‘पंढरीच्या वाटेवर प्लास्टिकचे साम्राज्य, अन्नाची नासाडी, घाणीचे डोंगर’ हा मथळा असलेला अंक वाचून असे वाटले की पंढरीची वारी आता नियोजित करण्याची वेळ आली आहे. लाखो भक्तांऐवजी निवडक पन्नास-पंचाहत्तर हजार लोकांचे पंजीकरण करून प्रत्येक वारीत जाणाऱ्या गावांतून निवडक पाच-सात लोकांनी दिंडीत प्रवेश घ्यावा. त्यांनी आपल्याबरोबर जेवणासाठी ताट, वाटी न्यावे व प्लास्टिकच्या कप/बशा/पत्रावळींना आगदी र्निबध असावा. सोबत काळय़ा रंगाची मोठी एक प्लास्टिकची थैली ठेवावी व जो काही कचरा कराल तो त्या प्लास्टिक थैलीत एकत्र करीत एका ठिकाणी नगरपालिकेच्या स्वाधीन करावा. जेवणसुद्धा भरमसाट न देता मोजकेच द्यावे. धर्माचा अति हव्यास करू नये व अंधश्रद्धाही ठेवू नये. वारकऱ्यांनी स्वत:च्या कपडय़ाइतकीच स्वच्छता इतरत्र ठेवावी. पर्यावरणाचे संरक्षण हे वारीचे आणि वारकऱ्यांचे ब्रीदवाक्य असावे!
– चंद्रकांत लेले, भोपाळ.

आणखी काही म्हणी…
मराठीतील वाक्प्रचार व म्हणी एका ठिकाणी आणण्याचा आपला उपक्रम स्तुत्य आहे. प्रशांत दांडेकर यांच्या मराठी तितुकी फिरवावी या लेखमालिकेतून आणि वाचकांच्या मिळालेल्या प्रतिसादातून ‘मराठी वाक्प्रचार व म्हणी- एक संकलन’ अशा आशयाचा एखादा ग्रंथ यातून होऊ शकतो. वरील अंकात दिलेल्या अंक, आकडय़ांवरून आलेल्या म्हणी व वाक्प्रचारात मीही थोडी भर घालू इच्छितो.
१. दोन – ‘दोघांत तिसरा’ दोन व्यक्तींमध्ये आगांतुकपणे येऊन ढवळाढवळ करणारा.
२. पाच- ‘पाचावर धारण बसली’ मनात भीती घर करून बसणे. या म्हणीला एक इतिहास आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तांदळाचा भाव रुपयाला सोळा मण असायचा तो रुपयाला पाच मणापर्यंत खाली आला. तेव्हा लोकांच्या मनात महागाईविषयीची भीती घर करून बसली. लोक म्हणू लागले, अहो, काय झाले म्हणून काय विचारता? पाचावर धारण बसली. आता काय होणार? तो परमेश्वरच जाणे!
३. पंचावन्न- ‘पहिले पाढे पंचावन्न’ आधी शिकवलेला सर्व अभ्यास विसरला.
वरील उदाहरणे केवळ दाखला म्हणून दिली आहेत. त्यात त्रुटी असल्या तर वाचक मंडळी सुधारणा सुचवू शकतात.
– सुधाकर वासुदेव देशपांडे, शिंपोली, बोरीवली.

सहकार जागरचे पुस्तक व्हावे…
रमेश पंडित लिखित लेखमाला ‘सहकार जागर’ ही अतिशय उपयुक्त लेखमाला आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था कशा चालवाव्यात यासंबंधीचे अगदी तपशीलवार विवेचन त्यात आहे. ही लेखमाला पुस्तकरूपाने उपलब्ध व्हावयास हवी. मराठी आणि इंग्रजी दोन्हीत झाल्यास फारच छान. त्यात त्यांनी वेळोवेळी भरावे लागणारे फॉम्र्स, ते कुठे भरायचे, संबंधित सरकारी, निमसरकारी खाती, ज्या नियमांचा उल्लेख केलेला आहे त्याबद्दल जास्त माहिती किंवा ते नियमच अशा माहितीची पुरवणी जोडल्यास ते पुस्तक एक आवश्यक संदर्भ म्हणून उपयोगी पडेल. पंडितांचे मन:पूर्वक अभिनंदन.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद (ई-मेलवरून)

अपघात टाळता येतात
‘अपघात कसे टाळाल’ ही निशांत सरवणकर यांची कव्हरस्टोरी वाचली. लेखातील चौकटीत लिहिलेली ‘अपघाताची कारणे’ ही महत्त्वाची, थोडक्यात फ्लोरोसंट रंगात मोठय़ा फलकांवर महामार्गावर जागोजागी लावली पाहिजेत.
रोज हल्ली टीव्ही लावावा तर थरकाप उडवणारी अपघाती दृश्ये व सकाळी पेपर उघडावा तर अस्वस्थ करणारी माहिती वाचायला मिळते. त्यात बरेचदा लग्नाचे वऱ्हाड, तर कधी देवदर्शनाला जाणारे कुटुंबच मृत्युमुखी पडलेले दिसतात. अशा वेळी वाईटच, पण सारासारविचार फक्त मनात असा येतो की कायम अपंगत्व/ स्मृती जाणे वगैरे येण्यापेक्षा अपघाती मृत्यू ओढवलेला ठीक. पूर्वी रोगाच्या साथीने मृत्यू यायचे तसेच हल्ली बरीच माणसे अपघाती मरण पावतात. तासाला सरासरी अठरा माणसे अपघाताने मरण पावतात.
२०१४ मध्ये आपण वाहन निर्मितीत चौथ्या क्रमांकावर आहोत. अपघाताविषयी त्रिसूत्री मुद्दय़ांवर विचार राबवयाला हवा. १) सुरक्षित वाहन. २) कुशल संयमी वाहक व ३) उत्तम रस्ते. युरोपात सर्व गाडय़ांना दिवसाउजेडीही गाडीचे दिवे असणे सक्तीचे आहे, तसे भारतातपण दिवे लावले तर हलणारी गाडी पादचाऱ्यांच्या आणि इतर वाहकांच्या चटकन लक्षात येईल. नवीन गाडय़ांना मागचे वाहन, बाजूचे वाहन यापासून अंतर ठेवण्यास सुचविणारे इंडिकेटर्स व आलार्म असणे, वाहकाने दारू प्यायल्यास दारूच्या वासाने इंजिन बंद पडणे, पावसाचे थेंब काचेवर पडल्यास वायपर्स आपोआप चालू होणे, महामार्गावर वाहकाचा डोळा लागल्यास गाडी बंद पडणे, सीट बेल्ट न लावल्यास हॉर्न वाजणे वगैरे अधुनिक सुधारणा नवीन गाडय़ांना असाव्यात. गाडीचा रंग, वातानुकूलित, सुंदर डेक व पॉश सीटस् वगैरे बघण्यापेक्षा सुरक्षा महत्त्वाची.
अपघात टाळायचे असतील तर सिग्नलचे कठोर पालन करायला हवे. सिग्नल हिरव्याचा पिवळा झाला की वेग कमी करायला हवा, पण आपण अलीकडे असलो तर उलट वेग वाढवतो व निसटतो. १५-२० मिनटे उशिरा पोचलात तर चालेल. पण १५-२० वर्षे लवकर कशाला जावे? ज्येष्ठ नागरिकांनी रस्ता क्रॉस करताना हाताने ‘माझ्या मागून जा’ असा इशारा करावा म्हणजे वाहकाचा गोंधळ उडत नाही.
मुंबईत बॅण्डस्टॅडवर एक लक्षवेधी मोठा बोर्ड पाहिला. दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झालेली दाखवून खाली मोठय़ा अक्षरात लिहिले होते, You want to be in peace or pieces. कुटुंब तुमची घरी वाट पाहत आहे, गाडी काळजीपूर्वक चालवा.
श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई.

ठेवा पावसाळी भाज्यांचा
पावसाळा सुरू झाला की वर्षभर कुठेतरी दडी मारून बसलेले किडे, कीटक, बेडकासारखे प्राणी आजूबाजूला वावरायला लागतात. अनेक प्रकारची रानफुले आणि वेली पावसाळय़ात उगवतात आणि पाऊस गेल्यावर जमिनीच्या पोटात गडप होतात. पावसाच्या एक दोन सरी येऊन गेल्या की रानावनात, डोंगर उतारावर, नदीकाठच्या ओलसर ठिकाणी रानभाज्यांचे कोवळे कोंब डोकावू लागतात आणि जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत रानभाज्या तरारून उठतात. कोकण आणि पश्चिम घाट म्हणजे रानफुले आणि रानभाज्यांचे भांडार. या ठिकाणी पावसाळय़ात विविध प्रकारची रानफुले आणि रानभाज्या उगवतात. ठाणे जिल्हा हा रानभाज्यांचे आगार आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून आदिवासी आणि कातकरी स्त्रिया मुंबईच्या भागात रानभाज्या विकायला आणतात. पावसाळय़ाच्या दरम्यान या स्त्रिया भल्या पहाटे उठतात आणि जंगल, डोंगर उतारावरून कोवळय़ा रानभाज्या गोळा करतात आणि लोकलने मुंबईत येऊन त्याची विक्री करतात. निसर्गात आढळणाऱ्या या रानभाज्या म्हणजे केवळ उदरभरणाचे साधन नाही तर तो एक औषधी गुणधर्माचा मौल्यवान ठेवा आहे. या रानावनात सापडणाऱ्या रानभाज्यांच्या औषधी खजिन्याचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करावा. गेल्या काही वर्षांत अशा रानभाज्यांविषयी खूपच जागृती झाली आहे. काही रानभाज्यांची पाककृती काहीशी किचकट असली तरी केवळ कांदा, लसूण, मीठ व तेलाचा वापर करून या रानभाज्या अधिक रुचकर आणि खमंग करता येतात. पावसाळय़ात अनेक प्रकारचे साथीचे व जलजन्य आजार उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही वाढायला लागतात अशा वेळी पचायला हलक्या असणाऱ्या या रानभाज्या औषधी म्हणून मानवी शरीरास उपयुक्त पडतात. पावसाळय़ात केवळ दोन ते तीनच महिने या उपलब्ध असतात. शिवाय या रानभाज्यांची पाने कोवळी असतानाच त्यांची भाजी करावी, अन्यथा पाने जून झाल्यावर त्यांची चव फारशी चांगली लागत नाही. या रानभाज्या घरी आणल्यावर त्या स्वच्छ पाण्याने धुवून त्यांचा वापर करावा. या रानभाज्या पावसाळय़ात उगवत असल्यामुळे त्यांना पावसाळी भाज्याही म्हणतात. यातील काही रानभाज्यांची फुलेही भाजीत वापरतात. घोळ (Porthulaca), भारंगी (Clerodendrum Serratum), टाकळा (Cassia tora), शेवळा (Amorthophylus Commutatis), फोडशी (Celosia Argentea), बाफळी (Percedanum Grande), करटुली (Momerdica Dioica), काटेमाठ (Amarantus Spinosus) अशा रानभाज्या कृमिनाशक असतात. पावसाळय़ात फोडशीच्या भाजीच्या जुडय़ा विकायला येतात. फोडशी हा गवताचा प्रकार आहे, पण ही भाजी करण्याआधी त्यातले तण काढून टाकावेत, अन्यथा ही भाजी चरचरीत लागते. सुकी मासळी घालून ही भाजी अधिक खमंग करतात. या भाजीमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण मर्यादित राहतं. म्हणून मधुमेही व्यक्तींनी फोडशीची भाजी हमखास खावी. कोवळय़ा टाकळय़ाची भाजी त्वचाविकारावर उपयुक्त आहे. उन्हाळय़ात शरीरावर बारीक पुरळ उठते, खाज निर्माण होते यासाठी टाकळय़ाची भाजी आवर्जून खावी. अंगाला कंड सुटल्यास टाकळय़ाच्या बियांची कॉफी प्यायला देतात. भारंगीची भाजी श्वसनाचे विकार, दम्यासाठी उपयोगी आहे. भारंगीच्या कोवळय़ा पानांची भाजी पाचक असते. पोट साफ होण्यासाठी ही भाजी खावी. भारंगीची पाने उकळून ते पाणी प्यायल्यास पोटातील कृमींचा नाश होतो. करटोली ही एक वेलवर्गीय फळभाजी आहे पण ती तुरळक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने काहीशी महाग असते. करटुलीची भाजी छातीत कफ, मूतखडा यावर गुणकारी आहे. रासायनिक खतांचा वापर करून उगवणाऱ्या भाज्यांपेक्षा निसर्गात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या या रानभाज्या खरोखरच मानवी शरीरास आरोग्यवर्धक आहेत. पण विकासकामांची भूक हा रानभाज्यांचा मौल्यवान ठेवा नष्ट करत आहे. आज कितीतरी मोकळे भूखंड इमारत बांधकामासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे तेथे उगविणारी रानफुले आणि रानभाज्या कमी होऊ लागल्या आहेत.
– सुहास बसणकर, दादर.