दि. २५ जुलैच्या ‘लोकप्रभा’मधील डॉ. उज्ज्वला दळवीलिखित ‘झुरता झुरक्यासाठी’ या लेखात त्यांनी धूम्रपानाचे व्यसन सुटण्यासाठी अधिकारपरत्वे काही उपाय सुचवले आहेत. मी या व्यसनाच्या मगरमिठीत सुमारे दोन वर्षे सापडलो होतो. तीतून मी कशी सुटका करून घेतली त्याची ही कथा.
नागपूर येथे जुन्या मध्य प्रदेश विधान मंडळ सचिवालयात विधानसभा सदस्यांची मराठी भाषणे लिहून घेण्यासाठी मी एकटाच ‘मराठी प्रतिवेदक’ म्हणून नियुक्त होतो. (हल्ली या कामासाठी सुमारे ८-१० प्रतिवेदक कार्यरत आहेत.) त्यामुळे सभागृहातच कामकाज चालू असताना मला दिवसभर सभागृहातच बसून राहावे लागे. त्यामुळे सभागृहात झालेली मराठी भाषणे टंकलिखित करण्याकरिता सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून मला ते काम करावे लागे. रात्रीच्या समयी झोप अनावर झाल्यामुळे त्या कामी व्यत्यय येत असे. त्यावर एका सहकाऱ्याने धूम्रपानाचा उपाय सुचवला. त्यानुसार चहा आणि धूम्रपान करून मी माझे काम पूर्ण करीत असे. कालांतराने मी त्या व्यसनात चांगलाच अडकलो. परिणामी खोकल्याचा आजार जडला. फॅमिली डॉक्टरांनी गंभीर दुष्परिणामांचा इशारा दिल्यामुळे मी ते व्यसन सोडण्याच्या प्रयत्नांस लागलो. तथापि, त्यात मला काही केल्या यश येईना. त्याच सुमारास माझ्या वडिलांचे दु:खद निधन झाल्यामुळे त्यांच्या नावाने मी ते व्यसन सोडण्याचा दृढनिश्चय केला. इतकेच नव्हे, तर मनाशी तशी शपथही घेतली. त्यानंतर ज्या ज्या वेळी मला सिगरेट पिण्याची तलफ येत असे, त्या त्या वेळी माझ्या डोळय़ांपुढे वडिलांचा चेहरा दृग्गोचर होत असे. परिणामत: माझे ते व्यसन लगेच सुटले. आज मला चहा-कॉफीखेरीज दुसरे कसलेही व्यसन नाही. त्यामुळेच बहुधा आज मी आयुष्याच्या शंभरीच्या उंबरठय़ावर उभा आहे.
वसंत इनामदार, वांद्रे (पू.)

विठ्ठलानेच सुबुद्धी द्यावी
‘लोकप्रभा’ दि. ११.७.१४ मधील तीन लेख- पंढरीच्या वाटेवर प्लास्टिकचे साम्राज्य, अन्नाची नासाडी, घाणीचे डोंगर ही सुहास जोशी यांची मुखपृष्ठ कथा, बाजू न्यायाची, मानवतेची हा प्राजक्ता कदम यांचा लेख व न्यायालयाचे ४ महत्त्वाचे आदेश इ. सर्व वाचून मन सुन्न झाले. त्या आठवणीसुद्धा दु:खद आहेत. वर्षांनुवर्षे जर वारी अशीच चालत होती आणि आहे तर या वारीनंतरच्या वारीबाबत सर्वानी गंभीर होणे गरजेचे वाटते. कारण वारी ही फक्त भक्तजनांची व पंढरपूरची राहिली नसून त्यात राजकारणाचा चंचुप्रवेशही सहज होत आहे. जरी वारी धर्म, पंथ, जात इ. स भेद देणारी असली तरी ती अगदीच गरिबांची राहिलेली नाही. आता तर वारी सामाजिक प्रतिष्ठाही लाभलेली आहे. त्याचप्रमाणे वारीची संपूर्ण बडदास्त ठेवण्यासाठी स्वयंसेवी संस्था वाढत्या संख्येने पुढे येत आहेत. पण वारी संयोजनांची जबाबदारी महत्त्वाची आहे. जर मोठय़ा प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असेल तर आणि मलमूत्र विसर्जनाची सार्वजनिक शिस्त पाळता येत नसेल तर व जर यामुळे पर्यावरण व प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होत असतील तर वारीस येणाऱ्या प्रत्येकांची अधिकृत नोंद होणे गरजेचे आहे, तसेच त्याचेकडून वरील प्रकारच्या समस्या होणार नाहीत यासाठी प्रथम प्रबोधन व नंतर कडक शब्दांत समजही देण्याची गरज आहे. कारण वारीच्या प्रत्येक मुक्कामाच्या स्थळी जर स्थानिकांना असे प्रश्न भेडसावत असतील तर प्रशासन कितीही सक्षम असले तरी कोणतीही व्यवस्था पूर्णपणे यशस्वी होणार नाही. वारकरी मंडळीच्या सार्वजनिक वागणुकीवर बंधने आणणे कितीही भावनेच्या विरुद्ध असले तरी ते सार्वजनिक हिताचे आहे याची जाणीव वारींच्या नेतेमंडळींना करून देणे अनिवार्य आहे. वारीत सर्व पांडुरंग पाहतो व आम्ही काय करावयाचे अशी भोळी व तर्क विसंगत भूमिका काय कामाची! जर वारीला सार्वजनिक शिस्तीचे वळण लागले तर वारी खऱ्या अर्थाने शोभनीय व महाराष्ट्राचे वैशिष्टय़ बनेल.
आता जर या सर्व लेखांची कात्रणे वारीच्या नेत्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांना विठ्ठलाने सुबुद्धी दिली तर पुढील वर्षी वारीनंतर खरोखर विठ्ठल पावला असे म्हणता येईल.
नारायण खरे, हिंगणे खुर्द पुणे</strong>

पंढरीच्या वाटेवर…
‘लोकप्रभा’ ११ जुलैचा अंक वाचला. वाईट वाटले. प्लास्टिकचे सामान, अन्नाची नासाडी, घाणीचे डोंगर हे आपणाला माहीत नाही असे नाही, पण आपण काय करणार बुवा. आमचा हा संसदेने दिलेला अधिकार आहे. तो आम्ही सोडणार नाही. असो. वयोमानाप्रमाणे मनातून इच्छा असूनही ‘माउलीच्या’ पालखीबरोबर जाणे शक्य नाही, परंतु ही इच्छा सुहास जोशी यांनी आळंदी ते पुणे, सासवड (ईशाचे माहेर, दिवेघाट, खंडोबाच्या जेजुरीत, वाल्हे वारी नदी, लोणंद (सातारा जिल्हा), फलटण अशा रीतीने माउली पोहचते.
हे विचार लिहिण्याचे कारण, आम्ही जुन्या काळचे मॅट्रिक (म्हणजे अकरावी) भूगोल विषयांत जेमतेम पास. त्यामुळे या लेखांत लिहिलेल्या लेखासोबत या पूर्ण स्थानांचा नकाशा दिला असता तर आम्हीसुद्धा माउलीच्या पालखीबरोबर जाऊन (मनानी) आलो असतो. अजून वेळ गेली नाही. पुढच्या अंकात हा नकाशा देऊ शकता.
डॉ. जयंत जुननकर, नागपूर.

अजूनही आठवतो तो दिवस…
२६ जुलै २००५, मंगळवार. पाऊस पडत होता. मोठी मुलगी कॉलेजला गेली. हे पण ऑफिसला गेले. दुपारी एक वाजता छोटी मुलगी शाळेतून आली. पावसाचा वेग वाढत होता. चार वाजता मोठी मुलगी आली तेव्हा तिनं सांगितलं की मी गुडघ्याच्यावर पाण्यातून चालत आले आणि खिडकीतून बघितलं तर पाणी खूपच तुंबलं होतं. आम्ही डोंबिवलीहून याच मेमध्ये सहकार टॉकीजसमोरील बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहायला आलो होतो. आमच्या ‘विंग’मध्येसुद्धा चार ते पाच कुटुंबंच राहायला आली होती. त्यामुळे दर पावसाळ्यात इथं एवढं पाणी जमा होतं का, काहीच समजायला मार्ग नव्हता. वेळ जात होता तशी पाण्याची पातळी वाढतच होती. संध्याकाळी साडेसात वाजता मिस्टर ऑफिसमधून कमरेएवढय़ा पाण्यातून घरी आले आणि सुटकेचा नि:श्वास टाकला. लाइट गेली. पाणीपण गेलं.
रात्री आठ वाजता पाणी छातीपर्यंत चढलं. विजा सारख्या चमकत होत्या. समोरच टिळकनगर मैदान म्हणजे समुद्रच असा भास होत होता. पार्किंगमधल्या सर्व गाडय़ा पाण्यात बुडल्या होत्या. आमच्या बिल्डिंगच्यापुढे लोक जाऊच शकत नव्हते. लोक आमच्या बिल्डिंगच्या खाली येऊन उभे राहात होते. शेवटी फोनसाठी आमच्या घरी विचारायला आले. आम्ही सहा जणांना घरात घेतलं. तीन स्त्रिया व त्यांना पोहोचवायला आलेले पुरुष. त्यांना चहा दिला. कोरडे कपडे घालायला दिले. त्यातील काही जण सांगू लागले, आम्ही इथेच मैदानाच्या पुढे राहतो, पण असा पाऊस कधी बघितला नव्हता. लोक हिंमत करून यायचे, पण पुढे जाऊ शकत नव्हते. माझे मिस्टर बॅटरी (टॉर्च) दाखवून त्यांना बिल्डिंगकडे यायचा रस्ता दाखवत होते. घरी थांबलेल्यांना एक मेणबत्ती व देवाचा लावलेला दिवा एवढय़ा प्रकाशात डाळ-भात शिजवून जेवायला घातले. कसंतरी झोपायची सोय केली. पण झोप कोणालाच येत नव्हती.
रात्री अडीच वाजता स्त्री-पुरुषांचा एक जमाव मानवी साखळी करून आला. पण बिल्डिंगच्या पुढे त्यांना जाता येईना. स्त्रियांच्या तोंडात पाणी जायला लागलं. त्या जोरजोरात किंचाळायला लागल्या. माझ्या मिस्टरांनी त्यांना बॅटरीचा उजेड दाखवून वरून ‘तुम्ही इथून इथून या असे सांगितले.’’ त्या बिल्डिंगमध्ये आल्या तेव्हा ‘पुनर्जन्म झाला,’ ‘जान बच गयी’ असे म्हणायला लागल्या. आमचं घर आधीच भरलेलं, त्यामुळे आम्ही त्यांना घरी घेऊच शकत नव्हतो. पण बिल्डर खाली आला आणि सर्वाना एक घर उघडून दिलं. चहाची सोय केली.
दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाला तेव्हा आमच्या घरी ज्या स्त्रिया होत्या त्यांना पाण्यातून जाऊन तसंच नातेवाईकांचं घर शोधण्यात मदत केली. कुठली कोण माणसं घरी राहिली. आपण अशा प्रसंगात सापडलेल्यांसाठी उपयोगी पडलो, त्यांना मदत केली त्याचं समाधान वाटतं. आणि कोणावरही आयुष्यात असे प्रसंग येऊ नयेत असं वाटतं. नंतर कित्येक लोकांचे अनुभव पेपरमध्ये वाचताना अंगावर काटा उभा राहायचा. टी.व्ही.वरील दृश्य बघताना काळजाचं पाणी व्हायचं. लोकांचे अनुभव ऐकून तर जीव कासावीस होतो. जिथं जावं तिथं हाच विषय. रेडिओवरील बातम्या ऐकून मन सुन्न व्हायचं. आम्ही नवीनच राहायला आलो होतो. आणि बिल्डिंगचं कामपण पूर्ण झालं नव्हतं, म्हणून एक बॅटरी आणि रेडिओसाठी सेल घेऊन ठेवले त्याचा उपयोग झाला. दर पावसाळ्यात आम्हाला या घटनेची आठवण येते आणि डोळ्यासमोरून २६ जुलैच्या रात्रीचा घटनाक्रम सरकू लागतो.
वनिता प्र. पाटील, चेंबूर, मुंबई</strong>