‘ये रे बाळ, निनाद, घाल गंगाजल आईच्या मुखात.. उगी उगी बाळा, आता तुही मोठा आहेस. तू आणि तुझ्या बाबानं कमी का प्रयत्न केले तिला मृत्यूच्या दाढेतून परत आणायला. पण तिला असा दुर्धर रोग झालेला. काय करणार आपण? परमेश्वराची इच्छा. सावर स्वत:ला आणि तुझ्या बाबालाही.’

माईआत्या २० वर्षे वयाच्या निनादला समजावत होत्या. पुन्हा बहिणीच्या – कुसुमच्या – गळ्यात पडून स्वत:ही रडत होत्या.
तरिता तशी अवेळीच गेली. नशीब म्हणजे लेकीचं लग्न व्यवस्थित पार पाडून गेली. माई आणि कुसुम या तिच्या नणंदांनी वेळोवेळी तिला आपल्याकडच्या चालीरीती शिकवल्या, स्वयंपाक शिकवला. तिच्या प्रत्येक कार्यात तिला काही गोष्टी कशा पुन:पुन्हा शिकवाव्या लागतात हेही बोलून दाखवत आल्या. तिच्या माघारी तिच्या कागाळ्याही भावाला केल्या. तीही फटकळपणे बोलायची कधी कधी, पण ते तेवढय़ापुरतंच. मनात काही नाही. नणंदांचं दुखलं-खुपलं बघायला पुढं सरायची. पण तिचा असा असाध्य रोगानं अंत व्हावा हे त्यांच्या जिवाला फारच लागलेलं दिसत होतं.
दोघीही आळीपाळीनं भावाच्या, नुकतंच लग्न पार पडलेल्या भाचीच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत होत्या. किती झालं तरी हा धाकटा भाऊ – रमेश – लाडका होता. त्याच्यासाठी वरखाली किती बघितलं, लहानपणी आईचं लक्ष नसेल तेव्हा छोटा ओरखडा, पण उठू दिला नव्हता त्यालाच काय त्याच्या मनालाही. पण तरिताचं जाणं ही जखम कधीच भरून न येणारी होती, हे त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या साऱ्यांनाच जाणवत होतं.
‘चला, उचला लवकर, शववाहिका आलीय. तुम्ही कितीही सेंट मारला, फुलं हार वाहिले तरी शरीर लवकर पंचत्वात विलीन झालेलं बरं.’ पुरुषमंडळींपैकी रोखठोक बोलण्यात प्रसिद्ध असलेले गजाभाऊ शेवटी पुढाकार घेऊन रमेशशी बोलते झाले.
मंडळींनी भराभर शववाहिका वैकुंठाकडे रवाना केली. त्यातून रमेश, निनाद अशी अगदी जवळचे नातेवाईक गेले आणि बाकी साऱ्या पुरुषमंडळींनी आपापल्या गाडय़ा त्यापाठोपाठ दामटल्या.
‘मला निनादचं फार वाईट वाटतं. किती प्रौढासारखा धीरगंभीर वागला. लहानपणी याच्या खोडय़ा बघता बघता आई-बाप थकून जायचे गं. आज अगदी हिरमुसलं कोकरूच दिसत होतं गं!’ कुसुमच्या मनाचा बांध पुन्हा फुटला.
‘हो नं! किती आशा वाटत होती त्याला, आई याही अवस्थेतून बाहेर येईल म्हणून! एकेकाळी त्याच्या बाललीलांनी आणि मग नुकतंच मिसरूड फुटलेल्या वयातल्या खोडय़ांनी हैराण केलेलं आई-बापाला’. माईनं कुसुमची री ओढली.
‘तरिता किती रागवायची त्याला पाहुण्यांच्या देखत ताईची आईची टिंगलटवाळी करायचा म्हणून. ताईचा खेळ हवा म्हणून किती वेळा तिचा मैत्रिणींबरोबर रंगात आलेला खेळाचा डाव मोडला होता यानं. आई नोकरीवरून घरी आली की सुरू ताईच्या याच्याबद्दलच्या तक्रारींचा पाढा. पण तरिताही जमेल तेवढं त्याला समजावून सांगायची. त्याला मदतीला लावायची.
‘बाबांच्या हाताखाली स्वयंपाकघरात एखादा पदार्थ शिका.’ असं म्हणून हसायची.
पण बापसे बेटा सवाई म्हणतात नं तसं तो चक्क आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा किंवा ‘मला नाही बाबांसारखा स्वयंपाक येत’, अशी दवंडी पिटवायची. त्याचीच फळं भोगताहेत ना ते! असं म्हणून मोठय़ांदा हसत सुंबाल्या करायचा खेळायला. कधी ताईबरोबर शुभंकरोती म्हटलं नाही. घरातल्या देवापुढे दिवा लावला नाही. बाबांबरोबर स्तोत्रं म्हटली नाहीत. देवाला आईबरोबर जायचा आणि आईच्या प्रदक्षिणांकडे लक्ष न देता प्रसाद घेऊन बाहेर येऊन थांबायचा. हा कुठलाही अभ्यास मागे लागल्याशिवाय करायचाच नाही. आई मग छडी घेऊनच बसायची त्याचा अभ्यास घ्यायला. आता मात्र नुकतीच त्याला छान दिशा मिळाली होती व्यावसायिक शिक्षणाची. त्यात तो विशेष नैपुण्यही मिळवू लागला होता. आईचा ऊर ते सांगताना अभिमानानं भरून यायचा. मग हा तिच्याकडून विशेष पॉकेटमनीही मिळवायचा. हॉटेलमध्ये मित्रांबरोबर चमचमीत पार्टीही व्हायची छोटीशी.
‘ताईच्या लग्नातच तरिता ओढूनताणून करत होती आणि दमत होती. तिला बसायला दिलं तर संकोचत होती. इच्छाशक्तीच्या बळावर निभावलं बापडीनं.’ कुसुमनं पुन्हा डोळ्यांना पदर लावला.
‘निनादला काय करू अन् नको करू असं होऊन गेलं होतं, उपायांच्या बाबतीत. शेवटी डॉक्टरना विनवण्या केल्या. पण निसर्गापुढे आणि ईश्वर इच्छेपुढे आपण तोकडे आहोत गं.’ माई रडवेल्या स्वरात बोलल्या.
‘अगं हो नं, मी नारळ ओवाळून टाकायला गेले, कुणीतरी दिलेला अंगारा लावायला गेले आय. सी.यू.मध्ये तर डॉक्टरनी अजिबात अडवलं नाही मला. म्हणाले, ‘काकू, आता आमचे उपाय थकत आलेत. तुम्ही करा देवाची आळवणी.’ ‘अगं हेच डॉक्टर ३-४ दिवसांपूर्वी तरिताच्या बेडपाशीही जाऊ देत नव्हते.’ कुसुमही सांगता सांगता रडत होती.
कुसुमताईंचं लक्ष तेवढय़ात देवघराकडे गेलं. छोटसंच पण छान सजवलेलं. रमेशनं आपल्या कुलदैवतांपैकी काही टाक आणि छोटय़ा मूर्ती मांडलेल्या. तरिता बहुतेक वेळा पूजाअर्चा करून नोकरीवर जायची. रमेशलाही फारसं बघायला लागायचं नाही. मग मुलं तर दूरच.
‘अगं माई, हे बघितलंस का, रमेशनं देव पाण्यात ठेवलेत. सांकडं घातलं होतं त्यानं देवाला तरिताला आराम पडावा म्हणून.’ कुसुमताई उद्गारल्या.
एव्हाना माणसं परतू लागली होती. रमेश आत येताच माईंनी विचारलं,
‘रमेश, तू देवांना पाण्यात ठेवलं होतंस का रे? पण त्यांचाही नाइलाज झाला असावा.’
‘बघू. मी, अगं मी होतो कुठे घरी जास्त. सारखा हॉस्पिटलमध्येच असायचो. शेवटी शेवटी तर कुसुमच्या घरीच जायचो आवरायला. घरी तर निनाद यायचा झोपायला. सकाळी चहा, नाश्ता करून यायचा हॉस्पिटलला मला आवरायला जायला मिळावं म्हणून..’ आणि रमेशच्या डोक्यात लख्ख उजेड पडला. ‘निनाद.?’
निनाद समोर हजर होता. ‘हो बाबा, मीच.देवांनी आपली परीक्षा पाहिली, मग मी त्यांनाही..’
ही अंधश्रद्धा होती की नव्हती हे माहीत नाही, पण देवावर पूर्णपणे श्रद्धा ठेवण्याचा निनादपुरता कुठंतरी पाहिलेला किंवा कुठूनतरी ऐकलेला मार्ग होता. कदाचित आईनं देवाधर्माचं केलेलं बघून देव त्याचं फळ या कसोटीच्या क्षणी नक्की देईल हा तो विश्वास असावा.
रमेशनं न राहवून निनादला उराशी कवटाळलं अन् अश्रूंना वाट करून दिली. कुसुम आणि माई यांचा पुन्हा बांध फुटला. जणू या साऱ्यांच्या अश्रूंच्या महापुरात देवही वाहून जाऊ पाहात होते.