lp33आपल्या देशाने ३० जानेवारी या दिवशी आपला राष्ट्रपिता गमावला. होय, ही महात्माजींची पुण्यतिथी. आपल्याकडे गांधीजींविषयी वस्तुनिष्ठपणे बोलणे अभावानेच आढळते. काही सन्माननीय अपवाद निश्चितच आहेत, पण बहुतेककरून त्यांचे कट्टर समर्थक व कट्टर विरोधक असे दोन गट आढळतात आणि समाजाची विभागणी ही सामान्यत: या दोन गटांमध्येच झालेली दिसते. या परिस्थितीत तरुण पिढीला गांधी विचारांची ओळख वस्तुनिष्ठपणे कशी होणार? आणि ती कोण करून देणार? समर्थक की विरोधक?

विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे गांधीजींविषयीचे उद्गार अनेकदा उद्धृत केले जातात- ‘असा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर आणखी काही वर्षांनी पुढील पिढय़ांचा विश्वास बसणार नाही.’ आपल्याला याविषयी काय वाटते, हे माहीत नाही; पण एवढे मात्र खरे, तरुण पिढीला गांधीजींबद्दल फारच कमी माहिती आहे. त्यांना ‘समकालीन’ गांधी व महात्मा गांधी यांच्यामधील फरकही माहीत नाही. आम्हाला समकालीन गांधींबद्दल काही म्हणायचे नाही, पण महात्मा गांधींविषयीच्या तरुण पिढीच्या अज्ञानाने वेदना होतात. ही परिस्थिती बदलावी, यासाठी आपला हातभार लागावा म्हणून ३० जानेवारीला काय करता येईल, याचा विचार करीत होतो.

‘मग, कशी साजरी करणार गांधीजींची पुण्यतिथी?’ आमच्या परिचयातील एका तरुण मित्राने विचारले. ‘आणि बेसिकली, इज इट रियली नेसेसरी? गांधी हॅज बिकम सो आऊटडेटेड!’ त्याने अगदी तरुण पिढीची मानसिकताच उघड केली.

हे सर्व अचंबित करणारं होतं. मुळात आपण कोणाची पुण्यतिथी ‘साजरी’ करतो, असा या तरुण पिढीचा समज का व्हावा? ज्या पद्धतीने पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात, त्या पद्धतीच या समजाला कारणीभूत असाव्यात. मोठमोठय़ा सभा, त्यातली लांबलचक कंटाळवाणी भाषणे, हार-तुरे, वेळप्रसंगी लाऊडस्पीकरवर वाजवले जाणारे अप्रासंगिक संगीत, कॅमेऱ्यांचे लखलखाट, इत्यादी सर्व घटक कुठल्याही पुण्यतिथीचे गांभीर्य घालवणारे आहेत. कोणाच्याही मृत्युदिनी त्या व्यक्तीचे समाजाला, देशाला, जगाला जे योगदान असेल त्याचे आदरपूर्वक स्मरण करायचे असते, याचे आपल्याला जणू विस्मरणच झाले आहे. आणि गांधीजींची पुण्यतिथीसुद्धा याला अपवाद नाही.

गांधीजी ‘आऊटडेटेड’ झाले आहेत का, या प्रश्नाचे तरुण पिढीला उत्तर देण्याइतकी पात्रता व क्षमता आमच्यात आहे का, हे आम्हाला माहिती नाही; कदाचित काळच ते उत्तर देऊ शकेल, पण एक मात्र दिसते, की गांधीजींचे अभिमानाने नाव मिरवणारे गांधी विचारांपासून मैलोगणती दूर आहेत. त्यांची भपकेबाज राहणी, उंची कपडे व आलिशान निवासस्थाने, विमान प्रवास, सर्व प्रकारचा बडेजाव यांतून त्यांच्यातील व गांधीजींमधील अंतर अधोरेखित होते. आज आपल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये महत्त्वाच्या रस्त्याला गांधीजींचे नाव दिलेले दिसते- एम. जी. रोड. पण त्या रस्त्याच्या जवळ राहणाऱ्या किती जणांच्या हृदयात गांधीजी आहेत, हा प्रश्नच आहे. कित्येकांच्या घरी गांधीजींच्या मोठमोठय़ा तसबिरी लावलेल्या असतात, गांधीजींचे चित्र असलेल्या शोभिवंत वस्तू अनेक जण वापरतात, पण सजविण्याचे सामान यापेक्षा त्याला अधिक किंमत नसते. गांधीजींची शारीरिक हत्या एकदाच झाली, पण त्यांच्या आचारविचारांची हत्या अनेकदा, अनेक प्रकारे होत आहे, असेच दुर्दैवाने निदर्शनास येते.

या सर्व विचारांच्या गलबल्यातून बाहेर येऊन आम्ही असे ठरविले की गांधीजींचे पुण्यस्मरण त्यांच्या आचार-विचारांच्या धर्तीवरच करायचे. गांधीजी दर सोमवारी मौन पाळत असत. आपणही ३० जानेवारीला मौन पाळायचे, तेही सार्वजनिक रीतीने. आमच्या शहरातील मध्यवर्ती मैदानात काही स्नेहीमंडळींसह जमलो. गांधीजींची तसबीर समोर ठेवली व सायंकाळी ठीक ५.१७ वाजता (गांधीजींची हत्या झाली, त्या वेळेस) मौनाला प्रारंभ केला. एक तासभर सर्वानी मौन पाळायचे ठरवले होते. भाषणे, हार-तुरे, टाळ्यांचा कडकडाट, लाऊडस्पीकर काही नाही; तसेच मोर्चे, घोषणाबाजी हेसुद्धा नाही. केवळ तासभर मौन. या कार्यक्रमासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घेतली होती, त्यामुळे बंदोबस्तासाठी पोलीस आले, पण अशी मौनसभा पाहून तेही चक्रावले. थोडय़ा वेळाने त्यांनाही असे वाटले की आमच्यात येऊन बसावे. जरा वेळ मौन पाळावे, पण ते डय़ुटीवर असल्यामुळे त्यांना तसे न करण्याची आम्ही विनंती केली. मैदानावर आमच्या अवतीभवती भिन्न भिन्न वयोगटांतील अनेक मुले खेळत होती. त्यांच्यातील काही जणांना या सभेचे कौतुक वाटले. ती आमच्या आसपास घोटाळू लागली. काही जण आमच्यात येऊन बसले, पण बहुधा काहीच होत नाही असे दिसल्यावर उठून गेले. एक तास संपल्यावर आम्ही उठलो व निघण्याची तयारी करू लागलो. काही तरुण मुले जवळ आली व ‘हा सगळा काय प्रकार होता?’ असे विचारू लागली. आम्ही त्यांना कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. त्यांची उत्सुकता चाळवल्यासारखे वाटले.

आमच्या परमस्नेह्य़ांनी आम्हाला नेहमीप्रमाणे टोकलेच, ‘काय मिळवलेत असल्या मौनरागाच्या आळवणीतून?’

खरंच, मौनातून काय मिळवायचं असतं? मन:शांती? चित्तशुद्धी?  ‘मौनं सर्वार्थसाधनम्’ असं म्हणतात, पण तो मौनाचा धोरणीपणाने केलेला उपयोग झाला. अबोला व मौन यांतही फरक आहे. अबोला रागातून, भांडणातून उद्भवतो; पण मौन पाळण्यासाठी कुठल्या रागाची किंवा कुणाशी भांडण व्हायची गरज नाही, तो स्वत:चा दृढनिश्चय असतो. मन निर्विचार करणे, त्यातील खळबळ शांत करणे, त्याच्या सामर्थ्यांचा प्रत्यय येणे, हे मौनातून साध्य होत असावे. गांधीजींना मौनाच्या या सामर्थ्यांची प्रचीती आलीच असणार.

आपल्याला मौनाची ही प्रचीती घेण्यापासून कोणी थांबवलेले नाही. पण त्यासाठी आपली सर्व गॅजेट्स, सोशल नेटवर्किंग इ. इ. बाजूला ठेवून फक्त मनासोबत राहण्याची तयारी हवी. या, गांधीमार्गाचे लहानसे अनुकरण करून गांधीजींचे पुण्यस्मरण करू या.
डॉ. मीनल कातरणीकर –