वर्तमानपत्रात बातमी आली की, रुग्णांच्या नातेवाईकांचा डॉक्टरांवर हल्ला! सविस्तर बातमी वाचल्यावर वेडय़ांचा कारभार होता, हे कळले. डॉक्टर सेवाभावी असतो. चार-पाच वर्षे अतोनात कष्ट घेऊन डॉक्टरची पदवी प्राप्त करतो. प्रत्येक डॉक्टरची भावना रुग्णाला वाचवायची असते. तो रुग्णाचा जीवनदाता असतो; तेव्हा तो रुग्णाला मारेलच कसा? शेवटपर्यंत रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

अमर होऊन कोणी आलेले नाही. तेव्हा आज-उद्या जीवन संपणारच आहे. मग रुग्ण मेल्यावर हॉस्पिटलची मोडतोड व डॉक्टरांवर हल्ला कशाकरता? हा कुठचा न्याय? माणूस अशिक्षित असला, तरी माणुसकी सोडू नये. रागाने अद्वातद्वा बोलणे ठीक आहे. हात उगारण्याचे कारण नाही. डॉक्टर जीवनदाता आहे, त्याच्याच जिवावर उठायचे?

चुकून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण मेला, तर डॉक्टरांना मारून तो परत येणार नाही. डॉक्टरही माणूस आहे. माणसाच्या हातूनच चुका होतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय चुकतोच. तेव्हा शांतपणे विचार करून, चर्चा करून काय करायचे ते ठरवावे. सज्जड दम भरून भीती दाखवावी किंवा दबाव आणावा; पण डॉक्टरांवर हत्यार चालवू नये.

एका डॉक्टरला मारले म्हणून ७८४ निवासी डॉक्टर संपावर गेले. एकी दाखवली ही कौतुकाची बाब आहे. पण आता गैरसोय रुग्णांचीच झाली. कोण करतो व कोणाला भरावे लागते? मागे शिवसेनेनेही हाच फार्स केला होता. मनाविरुद्ध झाले की, बेस्ट-बसेस जाळून राग व्यक्त करायचा. आपल्या जनतेचे नुकसान होते. कळते, पण वळत नाही. कारण एक नाही, अनेक बसेस जाळल्या. तसेच डॉक्टरवर हात उचलण्याचा फार्स पहिल्यांदाच झाला नाही. प्रत्येक डॉक्टरला वाटते की असा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो. म्हणून सर्व डॉक्टरांनी एकोपा दाखवून संपाचे शस्त्र काढले. तेव्हा मागचा-पुढचा विचार न करता पाऊल उचलू नये. त्याचे परिणाम भविष्यात सर्वाना भोगावे लागतात.

सुरक्षारक्षक ठेवायचे कारणच काय? रुग्ण नातेवाईकांनी मारामारी करायची गरजच काय? प्रत्येकाने आपापली कामे चोख करावीत. दुष्कर्म न करता सुकर्म करण्याचा प्रयत्न करावा. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावून काय फायदा? कारण अर्धे-अधिक ते बेकार असतात. काही वाईट घटना घडल्यावर ते कॅमेरे ठीक करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. नरेंद्र दाभोळकरांचा खून भर रस्त्यात व दिवसाढवळ्या झाला. पाठमोरा माणूस म्हणे कॅमेऱ्यात दिसला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात चोरी झाली, तेव्हा पण चोर दिसत होता, पण अगदी अस्पष्ट! कितीही चोख व्यवस्था केली, तरी गुन्हेगार मंडळी त्यातून रस्ता काढतातच.

माणसाचे मन चंचल असते. त्या मनाला इकडेतिकडे धावू न देता नियंत्रणात ठेवावे. मनात असलेला कचरा असतो आधी साफ केला पाहिजे. शहराची साफसफाई करून चालत नाही; तर मनाचीही केली पाहिजे. त्याकरिता अध्यात्माचे धडे मुलांना लहानपणापासून दिले पाहिजेत. पुनरेसक्ती केल्याने मन महामुश्किलीने ताळ्यात येते. निराश न होता, प्रयत्नांती परमेश्वर आहे; हे सत्य जाणून घ्या.

डॉक्टरला आपण देव मानतो. मेहनतीने, मन लावून रुग्णसेवा देतो. रुग्णच त्याच्या जिवावर उठले; तर तो कशाला मन लावून काम करेल? पूर, भूकंप इ. आले की डॉक्टरांची फौज मदतीकरिता धावते. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करतात. त्यात एखाद्या डॉक्टरचा मृत्यू झाला; तरी जास्त वाच्यता न करता सेवा चालू असते. जनसेवा म्हणून अनुभवी डॉक्टर्स खूप ठिकाणी ‘कॅम्प’ घेऊन सेवा देतात. तेव्हा अशा उदात्त सेवा देणाऱ्या डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्यांच्या क्षेत्रात मारहाण करून हल्ला करायचा? कीव करावीशी वाटते हल्ला करणाऱ्या रुग्ण-नातेवाईकांची? संतुलित विचारांमुळे संतुलित मन राहते. संत सहवासाने ते शक्य आहे. मंत्र्यांशी नुसती बोलणी करून संपकरी डॉक्टरांनी माघार घेऊ नये. तर लिखित रूपात डॉक्टरांची सुरक्षा झालीच पाहिजे. आजकाल पैशाला पासरी डॉक्टर झाले आहेत. खोटय़ा सर्टिफिकेटने पण अनेक डॉक्टर व्यवसाय करतात. पण ओल्याबरोबर सुके जळायला नको. चांगल्या डॉक्टरांना चांगला न्याय मिळालाच पाहिजे. रुग्णांनी वडय़ाचं तेल वांग्यावर काढू नये.
रेखा केळकर – response.lokprabha@expressindia.com