‘लोकप्रभा’ १८ मार्चच्या अंकातील कव्हर स्टोरी वाचली. जेएनयूत शिकणाऱ्या मराठमोळ्या सुयश देसाई याचे अभिनंदन. अभिनंदन यासाठी की, जेएनयूत जे काही घडलं-पाहिलं त्याचं सत्यकथन त्याने आमच्यासारख्या तरुणांपुढे मांडलं. हे मांडण्याचं धाडस सुयशने दाखवले त्यालाही दाद दिली पाहिजे. जे राजकारण समाजात ज्या ज्या पातळीवर चालतं ते त्याला दिल्लीतल्या जेएनयूमध्ये पाहायला, अनुभवायला मिळालं. जे त्याला कुठेच अनुभवता आलं नसतं, असं सुयशनेच म्हटले आहे. या लेखामुळे या प्रकरणाची एक बाजू कळण्यास मदत झाली. पण अजून एक प्रश्न अनुत्तरित राहतो की, ज्यांनी कोणी देशविरोधी घोषणा दिल्या, अफझल गुरूबद्दल सहानुभूती दाखविली ते नेमके कोण आहेत. त्यांची नेमकी विचारधारा काय? त्याला काही धार्मिक रंगछटा आहेत का? हे फक्त मला पडलेले प्रश्न आहेत. कदाचित ते या राजकीय वातावरणात बाळबोध ठरणारे असतीलही. पण तरी पडलेत. वैशाली चिटणीस यांचेही अभिनंदन. त्यांनी अनुवाद चांगला केलाय.
– अंकुश बोबडे, ई-मेलवरून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकप्रभा’च्या १८ मार्चच्या अंकातील ‘थेट जेएनयूमधून’ ही कव्हर स्टोरी वाचली. या लेखामुळे तटस्थपणे खरी परिस्थिती कळली. त्यासाठी सुयश देसाई यांना धन्यवाद.
– राजू साठे, ई-मेलवरून

मनोरंजनाचे पहिले पाऊल
१८ मार्चच्या अंकातील पराग फाटक यांचा ‘रात्रीस खेळ अन् दिवसाचे नाटय़’ हा लेख आवडला. सर्वात महत्त्वाचे असे की, ही मालिका एक गोष्ट सांगत आहे. हे मनोरंजनाचे पहिले पाऊल नाही का? प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडली पाहिजे, असे नाही. इतर मालिकांमध्ये गोष्ट शोधावी लागते, त्याचे काय? शेवटी, आपण एक मुद्दा विसरलात असे वाटते. राजकारण्यांचा विरोध झटपट फायद्यासाठी- साध्या भाषेत, खंडणी – असू शकतो!

– मिलिंद कर्णिक, ठाणे, ई-मेलवरून

विरोध करण्याची फॅशनच
‘रात्रीस खेळ अन् दिवसाचे नाटय़’ हा पराग फाटक यांचा लेख उत्तम आहे. शक्य झाल्यास या विषयावर जनतेचा कौल घ्यावा. मालिका खरंच चांगली आहे. पण, लेखात म्हटल्याप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय एखाद्या गोष्टीला विरोध करणं ही सध्या फॅशन झाली आहे. तसंच प्रत्येक गोष्टीचा राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघण्याचीही फॅशन झाली आहे.
– प्रसाद दातार, ई-मेलवरून

‘नाटय़गृहांची दुर्दशा’
दि. २६ फेब्रुवारीच्या ‘लोकप्रभा’ अंकात चैताली जोशींनी नाटय़रसिकांच्या समस्यांना प्रसिद्धी तर दिलीच, पण नाटय़गृहांच्या देखरेखीला जे जबाबदार आहेत त्यांची चांगलीच कानउघडणी केली. जवळजवळ सर्वच नाटय़गृहे (२०० ते ३०० रुपये खर्च करून) गैरसोयीमुळे मनोरंजनाच्या ऐवजी मनस्तापच देतात. असा लेख लिहिणे खरोखरच अत्यावश्यक होते. बरेचदा स्थानिक वर्तमानपत्रात या समस्यांवर, त्रुटींवर लिहून येतेच पण त्याची दखल घेतली जात नाही. नगरपालिका, सरकार गेंडय़ाचे कातडे पांघरून असतात.

आमच्या नागपूरच्या वसंतराव देशपांडे हॉलची स्थिती अशीच आहे. तुटलेल्या खुच्र्या, फाटलेले कारपेट, खुच्र्यावर नंबर नाहीत, जुनाट ध्वनियंत्रणा, तोटय़ा नसलेले नळ, फुटके वॉश बेसीन, घाणेरडा वास. खरं म्हणजे याला ‘स्वच्छतागृह’ का म्हणावे हेच कळत नाही. स्वच्छतेचा काहीच संबंध नाही अशी ही जागा आहे. पूर्वी याच हॉलच्या दुर्दशेविषयी गायक व वसंतराव देशपांडेचा नातू राहुल, विक्रम गोखले, प्रशांत दामले इत्यादींनी या हॉलच्या अवस्थेबद्दल बरेच काही म्हटले होते, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. वास्तविक या देशपांडे हॉलचा परिसर डिझाइन इतके चांगले आहे की क्वचितच असा सुंदर हॉल संपूर्ण महाराष्ट्रात असेल. मध्यंतरी एक-दोन कोटी रुपये हॉलची सुधारणा व्हावी म्हणून मंजूर केल्याचे वाचले. पण परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे.

प्रयोगाकरिता माणूस ३००-४०० रुपये द्यायला तयार होतो. पण त्याची रास्त व कमीत कमी अपेक्षा म्हणजे बसायला चांगली खुर्ची, स्पष्ट संवाद ऐकायला येईल अशी ध्वनियोजना, टॉयलेट, एखादवेळी तरी वापरण्यायोग्य असावे अशी असते. सुधारणा न झाल्याने प्रेक्षक इतके पैसे खर्च करण्याचे टाळतो व नाटक बघतच नाही. या समस्येला वाचा फोडल्याबद्दल लेखिकेला व ‘लोकप्रभा’ला मनापासून धन्यवाद.

याच अंकात चैताली जोशींचा ‘मुलाखत’ या सदरात समीर चौघुलेंवर उत्तम लेख लिहिला आहे. आम्ही नेहमीच ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ बघतो. अतिशय मनोरंजक आहे. समीर चौघुले हा तर या कार्यक्रमातील विनोदाचा बादशहा आहे. तो हुशार, अभ्यासू, उत्तम निरीक्षणशक्ती असणारा समयसूचकता व श्रेष्ठ विनोद या सर्वाचं योय ते मिश्रण त्याच्याकडे बघायला मिळते. परवा त्याने चार्ली चॅप्लीननवर केलेला प्रयोग व प्रेझेंटेशन उत्कृष्ट, विनोदी व मनाला चटका लावणारे होते. उच्च प्रतीचा विनोद पण त्याचा साधा स्वभाव वाखणण्याजोगा आहे. तो एक हिरा आहे. मी पण चार्ली चॅप्लीनचा फॅन आहे व सॅनफ्रान्सिस्कोजवळ ‘ठ्र’ी२’ (फ्रिमांट शेजारी) या ठिकाणी भेट दिली. त्या वेळची ट्रेन, बगिचा, चार्लीने वापरलेले साहित्य, दुकान, रस्ते, तो बेंच व घडय़ाळ या सर्वाची मजा व आनंद घेतला. सध्या समीर चौघुलेंना एक नवीन पण सुयोग्य जोडीदारीण भक्ती रत्नपारखी मिळाली आहे. हे दोघेही धमाल करतात व प्रेक्षकांना मनमुराद हसवितात.
– भाऊराव हेडाऊ, नागपूर.

सुट्टय़ांची चंगळ?
दि. ५ फेब्रुवारीच्या ‘लोकप्रभा’च्या अंकातील डॉ. विजय पांढरीपांडे यांचा ‘बंद करा सुट्टय़ांची चंगळ’ हा लेख वाचला. त्यांच्या दृष्टीने त्यांची भूमिका रास्तच आहे. कदाचित लेखातील आकडेवारीमुळे बऱ्याच लोकांची दिशाभूल होऊ शकते म्हणून काही गोष्टींचे स्पष्टीकरण देणे भाग आहे.

२०१ दिवस हक्काने आरामात घरी बसू शकतो या विधानातील हक्काने आणि शकतो या शब्दांतील विसंगती सुज्ञ वाचकांच्या लगेचच लक्षात येईल. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टय़ा ह्यच केवळ हक्काच्या सुट्टय़ा असतात. अपवाद अर्थातच आमचे पोलीस सहकारी. त्याचप्रमाणे बऱ्याच राज्य आणि केंद्र सरकारी कार्यालयांना शनिवारी सुट्टी नाही. कामाच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार या शनिवार आणि रविवारीसुद्धा कित्येक कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहावे लागते.

कॅज्युअल लीव आज १४ नाही केवळ ८ (आठ) दिवसांची आहे. ३० दिवसांच्या अर्नड् लीव्हबद्दल माझे स्वत:चे उदाहरण मी देऊ शकते. माझ्या आईच्या वार्षिक श्राद्धासाठी दोन दिवसांच्या रजेच्या अर्जावर ‘‘दोन दिवस रजा का पाहिजे? दोन दिवसांचे काय काम? गावाला कशाला जायचे आहे?’’ असे प्रश्न विचारण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात माझे वडील हार्ट अटॅकमुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना, ‘‘रजा कशाला पाहिजे! नर्स ठेवायची. कोणी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून रजा घ्यायची नसते.’’ असे सांगून रजा प्रथम नामंजूर करण्यात आली. माझ्या वडिलांचे मी एकच अपत्य असल्याचे माहीत असूनही हे घडले. नंतर डॉक्टरांचे सगळे रिपोर्ट जोडून विनंती अर्ज केल्यानंतर काही महिन्यांनी ती रजा मंजूर करण्यात आली.

रविवारची सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी आहे. ही सुट्टी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सगळे एमबीबीएस डॉक्टर, प्राध्यापक, खाजगी कंपन्या, बँका, एलआईसी अशा वेगवेगळ्या कार्यालयांतील सगळ्यांनाच ही सुट्टी मिळते. प्राध्यापक आणि शिक्षक यांना मिळणाऱ्या सुट्टीबद्दल तर डॉक्टर साहेबांनी स्वत:च लिहिलेले आहे.

दर पाच नाही, दहा वर्षांनी पे कमिशन येते. आणि भरघोस नाही तर केवळ १४% वेतनवाढ या वेळी देण्यात आलेली आहे. गंमत म्हणजे पे कमिशनमध्ये वापरण्यात आलेल्या फॉम्र्युलानुसार रु. ९७/- (सत्याण्णव फक्त) किलो दराने मिळणारी तूरडाळ ‘लोकप्रभा’च्या वाचकांनी जरूर शोधावी. सातव्या पे कमिशनने अतिशय कमी वेतनवाढ देतानाच वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते आणि अ‍ॅडव्हान्सेस रद्द केलेले आहेत. घरभाडे भत्ता मुंबईसारख्या शहरात ३० टक्क्यांवरून कमी करून २४ टक्क्यांवर आणला आहे.

आज पूर्ण देशभरात लाखो कर्मचारी/ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. समस्यांचा डोंगर उपसण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. म्हणून खरे तर सगळ्या तरुणांना माझीच विनंती आहे की आमच्या आंदोलनात त्यांनी सहभागी व्हावे. भरतीवरची बंदी उठवणे हा आमचा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. वाचक तरुणांनी खरंच स्वत: सगळ्या आकडेवारीचा अभ्यास करून हे ठरवणे गरजेचे आहे की त्यांना पूर्ण पगाराची सरकारी नोकरी करायची आहे की नवीन धोरणानुसार कंत्राटी तत्त्वावर नोकरी करायची आहे.
– प्रणाली सुळे, केंद्र सरकारी कर्मचारी.

बदक आणि कोंबडी तुलना
दि. २६ फेब्रुवारीच्या अंकातील श्रीनिवास डोंगरे यांचा ‘गाईला चारा’ हा निबंध वाचला. साधारण १९९०च्या आसपास माझ्या एका हिंदू कोळी सहकाऱ्याने सांगितले की आम्ही (हिंदू कोळी लोकांनी) नुकतेच बदकाचे मांस व अंडी खाण्याचे सोडले आहे कारण बदकाचे मांस व अंडी ख्रिश्चन व मुसलमानांचे आहे, हिंदूंसाठी नाही असे आम्हाला सांगण्यात आले. १९७०च्या सुमाराची वृत्तपत्रे पाहिली की त्यात बदकाच्या अंडय़ांचा भाव साधारण २२ पैशांना एक व कोंबडीच्या अंडय़ांचा भाव २५ पैशांना एक असे छापलेले असायचे. पुढे बदकाच्या अंडय़ांचा भाव पेपरमधे छापून येणे बंद झाले व बाजारातही बदकाची अंडी मिळत नाहीत. अशा प्रकारे मांसाहाराचीसुद्धा धर्मनिहाय/ जातीनिहायप्रमाणे वाटणी झाली आहे असे दिसते.

बदकांना हिरवा चारा आवडतो जर बदक पालनास प्रोत्साहन दिले तर भाजी बाजारातील तसेच फुलबाजारातील हिरवा कचरा बदकांना खायला घालता येईल व डम्पिंग ग्राऊंडवर कमी कचरा जाईल, तसेच बदकाची अंडी व मांस यांच्या व्यापारास चालना मिळेल. आयुर्वेदात कोंबडीचे मांसही निषिद्ध सांगितले आहे असे वाचल्याचे आठवते कारण काय तर म्हणे कोंबडी किडे इ. निकृष्ट खाद्य खाते. तर कोंबडीचे मांस पवित्र आणि बदकाचे मांस अपवित्र अशी भावना केव्हापासून झाली? गोमांसाच्या आहाराची चर्चा होते, मग बदक मांसासंबंधी अळीमिळीगुपचिळी असे का?

बदकाच्या व कोंबडीच्या अंडय़ांसंबंधी तुलनात्मक माहिती : बदकाचे अंडे कोंबडीचे अंडे

बदकाचे अंडे
पाण्याचा अंश  ७०%
नत्रांश  १३.३%
स्निग्धांश १४.५%
कॅलरीज १९१

कोंबडीचे अंडे
पाण्याचा अंश  ७४.५%
नत्रांश  १३%
स्निग्धांश  १०.५%
कॅलरीज १६३

जर इमू पक्ष्याचे अंडे सर्व लोक खातात, तर बदकाचे अंडे खायला काय हरकत आहे?
– अशोककुमार कानेटकर, बोरिवली, मुंबई.

कबीराच्या काव्याचे यथोचित स्मरण
दि. ४ मार्चच्या अंकातील ‘कबीरांचा वसंत’ हा संजय बर्वे यांचा लेख एकदम वेगळा आणि समयोचित असा होता. वसंत ॠतूवर आणि कबीरांवर बरेच ऐकायला, वाचायला मिळते, पण कबीरांचा वसंत हा आपण प्रसिद्ध केलेला नक्कीच वेगळ्या वाटेने जाणारा आणि सहजा कोठेही न वाचायला मिळणारा म्हणावा लागेल. समयोचित लेखन प्रसिद्ध करतानादेखील आपण जोपासलेला हा वेगळेपणा आवडला.
– अनिकेत जंगम, नागपूर.

मराठीतील सर्व वाचक प्रतिसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response
First published on: 18-03-2016 at 01:01 IST