सुरेश भटांच्या गजलांमुळे १९७० सालानंतर जे कवी गज़्‍ालही लिहिण्यास प्रवृत्त झाले, त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव रमण रणदिवे हे होय. चाळीस वर्षांच्या काव्यसृजन कालावधीत त्यांनी मोजकेच लिखाण केले. ‘काहूर’ हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह आहे. त्यांच्या या संग्रहात गज़्‍ाला, गीतं व कविता असून तो आशयगर्भता, गेयता व शब्दसौष्ठव या तीन गुणांमुळे लक्षणीय ठरतो.
मौन सोडावेच वाटे आशयाला
हेच माझ्या अक्षरांचे कसब आहे
कवी आंतरिक भाव, कल्पना, विचारांना अभिव्यक्ती देण्यासाठी विशिष्ट काव्य-विधा निवडतो असं नाही. ते भाव, त्या कल्पना ते विचारच आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम घेऊन साकारतात. गेय रूपात अवतरत असतील तर आपला छंद/ वृत्त तेच ठरवतात. कधी कविता तर कधी गीत वा गज़्‍ाल आकृतिबंधात पद्यरचना व्यक्त होते. रमण रणदिवेंची काव्य अभिव्यक्ती सहजपणे या तिन्ही काव्यविधेत होते. त्यांच्या उत्स्फूर्त शेरांचे काही नमुने बघा-
माझ्याविषयी जर काही वाटलेच नसते
जाता जाता वळून तू पाहिलेच नसते

पोखरते वाळवी, तरीही झाड हासते, तसाच मी
कधीच नाही कळले माझ्या मनातले काहूर तुला
मनोगतांचे हसेच होते पहिल्या दिवशी
साऱ्यांचे का असेच होते पहिल्या दिवशी
गज़्‍ालचे बाह्य निकष, छंद, रदीफ़, काफ़िया इ. असले तरी आंतरिक निकष सुबोधता, संप्रेषणीयता व तरलता आहे या निकषांवर हे शेर पारखायला हवेत.
मूलत: गायक व गीतकार कवी असल्यामुळे रणदिवेंच्या रचनांत लयदार छंद स्वाभाविकपणे आढळतात. त्यांच्या गजलेत कवितेची अर्थवत्ता व गीतांची कर्णमधुरता संगीतकारांना स्वरबद्ध करण्यास मोहीत करत नसेल तरच नवल.
गज़्‍ाल कधी कधी कवितेच्या अंगाने जाते. कशी ते खालील शेरांवरून स्पष्ट होईल-
विशालतेचा धसका घेते उमेद खचलेली
पंखावर आभाळ तोलतो विहंग एखादा

दोन डोळय़ांनीच सारा घेतला पाऊस ज्याचा
ते निळे आभाळ आता यापुढे भरणार नाही

त्याचप्रमाणे ती कधी गीतांच्याही अंगाने साकारते-
भोवताली थांबले क्षण सुखद आता
सांगते हिरव्या चुडय़ाला हळद आता

पहाटे चंद्रसाक्षीने तुझ्या गात्री उरावा मी
सुगंधी रातराणीचा तुला द्यावा पुरावा मी
‘सांगावा’, ‘सनद’, ‘रंग’, ‘उधाण’ इ. शीर्षकाच्या गज़्‍ालांचे शेर तरल रंगात न्हालेले आहेत.
रणदिवेंच्या गीतातही तरलता अन् शब्द लावण्य प्रकर्षांने जाणवतं. खरं तर गीतात स्वर लालित्य हे शब्दांपेक्षा किंचित
वरचढ असतं. पण रणदिवेंना गीतांतही वाङ्मयीन मूल्य
जपत शब्द-स्वरांचा समतोल समन्वय केला आहे.
रडताना हसते संध्या केशरी नभाच्या दारी
मेंदीत लपवते जखमा, का दु:ख तिचे जरतारी
थांबली का शब्द-सुमने या तुझ्या ओठावरी?
बोल ना काही तरी तू बोल ना काही तरी!
‘अद्वैत’, ‘स्मरतं पुन्हा पुन्हा रे’, ‘बहुमोल जीवन’, ‘चातक याचना’, ‘अता न जागणार मी’ या रचना, कविता व गीताचा संगम म्हणता येईल. या रचना आशयगर्भ व नादमधुर आहेत.
कोणत्याही वाङ्मयीन रचनेतील गद्य व पद्य स्वरूपाची पृथकता सिद्ध होते ती पद्याच्या गेयतेमुळे. छंदोबद्धतेमुळे, मग ती रचना गज़्‍ाल गीत वा अन्य कोणत्याही फॉर्ममध्ये अवतरो. मात्र गज़्‍ाल तंत्रविज्ञानाच्या शाळेतून बाहेर पडलेल्या व पहिलीच रचना गज़्‍ालेतून साकारणाऱ्या उदंड गज़्‍ालकारांच्या गर्दीतून खरा गज़्‍ालकार कवी शोधणं कर्मकठीण जरी मानलं तरी त्यांस रसिकमनांची चाणाक्ष दृष्टी मात्र अचूक हेरते. अशा मोजक्या गज़्‍ालकार कवीत रमण रणदिवेंची गणना होते.
वर्तमानातील अवतीभवती घडणाऱ्या घटना व त्यामुळे समाज जीवनावर होणाऱ्या दु:खद परिणामामुळे संवेदनशील रणदिवेंच्या कवीमनात विचारांचं एक काहूर उठतं अन् ते काहूर त्यांना शब्दबद्ध करण्यास प्रवृत्त करतं अन् ते म्हणतात-
ऐकतो मी हाक कोऱ्या कागदाची
गजल कासावीस होते काळजाची.
आपल्या तरल सौंदर्याने लयबद्ध लावण्याने मंत्रमुग्ध करण्याचे अद्भुत सामथ्र्य रमण रणदिवे यांच्या कविता, गज़्‍ाला आणि गीतांमध्ये आहे. अजातशत्रू व गुणग्राहकता ही त्यांची ओळख त्यांच्या सत्त्वगुण व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. त्यांची ही वैशिष्टय़े त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांच्या कवितेतही दिसतात. त्यामुळे त्यांची कविता लक्ष वेधून घेणारी ठरते. आज गज़्‍ाल ज्या उदंड प्रमाणात लिहिली जाते आहे. पण रमण रणदिवे यांच्या कविता आणि गज़्‍ाला वैशिष्टय़पूर्ण आणि दर्जेदार आहेत.
‘काहूर’ – रमण रणदिवे, प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे,  पृष्ठे – ७१, मूल्य- १०० रुपये.