राजस्थान म्हणजे रखरखीत वाळवंट अशीच आपल्या सगळ्यांची समजूत असते. पण त्या वाळवंटातही एक वेगळेच सौंदर्य आहे. त्याशिवाय राजस्थानातील भव्य महाल आपले डोळे दिपवून टाकतात.

आम्ही साऱ्या स्त्रियाच, गेलो एकदा राजस्थान फिरायला, सगळ्यांनी विरोध केला होता. एकही पुरुष सोबत नाही. कशा कराल तुम्ही? रात्री-बेरात्री काही अडचण आली तर? अगं पण तिथेही माणसं असतीलच की, तशी वेळच आली तर करतील की मदत, अणि तब्येतीचं काय? डॉक्टर असतातच की सगळीकडे, मग काळजी कशाची? पैसे कसे सांभाळायचे ? हो.. हा प्रश्न होताच, पण तोही सुटला, कारण एटीएमची सुविधा सगळीकडे होती.

pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
lok sabha election 2024 bjp condition before cm eknath shinde for kalyan and thane lok sabha seat
ठाणे-कल्याण यापैकी एक जागा हवी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपची अट; सूत्रांची माहिती
Ajit Pawar appeal to the wrestlers of the district regarding the dispute in the wrestling federation pune
अजित पवार यांचा पैलवानांना ‘खुराक’; जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मदत करण्याचे आवाहन

तसं पाहिलं तर सगळ्याच ५० ते ६० वयोगटांतल्या, मग केली तयारी आणि निघालो टूरला. सर्वप्रथम ठरवलं की ‘ब्रह्माकुमारी’चा ‘ओमशांती’ आश्रम असलेल्या माउंट अबूला भेट द्यायची. नागपूरहून अहमदाबाद आणि तेथून अबूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो. रात्री ट्रेन पोचली तेव्हा आश्रमातली व्यक्ती गाडी घेऊन स्टेशनवर हजर होती. पहिलाच सुखद अनुभव. आम्ही बाराजणी आणि इतर आलेली सर्व मंडळी गाडीत बसलो आणि पोचलो माउंट अबूच्या पायथ्याशी असलेल्या ओमशांती आश्रमात. खूपच छान व्यवस्था होती. तिथे, निरव शांतता, सगळीकडे पांढरे रंग असणाऱ्या इमारती, आणि मोठे मोठे पटांगण, शुभ्र वस्त्र घातलेल्या स्त्रिया..

खोलीत प्रवेश करताच मनाला खूप शांत शांत वाटायला लागलं. फ्रेश झालो आणि रात्रीचं जेवण घेऊन निजानीज झाली.

पहाटे तीन वाजता जाग आली तीच मुळी प्रार्थनाध्वनी ऐकून.  रूमच्या लॉबीमध्ये सर्वत्र स्पीकर लावलेले दिसले. त्या सौम्य शांत वातावरणात ओमशांतीचा स्वर कानात घुमत होता. शुचिर्भूत होऊन हॉलमध्ये गेलो, सर्व दादी तेथे एकत्र जमल्या होत्या. जानकी दादी, हृदयमोहिनी दादी यांचे स्वर जवळून ऐकायला मिळाले. प्रार्थना झाल्यावर सकाळच्या प्रसन्न वातावरणात सर्व परिसर बघायला निघालो. सगळीकडे फळांची झाडे असल्याचं लक्षात आलं. आंबा, चिकू, पेरू, संत्री, बापरे काय चंगळ आहे इथे. प्रत्येक इमारतीजवळ झाडांमध्ये झोपाळे लावलेले, त्यावर बसून झोके घेण्याचा आनंद काही औरच होता. सर्वाच्या चेहऱ्यावर लहानपणीच्या आठवणीचे प्रतिबिंब दिसत होते.

सर्व परिसर फिरून झाल्यावर चहा-नाश्त्याची सोय बघायला गेलो, बघतो तर काय, चहासोबतच कॉफी दूध बाजूला साखरेची थाळी, ज्याला जे पाहिजे ते घ्या, अधिक गोड लागतं, मग घ्या साखर, तशीच नाश्त्याची व्यवस्था, प्लेट, वाटय़ा चमचे कशाची कमतरता नाही. सगळ्या सोयी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जोपासणाऱ्या, बघून आश्चर्य वाटलं. तक्रारीला जागाच नाही. हवं ते घ्या. हवी तशी मौज करा. फक्त मौन साधा.

मोबाइलचा आवाज नाही, आपसांत बोलताना आपोआपच आवाजाची रेंज कमी होते. स्वत:ची रंगीत वस्त्रं खुपायला लागली. श्वेतवस्त्रावृता आवडायला लागल्या. मन, डोकं शांत होत होतं. हवी अशी शांतता कधीतरी? मग नक्कीच भेट द्या आश्रमाला.

चार दिवस असे शांततेत घालवून मग निघालो बाकी राजस्थान बघायला. राज्य परिवहनाच्या बसने जयपूपर्यंत रात्रीचा प्रवास केला. मागची सीट मिळाली म्हणून नाराज होतो. पण सकाळी जयपूरला पोचेस्तोवर एकही धक्का नाही की बस उसळली नाही, मग लक्षात आलं राजस्थानचे रस्ते उंचसखल नाहीतच. सरळ सपाट जागेवरून जाताना धक्का लागणारच नाही, ना नदीचे पूल, ना डोंगरांचा उंचसखलपणा.. प्रवास सुखद झाला.

जयपूरला एका मैत्रिणीने धर्मशाळेत व्यवस्था केली होती, कारण तिथे थांबायचं नव्हतं, फक्त फ्रेश होऊन निघायचं होतं. ऑटोने तिथे पोचलो, सर्वाना तयार व्हायला सांगून मी पुढची ट्रिप अरेंज करायची म्हणून गाडी शोधायला निघाले. समोरच बोर्ड दिसला पर्यटन व्यवस्थापन, तिथेच गेले आणि पंधरा सीटर गाडी बुक केली. मालकाला सांगितलं, सर्व लेडीज आहेत, ड्रायव्हर आणि क्लीनर चांगला द्या. बस एवढंच, त्यांनी व्यवस्थित गाडीची सोय करून दिली, तोपर्यंत सर्वाची तयारी झाली होती. सर्व सामान गाडीत टाकून निघालो, सर्वप्रथम जयपूरहून जवळ असलेलं ब्रह्माचं एकमेव मंदिर असलेलं ‘पुष्कर’ येथे पोचलो. खूपच छान परिसर आहे. मोठे जलाशय, चारही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेलं हेच ते ‘पुष्करसरोवर’ बघून धन्य धन्य वाटलं. पापपुण्याच्या कल्पना काय असतील-नसतील, पण तो परिसर बघून वाटलं की काहीतरी चांगलं आपल्या हातून घडलं असेल म्हणूनच हे बघायचं भाग्य आपल्याला लाभलं. सरोवरातील पाण्याचे शिंतोडे थोडे अंगावर घेऊन निघालो. येथे गुलाबपुष्पांची शेती भरपूर प्रमाणात आहे, छान गुलकंद मिळतं.

याच पुष्कर परिक्षेत्रामध्ये अरावली पर्वतरांगांमध्ये विसावलेलं सुफी संत अजमेर शरीफ, सलीम चिश्तींची कबर आहे. तिला भेट दिली. सगळीकडे गुलाबपाकळ्यांनी भरलेल्या परडय़ा आणि गुलाबाचा सुगंध पसरलेला संपूर्ण परिसरात सुगंध दरवळत असतो.

प्रत्येकीने तेथे आपली मनोकामना व्यक्त करून माथा टेकला आणि तेथून निघालो आणि उदयपूरला पोचलो रात्री मुक्काम केला. संपूर्ण ट्रिपमध्ये रात्री प्रवास केला नाही, कुठेतरी आश्रय घेतला त्यामुळे झोप चांगली व्हायची आणि पुढचा प्रवास छान व्हायचा. ड्रायव्हरने चांगल्याशा हॉटेलात आमच्या राहण्याची व्यवस्था करून दिली. छानपैकी जेवण घेऊन रूमवर गप्पा रंगायच्या आणि शांत झोप.

महाराजा उदयसिंग पॅलेस पाहिला. याला ‘सूर्यमहाल’ म्हणतात. उंच स्थानावर असलेल्या या महालावर कशाचीही सावली पडत नाही आणि तो अशा ठिकाणी आहे की त्याचीही सावली पडत नाही, म्हणून हा ‘सूर्यमहल’.

नंतर जोधपूर राजवाडा, बिकानेर पॅलेस असा प्रवास. या सर्व महालांकडे बघून आपण मंत्रमुग्ध होतो. बिकानेरच्या पॅलेससमोर उभं राहून बघितलं की वाटतं हा छातीठोकपणे सांगतोय की और हजार साल मुझे आप यही पायेंगे. एवढी मजबुती आणि भक्कमपणा या महालाला आहे. संगमरवरावर केलेल्या नक्षीकामाचे वर्णन शब्दांमध्ये होऊच शकत नाही ते प्रत्यक्ष बघूनच अनुभवायचं असं आहे.

बिकानेर महाराजा बिकासिंग यांचे कुलदैवत असलेल्या करणीदेवी मंदिरात प्रवेश केला तर काय सगळीकडे उंदीरच उंदीर, त्यांच्यासाठी खास ‘बिळं’ बांधून ठेवली आहेत सिमेंटची. मस्त रमतात ते तिथे, इकडून तिकडे आपल्या पायांवरून फिरतात. त्यांच्यासाठी परातीत दूध आणि बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य ठेवलेला असतो. सर्व उंदीर दोन पाय वर करून परातीत तोंड खूपसून प्रसादाचा आस्वाद घेत असतात. तिथली समजूत अशी आहे की त्या घराण्यातील ज्या व्यक्तीचा लीप वर्षांत जन्म झाला ते मृत्यूनंतर उंदराच्या रूपात या मंदिरात वास्तव्य करतात. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. चांदीच्या दरवाज्यावरसुद्धा उंदीर कोरलेले आहेत. राजघराण्याच्या मंदिराची भव्यताही पॅलेससारखीच दिमाखदार आहे.

येथून पुढे जैसलमेरचा प्रवास सुरू झाला तशा रस्त्याच्या कडेला वाळूच्या रांगोळ्या काढल्यासारखे दृश्य बघायला मिळते. दूरवर सगळीकडे वाळूच वाळू म्हणून हे वाळवंट, त्याच वाळवंटात ‘पोखरण’ बघायला मिळाले. वाळवंट जवळून बघायचे म्हणून ड्रायव्हर एका टिप्प्यावर घेऊन गेला. वाळूच्या टेकडय़ांना टिप्पा म्हणतात. तेथे गाडी पोचताच परिसरातील लहान मुलं धावत आली आणि ‘पधारो राजस्थान’ने आमचे स्वागत झाले. जसा मुंबईचा समुद्र तसाच इथला हा टिप्पा वाळवंट. जेवढा आनंद पहिल्यांदा समुद्र बघून किंवा हिमालयातील बर्फ बघून झाला होता तसाच किंबहुना थोडा जास्तच आनंद हा निसर्गाचा चमत्कार असलेले वाळवंट बघून झाला. उंटाच्या गाडीत बसून संपूर्ण टिप्पा फिरलो. वाळवंटात शांतता असली तरी निर्जीवपणा नाही. वाळवंटही जिवंत वाटतं. सतत हवेचा झोत सुरू असतो. मधूनच शॉवरसारखा पाऊस पडत असतो. त्यामुळे वाळवंटातले सौंदर्य खुलून येतं. जैसलमेरचे वाळवंट हे राजस्थानचे हृदयस्थान आहे. राजस्थानची संस्कृती येथे बघायला मिळते.

तेथून पुढे जयपूरकरिता निघालो. वाटेत संगमरवराच्या खाणी बघायला मिळाल्या. अरावलीच्या सरळ सरळ रांगा बघून पर्वत असाही सरळ सरळ असू शकतो याचे नवल वाटते. कुठेही सुळका नाही, की उंचखोल टेकडय़ा नाहीत. म्हणूनच त्यांना अरावली पर्वतरांगा म्हणतात. राजस्थानचे रस्तेही असेच सरळ सरळ.

जयपूरला मध्यवर्ती पॅलेस बघून महाराजा मानसिंग पॅलेस बघायला गेलो. रस्त्यातच असलेला हवामहल बघितला. राजघराण्यातील स्त्रियांसाठी ही खास केलेली व्यवस्था. कोण म्हणतं स्त्रियांना स्थान नव्हते? त्या काळात इतक्या मोठय़ा महालाच्या परिसरात फिरताना स्त्रियांना कुठे बाहेर जाण्याची गरज पडत नसेल ना! सर्व सुविधा, मनोरंजनाची व्यवस्था, सर्वच तर तिथे होते, असो.

राजा मानसिंग पॅलेसमधला ‘कांचमहल’ पाहिला. मिरर असलेले दालन तर अप्रतिम कलाकसुरीचा आणि सौंदर्याचा नमुना आहे. बिल्लोरी आरशांच्या तुकडय़ांचा वापर इथल्यासारखा जगात कुठेही बघायला मिळत नाही. या महालाच्या खिडक्यांमधून दिसणारी टेकडय़ांमधील भिंत, चायनावॉलची आठवण करून देते. आधी ही वॉल की आधी ती वॉल बनली माहीत नाही, पण धाटणी एकसारखीच आहे.

सर्वदूर पसरलेला मोठा परिसर त्याचे झालेले आधुनिकीकरण, मोठमोठय़ा बागा. जवळच, सरोवरातील जलमहालाचे प्रतिबिंब, त्याकाळातील सौंदर्यवती राण्यांचे प्रतिबिंब दर्शविते.

त्या काळातील सततची युद्धं लक्षात घेतली तर युद्धातील ‘घाव’ सोसण्यासाठी असलेले ‘रंगमहल’ ही काळाची गरज होती. याची खात्री पटते. आजच्या तरुणांना न पेलवणारी शस्त्रे, तलवारी पाहिल्या तर त्यांचे घाव शरीरावर कसे पेलवले असतील असा प्रश्न पडतो. असे काही प्रश्न घेऊनच तिथून परत निघालो.
डॉ. मंगला ठाकरे – response.lokprabha@expressindia.com