lp10दिवाळी २०१४
आपल्याला त्याचा चेहरा माहीत नसतो. तो काय करतो, कुठे असतो, आवडीनिवडी, हे काहीही माहीत नसतं; पण एफएमवर पिक्चर्र्र्र पांडे.. हे शब्द ऐकले की, एकदम ओळख पटते. एफएमवर बोलताना जुना मैतर भेटल्यासारखं वाटतं. फीव्हर १०४ या एफएमसाठी काम करणारा अनुराग पांडे हा असा आहे. तर या पिक्चर्र्र्र पांडेला अर्थातच पहिला प्रश्न होता, की इतर मुलांसारखं डॉक्टर, इंजिनीअर, गायक असं काहीही न होता तो आरजे का झाला? त्याच्याकडून एकदम वेगळंच उत्तर आलं. तो लहानपणी सतत आजारी असायचा. त्याचे वडील डॉक्टर होते. त्यामुळे घरात टीव्ही, फिल्म्स बघायची परवानगी नव्हती. मग आजारी असणारा माणूस टाइमपास तरी कसा करणार? त्याने रेडिओ ऐकायला सुरुवात केली. सकाळपासून रात्रीपर्यंत रेडिओ सुरू असायचा. त्याला रेडिओबद्दल अप्रूप वाटायचं. पुढे अभ्यासासाठी तो इंदोरला गेलो. तिथे जवळच रेडिओ स्टेशन होतं. त्याचं अनुरागला विलक्षण आकर्षण होतं. त्यामुळे आपण मोठेपणी रेडिओशी संबंधित काही तरी करायचं, असंच त्याने ठरवून टाकलं. 

त्याच्या ‘पिक्चर्र्र्र्र पांडे’ असं बोलण्याच्या स्टाइलवर सगळेच फिदा; पण याचं श्रेय संपूर्ण टीमचं असल्याचं तो कबूल करतो. तरुणाईच्या चर्चेचा विषय असलेल्या त्याच्या आवाजाची काळजी तो कशी घेतो हे विचारलं. तो म्हणाला, ‘‘गरम पाण्याने गुळण्या करतो. थंड पाणी पिणं टाळतो. प्रवासात मोठय़ाने बोलावं लागत असल्यामुळे मी त्या वेळी फारसा बोलत नाही. याशिवाय मी आठ तास झोपतो; पण आवाज हा वीस टक्के महत्त्वाचा असतो. विचार, वागणूक, दृष्टिकोन यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.’’ मीडियामध्ये काम करताना सतत सतर्क आणि अपडेटेड राहावंच लागतं. आरजेचंही तसंच. अनुराग सांगतो, ‘‘सभोवताली घडणाऱ्या घडामोडींची माहिती आरजेला असायलाच हवी. तसंच कधी काय बोलावं याचं भान असणं आवश्यक आहे.’’ ही सगळी माहिती वेगाने सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्स. त्यामुळे अशा साइट्स ज्ञान वाढवण्यात फायदेशीर ठरतात. अनुराग म्हणतो. ‘‘सोशल साइट्सवर अ‍ॅक्टिव्ह असल्याचा खूप फायदा होतो. माझ्या फॅन पेजचाही फायदा होतो. अनेक लोक या पेजवर माझ्याशी संवाद साधतात. त्यांच्याकडूनही मला माहिती मिळत असते. सोशल साइट्समुळे अनेक लोकांशी संवाद साधणं खूप सोपं जातं.’’ आरजेसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असणंही गरजेचं असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
पडद्यावरच्या कलाकारांसोबत आता आरजेंचाही चाहता वर्ग वाढतोय. त्यांच्या आवाजानेच नाही, तर चेहऱ्यानेही त्यांना आता ओळखलं जातं. त्यामुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य यातला समतोल साधणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम असतं. अनुराग ते तंतोतंत पाळतो, ‘‘व्यक्तिगत आणि व्यावसायिक ही दोन्ही आयुष्यं वेगळीच ठेवावी. दोघांनाही समान महत्त्व द्यावं, वेळ द्यावा. दोन्ही आयुष्यांचा एकमेकांवर नक्कीच परिणाम होत असतो. त्यातून अनेकदा शिकायलाही मिळत असतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात जास्त लक्ष कामात असतं. कालांतराने तुम्ही स्थिर होता. मग कौटुंबिक प्राधान्ये वाढतात.’’ व्यक्तिगत आयुष्यातल्या घटनांचा कार्यक्रमावर परिणाम होणं अत्यंत स्वाभाविक आहे; पण त्यातही तोल ढळू न देता पहिलं कर्तव्य, जबाबदारी काय याचा विचार करावा, असं अनुरागचं मत आहे. तो एका उदाहरणादाखल हे पटवून देतो. ‘‘गाडीने रेडिओ स्टेशनला येताय आणि रस्त्यात भांडण झालं. प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं. तुम्ही स्टुडिओत आलात. तीन मिनिटांत तुम्ही ऑन एअर जाताय. तरी नेहमीसारख्या शैलीत बोलता. आरजे म्हणून लोकांचं मनोरंजन कसं करता हे महत्त्वाचं असतं.’’ तो सांगतो.
अनुरागच्या रोजच्या बोलण्यामागे अभ्यास असल्याचा प्रत्यय येत होता. तो रोज सकाळी इंटरनेटवर १७ वर्तमानपत्रे वाचतो. तसंच प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनल्स पाहतो. कुठे काय बोललं जातंय त्यावर तो विचार करतो. काय योग्य-अयोग्य ते बघतो. अध्ययन, मनन, चिंतन या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. आरजेच्या ३५ या वयोमर्यादेच्या नियमाबाबत तो मत मांडतो की, ‘‘वयोमर्यादा असायला हवी असं मला वाटत नाही. वाढत्या वयाने अनुभव वाढतो. जगातले अग्रणी असलेले आरजे पंचविशीच्या पुढचे आहेत. दररोज कलाकार, राजकारणी, मोठमोठी व्यक्तिमत्त्वं यांच्याशी बोलणं, माहिती घेणं असं सुरू असतं. हा अनुभव कामी येतो. नियमित अभ्यास, ज्ञान, मतं, विचार यामुळे सुजाण होतात.’’ आजच्या ट्रेंडी तरुणाईची भाषा रेडिओमध्येही ऐकायला मिळते. ही भाषा ऐकून आपल्या संस्कृती सोडण्याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतात. याविषयी अनुराग सांगतो की, ‘‘भारतात किती संस्कृती आल्या? पíशयन, मुस्लीम, ब्रिटिश आले तरी आजही िहदू मुलं वडीलधाऱ्यांच्या पाया पडतात. शिवाय िहदुस्थानात राहणारे ख्रिश्चन, मुस्लीम आपल्या संस्कृतीलाच पुजतात. त्यामुळे संस्कृती सोडण्याचा प्रश्नच नाही.’’
आरजे म्हणून यंगिस्तानाच्या भाषेत बोलणारा अनुराग तितकाच वैचारिकही आहे. सामाजिक, नैतिक जबाबदाऱ्यांचं त्याला भान आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘‘कोणत्याही भाषिकांविरुद्ध, संप्रदायांविरुद्ध भाष्य करू नये, कोणाचं मन दुखावता कामा नये, ही जबाबदारी असते. रास्ता रोको, रेल रोको होतं तेव्हा लोकांच्या तक्रारींवरून आरजे राजकारण्यांना प्रश्न विचारतात. अशा वेळी त्यांच्याकडून येणारा प्रतिसाद, उत्तरं याचं भान ठेवावं लागतं. मला मिळालेली उत्तरं लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणणं, त्यांना खूश ठेवणं, प्रोत्साहित करणं, त्यांच्याकडून प्रेरित होणं अशा अनेक जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत.’’ सामाजिक जाणीव असलेला अनुराग इथे मन जिंकून घेतो. मुंबईत आलो तो दिवस आयुष्याचा ‘टìनग पॉइंट’ असल्याचं सांगणारा अनुराग आरजे म्हणून एक ब्रँड झाला आहे.