एक दक्षिणेकडचा यशस्वी अभिनेता आणि दुसरा मूळचा उत्तरेकडचा पण, बॉलीवूडमधला महानायक.. अशा दोन प्रस्थापित सुपरस्टार्सना एकत्र आणणारा चित्रपट कसा असू शकेल? या प्रश्नाला दिग्दर्शक आर. बाल्कीने दिलेले ‘षमिताभ’ हे योग्य उत्तर ठरेल. दाक्षिणात्य राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या धनुषचा ‘ष’ आणि अमिताभच्या नावातील ‘मिताभ’ एकत्र आणणं एवढय़ा मर्यादित अर्थापुरता ‘षमिताभ’ नाही. हे दोन्ही अभिनेते ज्या क्षेत्रात रमले आहेत; त्याचाच प्लॉट म्हणून वापर करत एक सुंदर कथा गुंफण्याचा वेगळा प्रयत्न आर. बाल्की यांनी केला आहे.

वर्षभरापूर्वी आर. बाल्की यांनी ‘षमिताभ’ची घोषणा केल्यावर त्याबाबत उत्सुकता होती. कलाकारांची निवड हेही त्यामागचं एक कारण आहे. अमिताभ बच्चन हे नाव आता बाल्कीच्या प्रयोगात्मक चित्रपटांसाठी ‘मस्ट’ झालं आहे. ‘हिरो’चा चेहरा नसला तरीही अभिनयात पक्का असलेला धनुष या चित्रपटासाठीची जमेची बाजू आहे. या दोघांबरोबर कमल हसन यांची मुलगी अक्षराही ‘षमिताभ’मध्ये आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट.
चित्रपटाच्या प्रोमोत एका लहानशा गावात चेहऱ्याला रंग लावून हावभाव करणारा तरुण (धनुष) अल्पावधीत ग्लॅमरस जगात वावरताना दिसतो. एकीकडे त्याचा आनंद तर दुसरीक डे ‘मैं भी हूँ षमिताभ’ म्हणत त्रागा करणारा, स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणारा, आपला ताठा टिकवून असलेला चेहरा (अमिताभ बच्चन) दिसतो. संपूर्ण प्रोमोमध्ये ‘यह पिक्चर नहीं है, यह मिक्स्चर है’ असा अमिताभ बच्चन यांच्या आवाजातला संवाद कानी पडतो.
या संवादाचा अर्थ काय, कसलं मिक्स्चर आहे, असा प्रश्न अमिताभ यांना विचारला तर, ‘या एका प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर तुम्हाला चित्रपटात रसच राहणार नाही’, असं सांगून ते म्हणतात, ‘बाल्की यांचे सिनेमे वेगळे असतात. ‘षमिताभ’ही त्यापैकीच एक. या सिनेमातल्या भूमिकेसारखी भूमिका मी आजवर साकारली नाही.
‘षमिताभ’च्या कथेविषयी ते सांगत नाहीत. मात्र चित्रपटाच्या नावात त्याची कथा आहे. दोन भिन्न व्यक्ती एकमेकांमधील उणिवा दूर करण्यासाठी एकत्र येतात. काही दिवस त्यांची एकत्र वाटचाल सुखाने सुरू असते. मात्र, एका क्षणानंतर दोघांमधले मतभेद डोकं वर काढतात. त्यांचा अहंकार जागा होतो. आणि त्या अहंकारापायी तथाकथित एकसंधपणा तुटू पाहतो. तेव्हा काय होतं, त्या परिस्थितीला ते बाहेर पडतात का याची कथा म्हणजे ‘षमिताभ’ चित्रपट असं अमिताभ सांगतात. एक कथा म्हणून दोन भिन्न व्यक्तिरेखा एकत्र येणं ही गोष्ट जर बाजूला ठेवली तरी वास्तव आयुष्यातही अमिताभ बच्चन आणि धनुष या दोन माणसांमध्ये काहीही साम्य नाही. धनुष अमिताभ यांच्या तुलनेत कमी उंच, चेहरा सर्वसामान्य, किरकोळ अंगकाठी आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व. तर दुसरीकडे अमिताभ यांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार, आवाज भारदस्त.. ‘तुम्हा दोघांना पडद्यावर एकत्र आणण्याचा बाल्की यांचा विचार तुम्हाला स्वत:ला कसा वाटतो?’ हे विचारल्यावर अमिताभ म्हणतात, ‘यालाच बाल्कीची कमाल असं मी म्हणतो. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं लक्षात येईल की त्याने आमच्या दोघांचीच निवड का केली आहे. आम्हा दोघांनाही पडद्यावर एकत्र आणणारी कथाही तितक्याच ताकदीची आहे’.
धनुष आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. पण, त्या दोघांमध्ये जिव्हाळ्याचं एक नातं आहे. रजनीकांतबरोबर असलेल्या मैत्रीतून ते निर्माण झालं आहे. धनुष रजनीकांत यांचा जावई असला तरी एक अभिनेता म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे, असे अमिताभ सांगतात. ‘धनुष सहजतेने अभिनय करतो. सहजतेने तो चेहऱ्यावरचे राग, रुसवा, आनंद अशा भावना व्यक्त करतो, ते थक्क करणारं असतं’, अशा शब्दांत ते धनुषचे कौतुक करतात. आजच्या तरुण कलाकारांचं आत्मविश्वासाने वावरणं त्यांना आवडतं.
बाल्कीसोबतचे त्यांचे या आधीचे दोन्ही चित्रपट वेगळे होते. ‘चिनी कम’ चित्रपटातील तरुण मुलीच्या प्रेमात पडणारा बुद्धदेब, ‘पा’ मधला लहान मुलगा; या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या. त्यामुळे ‘षमिताभ’ही याला अपवाद असणार नाही, याची अमिताभना खात्री आहे.
संगीतकार इलयराजा यांनी चित्रपटाला पाश्र्वसंगीत दिलं आहे. संगीतकार म्हणून इलयराजा यांचा हा हजारावा चित्रपट आहे. सिनेमात बच्चन यांनी ‘पिडली सी बाते..’ हे गाणं गायलं आहे. या गाण्याचा विषय काढल्यावर अमिताभ यांची कळी खुलते. ‘बाल्की आपल्याकडून काय करवून घेईल, याचा नेम नाही’, असं म्हणत ते टॉयलेटमध्ये बसवून हे गाणं आपल्यावर कसं चित्रित करण्यात आलं आहे, याबद्दल सांगतात. ‘पिडली’चे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे लघुशंकेला जाण्याची जाणीव झाल्यावर त्या क्षणभराचा अवघडलेपणा, संकोच असतो तो अतिशय सभ्य भावनेत मांडणारा हा शब्द आहे. त्याचा दुसरा अर्थ म्हणजे निर्थक बडबड. या दोन्ही अर्थाची सांगड या गाण्यात घातली आहे. ते गाणं सादर करताना खूप मजा आली, असं त्यांनी सांगितलं.