‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या प्रवासाचा या वर्षीचा टप्पा गंगेच्या खोऱ्यामधून होणार आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या पाच वर्षांमध्ये दोन वेळा या ‘एल निनो’बद्दल माहिती गोळा करण्यात आली. या वर्षीही ‘एल-निनो’ने होणारे परिणाम हा गट तपासून पाहणार आहे. भारतातील शेती, उद्योग याबरोबरच देशाची एकूण अर्थव्यवस्था आणि लोकसंस्कृती ज्यावर अवलंबून आहे, त्या नैर्ऋत्य मान्सूनचं अखेर मुंबईसह महाराष्ट्रात नुकतेच आगमन झालं आहे. यंदा कदाचित पावसाचं प्रमाण कमी असेल असं भाकीत काही हवामान शास्त्रज्ञांनी या वर्षी केलं होतं. गेल्या वर्षीही पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमीच होतं. सलग दुसऱ्या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याने सगळ्यांनाच चिंता वाटते आहे. आणि या चिंतेचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे ‘एल निनो.’ सूर्य, वारे आणि पाऊस आपण शाळेत भूगोलाच्या तासाला पाऊस कसा निर्माण होतो हे ऐकलं असेल. पण हा पाऊस तयार होण्यामागे वातावरणामध्ये होणारे जवळपास ३० ते ४० घातक कारणीभूत असतात. आणि पाऊस पडणं आणि त्याचा सृष्टीवर होणारा परिणाम जर आपण पाहायला लागलो तर ही प्रक्रिया आणखीनच क्लिष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. पाऊस ही एक वातावरणामधली एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात होते ती समुद्रापासून. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. हे बाष्प हलकं असतं, त्यामुळे ते काही ठरावीक उंचीवर जाऊन या बाष्पाचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. हे झालं एका सामान्य जलचक्राचं स्वरूप. आणि जिथे जिथे पृथीवर पाणी आहे तिथे तिथे हे जलचक्र अव्याहतपणे सुरू असतं. उष्णकटिबंधीय प्रदेशमध्ये म्हणजे विषुववृत्तापासून २३.५ अंश उत्तरेला आणि २३.५ अंश दक्षिणेचा हा प्रदेश आहे. या प्रदेशमध्ये सूर्याची उष्णता सर्वाधिक असते. त्यामुळे साहजिकच हा प्रदेश इतर भागाच्या तुलनेत अधिक तापतो. या ठिकाणी सूर्याची किरणं ही सरळ पडतात. जसं आपण उत्तरेला जायला लागू तशी ही किरणं तिरकी पडायला लागतात. त्यामुळे साहजिकच या भागांना कमी उष्णता मिळते. त्यामुळे या ध्रुवीय प्रदेशांवर बर्फ असतो. या विषुववृत्तीय भागामध्ये सर्वाधिक महासागर आहेत. या महासागरांचा पृष्ठभाग तापला की त्याचं बाष्पीभवन होऊन इथे ढगांची निर्मिती होते. ही सर्व प्रक्रिया वर्षभर सुरू असते. पृथ्वी ज्या दिशेने सूर्याच्या भोवती फिरत असते, त्यानुसार या सर्व भागांमध्ये वारे वाहत असतात आणि त्यामुळे पाउसही यावर अवलंबून असतो. म्हणजे २२ सप्टेंबरनंतर जेव्हा सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात जाणार आहे, तेव्हा त्या भागामध्ये उन्हाळा असणार आहे. मान्सून जगात केवळ भारतातच मान्सून आढळतो असं नाही, तर तो आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या काही भागात, नैर्ऋत्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये तसेच दक्षिण चीन, कोरिया आणि जपान या देशांच्या काही भागातही आढळतो. याबरोबरच, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलाया, जावा, सुमात्रा आणि उत्तर ऑस्ट्रेलियामध्येही मान्सून आढळतो. या प्रत्येक भागामधल्या मान्सूनचं वेगळं वैशिष्टय़ आहे. यामध्ये भारताचं वैशिष्टय़ असं की इथे मान्सून दर वर्षी न चुकता येतोच येतो. जेव्हापासून आपण पावसाचं मोजमाप करतो आहोत तेव्हापासून म्हणजे साधारण दीडशे वर्षांपासून मान्सून कमी जास्त फरकाने त्याच काळात येतो आहे. आफ्रिकेमध्ये जरी मान्सून येणार असला तरी तो एका ठरावीक काळात येत नाही. मान्सूनच्या काळात भारतात नैर्ऋत्य मौसमी वारे सक्रिय होतात आणि पाऊस देतात. या नियमित येण्यामध्ये भारताचा भूगोल हा महत्त्वाचा ठरतो. मान्सून आणि दुष्काळ साधारण दीडशे वर्षांपासून आपल्याला भारतीय उपखंडामधल्या पावसाच्या नियमित नोंदी सापडतात. या नोंदींमध्ये गेल्या दीडशे वर्षांत कोणत्याही वर्षी सरासरीपेक्षा २४ टक्क्य़ांहून कमी पाऊस कोणत्याही वर्षी पडलेला नाही. म्हणजे, अगदी १९७२ च्या दुष्काळाच्या काळातही भारतामध्ये ७६ टक्के पाऊस पडलाच होता. पाऊस जरी नियमित येत असला तरी काही वेळा, वेगवेगळ्या घटनांमुळे तो कमी प्रमाणात पडतो. कमी प्रमाणात पडला की आपला समाज, प्राणी, आणि सगळी सृष्टी त्यामुळे बदलायला लागते! काही वर्ष सलग कमी पाऊस पडायला लागला की तिथली जीवविविधता स्वत:ला वेगळ्या पद्धतीनी विकसित करायला लागते. त्यामुळे प्रत्येकच वर्षी पावसामध्ये आपल्याला वेगळेपणा बघायला मिळतो, आणि हा वेगळेपणा, आपल्या अस्तित्वाचं कारण असल्याने आपण त्याचा स्वीकार करायला हवा! पण हा पाऊस जर सरासरीपेक्षा १९ टक्क्य़ांनी खाली गेला तर तो कमी पावसाचा काळ ठरतो. त्याला आपण डेफिशियन्ट रेनफॉल (ऊीऋ्र्रूील्ल३ फं्रल्लऋं’’) असं म्हणतो. हा पाऊस जर २३ ते ५० टक्के कमी पडला तर त्याला आपण दुष्काळाचा काळ असं म्हणतो. हा पाऊस ५० टक्क्य़ांपेक्षाही कमी झाला तर तो स्कॅन्टी रेनफॉल (रूंल्ल३८ १ं्रल्लऋं’’) म्हणवतो. समजा एखाद्या भागामध्ये सततच पाऊस पडला, तर तिथलं ते कायमचं वातावरण झालं. तिथल्या वनस्पती, पशुपक्षी त्या पावसाच्या दृष्टीने विकसित होतात. त्यामुळे अधिक पावसाचं वातावरण तिथे तयार होतं. पण एखाद्या वर्षी जर पाऊस तसा पडला नाही, तर इथलं वातावरण बदलायला लागतं. माणूस, प्राणी, किंवा जैवविविधतेसाठी पुरेसा पाऊस नसेल तर आपण त्याला दुष्काळ आहे असं म्हणतो. पण म्हणून हा पाऊस अनैसर्गिक वागतो आहे, हे म्हणणं बरोबर नाही. जर कायमच एकसारखं वातावरण पृथ्वीवर राहिलं नसतं तर आज आपण जी विविधता अनुभवतो, ती विविधताच आपल्याला अनुभवायला मिळाली नसती. पाऊस, वातावरण अनियमित होतं, म्हणून त्या वेगवेगळ्या वातावरणात तग धरून राहू शकणारे असे पशू, पक्षी, कीटक निर्माण झाले! भारतामध्ये पावसाची खूप विविधता आपल्याला बघायला मिळते. भारतात जगात सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे, आणि तसंच, अतिशय कमी पावसाचं वाळवंटदेखील आहे. अनेक ठिकाणी आपण वाळवंट तयारही करत आहोत. पावसावर होणारे परिणाम आणि एल-निनो वर पाहिल्याप्रमाणे असे ३० ते ४० विविध घटक आहेत की ज्यांवर आपला पडणारा पाऊस अवलंबून असतो. गेल्या दीडशे वर्षांच्या नोंदींमधून आपल्याला हे समोर दिसतं की ज्या वर्षांमध्ये एल-निनो होता त्या वर्षांमध्ये भारताच्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी झालं आहे. सगळ्याच वर्षी नाही, पण ९५ टक्के वर्षांमध्ये आपल्याला हा फरक दिसून येतो. गिल्बर्ट वॉकर आणि वॉकर्स ऑसिलेशन गिल्बर्ट वॉकर हा सन १९०४ ते १९२४ या काळामध्ये, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय हवामान खात्याचा डायरेक्टर जनरल होता. त्याच्या कारकीर्दीमध्ये त्याने लांबपल्लय़ाच्या हवामानाचा अंदाज याबद्दल बराच अभ्यास केला. त्याच्या या शोधानुसार जेव्हा प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं तेव्हा हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरचं तापमान कमी असतं. आणि ज्या वेळेला हिंदी महासागराचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असतं, तेव्हा प्रशांत महासागर तुलनेने थंड असतो. याला त्याने एल-निनो सदर्न ओसीलेश (एठरड). असं नाव दिलं. यामुळे जेव्हा प्रशांत महासागराचं तापमान ०.५ अंशांनी वाढलेलं असतं, आणि अशीच परिस्थिती जर सतत पाच महिने राहिली तर आपण एल-निनो सक्रिय झाला असं म्हणू शकतो. ज्या भागावरचं तापमान वाढणार आहे ती हवा वर जाते. ती हवा, बाष्प हलकं होऊन वर गेल्यावर तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे हिंदी महासागरावर कमी तापमान आणि प्रशांत महासागरावर अधिक तापमान अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे हिंदी महासागराकडून प्रशांत महासागराकडे इथले वारे वाहायला लागतात. हे वारे प्रशांत महासागराकडे बाष्प वाहून आणतात. त्यामुळे एल-निनोच्या काळामध्ये प्रशांत महासागराच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून एल-निनोच्या काळामध्ये जेव्हा भारतात कमी पाऊस असतो, दुष्काळ असतो, तेव्हाच दक्षिण चीनच्या भागामध्ये तसंच अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. याच काळामध्ये त्यामुळे प्रशांत महासागरामध्ये मोठ-मोठी चक्रीवादळे येतात. त्यामुळे टायफून्स किंवा हरीकेन्सचं प्रमाण वाढलेलं दिसतं. हा एल-निनो साधारणपणे हिवाळ्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे साधारणपणे डिसेंबर महिन्यात. म्हणून त्याला येशूचं बाळ, म्हणजे स्पॅनिशमध्ये ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. या विरुद्ध परिस्थिती जेव्हा असते, म्हणजे प्रशांत महासागराचं तापमान हिंदी महासागरापेक्षा ०.५ डिग्रीने कमी असतं, आणि अशी परिस्थिती सलग पाच महिने राहते, तेंव्हा या परिस्थितीला ‘ला-नीना’ असं म्हणतात. या ला-नीनाच्या प्रभावामुळे भारतामध्ये पावसाचं प्रमाण हे आपल्याला वाढलेलं दिसतं. हा एल-निनो कोणत्या भागात तयार होतो, त्यावरही तो एकूणच मान्सूनवर किती परिणाम करणार हे अवलंबून असतं. प्रशांत महासागराचे यासाठी आपल्याला तीन भाग पाडावे लागतील. मध्य, पश्चिम आणि पूर्व भाग. त्यापैकी पूर्व भागात झाल्यावर आपल्याकडे परिणाम होतो हे दिसून येतं. यावर्षीचा एल-निनो या प्रशांत महासागराच्या मध्य भगात तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काहींच्या मते यावर्षी याचा परिणाम आपल्याला फार बघायला मिळणार नाही. पण यामधली मेख अशी की यावर्षीचा एल-निनो हा सलग दुसऱ्या वर्षीचा आहे. कारण २०१४ सालीही आपल्याला एल-निनो अनुभवायला मिळाला होता, त्यामुळे कदाचित पावसाच्या पाण्याच्या साठय़ावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं वाटतं आहे. काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी आलेला एल-निनो हा कमी परिणाम करतो, त्यामुळे या दृष्टिकोनातूनही यावर्षी कदाचित याचा फार परिणाम आपल्याला दिसणार नाही. काही हवामानतज्ज्ञांशी बोलताना असं लक्षात आलं की सध्या एल-निनो हा वारंवार यायला लागला आहे. गेल्या शतकात याची वारंवारता कमी होती. ही वारंवारता कदाचित ग्लोबल-वॉर्मिगमुळेही होत असेल असं म्हटलं जातं. गेल्या दोन दशकांचा जर आपण विचार केला तर २००२, २००९ २०१४ आणि २०१५ या वर्षांमध्ये आपल्याला एल निनो सक्रिय झालेला दिसतो. २०१२ सालीदेखील एल-निनोसारखी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु त्याचा म्हणावा तितका परिणाम आपल्याला अनुभवास आला नाही. २०१४ मध्येही त्यामुळे पावसाळा संपल्यावर इथे पाऊस आलेला आपल्याला अनुभवायला मिळाला. या तीनही वर्षी भारतामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. या १५ वर्षांमधले आणि त्यापेक्षाही अधिक गेल्या शतकांमधली उदाहरणं आपण बघितली तरी आपल्याला एल-निनो आणि दुष्काळ याचा थेट संबंध लावता येईल. तरीही अजून भारतीय हवामान शास्त्रज्ञ हा थेट संबंध मानायला तयार झालेले नाहीत किंवा उघडपणाने सांगायला तयार नाहीत. याचं कारण कदाचित शास्त्रीयपेक्षा आपल्या राजकारणात किंवा अर्थकरणात दडलेलं आहे. कदाचित साठेबाजी, शेअर मार्केटचे दर खाली ठेवण्यासाठी किंवा इतर सामाजिक किंवा राजकीय कारणांमुळे हा थेट संबंध दडवला जात असण्याची शक्यता आहे. पण हे मात्र नक्की की एल-निनो आहे असं म्हटल्यावर आपण तयारीत राहणं कायमचं श्रेयस्कर. पावसाचे परिणाम ‘प्रोजेक्ट मेघदूत’ २०११ साली सुरू झाला. तेव्हापासून आपण या वर्षी तिसरा एल-निनो अनुभवणार आहोत. या तीन वर्षांमध्ये या गटाने अनुभवल्या प्रमाणे, जेंव्हा भारताच्या मध्य भागामध्ये जेंव्हा एल-निनो असतो त्यावेळेस पाऊस कमी पडतो. पण याच वेळेस ईशान्येकडे पाऊस जास्त होतो. कारण बंगालच्या महासागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा आणि इतर पाऊस यायला पूरक अशा घटना घडत असतात. या घटनांमुळे इथे असणारे वारे आणि बाष्प, बांगलादेश, ईशान्य भारत असा प्रवास करत करत चीनकडे सरकतात. त्यामुळे जेव्हा भारताच्या मध्य किंवा पश्चिम भागामध्ये जेव्हा एल-निनोमुळे कमी पाऊस पडत असतो तेव्हा ईशान्येकडे पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक असतो. त्यामुळे मागच्या वर्षीही जेव्हा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट ईशान्येकडे सफर करत होता, तेव्हा त्यांना ईशान्येकडे होणारे अतिपावसाचे दुष्परिणामही बघायला मिळाले. माजुली येथील अनेक बेटे वाहून गेली, काझिरंगा इथे पाण्याची पातळी वाढल्यामुळे तिथल्या वन्यजीवनालाही धक्का लागला. त्यामुळे याचे परिणाम आपल्याला प्रत्येक भौगोलिक क्षेत्रानुसार पाहावे लागतील. त्याच्या उलट मध्य भारतातून फिरताना कमी पाऊस झाल्यामुळे होणारी स्थलांतरं पाहायला मिळाली. या वर्षी ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट गंगेच्या खोऱ्यात प्रवास करणार आहे. या संपूर्ण प्रदेश हा शेतीवर अवलंबून असतो. त्यामुळे शेतीची पेरणी व्यवस्थित करता आली नसेल तर इथल्या स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं दिसतं. बिहार आणि उत्तर-प्रदेशमधून भारताच्या इतर ठिकाणी स्थलांतरं दरवर्षी होतातच. पण या वर्षी पाऊस न पडल्यामुळे या स्थलांतरांवर काही परिणाम होतो आहे का हे बघावं लागेल. त्यामुळे यावेळेला फिरताना पावसामुळे, कमी किंवा जास्त, होणारी स्थलांतरं कशी होतात, हा या गटाच्या अभ्यासाचा आणखी एक विषय असणार आहे. पावसाच्या लहरीपणाचा थेट फटका हा समाजाच्या सर्वात खालच्या थरावर झालेला आपल्याला दिसतो. मध्यमवर्गातला माणूस कदाचित जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले म्हणून सरकारला दोष देईल, किंवा पावसाच्या लहारीपणाला दूषण देईल. पण रोजंदारीवर जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यावर पावसाच्या बदलांचा थेट परिणाम होतो. कमी पावसामुळे शेती झाली नाही की त्याची रोजी बुडते आणि त्याला स्थलांतराशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. केरळच्या मच्छीमारांना मान्सूनच्या काळात आपल्या होडय़ा समुद्रात नेता येत नाहीत. बडय़ा व्यापाऱ्यांची गलबते मात्र समुद्राच्या आत जाऊन मासेमारी करत असतात. आणि इथे वर्षभर स्वत:च्या होडीमधून आपल्या व्यवसाय करणारा मच्छीमार कुठेतरी मजुरी करताना दिसतो. त्यामुळे भारताची बहुसंख्य लोकसंख्या ज्याच्यावर अवलंबून असते अशा पावसाच्या लहरीपणाचं अचूक अनुमान आपल्याला लावता आलं पाहिजे. हे अनुमान अचूक असावं यासाठी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या वर्षी पावसाच्या न येण्यामुळे माणसांवर होणारे परिणाम यावर विशेष अभ्यास करणार आहे. (क्रमश:) प्रज्ञा शिदोरे - response.lokprabha@expressindia.com