनं मुलं वैतागतात.कधी कधी त्यांच्या मनात वेगळंच वादळ उठलेलं असतं. आईबाबांचा अतोनात राग त्यांच्या मनात धुमसत असतो. त्यापायी उद्भवणाऱ्या वेडय़ावाकडय़ा प्रतिक्रिया त्यांच्याही आवाक्यापलीकडच्या असतात. त्यांची संगती लावणं त्यांना स्वत:लाही जमण्यातलं नसतं. जर कुढय़ा, अबोल मुलांच्या पालकांनी मुलांच्या अशा तिरसट प्रतिक्रिया समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न धीटपणे केला, तर त्यांना स्वत:च्या हातून नकळत घडलेल्या चुका सहज उमगतील.मीनाची आई सतत आजारी पडते. तिचा दमा वरचेवर उसळतो. मीनाचं आईवर खूप प्रेम आहे. दम्यापायी होणारे तिचे हाल मीनाला पाहावत नाहीत. आई आजारी पडली की, मीनालाच घरचं सारं बघावं लागतं. मित्रमैत्रिणींबरोबरचे हौसेमौजेचे कार्यक्रमही तिला अनेकदा रद्द करावे लागतात. ती ते सारं आनंदानं करते. आजाराच्या काळात त्या साऱ्या औषधांमुळे आई विलक्षण चिडचिडी बनते. मीनावर अकारण रागावत राहते. तेव्हा मात्र मीनाला तिचा खूप राग येतो. परवा आईचा दमा उसळला. मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या सिनेमा पार्टीलाही मीनाला जाता आलं नाही. त्याच वेळी काहीतरी क्षुल्लक कारणावरून आई तिला रागावली. तिला वाटलं, किती सेवा करत बसायची मी हिची! त्यापेक्षा बाबांनी आईला हॉस्पिटलात ठेवलं तर बरं होईल. निदान माझ्या डोक्याशी कटकट तरी नसेल.मीनाच्या दुर्दैवानं सकाळीच आईला हॉस्पिटलात भरती करावं लागलं. दिवसभर मिटल्या तोंडानं मीना घरकाम करीत राहिली. चार वाजता हॉस्पिटलची पेशंट्सना भेटायची वेळ होताच ती धावतपळत आईला भेटायला गेली. तिला पाहताच आई म्हणाली, ‘‘वा, तू फुलं आणणार हे ठाऊकच होतं मला! किती गं सारखा माझाच विचार करीत असतेस तू!’कधी कधी मुलांची स्तुती करताना आपण फार मोठय़ा चौकटीत त्यांना बसवू पाहतो. ‘‘तू अगदी लता मंगेशकरसारखी गातेस’’ किंवा ‘‘तू अगदी पुलंइतका विनोदी आहेस’’ असे आपले साधे शेरे त्यांना अवाजवी मोठय़ा फूटपट्टीसारखे भासतात व त्या तुलनेत आपण नगण्य आहोत या जाणिवेनं मुलं वैतागतात.त्यावर मीना फुरंगटून म्हणाली, ‘‘पुरे हं तुझं कौतुक!’’ आणि आईच्या समाचाराला आलेल्या आप्तासमोरच ती एकाएकी ओक्साबोक्शी रडू लागली. सर्वाचीच अवस्था फार अवघड झाली.मीनाला स्वत:च्या विचारांपायी दिवसभर खूपच अपराधी वाटत होतं. आपल्या मनातील रागापायीच आईला हॉस्पिटलात भरती व्हावं लागलं, अशी खंत तिला सकाळभर बोचत होती. अशा वेळी आईचं कौतुक ऐकून तिला वाटलं की, ‘आईला माझ्या मनातलं सारं कळलं तर?’ क्षणभरात मनात उठलेल्या भीती, अपराधी खंत या साऱ्या कल्लोळानं तिला रडू अनावर झालं. मी आईचाच विचार करते असं तिनं म्हटलं, तरी आपण नेहमीच आईवर इतकं प्रेम करत नसतो, कधी कधी तर आपल्याला तिचा रागच येत असतो. काल तर ती अगदी हॉस्पिटलात गेली तर आपला त्रास वाचेल असा दुष्ट विचारही आपण केला हे सारं मीनाला जाणवलं. आई आपल्याशी सरळ मनानं वागते, पण आपण मात्र तसं वागू शकत नाही या जाणिवेनं तिला एवढं रडू फुटलं. आता इथं मीनाच्या आईनं काय करायला हवं होतं? स्वत:च्या चिडचिडीपायी मीना दुखवते, हे तिनं ध्यानात घेतलं असतं तर तिची आपल्या चिडचिडीपायी होणारी गुदमर आईला जाणवली असती. आईनं मग म्हटलं असतं, ‘‘किती छान वास आला गं! रात्रभर दम्यानं नुसता जीव हैराण केला होता. आत्ताशी कुठं मोकळा श्वास घेता येतोय तर सगळीकडे नुसता औषधांचा वास. हा ताजा सुगंध घेऊन श्वास अधिकच छान मोकळा झालायसं वाटलं.’’ हे कौतुक मीनाचं नसून तिनं आणलेल्या फुलांचं असल्यामुळे मीनाला ते सोसवलं असतं. प्रखर सूर्यप्रकाशामुळे आपले डोळे दिपतात, पण तोच प्रकाश जर चंद्रावरून परावर्तित होऊन आला, तर तो जसा सुखद आणि हवाहवासा वाटतो, तसंच काहीसं या मुलांच्या बाबतीत कौतुकाचं आहे. मीनासारख्या मुलीचं कौतुक करताना थोडं वेगळं तंत्र वापरायला हवं. त्यांच्या स्वभावाचं किंवा व्यक्तिमत्त्वाचं मूल्यमापन जाणीवपूर्वक टाळायला हवं. ‘मीना तू माझा फार विचार करतेस,’ असं म्हणण्याऐवजी ‘तू फुलं आणलीस ती छान आहेत,’ असं म्हटलं की मीनाला ते स्वीकारणं सोपं जातं.वैशाली एक गुणी मुलगी आहे. पण ती अबोल आहे. तिच्या शाळेतल्या दीपाताई तिला खूप आवडतात. एकदा वैशालीनं आपण लिहिलेली कविता दीपाताईंना दिली. ती वाचून त्या म्हणाल्या, ‘‘वा! अगदी इंदिराबाई झालीस की गं तू!’’ आदल्याच दिवशी दीपाताईंनी वर्गात इंदिरा संतांची एक सुंदर कविता शिकवली होती. वैशालीनं तो कागद घेतला आणि फाडून टाकला. वैशालीला काय बरं खटकलं?दीपाताईंनी कविता शिकविताना इंदिराबाई किती थोर कवयित्री आहेत याचं रसभरीत वर्णन केलं होतं. आजची कविता ही वैशालीनं लिहिलेली पहिलीच कविता होती. आपण काही इंदिराबाईंएवढय़ा प्रतिभावान नाही, बाई आपलं अवास्तव कौतुक करताहेतसं तिला वाटलं. म्हणून तिनं कागदच फाडून टाकला. बाईंना स्वत:ची चूक उमगली. पुढं एकदा सागरनं त्यांना जेव्हा आपली मोरावरची कविता त्यांना दाखवली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘या कवितेतलं पावसात नाचणाऱ्या मोराचं वर्णन किती छान आहे. कविता वाचता वाचता माझं मनही कवितेतल्या मोरासारखं थुईथुई नाचू लागलं.’’ सागरला मोठ्ठा कवी वगैरे म्हणण्याऐवजी बाईंनी कवितेला छान म्हटलं. सागरच्या मनात आलं, की माझी कविता छान आहे. ती वाचून बाईंना खूप आनंद झाला. आता मी अशाच छान-छान कविता लिहीन म्हणजे त्या वाचून खूप जणांना आनंद होईल. हा विचार सतत मनात येत राहिला की, सागरला आपल्याला कोण व्हायचंय, अशा कविता लिहायच्या आहेत याबाबतची स्वत:ची प्रतिमा स्पष्ट होत जाईल.आपण केलेल्या स्तुतीचं मुलांना खटकणारं आणखी एक अंग पाहा. अमित म्हणतो, ‘‘माझे बाबा माझी स्तुती करू लागले की, पुढचं वाक्य काय येईल याचीच मला भीती वाटू लागते. परवा माझं प्रगती-पुस्तक पाहून ते म्हणाले, ‘‘वा! अमित बापसे बेटा सवाई हं गणितात पैकीच्या पैकी आणि विज्ञानात नव्याण्णव मार्कस् तू मिळवले आहेस. मराठीकडे जरा नीट लक्ष दे रे बाबा. नव्वद म्हणजे फारच कमी मार्कस् झाले रे. नेहमीप्रमाणे व्याकरणातच गेले असतील मार्कस्. खरं तर व्याकरणाचे मार्कस् अगदी हातचे असतात, पण तुला मेहनत करायचाच कंटाळा आहे नं!’’ अमितचं कौतुक करतानाच त्याचे दोष दाखवल्यामुळे अमितला वाटलं की, बाबांना मनापासून आपलं कौतुकच वाटत नाही. आपले दोष दाखवण्यासाठी मधाचं बोट म्हणून बाबा सुरुवातीला आपलं कौतुक करतात.कौतुकाचे दोन घटक असतात. आपण वापरलेले शब्द हा पहिला घटक आणि त्यातून मुलांपर्यंत पोहोचलेली आपली भावना हा दुसरा घटक. हे दोन घटक संपूर्णत: वेगवेगळे आहेत. कौतुकात अधिक महत्त्वाचा ठरतो तो दुसरा घटक. आपण केलेलं कौतुक ऐकत असताना मुलांचा स्वत:शी संवाद सुरू होतो. आपण त्याच्या कृतीचं, श्रमाचं कौतुक केलं की त्यावरून मूल स्वत:चं मूल्यमापन करू लागतं. ही उदाहरणं पाहा.आपण मुलांशी बोलतो, त्यांचं कौतुक करतो, त्यावर मुलं जी प्रतिक्रिया देतात त्याकडे पालकांनी गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आपल्याबाबत मुलांच्या मनात अढी आहे असं वाटल्यावर त्यांना रागावताना जसे आपण नेमके शब्द वापरू, तसंच त्यांची स्तुती करतानाही ती अढी थोडी दूर होईल आणि आपलं कौतुक नेमकेपणानं होईल, असे शब्द आपण विचारपूर्वक निवडले पाहिजेत.बाबा म्हणाले, ‘‘किती चकाचक करून टाकली आहेस गाडी. स्वच्छतेचा फारच सोस आहे बुवा तुला!’’ ‘पारोसा दिसतोय बघ चेहरा’ असं म्हणत रोज चिडणारे बाबा आज मला स्वच्छतेचा सोस आहे असं म्हणताहेत ते ऐकून मुलाला ती स्तुती खोटी वाटली. त्याऐवजी बाबांनी म्हणायला हवं होतं, ‘किती चकाचक धुतली आहेस गाडी! दमून गेला असशील नं?’ त्यावर मुलगा म्हणाला असता, ‘छे, छे, दमायला काय झालं!’आपल्या वाढदिवसाला मुलीनं भेट दिलेली चष्म्याची केस पाहून आई म्हणाली, ‘‘छान आहे. मला हवीच होती अशी एक केस. माझी केस अगदी फाटून गेली आहे. भारी बारीक लक्ष असतं तुझं बाई!’’ एरवी ‘घरात जरा लक्ष द्यायला नको’ असं दामटणारी आई ‘बारीक लक्ष बाई तुझं’ असं म्हणते आहे, म्हणजे ती खोटं कौतुक करते आहे असं मुलीला वाटलं. त्याऐवजी आईनं म्हणायला हवं होतं, ‘‘मस्त आहे प्रेझेंट! इतकी नाजूक, देखणी चष्म्याची केस मिळते, हे ठाऊकच नव्हतं मला!’’आपण मुलांशी बोलतो, त्यांचं कौतुक करतो, त्यावर मुलं जी प्रतिक्रिया देतात त्याकडे पालकांनी गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आपल्या बाबत मुलांच्या मनात अढी आहेसं वाटल्यावर त्यांना रागावताना जसे आपण नेमके शब्द वापरू, तसंच त्यांची स्तुती करतानाही ती अढी थोडी दूर होईल आणि आपलं कौतुक नेमकेपणानं होईल, असे शब्द आपण विचारपूर्वक निवडले पाहिजेत. त्यांना न पेलवेल अशी फूटपट्टी त्यांचं कौतुक करताना न वापरता, त्यांना खरं वाटेल, आपलं प्रामाणिक कौतुक त्यांच्यापर्यंत पोहोचेल असे शब्द वापरले, की त्यांच्या मनात स्वत:चं मोजमाप घ्यायची फुटपट्टी हळूहळू तयार होत जाते. आपली स्तुती त्यांना मानभावी न वाटता त्यातून मुलांना कौतुक, प्रेम जाणवतं. त्यामागची आस्था त्यांना आश्वस्त करत जाते.