मालिका आणि नाटकात एकाच वेळी काम करणं तसं कठीण. याचं कारण म्हणजे मालिकेचं शूट आणि नाटकाचे दौरे याचं वेळापत्रक. मात्र ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका अपवाद ठरली. यातले मुख्य दहा कलाकार रंगभूमीही गाजवताना दिसताहेत.

मालिकेत काम करायचं म्हणजे तासन्तास शूट करण्याची तयारी ठेवायचीच. हे ‘तासन्तास’ काम कधी ‘दिवसरात्र’वर जाऊन पोहोचतं हे कळत नाही. टीआरपीची गणितं, मालिका ‘डेली’ चालवणं, इतर चॅनल्सशी स्पर्धा अशा सगळ्यामुळे मालिकांच्या शूटिंगचं दुकान अनेकदा बंद न होणारच असतं. मग सकाळी सात ते संध्याकाळी सात अशी शिफ्ट रात्री बारापर्यंत खेचली जाते. आणि पुढे ही खेचलेली शिफ्ट ‘डे-नाइट’ मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे मालिकेतले कलाकार मालिका एके मालिका आणि मालिका दुणेही मालिकाच करतात. अगदीच एखाद्या कलाकाराचं नशीब चांगलं असेल तर तो सिनेमात दिसतो. पण, मालिकेतले सरसकट सगळेच मध्यवर्ती भूमिका असणारे कलाकार वेगवेगळ्या नाटकांमध्ये दिसणं आजच्या टीव्हीच्या स्पर्धात्मक युगात तसं अवघडच. झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका मात्र याला अपवाद ठरली आहे. मालिकेतल्या सहा सासू, दोन सासरे, नायक-नायिका असे दहा कलाकार छोटय़ा पडद्यासह रंगभूमीवरही दिसताहेत. मालिकांची बारा तासांची शिफ्ट आणि नाटकांचे दौरे अशाचा योग्य मेळ घालत या मालिकेतले मध्यवर्ती भूमिका करणारे कलाकार मालिकेसोबत नाटकही गाजवतायत.
या मालिकेतले प्रसाद ओक, मनोज जोशी हे कलाकार आधीपासूनच नाटक करत होते. प्रसादचं ‘नांदी’ आणि ‘वाडा चिरेबंदी’ अशी दोन लोकप्रिय नाटकं सध्या सुरू आहेत. तर मनोज जोशी यांचं ‘चाणक्य’ आणि ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकाचं गुजराती भाषेमधलं रूपांतर अशी दोन नाटकं सुरू आहेत. प्रसाद सांगतो, ‘मालिकेत येण्याआधीपासून मी नाटक करतोय. ‘नांदी’ हे नाटक मी दीड वर्षांपासून करतोय. मालिकेत मात्र मी नऊ महिन्यांपासून काम करतोय. त्यामुळे माझे नाटकांचे दौरे असणार हे मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांना माहीत होतं. आमची जुनी मैत्री असल्यामुळे आम्ही एकमेकांना नेहमीच समजून घेतो. तसंच ‘होणार सून..’साठी महिन्यातून मी तीन ते चार दिवस देतो. त्यामुळे वेळेचं नियोजन करता येतं. मी करत असलेल्या दोन्ही नाटकांच्या तारखा पुढच्या तीन-चार महिन्यांच्या आधीच ठरल्या जातात. त्यामुळे मालिकेच्या टीमला या तारखांविषयी आधीच सूचित करता येतं. नाटक हा माझा श्वास आहे. त्यापासून मी लांब राहूच शकत नाही.’ मालिकेचं चक्र हे आठवडय़ाच्या त्या एका टीआरपीच्या दिवसामुळे फिरत असतं. तसंच मालिकेच्या ट्रॅक्समध्ये अनेकदा बदल केले जातात. अशा वेळी कलाकार उपलब्ध असणं आवश्यक असतं. अशा वेळी एखादा कलाकार दौऱ्यावर किंवा प्रयोगासाठी बाहेर असेल तर मात्र मालिकेच्या टीमची पंचाईत होते. प्रसाद एक किस्सा सांगतो. तो म्हणतो, ‘६ डिसेंबरला ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा शुभारंभ होता. मी एक तारखेपासून नाटक सुरू होईपर्यंत शूटला येऊ शकणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याआधीच आवश्यक ते शूट मी केलं होतं. प्रॉडक्शन हाऊसलाही याबाबत काहीच अडचण नव्हती. पण, मी सुट्टीवर असलेल्या त्याच दिवसांमध्ये माझे दोन-तीन महत्त्वाचे सीन्स होते. त्याचं शूट मी केलं नव्हतं. मी मंदारला सांगितलं होतं की, मला त्या सीन्समधून काढून टाक. पण, जान्हवी आणि काका अशा दोघांचे ते महत्त्वाचे सीन्स होते. ते सात डिसेंबरला टीव्हीवर दिसणारही होते. त्यामुळे त्या दिवशीही शूट करता येणार नव्हतं. मग मंदारने एक मार्ग सुचवला. त्या सुट्टीच्या दिवसातल्या एका दिवशी माझा ‘नांदी’चा ठाण्यात प्रयोग होता. संध्याकाळी साडेआठ वाजता हा प्रयोग होणार होता. या नाटकात सुरुवातीलाच माझा पहिला प्रवेश असतो. हा प्रवेश झाल्यावर जवळपास दोन तास मला मोकळा वेळ असतो. या मोकळ्या वेळेत ते सीन्स शूट करण्याचं मंदारने सुचवलं. मग मी पहिला प्रवेश संपल्यावर साडेनऊ ते अकरा असं दीड तास शूट केलं. लगेच दुसऱ्या प्रवेशासाठी तयार होऊन बसलो. अशा गोष्टी घडत असतात. पण, यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही. फायदाच होत असतो.’

रोहिणी हट्टंगडी – आई तुला मी कुठे ठेवू?
मनोज जोशी – चाणक्य, सुखांशी भांडतो आम्ही या नाटकांचं गुजराती भाषेतलं रूपांतर
सुहिता थत्ते, पौर्णिमा तळवलकर, स्मिता सरवदे, सुप्रिया पाठारे- मदर्स डे
प्रसाद ओक – नांदी, वाडा चिरेबंदी
शशांक केतकर, लीना भागवत – गोष्ट तशी गमतीची
तेजश्री प्रधान- नाव कळलेलं नाही (आगामी)

खरंतर मालिका आणि सिनेमा अशा दोन्ही माध्यमांत एकाच वेळी काम करणाऱ्या कलाकारांची संख्या तशी बऱ्यापैकी आहे. पण, मालिकेतल्या कलाकारांसाठी नाटकांमध्ये भूमिका करणं काहीसं अवघडच असतं. याचं कारण असं की, सिनेमाचं ठरावीक दिवसांचं शूट संपल्यानंतर त्या सिनेमासाठी फारसा वेळ द्यावा लागत नाही. मात्र नाटकांचे दौरे हे सतत सुरूच असतात; त्यामुळे मालिका-सिनेमा यांच्या वेळेचं नियोजन हे मालिका-नाटक यांच्या नियोजनापेक्षा कैक पटीने सोपं असतं. मालिकांची बारा तासांची शिफ्ट आणि ठिकठिकाणी होणारे दौरे याचं वेळापत्रक आखणं कलाकारांसाठी कठीण काम असतं. त्यामुळे मालिका आणि नाटक अशा दोन्ही माध्यमांत सातत्याने दिसणारे कलाकार फार नाहीत. पण, ‘होणार सून मी..’मधल्या महत्त्वाच्या सगळ्याच कलाकारांची रंगभूमीवरची श्रद्धा त्यांना तिथवर घेऊन गेली. म्हणून ही मंडळी लोकप्रिय नाटकांचा एक भाग झाली आहे. मालिकेतली आई, मोठी आई, बेबी आत्या, सरू मावशी या सगळ्या रंगभूमीवर एकाच नाटकातून दिसतायत, मात्र वेगवेगळ्या भूमिकांतून. ‘मदर्स डे’ या नाटकातून सुहिता थत्ते, सुप्रिया पाठारे, पौर्णिमा तळवलकर, स्मिता सरवदे या अभिनेत्री वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतात. सुप्रिया पाठारे नाटक आणि मालिका यांच्या वेळेचं नियोजन कसं करतात त्याविषयी सांगतात, ‘आमच्या चौघींचा नाटक करण्यामध्ये मोठा सहभाग हा चॅनल आणि निर्माता मंदार देवस्थळी यांचा आहे. मालिकेच्या एपिसोड्सची बँक करून कलाकारांना इतरही काम करू देणं ही चॅनल आणि निर्मात्याने दिलेली मोठी साथ आहे असं मला वाटतं. व्यवस्थित नियोजन केल्यामुळे महिन्याचे दहा ते बारा दिवस शूट करावं लागतं. त्यामुळे नाटकाचंही त्याप्रमाणे नियोजन करणं सोप जातं. नाटकात काम करताना कलाकारांचं एकमेकांशी टय़ुनिंग जुळणं महत्त्वाचं असतं. आमच्या चौघींचं ते टय़ुनिंग आधीपासूनच जुळलंय. त्यामुळे नाटक करताना मजा येते. रंगभूमीवर काम करणं हे कोणत्याही कलाकाराला आवडतंच. मालिका-नाटक यामध्ये थोडं थकायला होतं हे खरंय पण, या दोन्हीतून मिळणारा आनंद आणि समाधान खूप असल्यामुळे तो थकवा जाणवत नाही. तसंच आम्ही शुक्रवार रात्र, शनिवार, रविवार असे प्रयोग करतो. हे आधीच ठरल्यामुळे नियोजन करणं सोपं जातं.’

अडवणूक का करावी?
कुठल्याही कलेला तुम्ही थांबवू शकत नाही. एकमेकांना सांभाळून, मदत करत मालिकेचं शूट होत असतं. lp51मालिकेतल्या कलाकारांनी त्यांना मिळालेल्या नाटकाच्या ऑफरबाबत सर्वप्रथम माझ्याशी सविस्तर चर्चा केली. शूटिंगच्या तारखा आणि नाटकांचे दौरे हे एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेतली. यामुळेच मालिका आणि नाटक अशा दोन्ही माध्यमांतून ते प्रेक्षकांना दिसताहेत. जसं प्रॉडक्शन हाऊसकडून कलाकारांना सहकार्य मिळतंय तसंच कलाकारही प्रॉडक्शन टीमला खूप सहकार्य करतायत. त्यांचा एखादा प्रयोग रद्द झाला किंवा वेळ बदलली की त्याची माहिती ते सगळ्यात आधी प्रॉडक्शन टीमला देतात. तसंच ते नाटकांची तालीम रात्रीच ठेवतात जेणेकरून सकाळी सात ते संध्याकाळी सात या शूटच्या वेळेला धक्का लागत नाही. प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या माध्यमांतून काम करण्याची इच्छा असते. पण, त्यासाठी कलाकाराची अडवणूक का करावी? एकमेकांना सहकार्य केल्यामुळेच हे शक्य होतंय.
– मंदार देवस्थळी, निर्माता-दिग्दर्शक

यालाच दुजोरा देतो तो मालिकेचा नायक शशांक केतकर. त्याचं ‘गोष्ट तशी गमतीची’ हे पिढय़ांमधलं अंतर या विषयावर भाष्य करणारं नाटक लोकप्रिय ठरतंय. तो म्हणतो, ‘शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस प्रयोग करायचं ठरलेलं असल्यामुळे मालिकेच्या टीमलाही प्रत्येकाच्या तारखा जुळवणं सोपं जातं.’ शशांकसह या नाटकात मालिकेतली त्याची छोटी आई म्हणजे लीना भागवत याही काम करतायत. मालिकेतली छोटी आई नाटकात मात्र त्याच्या आईची व्यक्तिरेखा साकारतेय. शशांक सांगतो, ‘आमच्या मालिकेने अनेक रेकॉर्डस केले आहेत. तसंच काही पायंडेही घातलेत. तसंच मालिकेतले सगळे मध्यवर्ती भूमिकेतले कलाकार नाटकांमध्ये काम करण्याचा त्यापैकीच एक पायंडा म्हणता येईल. मालिका करताना सातत्याने नाटकाचे प्रयोग करणं हे अवघड असतं हे खरंय. पण, प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनल यांचं सहकार्य असेल तर मात्र ही अवघड गोष्ट सोपी होते. आम्हा सगळ्यांना सुदैवाने चॅनल आणि मालिकेच्या टीमने सांभाळून घेतलं, घेताहेत. इतकंच नव्हे तर यासाठी कलाकारांचाही आपापसातला समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. जसं प्रॉडक्शन टीम आम्हाला सांभाळून घेते तसंच आपणही सहकार्य करणं ही आमची जबाबदारी असते. म्हणूनच मुंबईतच दुपारचा प्रयोग असेल तर सकाळी किंवा रात्री शूटसाठी जाणं आवश्यक असल्यास आम्हीही तयार असतो. एकमेकांमध्ये सामंजस्य असणं खूप आवश्यक आहे.’ मालिकेतल्या आईआजीही यात मागे नाहीत. रोहिणी हट्टंगडी या ‘आई तुला मी कुठे ठेवू’ या नाटकात भूमिका करताहेत.
मालिकेत फक्त नायिका, तेजश्री प्रधान ही रंगभूमीपासून लांब होती. पण, आता तीही याकडे वळतेय. महिन्याभरात प्रेक्षकांची लाडकी जान्हवी एका नाटकातून भेटीस येणार आहे. तिच्या नव्या नाटकाबाबत ती सांगते, ‘एखादी व्यक्तिरेखा सतत दीड वर्ष साकारल्यानंतर थोडा ब्रेक हवा असतो. ती व्यक्तिरेखा तुम्ही उत्तमरीत्या करत असताच. पण, ती आणखी चांगली होण्यासाठीही तो ब्रेक आवश्यक असतो. म्हणून मी नाटक करायचं ठरवलं. मालिका सुरू होण्याआधीच मला ‘तुझी कमिटमेंट काय’ असं विचारलं होतं. तेव्हा मी ‘मालिकेला एक वर्ष झाल्यानंतर नाटकाची ऑफर मिळाली तर नाटक करेन’ असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे नाटकाकडे लक्ष ठेवून होतेच. नाटक करायला मिळतंय याचं कारण आहे मालिकेची टीम. सगळ्यांप्रमाणे ही टीम मलाही सांभाळून घेते. माझ्या नाटकाचे प्रयोग अजून सुरू झाले नाहीत. पण, महिन्याभरात ते सुरू होईल. सध्या मी सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सात असं मालिकेचं शूट करतेय आणि संध्याकाळी साडेसात ते दहा अशी नाटकाची तालीम करतेय. दोन्ही माध्यमांत काम करताना कोणाचंच नुकसान होणार नाही याची काळजी मात्र मी घेतेय.’ या नाटकाची निर्मिती मनोज जोशी यांनी केली आहे. मनोज जोशी यांच्यासोबत तेजश्रीने यापूर्वी एका हिंदी सिनेमात काम केलंय.
मालिका लोकप्रिय असली, टीआरपीच्या रांगेत सगळ्यात पुढे असली की ती आणखी लोकप्रिय कशी होईल याचा प्रॉडक्शन हाउस आणि चॅनल सतत विचार करत असतात. टीआरपीच्या आकडय़ांप्रमाणे मालिकांचे ट्रॅकही झपाटय़ाने बदलत असतात. या सगळ्यामध्ये कलाकारांचीही कुंचबणा होत असते. दिवसरात्रीच्या शिफ्ट्समुळे कलाकारांना इतर माध्यमांमध्ये काम करण्याची संधी असूनही ते करता येत नाही. पण, या सगळ्या चित्राला ‘होणार सून..’ या मालिकेने मात्र खोटं ठरवलंय. मालिका तुफान लोकप्रिय असली तरी त्यांच्या एपिसोड्सची बँक केली जाते. तसंच ठरावीक तास आणि दिवसांचं शूट करुन शिफ्ट्सची वेळही आटोक्यात असते. अशा प्रकारे, मालिका-नाटक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत हे कलाकार चांगलं काम करताहेत.
चैताली जोशी