अभिनेत्री मनवा नाईकच्या ‘पोरबाजार’ या सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून स्थिरावल्यानंतर निर्माती, दिग्दर्शक अशा जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या काही अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा आढावा-

सर्वच क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने ठामपणे उभ्या आहेत, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, तर त्यात चित्रपट अभिनेत्रींनी निर्मिती व दिग्दर्शन अशा अवघड वाटणाऱ्या क्षेत्रांतही यशस्वी पाऊल टाकले, तर त्या गुणाचे आपण विशेष अभिनंदन करायलाच हवे..
चित्रपटाच्या कथानायकाची जोडीदारीण म्हणजे नायिका अशी व्याख्या केव्हाच कालबाह्य़ झाली आहे. चित्रपटाची नायिका म्हणजे केवळ शोभेची वस्तू, असे म्हणणेदेखील गैर आहे.
चित्रपट अभिनेत्री म्हणजे ग्लॅमर व गॉसिप्स यासाठीचा अखंड पुरवठा होणारी संधी, असे कोणी समजत असेल तर तेदेखील चुकीचेच आहे. चित्रपट अभिनेत्रींची संवेदनशीलता, सकारात्मक दृष्टिकोन, तिने या माध्यम व व्यवसाय यामधील स्वीकारलेली आव्हाने या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत.
आपली ‘अभिनेत्री’ म्हणून होणारी जडणघडण सांभाळतच काही ‘मराठी तारका’ चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन या क्षेत्रांत उतरल्या आहेत.
मराठी चित्रपटाच्या देदीप्यमान, चौफेर, बहुरंगी, बहुढंगी वाटचालीमध्ये त्यांचादेखील रंग आहे. विशेष म्हणजे त्याबाबत दुर्गा खोटे ते मनवा नाईक, क्रांती रेडकर अशी खूपच मोठी परंपरा आहे. कौतुक करावे असे काही ठसे आहेत.
चित्रपट उद्योग पुरुषप्रधान अशा समजाला यातून जबरदस्त छेद बसतो. अभिनेत्रींना कॅमेऱ्यासमोर वावरायला आवडते. त्या ‘पडद्याआड’ राहून काम करू इच्छित नाहीत, अशा कुचाळक्या पुऱ्या झाल्या असे हे यश आहे. दिवसभर उन्हात उभ्या राहून या काय दिग्दर्शन करणार, यांना आपल्या मेकअपची काळजी, असे कुचकटपणे बोलणाऱ्यांना या तारकांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एखाद्या तारकेला कदाचित दिग्दर्शनात फारशी ‘चमक’ दाखवता आली नसेलही, पण तिच्या प्रयत्नांना दाद द्यायला हवीच. एखादीने निर्माती म्हणून उभे राहताना कामाच्या तणाव व धावपळीतून ‘कदाचित’ कोणाला दुखावलेही असेल, पण ते कळत नकळत झाले असे समजावे. मराठी चित्रपटनिर्मितीचे चाळीस-पन्नास जणांचे युनिट सांभाळणे इतके सोपे नसते. अभिनेत्री म्हणून सेटवर यायचे, आपले काम करायचे, निर्मात्याने पुरवलेल्या आलिशान गाडीत मस्त आराम करायचा आणि संध्याकाळी काम संपल्याबरोबर कोणत्या तरी ‘पार्टी’ला जाण्यासाठी घरी पळायचे असे ‘निर्मातीच्या भूमिके’त करता येत नसते. कलाकार निर्माता झाल्यावर त्याला चित्रपट व्यवसाय म्हणजे नेमके काय हे जास्तच व्यवस्थित कळते म्हणे. आदल्या दिवशीचे चित्रीकरण संपण्यापूर्वीच दुसऱ्या दिवशीच्या एकूणच कामाचा आवाका व खर्च विचारात घ्यावा लागतो, तर कलाकार दिग्दर्शक झाला, की त्याला सर्वच स्तरांवरच्या तंत्रज्ञांशी व्यवस्थित सुसंवाद ठेवावाच लागतो. प्रत्येक क्षेत्राची आपली कार्यपद्धती, कार्यशैली असते.
मराठी तारका निर्माती अथवा दिग्दर्शिका (काहींनी तर दोन्ही) झाल्यावर त्यांनी ते व्यवस्थित आत्मसात केले.
दुर्गा खोटे यांनी १९३८ सालीच ‘नटराज फिल्म’ ही निर्मिती संस्था स्थापन केली व ‘सवंगडी’ हा चित्रपट काढला. त्याच्यानंतर कमळाबाई मंगरूळकर यांनी ‘सावळय़ा तांडेल’ (१९४२) ते ‘जन्माची गाठ’ (१९४९) असे काही मराठी चित्रपट निर्माण केले. रत्नप्रभा यांनीही ‘संत कान्होपात्रा (१९५०) हा चित्रपट निर्माण केला.
मधुमती या अभिनेत्रीने ‘सावली प्रेमाची’ (१९८०) या चित्रपटाची निर्मिती करताना सुनील गावस्करला चक्क क्रिकेटच्या मैदानावरून चित्रपटात आणले. म्हणजेच मराठी तारका निर्मात्या झाल्यावर त्यांनी चाकोरीबाह्य़ पावले टाकली, हे उल्लेखनीय. (सुनील गावस्करची ‘अभिनयात विकेट’ पडली ते जाऊ दे.) या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते.
अभिनेत्री निर्माती या गुणामध्ये सीमा देव यांची दखल उल्लेखनीय ठरावी. त्यांनी रमेश देव यांच्याबरोबरीने उभे राहत दत्तात्रय फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. ‘या सुखांनो या’ (१९७५), ‘दोस्त असावा तर असा’ (१९७८), ‘सर्जा’ (१९८७), ‘जीवा सखा’ (१९८९), ‘जेता’ (२०१२) अशा काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. यापैकी ‘दोस्त असावा तर असा’ या चित्रपट निर्मितीत हिंदीतील त्या काळातील महत्त्वाचे निर्माते देवेन्द्र गोयल यांचाही सहभाग होता. त्यांच्या ‘आदमी सडक का’ या चित्रपटावरूनच हा मराठी चित्रपट निर्माण झाला.
सुमती गुप्ते-जोगळेकर यांनीदेखील निर्माती म्हणून चांगली पावले टाकली. ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’, ‘वाट पाहते पुनवेची’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. विशेष म्हणजे, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाचे त्या काळातील वितरणातील दादा गुलशन रॉय यांनी आपल्या मॉडर्न मुव्हीजच्या वतीने केले व हा चित्रपट तेव्हा मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित अशा मेट्रो या चित्रपटगृहात सकाळच्या खेळाला प्रदर्शित झाला, म्हणजेच काही अभिनेत्रींना निर्माती म्हणून उभे राहताना काही मान्यवरांची साथ मिळाली.
तर अभिनेत्री कुंदा भगत यांनी आपले पती भाई भगत यांच्या सहकार्याने ‘यशोदा’ या चित्रपटाची निर्मिती करताना अलिबागमधील चौल येथे चित्रीकरण केले.
‘अभिनेत्री निर्माती’ या वाटेवर आणखी काही नावे घेता येतील. रत्नमाला (ओवाळिते भाऊराया), आशा काळे (चांदणे शिंपीत जा), प्रेमा किरण (उतावळा नवरा), अन्नपूर्णा (बांगडय़ा भरा), भारती आचरेकर (सखी), तेजस्विनी पाटील (दादा फक्त तुझ्यासाठी).
जयश्री गडकर यांनी सामाजिक कथांपासून लावणीप्रधान नाटय़ापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपटांतून सारख्याच तन्मयतेने भूमिका साकारल्या. अनेक प्रकारच्या दिग्दर्शकांकडे त्यांनी भूमिका साकारल्याने त्यांच्याकडून असणारी चित्रपट दिग्दर्शनाची अपेक्षा त्यांनी ‘सासर माहेर’ व ‘अशी असावी सासू’ अशा चित्रपटांच्या दिग्दर्शनातून पूर्ण केली. तेव्हा त्यांनी कोल्हापूरमधील चित्रीकरणाच्या वेळी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आमंत्रित केले असता, अवघ्या अडीच तासांत तुम्ही एखाद्या चित्रपटाची सगळी अंगे तपासून समीक्षा कशी करता, असा प्रश्न केला. आपण दिग्दर्शनात उतरल्यावर हे माध्यम आपल्याला अधिक लक्षात आले, असेही त्या म्हणाल्या.
स्मिता तळवळकरने ‘अस्मिता चित्र’ अशी निर्मिती संस्था स्थापतानाच ‘बौद्धिक मनोरंजना’कडे आपले लक्ष केंद्रित केले. निर्माती म्हणून ‘कळत नकळत’ (दिग्दर्शक कांचन नायक) या पहिल्या चित्रपटापासून तिने वेगळी वाट धरली. तिच्या बॅनरचे २०१४ हे पंचविसावे वर्ष असताना स्मिताचे निधन व्हावे हे दुर्दैवाचे! ‘चौकट राजा’ (दिग्दर्शक संजय सुरकर), नंतर ‘तू तिथे मी’, ‘सवत माझी लाडकी’ यांचे दिग्दर्शन तिने केले. आपल्या चित्रपटाची चर्चा व्हावी, तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याबाबत स्मिता प्रचंड जागरूक असे.
उषा चव्हाणने ‘गौराचा नवरा’ या मसालेदार मनोरंजन चित्रपटाची निर्मिती करताना त्यात दुहेरी भूमिका साकारली. सुषमा शिरोमणीने तर दादा कोंडकेंच्या चलतीच्या काळात स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले. ‘तेवढं सोडून बोला’ या चित्रपटापासून सुषमाची जबरदस्त घोडदौड सुरू झाली. ‘भिंगरी’, ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारंगी’ अशा ‘महामनोरंजना’त सुषमाने रेखा, जीतेन्द्र, मौसमी चटर्जी, रती अग्निहोत्री यांना मराठीच्या पडद्यावर नाचवले. रेखाला मराठीत आणण्याची सुषमाने धमक दाखवली याबाबत तिचे खास कौतुक हवे. रेखानेदेखील ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ ही लावणी फक्कडपणे नाचवली. चित्रपट गावभर यशस्वी ठरल्याची चर्चा रेखाला समजल्यावर तिने ते पाहायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सुषमाने खास तिच्यासाठी ट्रायल आयोजित केली. अभिनेत्री निर्माती व दिग्दर्शिका म्हणून ठामपणे उभे राहताना असा प्रतिसाद मिळणे, कमालीचे सुखावणारे असते. ‘भन्नाट भानू’, ‘गुलछडी’ अशा चित्रपटांच्या दिग्दर्शनातून सुषमाने आपली यशस्वी वाटचाल पुढे सुरू ठेवली. सुषमाच्या यशाने काही निर्माते-दिग्दर्शक हबकून गेले होते. हीच चित्रपट जगतातील गंमत आहे.
चित्रा पालेकर दिग्दर्शनात वेगळय़ा वाटेने जाणार हे स्वाभाविकच होते व ते ‘माती माय’ने सिद्ध केले. किशोरी शहाणे-वीज हिचे पती दीपक बलराज वादळी विषयांना हाताळणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात (‘सैलाब’, ‘हप्ता बंद’, ‘हप्ता वसुली’ इत्यादी); पण किशोरीने दिग्दर्शन करताना ‘मोहित्यांची रेणुका’ अशा सामाजिक विषयाला पसंती दिली. निर्माती म्हणून उभे राहताना ‘ऐका दाजिबा’चे दिग्दर्शन दीपक बलराजला दिले. अलका आठल्येने ‘अग्निपरीक्षा’ चित्रपटाची निर्मिती करताना कारकिर्दीत पहिल्यांदा दुहेरी भूमिका साकारली, तर ‘आम्ही का तिसरे’मध्ये तृतीय पंथीयांच्या समस्यांना मांडले. या चित्रपटातून तिने स्वत: भूमिका साकारणे नाकारले. आपल्या ‘सोशिक नायिका’ प्रतिमेचा विषयाला फटका बसू नये असा सुज्ञपणा तिने दाखवला. कांचन अधिकारीने चक्क सात चित्रपटांचे दिग्दर्शन केले. अश्विनी भावे लग्नानंतर सनफ्रॅस्किको (अमेरिका) येथे सुखावली; पण तिचे ‘कलावंत मन’ मुंबईकडे होते. अशातच तिने चंद्रकांत कुलकर्णीकडे दिग्दर्शन सोपवून ‘कदाचित’ची निर्मिती केली. निशा परुळेकर हिनेदेखील ‘शंभू माझा नवसाचा’ची निर्मिती केली. आदिती देशपांडेने गजेन्द्र अहिरेकडे दिग्दर्शन सोपवत ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटाची निर्मिती करून बरेच ‘मानाचे पुरस्कार’ मिळवले. मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पुरस्कार पटकावणे भावनिक गोष्ट असते, त्यातून भरपूर मानसिक आनंद मिळतो. अलीकडे त्या पुरस्कारांचा सुकाळ झाला आहे. तो टाळता आला तर अभिनेत्री निर्माती-दिग्दर्शिका प्रचंड सुखावतील. आदिती देशपांडेने ‘मायबाप’चीही निर्मिती केली. नीना कुलकर्णीनेही गजेन्द्र अहिरेंकडे दिग्दर्शन सोपवत शेवटी चित्रपटाची निर्मिती करून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. नीनाच्या या प्रयत्नांचे अधिक कौतुक करायला हवे होते. रेणुका शहाणेचे ‘रिटा’च्या दिग्दर्शनाच्या वेळी भरभरून कौतुक झाले, पण तिच्या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा होत्या. रेणुकाला मानणारा मोठा वर्ग समाजात आहे.
अर्चना जोगळेकरने निर्माती म्हणून उभे राहताना ‘बॅक टू अमेरिका’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. दिग्दर्शक दिलीप शंकर. तिने ‘कालचक्र’च्या वेळचे नाते जपले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील वैजयंतीमाला (झेप), पद्मिनी कोल्हापुरे (भुताचा भाऊ), विद्या सिन्हा (बिजली) अशा काही जणी मराठी चित्रपटाच्या निर्मात्या म्हणून उभ्या राहिल्या. शिल्पा शिरोडकरने ‘सौ. शशी देवधर’ची निर्मिती करताना सई ताम्हणकरला आव्हानात्मक अभिनयाची दिलेली संधी सईने पेलली. सई ताम्हणकर उत्तम अभिनय साकारते हा भक्कम पुरावा या चित्रपटाने दिला. एक अभिनेत्री निर्मातीच दुसऱ्या अभिनेत्रीला चांगली संधी देऊ शकते. पूनम झंवर या हिंदीतील अभिनेत्रीनेही मराठी चित्रपटाची निर्मिती केली. दक्षिणेकडची रेणू देसाईही मराठीत निर्माती झाली.
अभिनेत्रीने कोणत्या टप्प्यावर निर्माती अथवा दिग्दर्शिका व्हावे हे व्यक्तिगत इच्छा, अपेक्षा, दृष्टिकोन यावर अवलंबून आहे. मृणाल कुलकर्णीने त्याबाबतचा आत्मविश्वास वाढल्यावर ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते’च्या दिग्दर्शनात पाऊल टाकले व दादही मिळवली. इतिहासाची तिची आवड व भरपूर वाचन यातून तिने ‘रमा माधव’चे दिग्दर्शन केले. मनवा नाईकने ‘पोरबाजार’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे आव्हान पेलले. क्रांती रेडकरने ‘काकण’चे दिग्दर्शन करताना स्वत: या प्रेमकथेची नायिका होणे टाळले व व्यक्तिरेखेची योग्य गरज म्हणून ऊर्मिला कानेटकर-कोठारेला संधी दिली. यावरून अभिनेत्री दिग्दर्शिका स्वत:लाच भरपूर वाव मिळण्यासाठी दिग्दर्शनात उतरते ही टीका योग्य नाही, असेही म्हणायला हवे. काही जणींनी कदाचित तसे केलेही असेल, तो ‘नटी स्वभावधर्म’ झाला. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तारका तेवढय़ा गोष्टी हे चालायचेच.
काही मराठी तारका आर्थिक बळावर निर्मात्या झाल्याही असतील, पैशाशिवाय निर्मितीचे आव्हान पेलता येत नाही. काही जणींनी प्रेक्षकांना काही तरी विशेष द्यावे अशा भावनेने चित्रपट निर्मिती व दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. पडद्यावर येण्याची सवय व हौस कायम वाढताना, पडद्यामागची जबाबदारी स्वीकारताना बरीच मानसिक-भावनिक तयारी करावी लागते. त्यासाठी या अभिनेत्री उभ्या राहिल्या म्हणून या परंपरेचे विशेष अभिनंदन करायलाच हवे.
महिला दिग्दर्शिका बाहेरगावच्या चित्रीकरणाच्या वेळी दिवसभरच्या कामाचा गांभीर्याने आढावा घेतात (काही पुरुष दिग्दर्शकांप्रमाणे बैठकीत ओलावा मिळवत नाहीत.) आणि त्या आपल्या चित्रपटातील स्त्री कलाकारांच्या गरजा व्यवस्थित समजून घेतात.
अशा अनेक लहान-मोठय़ा गोष्टींनी या अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका (काही जणी त्यासह पटकथाकार वितरक वगैरेही) यांच्या वाटचालीचे वैशिष्टय़ आहे.. तर ‘महिला निर्माता व दिग्दर्शिका’ यांचेही प्रमाण याबरोबरीने वाढणारे आहे. त्यात श्रावणी देवधर, सुमित्रा भावे, अरुणा राजे इत्यादी अनेक जणी आहेत.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे