0kedareलोकल ट्रेनमध्ये रोज बाचाबाची होते. रस्त्यावर कुणाला धक्का लागला तर लगेच शिवीगाळ करणारे लोक असतात. वस्तीतल्या नळावर पाणी भरताना रोज भांडणे होतात. एखादा तरुण प्रेमभंगातून अ‍ॅसिड हल्ला करतो. कुटुंबकलहांमध्ये खून करणारेही आढळून येतात. एकटय़ादुकटय़ाच्या अशा आक्रमक कृतीबरोबरच मोठय़ा समूहामध्येसुद्धा हिंसाचाराच्या अनेक घटना घडत असतात. उत्सवांमध्ये छोटय़ाशा कारणावरून दोन गट हमरीतुमरीवर येतात. छोटय़ाशा कारणावरून अचानक दंगल सुरू होते आणि जीवित आणि वित्तहानी होते. आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात शेकडो माणसे दर वर्षी बळी पडतात. देशादेशांमधील छुप्या युद्धामुळे असुरक्षितता निर्माण होते.
जगात हिंसाचार जणू काही सर्वमान्य होत आहे. हिंसाचाराच्या बातम्यांचा सतत भडिमार होत असल्याने कदाचित आपल्याही संवेदना बोथट होत चालल्या आहेत.
हिंसाचार म्हणजे जाणूनबुजून दुसऱ्याला किंवा स्वत:ला शारीरिक किंवा मानसिक इजा होईल अशी वर्तणूक. स्वत:ला इजा करून घेणे आणि आत्महत्येचा प्रयत्न ही हिंसा आहे. केवळ शब्दांनीसुद्धा समोरच्या व्यक्तीला दुखावता येते. शिवीगाळ करणे, बिनबुडाचे आरोप करणे, इतकेच काय, पण एखाद्याविषयी अफवा पसरवणे हे सगळे आक्रमकतेचे किंवा हिंसेचेच प्रकार ठरतात. हाताने किंवा शस्त्राच्या साहाय्याने हल्ला करण्याने प्रत्यक्ष शारीरिक दुखापत होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडत्या गोष्टीपासून मुद्दाम दूर ठेवणे, जवळच्या नातलगांपासून त्याची ताटातूट करणे, अन्न, वस्त्र, निवारा हिरावून घेणे किंवा या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे हीदेखील एक प्रकारची हिंसाच आहे. या हिंसेमध्ये मानसिक आणि भावनिक इजा पोहोचते. बलात्कारासारख्या घटनांमध्ये लैंगिक हिंसाचार असतो.
हिंसाचार घराघरांमध्ये दिसून येतो. नवऱ्याने बायकोला मारणे, वडिलांनी मुलाच्या किंवा मुलाने वृद्ध वडिलांच्या अंगावर हात टाकणे सर्वसाधारण बनले आहे. हिंसाचार वस्त्यावस्त्यांमध्ये, समूहामध्ये दिसून येतो. हल्ली सर्व वयोगटांमध्ये हिंसेचे प्रमाण वाढत चाललेले दिसते; त्यातही युवकांमध्ये हे प्रमाण अधिक असते. पुरुषांमध्ये हिंसाचार जास्त असतो.
हिंसाचाराची कारणमीमांसा करताना जीवशास्त्रीय घटकही काही वेळा महत्त्वाचे असतात. विशेषत: महिलांमध्ये दिसणारा हिंसाचार आनुवंशिक असू शकतो. आपल्या मेंदूतील विशिष्ट भाग आक्रमकतेला प्रोत्साहन देणारे, तसेच आक्रमकता नियंत्रणाखाली ठेवणारे असतात. काही कारणाने या भागांना दुखापत झाली, तर मनाची हिंसक प्रवृत्ती वाढते. काही वेळेस फीट किंवा आकडी येणाऱ्या व्यक्तीमध्ये हिंसक वृत्ती बळावते. मेंदूतील सिरोटोनिनसारख्या रासायनिक द्रव्याचे प्रमाण कमी असले तर माणूस हिंसक बनू शकतो. तारुण्यावस्था प्राप्त होताना आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवून त्याप्रमाणे आपली वागणूक बदलण्याचे कौशल्य प्राप्त होते. ही भावनिक वाढ नीट झाली नाही तरी हिंसेचे प्रमाण वाढते.
आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा परिणाम माणसाच्या मनावर होतो. घरात हिंसा पाहिली, आपल्या वस्तीतील सतत चालणारी भांडणे आणि मारामाऱ्या लहानपणापासून पाहिल्या, तर कोणत्याही प्रश्नावर हाच तोडगा, असे मुले शिकू लागतात, शाळेतच दादागिरी करू लागतात. प्राण्यांना त्रास द्यायला शिकतात, त्यांच्यात वर्तणुकीचे दोष निर्माण होतात. आजूबाजूला व्यसनाधीनता असेल तर युवक व्यसनांच्या आणि त्यातून हिंसेच्या आहारी जातो.
घरात प्रतिकूल परिस्थिती असेल, दारिद्रय़ असेल, पालकांच्या शिस्त लावण्यामध्ये सातत्य नसेल, तर मूल लवकर हिंसेचे धडे घेते. सुदृढ नातेसंबंध नेहमीच हिंसेपासून वाचवतात. शाळेत आणि कुटुंबात वागणुकीचे योग्य आदर्श घालून दिले, तर हिंसेची वृत्ती बळावत नाही.
टीव्ही, सिनेमांमधून होणारे हिंसेचे चित्रण लहानपणापासून पाहून हिंसक प्रवृत्ती बळावते. बरेचसे व्हिडीओ गेम्ससुद्धा मारामाऱ्या आणि बंदुका यावरच आधारित असतात. त्यामुळे मुलांची संवेदनक्षमता कमी होते. हिंसेला सामाजिक मान्यता आहे असेच यातून शिक्षण मिळते.
आज समाजात दैनंदिन जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. गर्दीला तोंड द्यावे लागते. कामाचा ताण असतो. बेकारी, दारिद्रय़, लोकसंख्या, अपुऱ्या व्यवस्था अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून धीर धरण्याची वृत्ती संपते आणि माणसे पटकन रागावतात, चिडतात आणि मग भांडणे, मारामाऱ्या होतात. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आक्रमकता वापरली जाते. स्पर्धेतूनही आक्रमकता येते. कधी कधी भीतीमधून हिंसा वाढते. एखादे ध्येय गाठण्यासाठी हिंसाचार हाच उत्तम मार्ग, असे मानणारे दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक विकार अनेकदा हिंसेला जबाबदार असतात. उदासीनता, स्किझोफ्रेनिया, लहान मुलांमधील उतावीळपणा आणि लक्ष केंद्रित न करता येणे अशा आजारांमध्ये आक्रमकता दिसून येते. तसेच खूप वेळा हिंसाचारी माणसाची बौद्धिक क्षमता कमी असते.
हिंसेचे बळी ठरलेल्या व्यक्तीवरसुद्धा मानसिक परिणाम होतो. मनात भीती बसते. सतत हिंसाचाराचे उदा. मारामारीचे, दंगलीचे दृश्य डोळ्यासमोर येत राहते, पटकन दचकायला होते, इतरांमध्ये मिसळू नये असे वाटते. एक प्रकारचा भावनांना बधिरपणा येतो. याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. उदासीनतेचा किंवा अतिचिंतेचा आजार जडतो.
हिंसाचार वाढू नये यासाठीही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नांची आवश्यकता आहे. समाजातल्या अनेक अपप्रवृत्तींची मानसिकता समजून घेताना आणि त्यांच्या प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा करताना कुटुंब आणि शाळा यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. तसेच सरकारी र्निबध, कायदेकानू यांचे महत्त्व कमी होत नाही.
मारामारी करून आपली ऊर्जा वाया घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा समाजोपयोगी कामे करणाऱ्या, आपल्या कला- क्रीडा क्षेत्रातील प्रगतीच्या आधारे आनंद मिळवणाऱ्या, आपल्या कार्यक्षेत्रासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा समाज आपल्याला निर्माण करायला हवा.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com