‘स्वातंत्र्य’ संकल्पना दोन सनातन प्रश्न आमच्या समोर उभे करते? ‘स्वातंत्र्य कोणापासून?’ ‘स्वातंत्र्य कशासाठी?’ आपल्या इतिहासात डोकावले तर यांची सरळ उत्तरेही मिळतात. दीडशे वर्षांहूनही अधिक काळ आपल्यावर राज्य करणाऱ्या परकीय सत्तेच्या पाशातून मुक्तता हे आपले राजकीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारतात नागरिकांना आचार, विचार, उच्चार, आहार, विहार, अभिव्यक्ती इत्यादींची मोकळीक देणारे ते घटनादत्त स्वातंत्र्य. असंख्य अनाम वीरांनी आपल्या रक्ताचे िशपण केले म्हणून तुम्ही- आम्ही आज स्वातंत्र्याचा जन्मसिद्ध अधिकार उपभोगतो आहोत.

पण अधिक खोलात गेल्यास असे दिसते की ‘स्वातंत्र्य’ ही अतिशय व्यापक व तितकीच क्लिष्ट संकल्पना आहे. तिचे महत्त्व केवळ राजकीय संदर्भात नाही, ते आपल्या सर्वाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. माझ्या मनाला येईल तसं मी वागू लागल्यास त्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत, स्वैराचार म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्यामध्ये काहीतरी नियंत्रण अभिप्रेत आहे. पण जेथे नियंत्रण आहे, तेथे स्वातंत्र्य कसे? अवघड पेच आहे; पण एका शहाणिवेने तोही सोडवता येऊ शकतो. आपले स्वातंत्र्य अबाधित राखताना दुसऱ्यांच्याही स्वातंत्र्याचा सन्मान राखला जाईल, अशी काळजी प्रत्येकाने घेतली, स्वत:च्या मोकळीकीचे स्वयंनियमन केले, तर कुठलाच पेच उरत नाही.

पण आज आपल्या अवतीभवती एकाचे स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याची फरफट असे होताना दिसत आहे. आपल्या कुटुंबप्रधान समाजव्यवस्थेत स्वातंत्र्याची व्यक्तिवादी कल्पना प्रबळ होताना दिसत आहे. कुटुंबाच्या एकसंधतेपेक्षा वैयक्तिक उत्कर्षांची आकांक्षा जोर करत आहे.

स्वातंत्र्याबद्दल आमचे हे जे विचारमंथन सुरू आहे ते एका विशिष्ट चिंताजनक घटनेमुळे. तुम्ही जर डोळसपणे अवतीभवती बघत असाल तर तुमच्याही लक्षात येईल की सध्या घटस्फोटांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. स्वतंत्र वृत्तीची मुलं आजकाल तडजोड करायला तयार नसतात. विवाह हा त्यांना आनंदापेक्षा गुलामगिरीचा, त्रासदायक बंधनाचा प्रसंग वाटू लागला आहे.

व्यक्तिवादी स्वातंत्र्याचा हा अतिरेकी परिणाम तर नव्हे? पण पुन्हा पेच! जे स्वातंत्र्य कुठल्याही जबाबदारीचं भान न देता केवळ मनमानी करायला शिकवतं, ते कसलं स्वातंत्र्य?

‘‘हे जरा टोकाचं झालं. घटस्फोट कुणी हौसेनं घेत नाही. प्रत्येकाचं काहीतरी जेन्युईन कारण असतं. ते माहीत झाल्याशिवाय त्याला मनमानी म्हणणं योग्य नाही.’’

‘‘एकदम मान्य. तुम्हाला एक गंमत सांगू का? आपल्याला आपले आई-वडील, नातेवाईक, सहकारी या कुणापासूनही घटस्फोट घेता येत नाही. कायदा आपल्याला फक्त जोडीदारापासून विभक्त होण्याचे स्वातंत्र्य देतो. आणि सध्या या स्वातंत्र्याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. पण तो हक्क बजावत असताना आपल्या मुलांचं काय, हा प्रश्न विभक्त होणऱ्यांना पडत नसेल का?’’

‘‘पडत असेलच. पण त्यांचा नाईलाज असणार.’’

‘‘मध्यंतरी आम्ही एक टॅगलाइन वाचली ‘पती-पत्नी विभक्त होऊ शकतात, पण आई-वडील नाही’. आई-वडील दोघांचंही प्रेम मिळणं हा मुलांचा हक्क नाही का? मग पती-पत्नींच्या स्वातंत्र्याच्या जयघोषात मुलांचा हक्क तुडवला जातो, त्याचं काय?’’

या समस्येने सध्या अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. विभक्त झालेल्या पती-पत्नींच्या मुलांच्या मानसिक समस्या, त्यांचं भकास मनोविश्व, त्याचे दूरगामी वैयक्तिक व सामाजिक परिणाम हा सध्याचा ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे.

त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या समविचारी मित्रांनी आपला स्वातंत्र्यदिन घटस्फोटित पालकांच्या मुलांसाठी प्रीतीभोजन आयोजित करून साजरा करायचे ठरवले. आणि मुलांबरोबर फक्त एक दिवस दोन्ही पालकांनी यावे असे प्रयत्न केले. पण यातली एक समस्या म्हणजे यांची कुठली एक संस्था वा संघटना नसते. त्यांना भेटायचे असेल तर कुटुंब न्यायालयाची मदत घ्यावी लागते. आमच्या मित्रांनी तेच केले. तेथील प्रमुख न्यायाधीश, समुपदेशक, वकील यांच्या सहकार्याने तेथे येणाऱ्या विभक्त पती-पत्नींना आमच्या कार्यक्रमाची कल्पना व तिचे महत्त्व समजावून सांगितले. तेथील साधारण निरीक्षण असे होते की, ‘इथे येणाऱ्या नवऱ्याला सगळ्या जंजाळातून सुटका हवी असते, बायकोचे लक्ष फक्त पोटगीकडे असते. मुलांची पर्वा दुर्दैवाने दोघांपकी कुणालाच नसते.’

कार्यक्रमाची कल्पना सर्वानाच चांगली पण महत्त्वाकांक्षी वाटली. कार्यक्रम काय? तर दुभंग कुटुंबातील मुलांनी आपल्या आई-वडिलांसमवेत भोजन करायचे. म्हटले तर कार्यक्रम अगदी साधा, म्हटले तर महाकठीण.

आम्ही गेली काही वष्रे हा कार्यक्रम करत आहोत. घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्यामध्ये समेट घडवून आणणे, हा आमचा उद्देश नाही. न्यायालयीन प्रक्रियेत आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला फक्त त्या दुभंग कुटुंबातील निष्पाप मुलांना प्रेम द्यायचे आहे. त्यांच्या जीवनात आल्हादाची पखरण करायची आहे. त्यांच्यासाठी स्वातंत्र्यदिन हा आल्हाददिन बनून यावा, असे आम्हाला मनापासून वाटते.

या कार्यक्रमामुळे आमच्यासमोरच अनेक प्रश्न उभे केले. स्वतंत्र भारतातील नवीन पिढी अशा विकल कुटुंबात, निष्प्रेम वातावरणात वाढणार? आपल्या जन्मदात्यांच्या ‘स्वतंत्र’ वागण्यामुळे त्यांची जी परवड झाली, त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असणाऱ्या प्रेमापासून ती वंचित राहिली, त्यातून त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल काय भावना जन्म घेईल? अशा भग्न बालपणाच्या शिदोरीच्या बळावर मोठेपणी ती सुसंस्कृत नागरिक होतील अशी अपेक्षा करता येईल का? भविष्यकाळात मानवता अशा ज्वालामुखीच्या तोंडावर उभी असणार का?

स्वातंत्र्यदिनाचे साचेबद्ध कार्यक्रम करण्यापेक्षा अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणाईला विचारप्रवृत्त करण्यात त्या दिवसाचे सार्थक होईल, असे आम्हाला वाटते.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com