क्रिकेटपाठोपाठ बॅडमिंटन, हॉकी यांच्या लीग सुरू झाल्या. फूटबॉल लीग सुरू झाला. त्यांच्यापाठोपाठ टेनिस, व्हॉलीबॉल कुस्ती तसंच कबड्डी लीगची घोषणा झाली आहे. काय आहे या सगळ्या लीगचं भवितव्य?

कबड्डी खेळासंदर्भात नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आली. कबड्डी म्हटलं की नियोजित वेळेवर कार्यक्रम सुरू होणार नाही, तसेच खेळाच्या व्यासपीठापेक्षा राजकीय मंडळींचीच ऊठबस जास्त असेल हे समीकरण या खेळाशी निगडित असणाऱ्या कोणाच्याही मनात उभे राहील. मात्र या प्रतिमेला संपूर्ण छेद देणारा आणि कबड्डीचं रूपडंच पालटवणाऱ्या एका स्पर्धेची घोषणा झाली. प्रो-कबड्डी लीग असं एकदम कॉर्पोरेटी नाव धारण केलेल्या कबड्डीतील पहिल्यावहिल्या लीग स्वरूपाच्या स्पर्धेचा नारळ फुटला. त्यानंतर थोडय़ाच दिवसांनी स्पर्धेतील एका संघाची मालकी कोणाकडे असणार हे जाहीर झालं. इथेही साधारण मनात उभं राहिलेल्या प्रतिमेला छेद देणारंच घडलं. म्हणजे मिलिंद सोमण अभिनेता असला तरी त्याचं नाव घेतलं की ‘धावणं-पळणं-मॅरेथॉन-फिटनेस’ याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र कबड्डीची लीग आणि त्यातला जयपूर संघाचे मालकत्व अभिषेक बच्चनकडे म्हटल्यावर भुवया उंचावल्या, डोळे विस्फारले. अभिषेक कबड्डीशी संलग्न होऊ शकत नाही असं नाही, परंतु आतापर्यंत अभिनयाच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या आणि उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या अभिषेकने मातीतल्या रांगडय़ा खेळाशी नाळ जोडावी हे चकितच करणारं. मात्र हे खरं आहे. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल या बीसीसीआयच्या खेळाडूंपासून प्रायोजकांपर्यंत मालामाल करणाऱ्या लीगनंतर प्रत्येक खेळातील संयोजकांना लीग/ क्लब स्वरूपाच्या संकल्पनेने गारूड घातले. प्रो-कबड्डी लीग हे या माळेतील अगदी अलीकडचं प्रारूप.
प्रत्येक खेळात राष्ट्रीय संघ आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा अग्रस्थानी असतात. या स्पर्धामध्ये पैसा या मुद्यापेक्षा प्रतिष्ठा असते. या स्पर्धेतलं यश, जेतेपद खेळाडूची पत उंचावतं. मोठी भरारी घेण्याच्या दृष्टीने ही पहिली पायरी असते. राष्ट्रीय स्पर्धा खेळून गडगंज संपत्ती कमावल्याची उदाहरणं सापडणार नाहीत, कारण या स्पर्धेचा तो उद्देशच नाही. त्या विशिष्ट खेळात देशातील सर्वोत्तम कोण याचा फैसला या स्पर्धा करतात. राष्ट्रीय स्पर्धाच्या संलग्नतेने राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका स्तरावर सातत्याने स्पर्धाचे आयोजन होते. विविध वयोगटातल्या गुणवान खेळाडूंसाठी हे उत्तम व्यासपीठ असते. छोटय़ा वाटणाऱ्या या स्पर्धातूनच अनेक मोठे खेळाडू घडले आहेत आणि घडत आहेत. मात्र लोकल ते ग्लोबल या संरचनेत पैसा, आर्थिक नफा या घटकांचा विचारच होताना दिसत नाही. खेळ- इन्डोअर असो किंवा आऊटडोअर. बैठा असो की शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा- त्यासाठी खर्च हा होतोच. खेळाची उपकरणं, प्रशिक्षण, प्रवास या प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. जेतेपदाचा चषक उंचावून फोटो काढणं सोपं असतं मात्र याने अर्थकारणाला हातभार लागत नाही. चषक, मुकुट, किताब यापेक्षाही बक्षीस रक्कम किती हा मुद्दा निर्णायक ठरतो. दुर्दैवाने याबाबत मात्र निराशाच असते. खेळासाठी क्रमिक अभ्यासक्रम बाजूला ठेवून, वेळ-श्रम-ऊर्जा देणाऱ्या खेळाडूंना आर्थिक फायदा व्हावा यासाठीच्या विचारातूनच लीग स्वरूपाच्या स्पर्धाचा उदय झाला. खेळाडूंच्या माध्यमातून आपणही चार पैसे कमवावेत ही त्यामागची स्पष्ट बाजारू महत्त्वाकांक्षा. देशांदरम्यान होणाऱ्या सामन्यांपेक्षा लीग स्वरूपाच्या स्पर्धाची संरचनाच वेगळी असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जगभर लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉलमध्ये क्लब म्हणजेच लीग स्वरूपाच्या स्पर्धाच लोकप्रिय आहेत. आपल्या अद्भुत खेळाने देशोदेशीच्या चाहत्यांना भुरळ घालणारे लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, गॅरेथ बॅले त्यांच्या क्लबसाठीच सर्वाधिक खेळतात. याच हंगामात वाचताना भोवळ येईल एवढय़ा प्रचंड रकमेला रिअल माद्रिद संघाने गॅरेथ बॅलेला खरेदी केले. हे खेळाडूही आपल्या देशाच्या संघासाठी खेळतात मात्र हे प्रमाण क्लबच्या तुलनेत कमीच असतं.
आवर्जून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे लीग ही काही धर्मादाय वगैरे गोष्ट नाही. हा सगळा गाडा हाकण्यासाठी प्रचंड पैशाची गरज असते. एक संघ म्हणजे आवश्यक खेळाडू, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक-सहयोगी यंत्रणा. प्रवास यंत्रणेसाठी लॉजिस्टिक मॅनेजर, प्रसारमाध्यमांना यथासांग माहिती देण्यासाठी माध्यम व्यवस्थापक, विविध अपरिचित ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सिक्युरिटी कन्सल्टंट, आर्थिक गणितं सांभाळण्यासाठी सीईओ आणि त्याचे सहकारी. खेळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला लोकाश्रय मिळवून देणे. कॉर्पोरेट स्वरूपात त्याला र्मचटायजिंग असं गोंडस नाव आहे. आपल्या क्लबचा, संघाचा ब्रॅण्ड तयार व्हावा यासाठी अनेक क्लृप्त्या योजल्या जातात. चाहत्यांना आवडत्या खेळाडूबरोबर डिनर तर कधी कॉन्टेस्ट ज्याद्वारे सामना मैदानात याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी देणं. खेळ असला तरी त्याला मिळणारी कॉर्पोरेट झूल स्तिमित करणारी आहे. आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचं ‘व्हीसल पोडू’ हे गाणं किंवा शाहरूख खान सहमालक असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचं ‘कोलबो रे-जीतबो रे’ हे थीम साँग तेवढंच लोकप्रिय आहे. या बाजारात प्रत्येक गोष्ट खपते-खपवली जाते- खेळाडूंची जर्सी, त्यांनी ऑटोग्राफ दिलेल्या बॅट्स, टोप्या, सुव्हिनियर म्हणून स्टंप्स असं भरपूर काही. हेतू एकच- सामने पाहायला, गेटमनी अर्थात मैदानावर सामने बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून होणारा नफा. क्लबचा मालक विविध कारणांसाठी प्रचंड पैसा ओततो. त्यामुळे अर्थातच रिटर्न्सची अपेक्षा तो करणारच. खेळ असला तरी त्याची ही बाजू दुर्लक्षून चालणार नाही. क्रिकेट मुळातच प्रचंड पैसा असलेला, लोकाश्रय आणि संयोजकाश्रय दोन्हींचा वरदहस्त लाभलेला खेळ आहे. आयपीएलच्या निमित्ताने अनेक लहान खेळाडू रातोरात लखपती झाले. त्यांच्या खेळाला-कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा खुळखुळू लागला. पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य, कायम विमानाने प्रवास, ब्रॅण्डेड वस्तूंचा वापर हे मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेल्या खेळाडूंच्याही अंगवळणी पडू लागलं. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळून वर्षभराची पुंजी मिळवता येऊ लागली. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी भारतासाठी खेळणं ही सर्वोच्च गोष्ट होती, आजही आहे. मात्र अंतिम अकरासाठी शेकडो जणांची वेटिंग लिस्ट आहे. निवड समितीचा विचार, दुखापती, नशीब हे सगळं पार करत अगदी हाताच्या बोटांवर मोजता येणारी माणसं भारतासाठी खेळतात. बाकीच्यांचं काय हा प्रश्न उरतोच. आयपीएल भारतासाठी खेळायला देत नाही, मात्र अमाप पैसा देतं. पैसा कितीही मिळवला तरी कमीच, पैसा भौतिक असं तत्त्वचिंतन केलं तरी दैनंदिन जगण्यासाठी पैसा लागतो-आयपीएलने अनेक स्थानिक खेळाडूंच्या आयुष्याची भरभराट झाली.
प्रचंड पैसा, यश यामुळे भारावून जात प्रत्येक खेळाने ही संकल्पना राबवण्याचा विडा उचलला आहे. मात्र क्रिकेटचं अर्थकारण आणि आपल्या खेळातला पैसा याबाबत सम्यक विचार न झाल्याने अनेक लीग डबघाईला आल्या आहेत, तर काही पहिल्या हंगामानंतरच निकाली निघाल्या आहेत. गेल्या वर्षी भारतीय बॅडमिंटन लीगची मुहूर्तमेढ रोवली गेली. सायना नेहवाल या ब्रॅण्डभोवती स्पर्धेचे अर्थकारण गुंफलेले होते. सायनाने दिमाखदार खेळ करत आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सातत्याने खेळत असल्याने देशात सायनाचा खेळ पाहण्याची संधी फारशी मिळतच नाही. आयबीएलच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण झाली. सायनाच्या यशानंतर देशभरात बॅडमिंटन चाहत्यांची संख्या वाढली आहे, तिकीट काढून प्रेक्षक बॅडमिंटनचे सामने पाहायला येत आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र संयोजनातल्या असंख्य गफलतींमुळे विश्वासार्हतेवर विपरीत परिणाम झाला. स्पर्धेच्या तारखा पुढेमागे होत होत्या, ते झाल्यावर खेळाडूंचा लिलाव झाला. खेळाडूंना कल्पना न देता मूलभूत किमती कमी करण्यात आल्या. ज्वाला गट्टासह विदेशी खेळाडूंनीही यावर नाराजी व्यक्त केली. एकीकडे स्टार स्पोर्टस्सारख्या प्रक्षेपणाची जबाबदारी स्वीकारल्याने अधिकाअधिक लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहचली. मात्र दगदग होईल अशी पद्धतीच्या वेळापत्रकामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला. सुपरसीरिज अर्थात बॅडमिंटन क्षेत्रातील सर्वोच्च स्तरीय दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर मिळणार नाही एवढा पैसा आयबीएलने दिला. त्यामुळे खेळाडू खूश होते. मात्र या वर्षीही खेळाडूंना खूश करायचे असेल तर संयोजकांना आयोजनातला ढिसाळपणा टाळायला लागेल. स्पर्धा यशस्वी झाली असली तरी संघांसाठी फ्रँचायजी मिळवताना नाकीदम आल्याचे संयोजकांनी सांगितले. सायनाव्यतिरिक्त अन्य खेळाडूंचा ब्रॅण्ड अजूनही विकसित झालेला नाही. लीगची मांडणी आकर्षक असली तरी आर्थिक घडी सांभाळणे जिकिरीचे आहे.
आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीत तीन लीग स्वरूपाच्या स्पर्धा गेल्या काही वर्षांत झाल्या. वर्ल्ड सीरिज हॉकी हा भारतीय हॉकी महासंघ आणि निम्बस यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आयपीएलप्रमाणेच सगळं काही झालं. असंख्य विदेशी खेळाडूंनी सुरेख खेळ करत आपली पत सिद्ध केली. मोठय़ा प्रमाणावर नाही, पण स्पर्धेतील सामन्यांना दर्दी प्रेक्षकांनी हजेरी लावली. मात्र हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ यांच्यातील वादाचा फटका स्पर्धेला बसला. त्यानंतर हॉकी इंडियाने हॉकी इंडिया लीग स्पर्धेचा घाट घातला. अधिकृत संघटनेचा पाठिंबा असल्याने स्पर्धेला संजीवनी मिळाली. ईएसपीएन-स्टार स्पोर्टस् वाहिनीने आक्रमक आणि कल्पक जाहिरातींद्वारे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थेट प्रक्षेपणासह स्पर्धेला लोकाश्रय मिळवून दिला.

क्रिकेटचं अर्थकारण आणि आपल्या खेळातला पैसा याबाबत सम्यक विचार न झाल्याने इतर खेळांच्या अनेक लीग डबघाईला आल्या आहेत तर काही पहिल्या हंगामानंतरच निकाली निघाल्या आहेत.

व्हॉलीबॉल आणि कुस्ती लीगची घोषणा झाली. मात्र संघ उभारण्यातील अडचणी, आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे व्यस्त वेळापत्रक यामुळे तूर्तास तरी या लीगला मुहूर्त लाभलेला नाही. असं सगळं असलं तरी तीन नव्या खेळांच्या लीगच्या घोषणांमुळे हा फॉरमॅट लोकप्रिय झाल्याचं स्पष्ट झालं आहे. भारताचा अनुभवी टेनिसपटू महेश भूपतीने इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीगची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळण्याचा अनुभव असल्याने भूपतीने टेनिसमधल्या अव्वल खेळाडूंना लीगमध्ये खेळण्यासाठी राजी केलं आहे. तसं झालं तर राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच, पीट सॅम्प्रस, अँडी मरे, सेरेना विल्यम्स, आंद्रे आगासी या दिग्गजांचा खेळ पाहण्याची संधी टेनिसरसिकांना मिळणार आहे. स्पर्धेत सिंगापूर, बँकॉक, दुबई आणि मुंबईचा संघ असणार आहे. संघ आणि खेळाडूंचा लिलाव नुकताच दुबईत झाला. साधारणत: नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या लीगबद्दल, खेळाडू, संघ याबाबत भूपतीची अळीमिळी गुपचिळी आहे. डेव्हिस चषक वगळता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय टेनिसपटू खूपच पिछाडीवर आहेत. लिएण्डर पेस, भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर एक मोठी पोकळी जाणवते. या लीगच्या निमित्ताने जागतिक स्तरावर भारताचे स्थान बळकट होऊ शकते.
याच्या जोडीला भारतीय सुपर लीगचे दणक्यात आगमन झाले आहे. खरं तर भारतीय फुटबॉलमध्ये लीग व्यवस्था नवीन नाही. नॅशनल लीगच्या अपयशानंतर आयलीग स्पर्धा सुरू झाली. मोहन बागानच्या संघाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. केरळ, गोवा, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये या स्पर्धेला प्रेक्षकवर्गही लाभला. मात्र एकूणात थेट प्रक्षेपणाचा करार मोडीत निघाल्याने नुकसान झाले. स्पर्धेतील बहुतांशी लढती दुपारी ४ वाजता ठेवल्याने प्रेक्षकही दुरावले. खेळाडू आणि त्यांचे संघ यांचा ब्रॅण्डही प्रस्थापित होऊ शकला नाही. हे असं सगळं झाल्यामुळे इंडियन सुपर लीग या नव्या प्रारूपाला शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे. आयलीग संयोजनात झालेल्या चुका टाळल्यास सुपर लीगला घोडदौड करण्याची संधी आहे. फुटबॉलला जागतिक मार्केट आहे. शनिवार-रविवारी होणाऱ्या इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या इंटरनॅशनल आवडीला देशी तडका देण्याची वेळ आली आहे. बंगळुरू, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, मुंबई आणि पुणे असे आठ शहरांचे संघ असणार आहेत. साक्षात सचिन तेंडुलकर कोची संघाच्या मालकांपैकी एक आहे. सौरव गांगुली कोलकाता संघाच्या मालकांपैकी आहे. जॉन अब्राहम, सलमान खान आणि रणबीर कपूर हेही बॉलीवूड स्टार संघांचे मालक आहेत. विदेशी खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी होणं साहजिक आहे, मात्र आतापर्यंत लो-प्रोफाइल असणाऱ्या भारतीय फुटबॉलपटूंना चेहरा मिळवून देण्याची जबाबदारी लीगवर आहे. स्पर्धेसंदर्भातील आकडे पाहता हा पसारा मोठा असणार आहे हे निश्चित.
कोणताही नवा व्यवसाय, व्यापार सुरू करतानाच भविष्यातील त्याच्या संवर्धनाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असते. खेळांशी निगडित असल्या तरी येऊ घातलेल्या लीग हे पूर्णत: बिझनेस मोडय़ुल असणार आहे. परफॉर्म ऑर पेरीश किंवा हायर एण्ड फायर तत्त्व कठोर वाटतं तरी ते राबवलं जाणार आहे. लीगशी निगडित फ्रँचाइजींना स्वत:चा फायदा करून घ्यावासा वाटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याच वेळी या सगळ्या खटाटोपाने खेळाडूंचा, खेळाचा किंचित तरी विकास होतोय का हे पाहणेही गरजेचे आहे. पैसा मिळवून देतोय म्हणून दर्जाशी तडजोड करून चालणार नाही. या सगळ्या लीग ज्या धर्तीवर सुरू आहेत, त्या मूळ आयपीएलचं काय झालं याकडे उघडय़ा डोळ्यानी पाहण्याची गरज आहे. सट्टेबाजी, स्पॉटफिक्सिंग तसेच या स्वरूपाचे अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी लीग सुरू होण्याआधीच व्यवस्था करायला हवी. आग लागल्यावर विहीर खणण्यात काहीच अर्थ नाही. आयपीएलच्या निमित्ताने चंगळवादी आणि उथळ, थिल्लर आणि सपक संस्कृतीही विकसित झाली आहे. ही खेळासंदर्भात स्पर्धा आहे याचेही भान अनेकदा हरवलेले दिसते. खेळांडूंबरोबरच अन्य संलग्न व्यक्तींनीही खेळभावना जोपासणे अनिवार्य आहे. अन्य लीगकर्त्यांना प्रायोजकांसाठी शोधाशोध, आर्थिक घडी, याच्या जोडीला खेळाचा गाभा टिकवण्याचे खडतर आव्हान समोर आहे.