महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारून तेथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काही जाणकारांच्या मते त्यासाठी प्रत्यक्ष खर्च खूप अधिक होईल.

शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचे, पराक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांची स्मृती अत्यंत प्रेरणादायक आहे. शिवरायांचा आणखी एक पुतळा समुद्रामध्ये उभा करावा हे बरोबर वाटत नाही. महाराजांचे तीन पुतळे मुंबईत आहेतच आणखी एक पुतळा समुद्रामध्ये उभारण्याने काय साध्य होईल? त्यांच्या भव्य कर्तृत्वातून व जीवनातून प्रेरणा मिळावी असे वाटत असेल तर त्यासाठी एखादे जिवंत व अत्यंत उपयुक्त असे स्मारक उभारता येईल.
शिवाजी महाराजांच्या चरित्रातून त्यांच्या तीन गोष्टी प्रकर्षांने पुढे येतात.
१) त्यांचे अतुलनीय शौर्य व पराक्रम. त्यांनी स्वराज्यासाठी उभारलेले सैन्य व त्याचा उत्तम उपयोग करून मिळवलेले देदीप्यमान विजय.
२) त्यांची उत्तम अशी लोकाभिमुख राज्यव्यवस्था.
३) स्वत: एक बलवान राजे असूनसुद्धा एखाद्या संताला शोभेल अशी उच्च दर्जाची नीतिमत्ता, म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी त्यांना श्रीमंत योगी असे म्हटले.
या सर्व गोष्टी अत्यंत प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत. तेव्हा मला वाटते की त्यांच्या नावाने एक मोठे प्रतिष्ठान स्थापावे हे शंभर कोटी रुपये तेथे जमा करावे. या संस्थेने महाराष्ट्रात जास्तीत जास्त निवासी सैनिकीशाळा सुरू कराव्या. तेथे ५वी ते १२वीपर्यंत शिक्षण द्यावे. सर्व शिक्षण व निवारा खर्च नि:शुल्क असावे. तेथल्या मुलांना नेहमीच्या शिक्षणाव्यतिरिक्त शारीरिक व मानसिक बल वाढवणारे शिक्षण द्यावे. त्यात योग्य अशा कवायती, नेमबाजी, घोडेस्वारी, पोहणे तसेच फुटबॉल, हॉकीसारखे खेळ शिकवावे.
त्यांना संपूर्ण शिवचरित्र शिकवावे. शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले दाखवावे. मराठे शाहीतल्या सर्व वीर पुरुषांचे चरित्र व त्यांनी केलेल्या परक्रमाच्या कथा त्यांना सांगाव्या. त्याचप्रमाणे भारतीय सैन्याने वेगवेगळय़ा युद्धात जे पराक्रम गाजवले त्याची माहिती द्यावी.
भारताच्या सर्व सेनादलाची संपूर्ण माहिती द्यावी. तसेच तेथे दाखल होण्यासाठी त्यांच्याकडून योग्य ती तयारी करून घ्यावी. १०वी व १२वी पास झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय प्रबोधिनी व लष्कराच्या इतर संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रयत्न करावे. या सैनिकी शाळांमध्ये दाखल होणारी मुले व त्यांचे पालक यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, की ही मुले पुढे सैन्यदलात दाखल होतील.
या सैनिक शाळेतून पुढे सैन्यात गेलेले तरुण जेव्हा पराक्रम गाजवतील व त्यापैकी काही सैन्यात उच्च पदे भूषवतील तेव्हा ते शिवरायांचे खरे स्मारक होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणत असत की महाराष्ट्र हा भारताचा खडग हस्त झाला पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ते प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी शिवप्रतिष्ठानने प्रयत्न करावे.
याशिवाय खालीलप्रमाणे काही गोष्टी करता येतील.
ज्या तरुणांना सैन्याच्या विविध शाखांमध्ये प्रवेश हवा असेल त्यांच्यासाठी एक ते दोन महिन्यांच्या शिबिरांचे आयोजन करून त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करावे तसेच सैन्यदलात दाखल होण्यासाठी ज्या परीक्षा असतात त्यात ते उत्तीर्ण होतील, अशी त्यांची शारीरिक व मानसिक तयारी करून घ्यावी.
महाराष्ट्रातून जे जवान व अधिकारी कर्तव्य बजावताना अपंगत्व किंवा वीरगती प्राप्त करतील त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस सर्व प्रकारे मदत करावी. सरकार देते त्या शिवाय. तसेच प्रत्यक्ष रणांगणावर पराक्रम गाजविणाऱ्या सैनिकांचा शिवप्रतिष्ठानतर्फे गौरव करावा.
आपले वैज्ञानिक व इंजिनीअर्स संरक्षण क्षेत्रात संशोधन करतात. त्यांच्या विशिष्ट कामगिरीबद्दल त्यांना शिवप्रतिष्ठानतर्फे पुरस्कार द्यावे. उदाहरणार्थ, भारताने अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्ब यांच्या यशस्वी चाचण्या केल्या. तसेच लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केली. त्यात महत्त्वाची कामगिरी बजवणाऱ्यांना पुरस्कार द्यावे.
या सर्व कार्यासाठी बराच पैसा लागेल. वरील लिहिल्याप्रमाणे जर सैनिकी शाळा चालवण्याचे ठरवले, तर इतर राज्य सरकारेपण मदत देतील. संरक्षण हा सर्व भारताचा महत्त्वाचा विषय आहे.
शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवावे व लोकांना सढळ हस्ते मदत करण्यास आव्हान करावे. महाराष्ट्राबाहेर अनेक शिवप्रेमी मंडळी आहेत. तेही शिवजयंतीच्या निमित्ताने मदत देतील.
शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नेते नव्हते. या महापुरुषाने भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला व इतिहासाची दिशा बदलली. त्यांनी लावलेला छोटा वृक्ष वटवृक्ष बनला. मराठी फौजा दिल्ली सर करत अटकेपार गेल्या. शिवाजी महाराज हे सर्व भारतीयांना आदरणीय व वंदनीय आहेत. त्यांचे स्मारक फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता अखिल भारतीय पातळीवर व्हावे.
अरुण दांडेकर