53-lp-dr-minalप्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटल याने ‘बुद्धिनिष्ठ प्राणी’ अशी मनुष्याची व्याख्या केली आहे. आपण प्राणीवर्गातच मोडतो, पण आपल्या बुद्धीमुळे आपण प्रगत प्राणी आहोत. बुद्धीच्या शक्तीमुळे आपण स्वत:ला प्राण्यांपेक्षा वेगळे व श्रेष्ठ समजतो. असे असले तरी, व आपण कितीही सुसंस्कृत आयुष्य जगत असलो, तरीही आपल्यातील हिंस्त्र वृत्ती अजूनही शिल्लक आहेत आणि त्या प्रसंगपरत्वे उफाळून येत असतात. अन्यथा, हिरोशिमा व नागासाकी यांच्यासारखा भयंकर नरसंहार घडला नसता व मानवी इतिहास रक्तरंजित पानांनी लडबडला नसता.

मानवाचा प्रवास पशू अवस्थेपासून येथपर्यंत झाला आहे आणि आपल्या आदर्शवादी विचारसरणीनुसार पुढे तो देवत्वाकडे व्हावा, असा संकेत आहे. देव हे अतिप्रगत व अतिसामथ्र्यशाली जीव होते, असे सिद्ध करू पाहणारे बरेच विद्वत्तापूर्ण साहित्य अलीकडे प्रसिद्ध झाले आहे. त्याच्या सत्यासत्यतेविषयी आपल्याला अधिकारवाणीने काही दावा करणे शक्य नाही. परंतु, आपल्या संस्कृतीतील, आपल्या पुराणांतील देवदेवतांच्या कथा वाचल्या तर ते ‘अतिप्रगत’ मानवसदृश जीव होते, असे वाटते. आणि विशेष म्हणजे त्यांच्या त्या अतिविकसित अवस्थेतही वेगवेगळे प्राणी हे त्यांचे सहचर होते. गणपती-उंदीर, शंकर-नाग, सरस्वती-मोर, (दुर्गा)लक्ष्मी-सिंह, विष्णू-गरुड, दत्त-गाय. किती उदाहरणे द्यावीत! राम तर सर्व वानरांचा सुहृद होता.

हिंदू पुराणांतील ही उदाहरणे आपल्याला एका गोष्टीची प्रखर जाणीव करून देतात. आपण ज्या विश्वात राहतो, (व त्याचे मालक असल्याच्या थाटात वावरतो) ते केवळ मानवाची मालमत्ता नव्हे. हे विश्व, हा निसर्ग हे सर्वाचे, मानवाचे, देवांचे, पशुपक्ष्यांचे, झाडाझुडपांचे, फुलापानांचे, कीटकांचे सर्वाचे अंगण आहे व सर्वाना तेथे मुक्तपणे बागडण्याची मुभा आहे. नाही, नाही.. डार्विनचा उत्क्रांतीवाद किंवा बिगबँग सिद्धांत यांच्या विद्वज्जड जंजाळात आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी शिरायलाच नको. विश्वाची उत्पत्ती कशातूनही झालेली असो, ते अनादि असो, आपल्यासमोरचे वास्तव हे आहे की ते त्यामध्ये असणाऱ्या साऱ्यांचे आहे व साऱ्यांना नि:पक्षपाती, उदंड प्रेम देते.

मानव आपले जीवन सुखकर व सुनियोजित करण्यासाठी अनेक गोष्टी शोधून काढतो. त्यापैकी एक म्हणजे लोकशाही. ती आजच्या घडीला तिच्या सर्व गुणदोषांसहित आदर्श शासनपद्धती आहे, हे आपण स्वीकारले आहे. परंतु, विश्वाच्या अफाट पसाऱ्याचा विचार करता लोकशाही फारच अपूर्ण आहे. मानवेतर सजीवांच्या दुनियेची ती पद्धती बनू शकत नाही. पशुपक्ष्यांना लोकशाहीचे कायदेकानू लागू पडू शकत नाहीत. आपण वन्यजीवन संरक्षक कायदा, पेटा वगैरे सर्व तरतुदी करतो, पण त्या पशुपक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी असतात; त्यांना आपल्या बरोबरीचे, समान लेखणाऱ्या नसतात. या तरतुदी करून आपण त्यांचे मसीहा बनू पाहतो. आपली लोकशाही आपल्याला हे विशेषाधिकार देते, कारण ती मानवाला सर्वोच्च समजते.

परंतु निसर्ग मानवाला सर्वोच्च समजत नाही. त्यामध्ये सर्व घटकांत सुरेख समतोल असतो. जणू एखादी सुरेल धून. मानव हा त्या समतोलातील एक घटक असतो; त्याचे सर्वस्व नव्हे. पण त्याच्या बौद्धिक क्षमतेमुळे हा समन्वय तोलून धरण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर आपल्या व्यतिरिक्त इतर जीवसृष्टीला संपवण्याचे किंवा तिच्याशी हिंसेने वागण्याचे स्वातंत्र्य मानवाला नसते. उलट, आपण सर्व या विश्वाचे, निसर्गाचे समान घटक आहोत, हे भान बाळगले तर विश्वाचे संतुलन राहील.

आमचे एक समविचारी स्नेही श्रीरामनवमी ते हनुमान जयंती हा आठवडा असा ‘विश्वशाही’ (ू२ेू१ूं८) चा आठवडा म्हणून पाळतात. हाच आठवडा का? श्रीरामाने वानरसेनेच्या साहाय्याने सीतेची रावणाच्या तावडीतून सुटका केली, असे मानले जाते. या सेनेतील हनुमान हा रामाचा परमभक्त बनला व त्याच्या हातून असाधारण कामगिरी घडली. श्रीराम व हनुमान यांच्या नात्याची ही गोष्ट म्हणजे देव, मानव व पशू यांच्यातील अतुल्य समन्वयाचा सौहार्दपूर्ण नमुना आहे. या विश्वाचे दुष्ट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी देवाने, म्हणजेच उन्नत मानवाने, प्राणीसृष्टीलाही आपल्या कार्यात सामील करून घेतले, त्यांना अत्युच्च कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्यातील त्या अपूर्व सुसंवादाचे स्मरण म्हणून हा आठवडा, विश्वशाहीचा आठवडा.

विश्वशाही म्हणजे काय? या विश्वातील सर्व सजीवसृष्टीला सामावून घेणारी जीवनपद्धती. आपल्या जवळपासच्या सर्व बाळगोपाळांना घेऊन आमचे स्नेही प्राणीसंग्रहालये, मत्स्यालये, प्राण्यांची इस्पितळे, पांजरपोळ, अभयारण्ये, पक्ष्यांची निवासस्थाने अशा ठिकाणी भेटी देतात. या आठवडय़ात मांसाहार करण्याचे टाळतात, सजीवांच्या प्राण्यांचे मोल देऊन केलेली औषधे वापरण्याचे टाळतात. पशु-पक्ष्यांना चारापाणी देतात. असं बरंच काही करतात.

याला विश्वशाही का म्हणायचे? लोकशाहीसारखी ती काही राज्यपद्धती आहे का? पण पशुपक्ष्यांसारख्या मुक्तजीवांसाठी कसले राज्य न् नियम? उलट त्यांचा निसर्ग त्यांना हवा तसा उपलब्ध करून देणे, त्यांना प्रेमाने वागवणे हे मनुष्याचे उत्तरदायित्व. आपण सर्व निसर्गाचे समान घटक आहोत, निसर्गावर मानवाने आपले नियम लादू नयेत, पण त्याचबरोबर आपल्या जबाबदारीचे भानही बाळगावे, ही विश्वशाही. संत तुकारामांसारख्या सत्पुरुषाने कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना हे भान दाखवले. प्राणी जरी मुके असले तरी प्रेमाची भाषा त्यांना समजते, ते प्रतिसादही देतात. एवढेच नव्हे, तर निसर्गही या भाषेला प्रतिसाद देतो.

एक गोष्ट आठवते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात सर्व सैन्य रणांगणावर आक्रमणाच्या तयारीत असताना सेनापती वॉशिंग्टनने त्यांना पुढे जाऊ दिले नाही, कारण मुंग्यांची रांग रस्ता ओलांडत होती. त्या युद्धात अमेरिकेचा विजय झाला. मुंग्यांमुळे? माहीत नाही. पण निसर्ग असे अनुभव देतो. आपल्यासारख्या विज्ञाननिष्ठ जगात राहणाऱ्यांना निसर्गाविषयीचे हे शाश्वत सत्य अंगी बाणवणे व विश्वशाहीचा आदर करणे अवघड ठरू नये.
डॉ. मीनल कातरणीकर -response.lokprabha@expressindia.com