स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सुमारे ६७ वर्षांच्या वाटचालीत देशात अनेक राजकीय, सामाजिक आंदोलनं झाली. त्यापैकी अनेक आंदोलनांचं स्वरूप प्रादेशिक पातळीवरच राहिलं, तर फार थोडय़ा आंदोलनांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिसाद मिळाला. माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांनी जून १९७५ मध्ये देशात आणीबाणी जारी केल्यानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभर चळवळ उभी राहिली. त्यातून मार्च १९७७ मध्ये झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांमध्ये मतपेटीच्या माध्यमातून शांततामय मार्गानं इंदिराजींना सत्तेवरून खाली खेचण्यात आलं. त्यानंतर वेळोवेळी राजकीय आंदोलनं झाली, सत्तांतरंही घडून आली. पण त्यांना जेपींच्या आंदोलनांची सर नव्हती.

त्यानंतर तब्बल ३४ वर्षांनी अण्णा हजारे यांच्या रूपानं पुन्हा एक नेतृत्व उभं राहिलं. टोपीपासून विचारांपर्यंत गांधीवादाचा मन:पूर्वक स्वीकार केलेल्या अण्णांनी ग्राम- विकासापासून सुरुवात करत भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर राजसत्तेला आव्हान देण्याची शक्ती संपादन केली. योगायोगाचा भाग म्हणजे जेपींच्या आंदोलनाचा मूळ पाया भ्रष्टाचार निर्मूलन हाच होता, त्यानंतर तीन दशकांनी अण्णांनी छेडलेल्या आंदोलनाचा रोख ही कीड नष्ट करण्यावरच राहिला. मात्र बदललेल्या परिस्थितीनुसार त्यांनी त्यासाठी लोकपालसारखी स्वतंत्र, स्वायत्त यंत्रणा उभी करण्याचा आग्रह धरला आणि त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनमत संघटित करण्यात ते यशस्वी ठरले. त्यासाठी १६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या काळात अण्णांनी दिल्लीत रामलीला मैदानावर केलेलं उपोषण ऐतिहासिक ठरलं. हजारो दिल्लीकरांसह देशभरातून अण्णांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादापुढे राजसत्तेला झुकावं लागलं. या अभूतपूर्व जनआंदोलनाचा वेध ज्येष्ठ पत्रकार आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते आशुतोष यांनी पुस्तकरूपानं घेतला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद  ‘ते तेरा दिवस’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे.

सुमारे अडीचशे पानांच्या या पुस्तकातील १९ प्रकरणांपैकी पहिली सात प्रकरणं या आंदोलनापूर्वीच्या घटना-घडमोडींची धावती नोंद घेणारी आहेत. तर दहाव्या प्रकरणापासून अठराव्या प्रकरणापर्यंत सलग नऊ प्रकरणांमध्ये रामलीला मैदानावरील अण्णांचं उपोषण आणि त्या अनुषंगाने पडद्यावर व पडद्यामागे घडलेल्या अनेक लहान-मोठय़ा नाटय़मय राजकीय घटनांचा लेखाजोखा आहे. पत्रकाराच्या नजरेतून सादर केलेला ‘आँखो देखा हाल’ आहे. त्यामुळे ही सर्व प्रकरणं अतिशय वाचनीय व रंजक झाली आहेत. विशेषत: अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये दोन्ही बाजूंकडून पडद्यामागे चालणाऱ्या डावपेचांचा  तपशील त्यातील गुंतागुंत समजावून घेण्यास उपयोगी पडतो. आशुतोष यांच्या प्रवाही लेखनशैलीला बाधा उत्पन्न होणार नाही अशा प्रकारे नीता भिसे यांनी हा स्वैर अनुवाद केला आहे.

रामलीला मैदानावरील अण्णांच्या आंदोलनानंतर सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप एखाद्या मोठय़ा राजकीय घडामोडीनंतर लगेच सादर केलेला ‘रिपोर्ताज’ एवढंच मर्यादित असणं अपेक्षित नव्हतं. पण आशुतोष त्यापेक्षा वरच्या पातळीवर जाऊ शकलेले नाहीत. समाजातील काही गटांना अण्णा हजारे देवदूत वाटू शकतात. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यासारखी काही आयुधं त्यांनी या देशाला, सामान्य माणसाला जरूर उपलब्ध करून दिली आहेत. पण त्याचबरोबर अण्णांच्या नेतृत्वाला, प्रसंगी बेभरवशी वाटावं अशा, प्रचंड मर्यादा आहेत. एवढय़ा मोठय़ा आंदोलनाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आशुतोष यांनी ‘उपसंहार’ या जेमतेम पाच पानांच्या प्रकरणात या मुद्दय़ाला स्पर्श करण्यापलीकडे फारसं काही केलेलं नाही. त्याचबरोबर त्या वेळच्या ‘टीम अण्णा’च्या भंपकपणावरही फारसा प्रकाश टाकलेला नाही. पत्रकार आशुतोष आणि राजकीय चेहऱ्याचे आशुतोष यांच्यातील द्वंद्वामुळे हे घडलं असेल. पण त्यामुळे पुस्तकाचा रोचकपणा मान्य करूनही अशा प्रकारच्या जनआंदोलनांचा गंभीरपणे विचार करणाऱ्या वाचकाच्या हाती फारसं काही लागत नाही.

‘ते तेरा दिवस’ –  आशुतोष, मराठी अनुवाद – नीता भिसे, अक्षर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – २४०, मूल्य – २५० रुपये.