हिरवळ, गारवा, शांतता अशी वैशिष्टय़े असलेलं केरळ नवविवाहित जोडप्यांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. रोमँटिक वातावरण, निवांत वेळ हवा असलेल्या  हनिमूनर्ससाठी केरळ आल्हाददायी ठरतंय.

लग्न ठरल्यावर जोडप्यांमध्ये हमखास चर्चेचा विषय असतो, तो म्हणजे ‘हनिमूनला कुठे जायचं’ हा. तिला उत्तरेला जायचं असतं तर त्याला दक्षिणेला. काही वेळा तिला परदेशात जायचं असतं तर त्याला देशातच कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी जायचं असतं. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घेतलात तर तुमची हनिमून ट्रिप उत्तम होऊ शकते. ऋतू, हवामान, इच्छित स्थळी पोहोचायला लागणारा वेळ, राहण्याचं ठिकाणं, तिथली प्रेक्षणीय स्थळे या सगळ्या गोष्टी तपासून ठरवलेलं ठिकाणं निश्चित आनंद देऊन जातं. यात सर्वार्थाने केरळ उत्तम आहे असं म्हणता येईल. थंड, प्रसन्न वातावरण, समुद्र, हिरवळ अशा अनेक गोष्टींमुळे केरळ हनिमून ट्रिप हिट झाली नाही तरच नवल!

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
washim, kinhiraja village, accident, Two Wheeler Collides, Truck Two Killed, One Injured, Sambhajinagar Nagpur Highway,
वाशीम : बंद ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात…. बापलेक जागीच ठार
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला

सध्या ‘हनिमून पॅकेज’चा ट्रेण्ड आहे. या पॅकेजमध्ये विमानाची तिकिटं, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत गाडीची व्यवस्था, हॉटेल वास्तव्य, ब्रेकफास्ट, डिनर यांचा समावेश असतो. विशिष्ट रक्कम एखाद्या ट्रॅव्हल कंपनीला दिली की काम झालं. तुम्हाला फक्त इच्छित स्थळी जाणं, हिंडणं, फिरणं, खाणं इतकंच उरतं. शॉपिंग आणि इतर काही लक्झरीअस गोष्टी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांव्यतिरिक्त तुम्हाला तिथे खिशातून पैसे काढावे लागत नाहीत. तसंच तिकडे गेल्यावर कुठे फिरायचंय, कोणती ठिकाणी चांगली आहेत, कुठे काय चांगलं खायला-शॉपिंगला मिळतं या सगळ्याची शोधाशोध करणं म्हणजे वेळ वाया घालवल्यासारखंही होतं. पॅकेजमध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित ठरलेल्या असतात. इथे तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचतं. सो, जस्ट गो फॉर अ पॅकेज!

विमानाने गेलात तर कोची विमानतळावर पोहोचाल. तिथून मुन्नार रस्तामार्गे तुमचा प्रवास सुरू होतो. कोची ते मुन्नार या पाच तासांच्या प्रवासात अनेक घाट लागतात. अधेमधे गाडी थांबवून तुम्ही या घाटांमधल्या काही धबधब्यांचा आनंद घेऊ शकता. काही धबधबे फक्त बघून समाधान मानावं लागतं तर काही ठिकाणी थोडं जवळ जाऊ शकता. तसंच या प्रवासात ठिकठिकाणी निसर्गदृश्ये म्हणजे सिनरीजही चांगल्या दिसतात. आजूबाजूला चहाचे मळेच मळे. चित्रपटातलं हे दृश्य प्रत्यक्ष समोर दिसत असतं! मुन्नारमधील हॉटेल्सच्या मार्गावर पोहोचत असताना गाडीतला एसी बंद करून खिडक्या उघडून नैसर्गिक वाऱ्याचा आनंद लुटायलाच हवा. हा थंडगार वारा दुपारी एक वाजताही अनुभवायला मिळतो. हिल स्टेशन असल्यामुळे मुन्नारमधील हॉटेल्स उंच ठिकाणी आहेत. त्यामुळे इथला गारवा अनुभवण्यात सुख आहे.

मुन्नारमधील हॉटेलमध्ये गेल्यावर ‘मुन्नारमध्ये बऱ्याच ठिकाणी एसी, पंखा दोन्ही नाहीत’ असं सांगितल्यावर भुवया उंचावू शकतात. पण, या दोन्हीची आवश्यकता नाही असं तुमच्याही नंतर लक्षात येईल. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान प्रचंड थंडी असते. दमट हवा असल्यामुळे तिथे दिवसाही हवेत गारवा असतो. काही वेळा तिथलं तापमान शून्याखाली जातं. कोचीहून मुन्नारला प्रवास केल्यानंतर तो दिवस आरामासाठी राखून ठेवावा. दुसऱ्या दिवसापासून मुन्नार दौऱ्याला सुरुवात करावी. फ्लॉवर गार्डन, मेडुपट्टी डॅम, एराविकुलम नॅशनल पार्क, ड्रिम लँड स्पाइस पार्क, एको पॉइंट या  ठिकाणी जाता येतं. फ्लॉवर गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगबेरंगी फुलं आहेत. या फुलांची नावं, माहिती त्या-त्या ठिकाणी लिहिली आहे. त्याची रचना उत्तम केल्यामुळे हे गार्डन प्रेक्षणीय ठरलंय. त्यानंतर मेडुपट्टी धरणाकडे वळायला हरकत नाही. या ठिकाणी विशेष काही अ‍ॅक्टिव्हिटी करता येत नाहीत. पण, धरण मनसोक्त न्याहाळता येतं. धरणाच्या एका कोपऱ्यात बोटिंगची सोय आहे. पण, तिथे स्पीड बोटिंग असल्यामुळे ते धोकादायक असू शकतं. शिवाय त्यात जाणाऱ्या पर्यटकांची जबाबदारी तिथले कर्मचारी घेत नाहीत. त्यामुळे इथे बोटिंगचा आनंद शक्यतो घेऊ नये. याच धरणाच्या दुसऱ्या बाजूस पेडल बोटिंग आहे. इथे मात्र तुम्ही बिनधास्त बोटिंग करू शकता, कारण होडीवर तुमचा ताबा असतो.

एर्विकुलम नॅशनल पार्क हे मुन्नारमधलं प्रसिद्ध ठिकाण आहे. शक्यतो इथे दुपारी जावं, कारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच त्याची वेळ आहे. निलगिरी ताहर या प्राण्यासाठी हे पार्क प्रसिद्ध आहे. डोंगराच्या अर्धा चढणीपर्यंत पार्कची बस पर्यटकांना पोहोचवते. पुढे चालत या पार्कचा अनुभव घेता येतो. डोंगरावर उतरलेले ढग, थंड हवा, प्रसन्न वातावरण अशा रोमँटिक वातावरणात जोडपी रमून जातात. पॅकेज घेतलं असेल तर कंपनीने त्या-त्या दिवसांचं कधी-कुठे-कसं जायचं असं वेळापत्रक आखून दिलेलं असतं. पण, त्यानुसार सगळीकडे जायलाच हवं असा नियम नाही. ड्रीम लॅण्ड स्पाइस पार्क हे त्या यादीत नसलं तरी इथे जावं असं ठिकाणं आहे. तिथले शुल्क माणशी ६०० रुपये आहे. हे शुल्क कालांतराने वाढू शकते. बंजी जम्पिंग, आर्करी, झिप लाइन, लॅडर क्लायम्बिंग, गन शूटिंग, हॉरर हाऊस, स्लिंग शॉट, स्पायडर नेट, टायर वॉक, स्विंग वॉक, रोप वे, सस्पेन्शन ब्रिज, सायकलिंग, बुल राइड असे अनेक खेळ या पार्कमध्ये आहेत. किमान चार तास तरी इथे जाऊ शकतात.

मुन्नारमध्ये टी म्युझिअमला भेट दिली नाही तर मग काय मजा! टी म्युझियम बघण्याचा अनुभव आणखी वेगळा. चहाचे मळे सर्वत्र दिसतात. पण, त्याचं पुढे होतं काय, हे जाणून घेण्यासाठी टी म्युझियमशिवाय दुसरा पर्याय नाही. इथे चहाची पानं स्वच्छ करण्यापासून त्याचं तीन भागात विभागणी होईपर्यंत कसं काम चालतं हे बघायला मिळतं. चहा पावडर तयार करण्याची प्रक्रिया पर्यटकांना खूप माहिती देऊन जाते. ठिकठिकाणी चहाचे मसाले, वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहा पावडर असं विकताना दिसतात. मुन्नारहून चहा पावडर, मसाले घेण्याचं कौतुक पर्यटकांनाही असतंच.

चहा पावडर, मसाल्यांसारखंच गरम मसाल्यासाठीसुद्धा केरळ लोकप्रिय आहे. त्यामुळे याचीही प्रक्रिया कशी घडते याचा अनुभव घ्यायलाच हवा. मुन्नारहून थेकडीच्या वाटेवर स्पाइस प्लॅन्टेशन येतं. तिथे या मसाल्यांविषयीची इत्थंभूत माहिती मिळते. इथे एकेका ग्रुपला एक गाइड दिला जातो. लवंग, तमालपत्र, जायफळ, वेलची, कॉफी, आलं, हिंग अशा अनेक जिनसांची झाडं दाखवून त्याचा मसाला कसा केला जातो, त्यासाठी त्या झाडांची देखभाल कशी आणि किती करावी लागते या सगळ्याबाबत सविस्तर माहिती सांगितली जाते. याशिवाय आयुर्वेदिक औषधांविषयीही ज्ञान इथे मिळतं. यानंतर त्याच ठिकाणी मसाले आणि आयुर्वेदिक औषधांची खरेदी करता येते. याच वाटेवर जाताना पेरियार वाइल्ड लाइफ सँच्युरी येतं. इथेही जरूर भेट द्यावी. निवांत लेक असलेलं हे ठिकाण अतिशय शांत आहे. या लेकमधून बोटीतून फिरवताना विविध पक्ष्यांची ओळख करून दिली जाते. एलिफंट राइडचाही इथे मनसोक्त आनंद घेता येतो.

अलेप्पीला गेल्यानंतर तिथलं प्रमुख आकर्षण आहे हाऊस बोटचं. वेगवेगळ्या प्रकारच्या हाऊस बोट इथे उपलब्ध असतात. एरवी मुंबईत किंवा इतर ठिकाणी बोटिंग केले जाते. पण, इथल्या बोटिंगचाही आनंद घ्यायला हवा. शिकारा बोट, हाऊस बोट असे प्रकार इथे आढळून येतात. पॅकेज घेताना होडीमध्ये रात्रीचं वास्तव्य न करण्याचा सल्ला कंपनीकडून दिला जातो. दिवसभर फिरून रात्री एका ठिकाणी होडी उभी केली जाते. तसंच आजूबाजूच्या काही गोष्टींच्या वासाचाही रात्रभर त्रास होण्याची शक्यता असते म्हणून अनेकदा न राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे होडीत रात्रभर राहायचं नसेल तर दोन तासांचे १४०० रुपये असे पैसे भरून मोठी फेरी घेता येते. तासांनुसार या होडय़ांचे शुल्क कमी-जास्त होत असते. दोन तासांच्या फेरीत बराच आनंद मिळतो. समुद्रकिनारा, त्याच्या एका कोपऱ्यात एक होडी, जवळच नारळाची बरीच झाडं, शेजारी एखादं कौलारू घर असं चित्र यापूर्वी शाळेत अनेकांनी काढलं असेल. हे चित्र होडीतून फिरताना जागोजागी प्रत्यक्ष दिसतं. नदीतून समुद्रमार्गे जाताना दूरवर होडय़ांची गर्दी दिसत असते. हाऊस बोट, शिकारा बोट, छोटी होडी वगैरे देखावा नेत्रसुख देतं. त्या पाण्यात बगळे मनसोक्त डुंबत असतात. पाण्याचा आवाज आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवत तुमचे दोन तास सहज संपून जातात. अलेप्पीला हाऊस बोटिंगचा आनंद लुटायलाच हवा.

अलेप्पीलाच डच पॅलेस नावाचं एक ठिकाणं आहे. शॉपिंगसाठी चांगली जागा आहे. केरळची पांढरी आणि सोनेरी काठ असलेली साडी, तसंच ड्रेस मटेरिअल, परफ्युम्स, सुकामेवा, केळ्याचे वेफर्स अशी शॉपिंग तिथे करता येते. तिथून कोचीनच्या मार्गावर जाता जाता सेंट फ्रांचाइज चर्च हे अठराव्या शतकातील चर्च बघण्यासारखं आहे. जुन्या पद्धतीचं बांधकाम असल्यामुळे त्याची वेगळी ओळख आहे. नुकतीच त्याची डागडुजी केल्यामुळे आता त्याचं रूप आणखी खुललं असेल. असे कोचीन-मुन्नार-थेकडी-अलेप्पी-कोचीन अशी हनिमून ट्रिप सात दिवसांत पूर्ण होते.

या संपूर्ण ट्रिपमध्ये खाण्या-पिण्यात तुम्ही प्रयोग करू शकता. विविध मासे, मांसाहारी पदार्थ यांचा आस्वाद घेऊ शकता. पण, केरळचं ‘केरळ मिल’ हे आवर्जून खायला हवं. इथलं एक वैशिष्टय़ असं की, खाद्यपदार्थ स्वस्त असल्यामुळे जेवणावर फारसा खर्च होत नाही. त्यात ‘केरळ मिल’ तर आणखी स्वस्त आणि मस्त! केरळ हे पर्यटनाचं राज्य म्हणून विकसित झालंय. हे लक्षात घेत स्थानिकांनी त्यानुसार व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांना ते योग्य ते मार्गदर्शनही करतात आणि स्वत:चा व्यवसायही वाढवतात. पॅकेज घेतलं असेल तर ड्रायव्हर सतत तुमच्यासोबत असतो. अशा ड्रायव्हर्सना विशिष्ट प्रशिक्षण दिलं जातं. पर्यटकांशी संवाद साधणे, संध्याकाळी ठरावीक वेळेत पर्यटकांना हॉटेलमध्ये पोहोचवणं, वेळ पाळणं अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे ड्रायव्हर त्यांचं काम चोख करीत असतात. ट्रिपच्या शेवटच्या दिवशी ड्रायव्हर पर्यटकांना एक फॉर्म भरायला देतात. त्यात त्यांच्याबद्दलचे मत लिहायचं असतं. त्या सात दिवसांमध्ये तो वागला कसा, बोलला कसा, मार्गदर्शन कसं केलं, वेळ पाळली का असे अनेक प्रश्नांवर त्याला रेटिंग द्यायचं असतं. या रेटिंगमधून त्यांच्यात ‘ड्रायव्हर ऑफ द मन्थ’ निवडला जातो. हा पुरस्कार असल्यामुळे ड्रायव्हरही उत्तम वागणूक देतो. ही पर्यटकांसाठी जमेची बाजू ठरते.

निसर्गाच्या सान्निध्यात, चहूबाजूंनी हिरवळ, शांतता, प्रसन्न वातावरण या सगळ्यामुळे ही ट्रिप संस्मरणीय होणार यात शंका नाही. खरं तर फक्त मुन्नारलाही फिरायला जायला हरकत नाही. एरवी मुंबई किंवा इतर शहरी भागात असताना हिरवळ बघण्याची संधी फार मिळत नाही. पण, केरळमध्ये सगळीकडे ही हिरवळ लक्ष वेधून घेते. ‘फ्रेश एअरच मिळत नाही हो’ अशी तक्रार करणाऱ्या शहरी लोकांना केरळमध्ये विशेषत: मुन्नार, थेकडी, अलेप्पीमध्ये असं म्हणण्याला वावच नाही. नवीन आयुष्याची सुरुवात करताना नवविवाहितांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, परस्परांचे स्वभाव ओळखण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांच्या सहवासात राहण्यासाठी निवांत, शांत, निसर्गरम्य अशा केरळला पसंती द्यायला हरकत नाही!

केव्हा जाल : पावसाळा हा ऋतू वगळता इतर कोणत्याही ऋतूत केरळला जाऊ शकता. पण, त्यातही नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ अधिक चांगला आहे.

कसे जाल : रेल्वेमार्गे नागरकोलपर्यंत जाता येते. पुढे खासगी वाहनाने मुन्नारचा प्रवास चार तासांचा आहे. विमानमार्गे जाणार असाल तर, कोचीनला जावे, पुढे खासगी वाहनाने चार-पाच तासात मुन्नार. मुन्नार ते थेकडी, अलेप्पी आणि पुन्हा कोचीन हा संपूर्ण प्रवास कारनेच करावा.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11