30-lp-hanumanराम व मारुतीचे नाते हे केवळ राजा आणि सेवक एवढेच नव्हते. समर्थानी या नात्याबद्दल लिहिताना म्हटले आहे की, रामाच्या आयुष्यातून मारुती वजा करताच येत नाही. का वजा करू शकत नाही तर सर्वात जास्त कामे करूनही तो अगदीच अपेक्षा न ठेवणारा असा आहे.

रामदासी संप्रदाय या शब्दप्रयोगातील पहिल्या शब्दातच राम आणि दास असे दोन शब्द आहेत. ही परंपरा खरेतर रामाचा दास असलेल्या हनुमंतापासून सुरू होते. तो ज्याप्रमाणे रामाचा दास तसे आम्ही समर्थाचे दास.  दास म्हणजे कोण? किंवा दास कोण होऊ  शकतो? सक्कलम यच्छती इति दास:, असे परंपरा सांगते. म्हणजेच जो संपूर्ण जीवन सद्गुरूला अर्पण करतो, तो दास. दास नेहमीच गुरूशी अनन्य राहतो, स्वत:चे जीवन समर्पण करतो. हनुमंताने आपले पूर्ण जीवन रामाला अर्पण केले होते. स्वामी आणि दास यांच्या नात्यातील अद्वैत म्हणजे मारुती व राम!

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

मारुतीरायाने त्यांचा स्वामी असलेल्या रामाला कधीही त्रास दिलेला नाही किंवा दुखावलेलेही नाही, आज्ञाभंग केलेला नाही. संपूर्ण रामायणात असे दिसते की, मारुतीच्या आगमनापासून रामाच्या जीवनात थोडा आनंद आला आहे. त्याआधी सारे दु:खच रामाला वाटय़ाला आलेले आहे. शिष्य तर अनेक असतात आणि ते गुरूचे कार्यही  करतात. पण आपल्या स्वामीचे मन ओळखून त्यानुसार काम करणारे ते मारुतीराय होते, असे अध्यात्मशास्त्र मानते. रामाच्या मनात काय आहे ते ओळखून आज्ञेआधीच मारुतीने काम केलेले असायचे, असे आपल्याला सर्व कथा सांगतात. आज्ञेपूर्वीच काम करणारा असा हा दास विरळाच. म्हणूनच या जगातील दास व स्वामी यांचे सर्वोत्तम नाते म्हणून राम व मारुतीकडे पाहिले जाते.

राम व मारुतीचे नाते हे केवळ राजा आणि सेवक एवढेच नव्हते. समर्थानी या नात्याबद्दल लिहिताना म्हटले आहे की, रामाच्या आयुष्यातून मारुती वजा करताच येत नाही. का वजा करू शकत नाही तर सर्वात जास्त कामे करूनही तो अगदीच अपेक्षा न ठेवणारा असा आहे. म्हणून तो आदर्श घेण्यासारखा, अपेक्षाविरहित काम करणारा सर्वोत्तम दास ठरतो. राज्याभिषेकानंतर सर्व वानरांना घरची आठवण येत असते, त्या संदर्भातील एक कथा असे सांगते की, सर्वजण रामाचे दर्शन घेऊन प्रसाद घेतात. रामही त्यातील प्रत्येकाला काही ना काही देतो. ज्या वेळेस मारुतीला जवळ बोलावून तो विचारतो, त्या वेळेस समर्थाच्याच शब्दांत सांगायचे तर

कपि वीर गेले, स्वइच्छा करुनी

नसे आत्मइच्छा

स्वइच्छा म्हणूनी

रघुवीर ठेविले तैसे राहावे

तुझ्या बुद्धियोगेची कार्य करावे

तू सांगशील तसं राहायचं, एवढीच इच्छा मारुती व्यक्त करतो. विचारशक्ती आणि कार्यशक्ती दोन्ही त्याने राघवाला म्हणजेच रामाला अर्पण केलेली आहे. किंबहुना म्हणूनच अहं अंगी न लाभलेला मारुती आपल्याला कथेत लोकोत्तर काम करताना दिसतो. समर्थ रामदासस्वामी आणि मारुती यांचं नातंच वेगळं असल्याचं समर्थाच्या रचनांमधून दिसते. ते केवळ देव आणि भक्त असे नाते नाही. समर्थ म्हणतात, रामाची भक्ती कशी करावी याचा आदर्श म्हणजे हनुमान. एका प्रार्थनेत समर्थ म्हणतात, हनुमंत आमची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली, श्री रामभक्तीने फळली, रामदास बोलिजे या नावे.

आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तयावीण अमुचा परमार्थ सिद्धते न पवे सर्वथा.

सा आम्हासि हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ, श्रीगुरू श्रीराम समर्थ, काय उणे दासासी

दाता एक श्री रघुनंदन, वरकड लंडी देईल कोण, तयासोडोन आम्ही जन कोणाप्रती मागावे, म्हणोनी आम्ही रामदास रामचरणी आमुचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश, आणिकाची वास न पाहू

रामदासी संप्रदायातील प्रत्येकाला समर्थच आदर्श वाटतात. त्यामुळे समर्थाचं सामाजिक- धार्मिक कार्य किंवा त्यांचा सूर्यनमस्काराचा नेम, दैनंदिन आयुष्य आचरण करण्याचा प्रयत्न प्रत्येक रामदासी करतो. तसंच काहीसं समर्थानाही मारुतीबद्दल वाटत असावे, असे समर्थाच्या रचना वाचताना जाणवते. कथा असे सांगते की, वडीलबंधू असलेल्या गंगाधारपंतांनी अनुग्रह देणार नाही असे सांगितल्यानंतर समर्थ मारुतीशी संवाद साधतात आणि रामापर्यंत पोहोचविण्याची विनंती ते मारुतीलाच करतात. समर्थाना मारुती जवळचाच वाटतो.  हनुमंतासारखाच मी रामाचा दास होईन, असे ते म्हणतात. समर्थ व मारुती या दोघांमधील दासभक्ती ही सारखीच आहे. किंबहुना म्हणूनच समर्थभक्त समर्थाना मारुतीचा अवतार मानतात.

अर्थात त्यामुळे साहजिकच होते की, बलोपासनेसाठी समर्थानी मारुतीचीच निवड करावी. पण तो फक्त बलशाली होता एवढेच त्यामागचे कारण नव्हते तर तो सर्वगुणसंपन्न होता, असे समर्थाना वाटत होते हे महत्त्वाचे. बलशाली तर रावणही होताच. पण रावणाने त्याची सारी शक्ती वाईटाच्या मागे लावली आणि मारुती मात्र अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहिलेला दिसतो. लंकादहन असो किंवा मग द्रोणागिरी आणण्याची कथा असो सर्वच ठिकाणी मारुतीने त्याचे सामथ्र्य चांगल्या कामासाठी वापरलेले दिसते.  समाजाचे हित हा त्याचा एकमेव निकष आहे. त्याच्या सामर्थ्यांने तो सीतेलाही समुद्रल्लंघुन आणू शकला असता पण त्याने तसे केले नाही, त्याने रामाच्या आज्ञेचे पालन केले. केवळ द्रोणागिरी आणला एवढेच नाही तर परत नेऊनही ठेवला. आणिला मागुता नेला, आला गेला मनोगती असेच त्याचे वर्णन समर्थ करतात.

समर्थ ज्या कालखंडात होऊन गेले त्या कालखंडात महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने बलोपासनेची गरज होती. तसे पाहायला गेले तर बळाची गरज समाजाला सार्वकालिक असते. पण त्या वेळचा महाराष्ट्र परकीयांच्या आक्रमणांनी पिचला होता, समाजही निष्क्रिय झालेला होता. दुष्टांची सरशी होत होती. समाजातील सज्जनही अन्याय सहन करण्यात धन्यता मानत होते. अशा वेळेस प्रतिकारासाठीची धमक ही मारुतीच्या उपासनेतूनच येऊ  शकते, असे समर्थाना वाटल्यास नवल ते काय. समाजातील सज्जन निष्क्रिय होणे ही सर्वाधिक चिंतेची बाब असते. सज्जनांनी कसा प्रतिकार करायचा हे मारुतीच्या कथेतून दिसते. समर्थ तत्कालीन परिस्थितीचे वर्णन करताना म्हणतात, धकाधकीचा मामला, कोण पुसे अशक्ताला. अशा वेळेस समर्थानी भक्तीला शक्तीची जोड देणारी मारुतीची उपासना महाराष्ट्रात सुरू केली. मारुती मंदिरांची स्थापना केली. म्हणूनच मारुती मंदिरात महाराष्ट्रातील अर्धे मारुती मंदिर आणि अर्धा आखाडा पाहायला मिळतो. मारुतीची केवळ शक्तीच नाही तो बुद्धिमतां वरिष्ठम् असेही त्याचे वर्णन समर्थ करतात.

पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळेस पायस आला त्याचेच भाग करून ते दशरथाच्या राण्यांना देण्यात आले. त्यातील एक घारीने पळविला आणि तो शिवभक्तीत रममाण असलेल्या अंजनीच्या हाती पडला आणि हनुमानाचा जन्म झाला, असे कथा सांगते. काही कथांनुसार म्हणून हनुमानाला रामाचा भाऊही म्हटले जाते. पण माझ्या दृष्टीने हनुमंताची रामाप्रति असलेली दास्यभक्ती ही सर्वात महत्त्वाची आहे. भारतीय परंपरेच दास्यभक्ती ही नवविधा भक्तीमधील एक भक्ती मानली जाते. त्याचा मुख्य प्रणेता हा मारुतीच आहे. अशी दास्यभक्ती इतरत्र पाहायला मिळत नाही.

आपल्या प्रत्येकात दैवी शक्ती असतेच, पण ती विकसित कशी करायाची हे आपल्याला ठाऊक नसते. गुणांचे संवर्धन कसे करायचे हे माहीत नसते. अशा अवस्थेत मारुतीची उपासना ही सामान्य माणसाला त्याच्या स्मरणानेही विलक्षण आत्मविश्वास देणारी ठरते. समर्थानी रचलेल्या भीमरूपी महारुद्रा किंवा संत तुलसीदासांच्या हनुमान चालिसा या दोन मारुती स्तोत्रांमध्ये मारुतीचे असंख्य गुण वर्णिलेले आहेत. त्यांचे पठण केले जाते, ते मारुतीने प्रसन्न व्हावे म्हणून नव्हे तर ते गुण आपल्या अंगात यावेत, याची आठवण सतत राहावी म्हणून. मारुतीकडे त्या अर्थी आदर्श म्हणून पाहिले जाते. मलाही हे भीमरूपी स्तोत्र नेहमीच प्रेरणादायी वाटले आहे.

सामान्य माणसांचे जीवन हे नेहमीच कष्टमय असते. दु:खाचे, संकटाचे अनेक प्रसंग येतात. समर्थानीच म्हटल्याप्रमाणे सुख सुख

म्हणताहे दु:ख ठाकुनि आले, अशी अवस्था होते. अशा वेळेस हनुमंताच्या स्मरणातून व चरित्रातून बळ मिळतं. मारुतीच्या जीवनचरित्रातून शिकण्यासारखे खूप आहे. द्रोणागिरी आणतो, लंकादहन करतो पण त्याचा अहंकार नाही. कर्ता मी असलो तरी करविता तूच आहेस, असे तो रामाला म्हणतो. दु:खात होरपळून न जाणं आणि सुखात हुरळून न जाणे अशी चित्ताची समतोल अवस्था आणि स्थिरबुद्धी प्रत्येक रामदासी माणसाने साधणे आवश्यक आहे, असे समर्थ म्हणतात. म्हणूनच तशी ती अवस्था साधणारा हनुमंत किंवा मारुती हा रामदासींचा आदर्श ठरतो. बोलणे कसे तेही नम्र दासमारुतीसारखे. रामायणाला पाच हजार वर्षे झाली. तरी जनमानसात तो कायम टिकून आहे. त्यांचे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व हेच त्याचे महत्त्वाचे कारण आहे. रामाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, वीरामध्ये विरोत्तमु, विशेष हा रघोत्तमु. तसाच हनुमंत हा देखील दासांमधील सर्वोत्तम आणि आदर्श असाच आहे.

गणपतीप्रमाणेच हनुमानही सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये लोकप्रिय झालेला दिसतो. यातील गणपती हा बुद्धिदाता तर हनुमान हा बलदाता आहे. आज समाजात जातपात मानण्याची अनिष्ट परंपरा आहे. मात्र वेदकाळात जातीपातींना महत्त्व नव्हते. मानवतेकरता उपासना अशी पद्धती होती. रामाने भिल्लाला मिठी मारली, असे वर्णन रामायणात येते, तसेच शबरीची बोरेही राम स्वीकारताना दिसतो. याचाच अर्थ त्या वेळेस जातीपातींना नव्हे तर मानवतेला महत्त्व होते. वर्णभेद जातीभेदापलीकडची उपासना म्हणूनच या दोन्ही देवतांच्या बाबतीत पाहायला मिळते. या दोन्ही देवतांच्या लोकप्रियतेचा दुसरा अर्थ म्हणजे समाजमनातही जातीपातींचे बंधन नाही. या दोन्ही देवता हे बंधन झुगारून देण्यात महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात.

हनुमानाचे देऊळ भारतात प्रत्येक गावात किंवा गावाबाहेर दिसतेच दिसते. एवढा तो जनमानसात रुजण्याचे कारण अर्थातच हजारो वर्षे जनमानसात रुजलेले रामायण. जेजुरीच्या गोंधळातही रामायणाचा उल्लेख येतो आणि इतर प्रथा-परंपरांमध्येही त्याचा उल्लेख येतो. अशा या रामायणातील रामाला संकटातून सोडवणारे  व्यक्तरूप म्हणजे हनुमंत. त्याचे देऊळ गावाबाहेर का तर ग्रामदेवतेचे देऊळही अनेक ठिकाणी थोडे दूरच असते. ग्रामदेवता व नंतर मारुतीचे दर्शन अशी प्रथा अनेक गावांमध्ये आहे. मारुतीच्या देवळात आखाडाही असतो अनेक ठिकाणी. व्यायाम खुल्या वातावरणात व्हावा, म्हणूनही असेल कदाचित किंवा मग गावाचे रक्षण करणारा म्हणूनही तो वेशीवर दिसतो. मध्ययुगात आपल्याकडे जातीपातींचे प्रस्थ वाढलेले दिसते. कदाचित त्या वेळेस सर्वच जातीच्या लोकांना दर्शन घेणे सोपे जावे म्हणूनही कदाचित नंतरची मंदिरे ही गावाबाहेर असावीत, असे म्हणण्यासही वाव आहे. मारुतीचे मंदिर ही आपल्याकडे ध्यानधारणेसाठी उत्तम जागा मानली जाते. कारण मारुती हा उत्तम ध्यानी होता, असे परंपरा सांगते. मग गावाच्या रामरगाडय़ात ध्यान उत्तम कसे होणार, म्हणूनही कदाचित मारुती मंदिर गावाबाहेर असावे, अशा अनेक शक्यता आहेत.

लोकांमध्ये पंचमुखी हनुमानाची प्रतिमाही प्रचलित आहे. पुराणात सांगितलेला पंचमुखी मारुती हा वराह, हयग्रीव, नरसिंह, हनुमंत आणि सूर्य यांचे एकत्रित रूप आहे. यातील चारही जणांनी पृथ्वीला अनाचारापासून वाचविण्याचे महत्कार्य केल्याचे परंपरा सांगते. वराहाने पृथ्वीला वाचविले, नरसिंहाने भक्ताचे रक्षण केले, हयग्रीवाने ज्ञानाचे रक्षण केले तर सूर्य हा तर अंधकाराचा नाश करणाराच आहे. या सर्वाच कार्य एकत्रित करणारा तो हनुमंत. किंवा ही सारी रूपे एकटय़ा हनुमंतामध्ये पाहायला मिळतात, म्हणून पंचमुखी हनुमान ही प्रतिमा अस्तित्वात आली असावी. रावणाला दहा तोंडे का, तर तो दशग्रंथी ब्राह्मण होता म्हणून असे परंपरा सांगते, तसेच काहीसे या पंचमुखी मारुतीचेही प्रतीकही असावे.

शनीच्या साडेसातीत मारुतीची उपासना करण्यामागे एक कथा पुराणातं सांगितली जाते. शनीने मारुतीला विचारले की, तुझ्या राशीला येऊ  का. खुशाल ये, असे मारुतीने सांगितल्यानंतर प्रत्यक्षात तो आला असता मारुतीने त्याला आपटूनधोपटून काढले व त्याला अनेक जखमा झाल्या. त्या जखमांवर औषध म्हणून शनीवर तेल चढविले जाते. असा हा हनुमंत संकटांना न घाबरण्याचे बळ सामान्य माणसाला देतो. म्हणूनच शनीच्या साडेसातीवर मारुतीच्या उपासनेचे औषध सांगितले जाते. असा हा मारुती आणि त्याचे आयुष्य म्हणजे सामान्य माणसासाठी शक्ती, युक्ती, साहस, धैर्य, निष्ठा, दक्षता आणि उत्तम गुणांचा समुच्चय असलेला आदर्शच आहे.
(शब्दांकन : डॉ. रसिका ताम्हणकर)
मारुतीबुवा रामदासी – response.lokprabha@expressindia.com