या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. युती तुटणं हे एक प्रमुख कारण त्यामागे असलं तरी मुळात सेनेचं काय चुकलं? पुढच्या काळात सेनेने काय करायला हवं?

विधानसभा निवडणुकीअगोदर असणारी सुमारे २५ वर्षांची शिवसेना-भाजप युती तुटली आणि दोन्हीकडील लोक कामाला लागले. युतीच्या काळातील जवळ-जवळ

२३ वर्षे महाराष्ट्राच्या इतिहासात युती ऐतिहासिक होती.

कुठल्याही देशाला, राष्ट्राला ६०-७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर स्थिरस्थावर होण्याचे वेध लागले पाहिजेत. राज्याच्या, राष्ट्राच्या विकासाचे स्वप्न बघून ते साकार करण्याचे कर्तव्य हे राज्यकर्त्यांचे आहे. न्याय, विकास हे परवलीचे शब्द न राहता आपल्या रोजच्या जीवनातील भाषा बनली पाहिजे.

एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या कागाळय़ा करण्याची एक मर्यादा असली पाहिजे. प्रचारकाळात शिवसेनेने भाजपवर नको तेवढी विखारी शब्दांत वंचना केली, निर्भर्त्सना केली. शिवसेनेशी तुटलेली युती हिंदुत्वाची नाळ कशी काय खंडित करू शकते हे समजले नाही. भारताच्या पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख तसेच त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जीवनातील कामावर झालेली ‘चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो’सारखी वाक्ये, भाजपमधील इतर मंत्री-उच्चपदस्थ व्यक्ती, महाराष्ट्रात प्रचारात उतरल्यावर त्यांचा उल्लेख ‘अफजलखानाची फौज’सारखा करणे.

लोकसभेच्या निवडणुकीत ‘चहावाला देश कसा चालवू शकतो?’ या दिग्विजय सिंग यांच्या टीकेला मोदींनी उत्तर दिले होते- ‘चहा विकतो, देश नाही’. या प्रचारकाळातसुद्धा मोदी किंवा इतरही शिवसेनेवर प्रखर टीका करू शकले असते; परंतु कुणीही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले नाही. खऱ्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा काय असते? तर त्याने त्याचा धर्म/कर्तव्य सोडू नये. ज्या वेळी सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असे व तो त्याच्या खेळावर टीकेचा ‘सामना’ हा मैदानातून करीत असे. त्याचप्रमाणे उत्तम राजकारणींनी हे विसरू नये की, राजकारण हे क्षणभंगुर असते, परंतु समाजकारण हे मात्र नित्य असते, कायमचे असते. लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना खरं तर पाच वर्षे रात्रंदिवस एक करून त्यांच्या मतदारसंघाचा कायापालट/विकास करण्याचे कर्तव्य असले पाहिजे म्हणजे प्रचारकाळ/ अधिवेशनकाळ सोडल्यास जवळजवळ ७० टक्के वेळ हा समाजाकरिता दिला पाहिजे. मागील १५ वर्षांतील आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल तसेच येणाऱ्या ५ वर्षांत निवडून दिल्यास विकासाची कामे इ.ची नितांत आवश्यकता या प्रचारात होती. बाळासाहेबांबद्दलचे प्रेम, आघाडी सरकारच्या प्रति असलेला राग हा मतपेटीतून शिवसेनेच्या पदरात व्यक्त करण्याची संधी घालवली. इतिहासाचे दाखले देऊन निवडणुका आता जिंकता येणार नाहीत. आताची पिढी ही तरुणांची आहे. त्यांना इतिहास, भूगोल, प्रादेशिकता, भाषावाद इत्यादी कालबाह्य़ झालेल्या मुद्दय़ांपेक्षा व्हिजन २०२०, रोजगार, पायाभूत सुविधा, विकास इ.वर फोकस असला पाहिजे होता. युती अभेद्य राहिली असती, छोटा भाऊ, मोठा भाऊ असा भेदभाव नसता तर आजची परिस्थिती निश्चितच वेगळी राहिली असती. खरा मुत्सद्दी हा शंभर टक्के टीकाकार कधीही नसतो. मोदींना पंतप्रधान होऊन केवळ चार महिन्यांचा काळ झालेला आहे. या चार महिन्यांतला त्यांचा लेखाजोखा सगळय़ांना माहिती झालेला आहे. किमान १५/१८ तास रोजचे काम, जपान, चीन, भूतान, ब्राझिल, अमेरिका दौरे, भारतात विविध प्रांतांतील भेटीगाठी निवडणूक प्रचारपूर्व एकही वक्तव्य, एकही सभा, मुलाखत मोदींनी घेतली नाही. आपण सगळय़ांनी ६० वर्षे काँग्रेसवर विश्वास ठेवला; परंतु या एनडीए नेतृत्वाची इतक्या लवकर परीक्षा घेण्याची घाई, तीही घटकपक्षाकडून घडली.

निवडून आलेल्या आमदारांची मानसिकता ही राज्य करण्याची असते. निर्णयप्रक्रियेत सहभाग हा प्रत्येक आमदाराला हवा असतो. कॅबिनेट पद, राज्यमंत्रिपद, किमानपक्षी विविध मंडळांचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची स्वप्ने आमदारांना पडत असतात. शिवसेनेमध्ये निवडून आलेले आमदारसुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. मे महिन्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मंत्रिपदाचीच स्वप्ने पडत होती. अशा परिस्थितीमध्ये सेनेच्या नेतृत्वाकडे फार मोठे आव्हान आहे ते संघटन कौशल्याचे. जर भाजपचे सरकार आघाडी सरकाराप्रमाणे अकार्यक्षम राहिले, भ्रष्ट झाले तरच त्यांना हिणवता येईल, अन्यथा भाजपविरुद्ध काही बोलतासुद्धा येणार नाही.

मुद्दा असासुद्धा आहे की, प्रचारकाळात भाजपवर पर्यायाने मोदींवर आगपाखड केल्यावर आता एक प्रकारची अपराधी भावना ही सेनानेतृत्वाच्यासुद्धा मनात येणार आणि अहंकार, बडेजाव, तुटेन पण वाकणार नाही, अशा संस्काराला खतपाणी न घालता विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपसोबत विनातक्रार जाण्याचा समजूतदारपणाचा मार्ग निवडला पाहिजे. किती मंत्रिपदे मिळणार, मुख्यमंत्रिपद किती वर्षे कुणाला मिळणार यापेक्षा आपण परिवर्तनाचा हिस्सा बनू या, बदलणाऱ्या महाराष्ट्राचे साक्षीदार होऊ या, तसेच ‘स्वप्नातला महाराष्ट्र’ घडवू या अशी भावना मनात ठेवून पाऊल पुढे टाकल्यास महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या आमदारांसकट या निर्णयाचे स्वागतच करेल.

या निवडणुकीने हे दाखवून दिले की, प्रांतवाद, भाषावाद, अस्मितासारखे विषय, शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक दाखले आता चालणार नाहीत. मतदार हुशार होत चालला आहे, तो स्वत: निर्णय घेऊ लागलेला आहे, त्याला बदल हवा आहे, त्याला स्थैर्य हवे आहे, त्याला फक्त विकासाची भाषा समजते.

शिवसेना या पक्षाचा सर्वात चांगला गुण म्हणजे पक्षाची बांधणी. खेडय़ापाडय़ांत शिवसेनेच्या शाखा दिसतात. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, सामान्य कार्यकर्ता यांची उत्तम नाळ बांधली गेलेली आहे. यामुळे संवाद अतिशय वेगाने होतो. कुठल्याही महत्त्वाच्या संवेदनशील विषयाबाबत कार्यकर्त्यांची गर्दी लगेच जमा होते. शहरातील-गावातील चांगले लोक या शाखेकडे कसे आकर्षित होतील याकडे बघितले गेले पाहिजे. पक्षाचा ५० वर्षांचा आराखडा तयार केला पाहिजे. बाळासाहेबांच्या वेळी असलेल्या गोष्टी कालांतराने नामशेष होत चालल्या आहेत याची जाणीव सेना नेतृत्वाने लक्षात घेतली पाहिजे. पक्ष सत्तेत राहून किंवा सत्तेत न राहतासुद्धा महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेच्या विकासाबाबत कामे हाती घेऊ शकतो, त्या सर्व कार्यक्रमांचे व्यवस्थापन, अंमलबजावणी, विस्तार सेनेच्या शाखेंच्या जाळय़ामार्फत होऊ शकते. विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे स्मार्ट सिटीत ब्रॉडबँड, स्काय स्क्रॅपर्स, फ्लायओव्हर्स, हायपर मॉल्स, मेट्रो रेल्वे, मोनो ट्रेन, सागरी वाहतुकीचा विकास, बंदराचा विकास यांची गरज आहे त्याचप्रमाणे ठाणे ते गडचिरोली, धुळे ते सांगली अशा विस्तीर्ण पसरलेल्या प्रदेशाला जोडणाऱ्या चांगल्या रस्त्यांची गरज आहे. दूरवरच्या खेडय़ांमध्ये, पाडय़ांमध्ये (स्वच्छ) पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण पसरले पाहिजे. मुंबईतील राहणारा नागरिक आणि मुरबाड तालुक्यातील मोरोशी मोरेगाव या भागातील नागरिक यांच्यातील तफावत वाढत चालली आहे. ज्याप्रमाणे मोदींनी प्रत्येक खासदाराला किमान ३ खेडी दत्तक घ्यावयास उत्तेजन दिले आहे त्याचप्रमाणे इथे महाराष्ट्रातसुद्धा ही मोहीम स्वयंस्फूर्तीने चालवली पाहिजे. इथल्या खेडय़ापाडय़ांत विविध लोकोपयोगी उत्पादने मिळू शकतात. त्यांना विपणन (मार्केटिंग)ची गरज आहे, बाजारपेठेची गरज आहे. उत्तम प्रतीचे धान्य, उत्तम प्रतीचे दूध-भाजीपाला आपणास उपलब्ध होऊ शकतो. राजकीय नेतृत्वाने परस्पर हेवेदावे न करता समाजकारण केल्यास महाराष्ट्र खरोखर उज्ज्वल होईल.

सेना नेतृत्वाने विवेकनिष्ठ पद्धतीने परिस्थितीचे अवलोकन केल्यास (SWOT Analysis) भावना बाजूला ठेवल्यास पक्ष एकसंध तर राहीलच, पण पक्षाची वाढसुद्धा होईल. जनता आत्मकेंद्री, स्वार्थी कारभाराला कंटाळून गेलेली आहे. गृहीत असे काही राहिलेले नाही. दिल्लीमध्ये ‘आप’च्या हातात दिलेली सत्ता किंवा केंद्रामध्ये आलेले मोदी सरकार ही अँटी इनकम्बसी फॅक्टर आहे. सेना नेतृत्वाने पारंपरिक राजकारणाचा (ठाकरेशाही) भावनांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा मार्ग बदलून व्यावसायिक राजकारणाचा प्रयोग महाराष्ट्रात करावा.

बहुतांश नगरपालिका/ महानगरपालिकांवर अजूनही सेनेचे प्राबल्य आहे. त्याचा वापर हा त्या शहरांच्या विकासाकरिता व्हावा. सेना नेतृत्वास सेनेमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर पुजले जाते. बाळासाहेबांबद्दलचा आदर, प्रेम, उद्धवजींबद्दल असलेली श्रद्धा आणि निष्ठा यांचा उत्तमरीत्या वापर करून सेनेने आपले उद्दिष्ट ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करावे.