07lp‘आभासी वास्तव’ हा मथितार्थ आणि ‘जगणं होतंय स्मार्ट’ ही कव्हरस्टोरी (२२ जानेवारी) मूलत: एकच विषय हाताळतात असे वाटते. एखाद्या बुफेमध्ये सर्व प्रकारच्या देशीविदेशी पदार्थाची रेलचेल असली तरी पोट आपलेच आहे आणि एकच आहे याची जाणीव ठेवावी लागते, तसे काहीसे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले आहे. गरज ही तंत्रज्ञानाधारित शोधांची जननी असते, पण ‘कोणाची गरज’ हा खरा कळीचा प्रश्न आहे. दिव्याचा, ग्रामोफोनचा, गणकयंत्राचा (calculator), संगणकाचा किंवा फोन / सेलफोनचा शोध लागला तेव्हा ती सामान्य माणसाची गरज होती. मग त्याच त्याच गोष्टींची क्षमता काही ना काही करून सतत वाढवत नेणे ही गरज सामान्य माणसाची नव्हती. ती गरज होती युद्धाकरिता निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षमता दैनंदिन जीवनात आणून विकू पाहणाऱ्या कंपन्यांची. मग एका सेलफोनला उत्तमोत्तम क्षमतेचे, पण आकाराने अगदी लहान असे दोन दोन कॅमेरे देऊन ‘सेल्फीची क्रेझ’ निर्माण करणे, जास्तीत जास्त क्षमतेची ‘सीपीयू’ संगणकावर / सेलफोनवर देऊन त्यावर आधारित अधिकाधिक वेगवान खेळांचे व्यसन लोकांना लावून देणे, जेम्सबाँडच्या ‘हातात’ शोभावे असे (अनेक चित्रविचित्र गोष्टी करू शकणारे) घडय़ाळ सामान्य लोकांच्या ‘गळ्यात’ मारणे, असे प्रकार सुरू झाले आहेत असे वाटते.  घरबसल्या बँकेची सगळी कामे क्षणार्धात करून देणारे तंत्रज्ञान आणि वरील उदाहरणांतील तंत्रज्ञान यात फरक करणारी नीरक्षीरविवेकबुद्धी आपण गमावता कामा नये. पूर्वी सहीसुद्धा करू न शकणाऱ्या अशिक्षित माणसाची ओळख असलेला अंगठा आता अत्यंत ‘स्मार्ट’ माणसाची संगणकावरील ओळख झालेला आहे! स्मार्टनेस आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक यातील धूसर सीमारेषा ओळखण्याचे कौशल्य आगामी काळात खूप गरजेचे आहे.
– प्रसाद दीक्षित, ठाणे, ई-मेलवरून.

सकारात्मकतेचा अतिरेक
सोशल मीडियाद्वारे प्रत्येक व्यक्ती स्वत:ची केवळ सकारात्मक बाजू दाखवते ज्यात कित्येकदा अतिशयोक्ती दिसते (आभासी वास्तव!, मथितार्थ – विनायक परब, २२ जानेवारी). वस्तुत: गेल्या काही वर्षांत आपल्या दैनंदिन जीवनात कमालीचा तणाव वाढल्याने नियमितपणे अस्थैर्य आणि असुरक्षित आयुष्याला सामोरे जावे लागते, परंतु फेसबुकसारख्या वेबसाइट्सवर या सत्य परिस्थितीचा लवलेशही कुठे आढळत नाही. त्यामुळे असे प्रोफाइल्स बघून बऱ्याच जणांचा असा समज होतो की सगळ्या लोकांचे आयुष्य कुठलेही अडथळे न येता पार पडत असून केवळ आपल्यालाच विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे निराशा उत्पन्न होऊन मानसिक विकारात परिवर्तन होते. म्हणून आगामी काळात सोशल मीडिया आणि त्याचे परिणाम ही मानसशास्त्रातील महत्त्वपूर्ण शाखा म्हणून उदयाला येईल असे वाटते.
– केतन मेहेर, विरार (पूर्व), ई-मेलवरून.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

सरकारी खाक्या
08lp१५ जानेवारीच्या अंकातील कव्हर स्टोरी वाचली. पण त्यात नवीन ते काय? आठवतंय का पाहा, सेलफोनचे युग भारतात आले त्याच सुमारास इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज ही सरकारी कंपनी बुडीत निघाली. लॅण्डलाइन फोन मागे पडतायत, असे दिसल्यावर त्यांनी मोबाइल हॅण्डसेट बनवण्यासाठी पावले टाकली नाहीत. आता तर मोबाइल टीव्ही कार्यक्रमही दिसतात. तीच गोष्ट रंगीत टीव्ही प्रक्षेपण सुरू झाल्यावर परदेशी टीव्ही बाजारात दिसून लागले. तसे सरकारी ईसीटीव्ही ही कंपनी गायब झाली. आता जे अत्याधुनिक टीव्ही दिसतात, त्याबाबतचे संशोधन ईसीटीव्हीने केले नाही. तेव्हा फक्त स्मार्टफोन व रंगीत टीव्हीसेट यासाठी अब्जावधी डॉलर्स दरवर्षी परदेशात घालवतो, बाकी गोष्टींबद्दल बोलूच नये. फार कशाला ‘मेक इन इंडिया’चा नारा देत आपले पंतप्रधान पृथ्वीप्रदक्षिणा करतात. दुसरीकडे एचएमटीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय काय घेतात तर एचएमटीच्या तीन संलग्न कंपन्यांना टाळे लावायचे आणि एक हजारांना स्वेच्छानिवृत्ती द्यायची. आरोग्य सेवेच्या सरकारी जाहिराती तासागणिक ऐकवतात (जनहित मे जारी) आणि दुसरीकडे पुण्याच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्सला टाळे ठोकून ती जमीन विकण्याचा घाट घालायचा. आता म्हणतात की आम्हाला योग्य सल्ले दिले नाहीत. मग तुमची कुवत ती काय राहिली? भारतीयांचे दुर्दैव असे की पंडित नेहरूंनंतरचे सर्व पंतप्रधान एकापेक्षा एक खुजेच निघाले.
 – अभयकुमार  गोविंद कानेटकर, बोरिवली, मुंबई.

शासकीय उदासीनतेची किंमत किती?
बावीस हजार कोटी आपण घालतोय चीनच्या घशात (१५जाने) हा लेख वाचल्यावर शासन यंत्रणेबद्दल मनस्वी चीड उत्पन्न झाली. सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ची मुदत दिली होती ते आदेश कमीत कमी वर्षभरापूर्वी तरी काढले असावेत त्या वेळी एक कोटी बॉक्स लागणार आहेत याची पुसटशी कल्पना प्रशासनाला आली नाही काय? सगळे आपली डोकी गंगेला अर्पण करून कामे करतात काय? सरकारी यंत्रणा नेहमीच आरंभशूर असते. अंमलबजावणीच्या वेळी मात्र त्यांना लकवा येतो अशी परिस्थिती प्रत्येक क्षेत्रात दिसते. सरकारच्या मालकीची इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्यांनी बॉक्सची निर्मिती का नाही केली? देशांत होणाऱ्या सेट टॉप बॉक्सना तांत्रिक कारणास्तव शासन परवानगी देत नाही? अशी कोणती कारणे आहेत कीज्यासाठी आम्ही बावीस हजार कोटी चीनच्या घशात घालायला तयार झालो? देशात रिलायन्स, टाटा, बिर्ला यासारखे प्रथितयश उद्योगपती आहेत त्यांना योग्य ते परवाने देऊन काम का सांगितले नाही? रतन टाटासारख्यांनी तर ते देशाभिनासाठी नक्कीच मान्य केले असते. शिवाय व्हिडीओकॉन ही तर स्वत: टीव्हीसारखी अनेक उपकरणे बनविते त्यांच्याकडे सर्व तंत्रज्ञान व तंत्रज्ञ हाताशी होते त्यांना सांगता आले असते! हायकोर्टाला मध्ये पडून डिजिटलायझेशन प्रक्रियेला स्थगिती लागते ही लाजिरवाणी बाब आहे. हे सर्वच काही संतापजनक आहे. आंधळं दळतंय… एवढंच म्हणायचं, दुसरं काय?
– सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले, मुंबई, ई-मेलवरून.

समंजस, सहृदयी जान्हवी उत्तम लेखिकाही
09lp-tejashree-pradhanसाऱ्यांना आवडावा असा ‘जडेल नाते प्रभुशी तयाचे!’  हा १५ जानेवारीच्या अंकातील तेजश्री प्रधान यांनी लिहिलेला लेख वाचला. ‘होणार सून मी या घरची’ची ही नायिका पडद्यावर समंजस आणि सहृदयी दाखविण्यात आली. तिचे गोड बोलणे आणि तेवढेच गोड गोड हसणे हे तिच्या अभिनयातील ठळक वैशिष्टय़ ठरले. तेजश्री ही प्रत्यक्षातही तशीच. सहृदयी व मोठय़ा मनाची आहे, हे हा लेख वाचून प्रत्ययाला आले.

या लेखाचा प्रारंभ एखाद्या गूढकथेप्रमाणे आहे आणि पुढे वाचताना मनाचा वेध घेणारे आहे. तेजश्री एक चांगली लेखिका आहे हे या लेखातून कळले. वैचारिक संपन्नता तिच्यात आहे. चंद्रपुरात एका कार्यक्रमातून हे पाहायला मिळालेच होते. मां निकेतनचे वर्णन, तेथील कार्यकलाप या लेखातून छान मांडले आहे. जितेंद्र गुप्ता या सधन व्यक्तीने आपल्या मुलीचा वाढदिवस मां निकेतनमध्ये करण्याचे ठरविले, त्याचे कारण आपल्या मुलीला नाण्याची दुसरी बाजू कळावी, हा तिच्या लेखातील उल्लेखनीय भाग आहे.

एका साडेतीन वर्षांच्या मुलीने आपल्या आजीला फोन करण्याच्या आग्रहाकरिता तेजश्रीचा हात धरावा, हा उल्लेख भिडणारा आहे. लेखाच्या शेवटी तेजश्रीने मां निकेतन मधील मुलांचा उल्लेख ‘परमेश्वर’ असा केला आणि आमच्या या छोटय़ा परमेश्वरांना माझी कला भावली असावी, असे तिने म्हटले आहे. तेजश्रीने लहान मुलांचा परमेश्वर असा केलेला उल्लेख सर्वाना भावावा असा आहे. तेजश्रीने अभिनयातून आम्हाला आनंद दिलाच, आता लेखणीतूनही तसाच आनंद देत राहा.
– वसंत खेडेकर, बल्लारपूर, जि. चंद्रपूर</strong>

तेजश्रीला शुभेच्छा
२२ जानेवारीच्या अंकातला, तेजश्री प्रधान यांचा ‘हायड्रॉलिक जॅक’ हा लेख वाचला. खेळकर शैलीत लिहिलेल्या या लेखांत लेखिकेची संवेदनशीलता व विनोदबुद्धी जागोजाग जाणवते. सदर लेख सादर केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. त्यांची ‘होणार सून’ ही मालिका (बराच काळ) आमच्या मस्ट सी यादीत होती. त्याचप्रमाणे त्यांचं सेलेब्रिटी लेखक सदरातले लेखन (सध्या तरी) आमच्या मस्ट रीड यादीत आहे. लेखिकेला पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
– शरद कोर्डे, ठाणे.

‘जान्हवी’ने आत्मकथन करावे
‘पॅन-केक’ नवीन सदर सेलिब्रिटी लेखक तेजश्री प्रधानांनी लिहिले; म्हणून पाहिले ते वाचले. कारण ‘जान्हवी’ आमची सर्वाची लाडकी आहे. पण निराशा पदरात पडली. आम्हा वाचकांना तिचे अनुभव वाचायचे होते. तिचे स्वानुभव कथन जास्त आवडेल.

दुसरी गोष्ट म्हणजे दत्त विषेशांक अप्रतिम होता. मुख्य म्हणजे आम्हा ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या  आत्मिक- आनंद मिळाला. नवीन वर्षांतील नवा अंक व नवे शीर्षक- ‘सोळावं वरीस मोक्याचं!! आवडले. नेहमी सोळावे वरीस धोक्याचे नसते. मनावर संस्कार असतील; तर नवीन वर्षांच्या पार्टीत पण पाय घसरत नाही. असो. भरत जाधव व केदार शिंदे यांची भट्टी नेहमीच छान जमते; त्यामुळे ‘आली लहर केला कहर’ बघायला आवडते.
– रेखा केळकर, कामशेत, पुणे.

आठवण पाडगावकरांची
‘असे लोक जात नाहीत’ (लोकप्रभा १५ जानेवारी) हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावरील श्रद्धांजली लेख वाचनात आला. आज पाडगावकर अनंतात विलीन झाले असले तरी ते आपल्यासाठी अजरामरच राहतील. त्यांच्या कविता आणि गाण्यांनी मराठी काव्यभांडार अधिक समृद्ध केले. तरुण पिढीच्या तारुण्यसुलभ भावनाही जपल्या. शालेय जीवनापासून महाविद्यालयापर्यंत त्यांच्या कविता अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या कवितांचे गारूडच त्या काळी सर्वावर पसरलेलं होतं आणि आजही ते कायम आहे. त्यांच्या कवितासंग्रहांचं साम्राज्य पाहिलं तर खरोखरच थक्क व्हायला होतं. शब्दरत्न म्हणजे काय याची प्रचीती त्यांच्या कविता वाचताना येते. दोन वर्षांपूर्वी त्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून एक पत्र पाठविले होते आणि काही दिवसातच मंगेश पाडगावकरांनी मी पाठविलेल्या पत्राची पोच आपल्या सुंदर स्वाक्षरीनुसार मला पाठविली. त्यांच्या त्या अनपेक्षित पत्राने मी भारावूनच गेलो. आज ते पत्र माझ्यासाठी अक्षय आनंदाचा एक मौल्यवान ठेवा आहे.
– सुहास बसणकर, दादर.

मी ‘लोकप्रभा’ची नियमित वाचक आहे. ‘रिक्षावाले दादा तीळगूळ घ्या’ हा डॉ. मीनल कातरणीकर यांचा लेख वाचल्यावर माझ्या विचार करण्यात फरक पडला. इतकेच नाही तर मी काही रिक्षावाल्यांना तीळगूळदेखील दिला. त्यांनी हसून प्रतिसाद दिला. धन्यवाद.
– सोनाली, ई-मेलवरून.

‘रिक्षावाले दादा तीळगूळ घ्या’ हा लेख आवडला. नवीन विषयांवरील लेख त्यांनी लिहिला याबद्दल धन्यवाद. मी रिक्षावाल्यांचे आभार वरचेवर मानत असतोच. हा लेख वाचून तीळगूळदेखील देईन. धन्यवाद.
– विजय महाशब्दे, वाशी, नवी मुंबई.