जेसिका आपल्या बागेतल्या सगळ्या फुलांची खूप काळजी घ्यायची. पण त्यातली पिवळ्या डॅफोडिलची फुले तिला खूपच आवडायची. ऋतू बदलला. बर्फ पडायला लागले आणि त्या पिवळ्या डॅफोडिलच्या कुंडीत एकच फूल राहिले. जेसिकाने ती छोटीशी फुलाची कुंडी उचलली आणि आपल्या तळघरातल्या खिडकीशेजारी नेऊन ठेवली. आजूबाजूला कोणी माणसे नाहीत, झाडे नाहीत, खिडकीतून बाहेर बघितले तर फक्त पांढराशुभ्र बर्फ. पिवळ्या डॅफोडिलला फार वाईट वाटले. त्याला खूप एकटे वाटायला लागले. बागेतल्या इतर झाडांची आठवण येऊन त्याला रडू यायला लागले.असेच काही दिवस गेले. एक दिवस पिवळे डॅफोडिल अगदी कंटाळून गेले. तेवढय़ात त्याला शेजारच्या खिडकीवर ‘टक टक’ असा आवाज ऐकू आला. डॅफोडिलने ‘कोण आहे?’ असे विचारल्यावर बाहेरून आवाज आला, ‘मी बर्फ, स्नो. खिडकी उघड, मला तुझ्याशी खेळायला आत यायचे आहे.’ पण डॅफोडिलने खिडकी उघडली नाही आणि त्याला आत येऊ दिले नाही.दुसऱ्या दिवशी परत एकदा खिडकीवर ‘टक टक’ झाली. डॅफोडिलला वाटले बर्फ आला, म्हणून ते त्याला रागावले आणि म्हणाले, ‘मी तुला काल सांगितले ना तुला आत घेणार नाही म्हणून. तू इथून जा.’ते ऐकून बाहेरून आवाज आला, ‘मी बर्फ नाही, वारा आहे. मला तुझ्याशी खेळायला आत यायचे आहे. खिडकी उघड ना.’डॅफोडिल म्हणाले, ‘मला बर्फामुळे आणि वाऱ्यामुळे थंडीचा त्रास होऊ नये म्हणून इथे ठेवले आहे. तुम्ही दोघे जर आत आलात तर मला थंडी वाजेल. मी तुम्हाला अजिबात आत घेणार नाही.’वारा आणि बर्फ निराश होऊन परत गेले.असेच बरेच दिवस उलटले. खिडकीवर परत एकदा ‘टक टक’ आवाज आला. बाहेर डोकावले तर त्याला कोणीच दिसले नाही. बाहेर पांढरा बर्फही दिसला नाही. मग त्याने इकडे तिकडे बघितले तर त्याला जमिनीवर छोटी छोटी झाडे उगवलेली दिसली. झाडांवर नवीन पालवी फुटलेली दिसली. म्हणजे ऋतू बदलला होता तर!इतक्यात खिडकीवर परत ‘टक टक’ झाली आणि बोलण्याचा आवाज आला. ‘आम्ही सूर्याची किरणे आहोत. एकटे बसून तुला कंटाळा आला आहे ना? चल, आम्ही तुला बाहेर घेऊन जायला आलो आहोत. बाहेर बघ, किती सुंदर वातावरण आहे. पटकन खिडकी उघड.’पिवळ्या डॅफोडिलला बाहेर जायचे ह्या कल्पनेनेच खूप आनंद झाला. त्याने हळूच खिडकी उघडली आणि त्यातून सूर्याची किरणे आत आली. त्यांच्या उबदार स्पर्शाने डॅफोडिल सुखावले आणि सूर्यकिरणांकडे बघून खुदकन हसले.सूर्यकिरणांनी पिवळ्या डॅफोडिलला अलगद उचलून खिडकीच्या बाहेर नेले. बाहेर गेल्यावर वाऱ्याने त्याला प्रेमाने मिठी मारली. वसंत ऋतूची सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र चतन्यमय वातावरण होते. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याचा आवाज आणि सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेली अवघी धरणी बघून पिवळे डॅफोडिल आनंदले.त्याने इकडेतिकडे बघितले, पण त्याला बागेतली टय़ुलिपची, लिलीची आणि त्यांच्याबरोबरची इतर कोणतीच फुले दिसली नाहीत. त्याच्या लक्षात आले, की बर्फ आणि बोचऱ्या थंडीपुढे त्या फुलांचा निभाव लागला नसणार.जेसिकाने तिच्या आवडत्या डॅफोडिलला बर्फाचा आणि गार वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून तळघरात ठेवले होते, म्हणूनच ते टिकून होते, नाहीतर त्याचीसुद्धा इतर फुलांसारखीच अवस्था झाली असती.बागेतली नवीन रंगीबेरंगी फुले बघून पिवळे डॅफोडिल खूश झाले. त्याने मनात जेसिकाचे आभार मानले आणि वारा व सूर्यकिरणांकडे बघून खुशीत मान डोलावली.(डच कथेवर आधारीत)गोष्ट सांगा गोष्ट!‘रिक्षावाली मुलगी’हेरंब कुलकर्णी herambrk@rediffmail.com‘रिक्षावाली मुलगी’ हे एका बंगाली मुलीवरचे मराठीतील अनुवादित पुस्तक- जे वाचायलाच हवे असे. नईमा ही सायकलरिक्षा ओढणाऱ्या गरिबाची मुलगी. ती सुंदर बंगाली चित्र काढायची. बापाचे कष्ट बघवत नाहीत म्हणून स्वत: सायकलरिक्षा चालवून पसे कमावयाचे, असे ती मनाशी ठरवते. रिक्षा चालवायला शिकतानाच अपघात होऊन रिक्षा मोडते. रिक्षाच्या दुरुस्तीसाठी आईला सोन्याची बांगडी मोडावी लागणार असते. तेव्हा नईमा स्वत:लाच अपराधी समजून परगावच्या रिक्षा दुरुस्तीच्या दुकानात पायी जाते, तेही पुरुषाचा वेष करून. ‘मी चित्र रंगवते, त्याबदल्यात रिक्षा दुरुस्ती करा’, असे दुकानदाराला सांगणाऱ्या नईमाची ही गोष्ट आहे. इतकी साधी कथा, पण लेखिकेने बांगलादेशातील केळीच्या बागा, गरिबी, मुस्लिम कुटुंबातील वातावरण, नईमाची तगमग, तिचा मित्र जावेद हे इतके हुबेहूब रेखाटलंय की नकळत आपण बांगलादेशात जातो. पुस्तकाच्या पानापानांवर तिची कल्पनाचित्रे आहेत. बांगलादेशात मुलींवरची बंधनं, त्यांचा सामाजिक स्तर हे पुस्तकाचा विषय नसला तरी तो कथेच्या ओघाने आला आहे. नईमाचे भावविश्व, कुटुंबियांचे प्रेम, वडिलांच्या कष्टाने तिची होणारी तगमग, नईमाचे संवेदनशील, कलासक्त, निरागस मन हे सारं मनात रुतून राहतं. अशी पुस्तकं आपल्याला देश-राज्याच्या सीमा ओलांडून अधिक संवेदनशील बनवतात. ‘रिक्षावाली मुलगी’- मिताली पíकन्स,अनुवाद - सुनंदा अमरापूरकर,ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे रेणू गावस्कर या सामाजिक कार्यकर्त्यां. त्या उत्कृष्ट कथाकथन करतात. ‘गोष्टी जन्मांतरींच्या’ या पुस्तकात रेणुताईंचा जागतिका साहित्याचा अभ्यास, संवेदनेने ओथंबलेली भाषा, उत्कटता आणि गोष्ट सांगण्याच्या पद्धतीने केलेले लेखन बघता हे पुस्तक आपण वाचत नाही, तर ऐकतोच आहोत असेच जाणवते.इसापपासून पुस्तक सुरू होते. अद्भुत आणि वास्तव, बक्षीस आणि शिक्षा, वास्तव आणि परिकथा, दोस्तीच्या सत्याची किंमत, लोककथाचं जग, लोककथा आणि शिक्षण, पुराणकथांचं विश्व, भूतकथा, रवींद्रनाथ -अॅन्डरसनच्या गोष्टी आणि साने गुरुजींची गोष्ट असे अनेक विभाग केलेत. त्यामुळे एकूणच पुस्तक कमालीचे रंजक झाले आहे. गोष्टीचे सर्व प्रकार विविध देशाच्या वैविध्यासह संकलित झालेत.अद्भुततेचे महत्त्व सांगताना गालिच्यात गुप्त होणाऱ्या सुंगणिची कहाणी त्या सांगतात. जगप्रसिद्ध चित्रपट ‘चिल्ड्रेन फ्रॉम हेवन’ची पटकथा अतिशय उत्कंठतेने मांडतात. वास्तव आणि परिकथा या भागांत त्या हेलन केलरची गोष्ट सांगतात. मत्रीचं महत्त्व सांगणाऱ्या जगभरातल्या गोष्टींविषयी त्यांनी एक विशेष विभाग लिहिलाय. रेणुताईंनी पुस्तकात जपानी, चिनी, फ्रेंच, जर्मन, ब्रिटिश आणि भारतीय अशा लोककथांचे नमुने दिले आहेत. भुताच्या गोष्टींभोवती जगभर कशी गुंफण झालीय हे त्या विविध उदाहरणांतून सांगतात. अॅडरसन आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यावर स्वतंत्र विभाग लिहिलाय. साने गुरुजींवर लिहून पुस्तकाचा शेवट केलाय.एकूणच हे पुस्तक म्हणजे मराठी गोष्टीविश्वात जागतिक कथाविश्वाची भर घालणारा ऐवज आहे. त्याचबरोबर आपण किती वाचायला हवं याची नकळत जाणीव करून देणारं आहे. ‘गोष्टी जन्मांतरीच्या’ रेणू गावस्कर,शब्द प्रकाशन, मुंबई.