घोळक्या-घोळक्यांनी लोक निघालेत. त्यांना साधायची आहे संध्याकाळची वेळ. पुरुष, बायका, म्हातारे, तरुण, लेकरं असे जथ्थे आतुर झालेले. या गर्दीला सोल्जरांकडून जागोजागी अडवलं जातंय. सुरक्षेच्या कारणानं तपासलं जातंय. भोवताली सगळं तणावग्रस्त वातावरण. जागोजागी बंदूक रोखून सोल्जर पहारा देताहेत. रंगीबेरंगी माणसांनी प्रशस्त रस्ता भरून गेलाय. गर्दीत हिंदीशिवाय तेलगू, तामीळ, गुजराती, बंगाली, पंजाबी, मराठी अशा अनेक भारतीय भाषा कानावर पडताहेत. परदेशी पाहुण्यांचीही शांत, संयत उपस्थिती आहे.
रस्ता कधी संपत नसतो. एक तर पाय थकतात किंवा प्रवासाचा ठेपा आलेला असतो. तसाच हा गर्दीनं ओसंडून वाहणारा आतुर रस्ता थांबला. समोर एका भव्य गेटनं रस्त्यावरच्या पावलांना मज्जाव केला.. म्हणजे पुढं जायला बंदी होती. कारण तो प्रदेश आपला नव्हता. स्पष्टच सांगायचं तर तो प्रदेश पारंपरिक शत्रूचा होता. मग एवढय़ा संख्येनं हे लोक शत्रूच्या प्रदेशावर चालून तर जात नव्हते? छे! छे! ही सारी पापभिरू पर्यटक माणसं. काठावरून पूर पाहताना घाबरणारी. पण अशा माणसांतील देशभक्ती जागी केली जातेय. हिंदुस्थानचा जयघोष पुकारून वातावरणात जोश आणला जातोय. बुलंद आवाजाचा एकजण कण्र्यातून त्यासाठी आवाहन करतोय. त्याच्या घुमणाऱ्या ‘हिंदुस्थान..’ अशा सादाला आतुर लोकांचा समूह ‘जिंदाऽऽबाद’ असा प्रतिसाद देतोय. यातच वातावरणाला कापत येणाऱ्या खडय़ा सैनिकी आवाजात ‘परेऽऽड’ घुमू लागते. सगळं वातावरण भारून जातं. आता गर्दी गेटजवळच्या मोकळ्या जागेत स्थानापन्न होतेय. तिथं प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारलेल्या. व्हीआयपींसाठी खुच्र्या टाकलेल्या. खचाखच भरलेल्या या स्टेडियमवर गेल्या अनेक वर्षांपासून ही परेड होत असते. वाघा बॉर्डरवर होणारा हा सोहळा पर्यटकांना आकर्षून घेतो.
ज्यांनी ही परेड स्वत: पाहिलेली आहे त्यांनी हा ‘तयार केलेला’ थरार अनुभवलेला असतो. पण ज्यांनी ही परेड प्रत्यक्ष पाहिली नसेल त्यांनी टीव्हीवरची फेविक्विकची ‘तोडो नहीं, जोडो’ ही जाहिरात आठवावी. पाकि स्तानी आणि भारतीय सैनिक त्वेषाने परेडच्या नावाखाली दणादण पाय आपटताहेत. नेमकं पाकिस्तानी सैनिकाच्या बुटाचं सोल निघतं. (ही जाहिरात पाकिस्तानात दाखवायची असेल तर भारतीय सैनिकाच्या बुटाचं सोल निघेल.) भारतीय सैनिक परेड सुरू असताना त्याला फेविक्विक देतो. पाकिस्तानी सैनिकाच्या बुटाचं सोल जोडलं जातं. पाश्र्वभूमीवर ‘तोडो नहीं, जोडो’ असा संदेश झळकतो. ही जाहिरात या वाघा बॉर्डरच्या परेडवरच आधारित आहे. खरं तर दुश्मनी उगाळत बसण्यापेक्षा दोस्तीसाठी हात पुढं करणं हे सर्वाच्याच हिताचं असतं. सौहार्द वाढवणं हाच या परेडचा मूळ हेतू असावा. आज मात्र या परेडला सीमेवरच्या नौटंकीचं स्वरूप आलेलं आहे. या परेडमधील हावभाव संघर्षांचा पवित्राच उजागर करतात. त्यामुळे दोन्ही देशांतील पारंपरिक खुन्नसच रोज आळवली जाते. गेटपलीकडचे पाकिस्तानी सैनिक आणि नागरिक दिसल्यावर तर ‘हिंदुस्थान जिन्दाबाद’चा नारा अधिकच चेकाळतो. गर्दीच्या देहबोलीत खुन्नस जाणवायला लागते. रेडय़ांची टक्कर पाहताना जमलेल्या लोकांनी हवेत फेटे उडवावेत, टाळ्या वाजवाव्यात, तसं वातावरण तयार होतं.
एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या दोन देशांत सौहार्दानं हात मिळविण्याचा खरं तर हा सोहळा; पण दृश्यरूपात मात्र खुन्नसच भरून राहिलेली. फेविक्विकच्या जाहिरातीतसुद्धा त्या सैनिकांचं अती पाय आपटणं त्रासदायक वाटतं. वाटलं, जाहिरातीत बुटाचं सोल काढायचं म्हणून जास्तीचे पाय आपटले असतील. पण प्रत्यक्षातही भयंकर पाय आपटण्याचा त्रासच होतो. त्या सैनिकांच्या चेहऱ्यावरचे भावही रौद्र आणि उग्रच आहेत. सैनिकी संचलनात पाय आपटण्याला वेगळा काही सिद्धतेचा अर्थ असेल, पण दिसताना मात्र आपल्याला ठळक क्रोध किंवा बदलाच जाणवत राहतो. आधी ही परेड साध्या स्वरूपात होत असणार.. पण जसजसा ‘टीआरपी’ वाढत गेला तसतसं त्याला एक उत्सवी स्वरूप येत गेलं असावं. दोन बाजू. दोन पक्ष. दोन देश. ‘हिंदुस्थान जिंदाबाद’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा दोन घोषणा. हिरवा आणि तिरंगा असे दोन रंग. एका गेटवर महात्मा गांधी, तर दुसऱ्या गेटवर बॅ. जीना असे दोन फोटो. या पाश्र्वभूमीवर एकमेकांविरुद्ध चित्कारणारे दोन समूह. यांत रोज टक्कर घडवली जाते. हहा मधील मारामाऱ्या जशा पूर्वनियोजित असतात, तशीच ही देशभक्तीची टक्करही ठरवल्यासारखी! सौहार्दाच्या नावाखाली दररोज साजरी होणारी ही खुन्नस न पटण्यासारखीच. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या, रोज कुरापती काढणाऱ्या, सीमेवरच्या निरपराध लोकांवर गोळीबार करणाऱ्या, भारतात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचं समर्थन करताच येणार नाही. पण याचा अर्थ हा राग रोज ‘साजरा’ करावा असा होत नाही. परेडच्या शेवटी पाकिस्तान आणि भारताचे सैनिक एकमेकांशी हस्तांदोलन करतात. हा क्षण त्या परेडचा अत्युच्च क्षण ठरायला हवा होता. पण याउलट रौद्ररस चेहऱ्यावर ओसंडताना सैनिक पाय आपटत एकमेकांना खुन्नस देतात तो क्षण लोकांना अधिक भावतो. लोक त्यावेळी चेकाळतात. वरतून घोषणा देऊन लोकांना अधिक पेटवलं जातं. त्यामुळे ही परेड म्हणजे रेडय़ांची टक्करच ठरते.
का कोण जाणे, पण ही परेड पाहताना लहानपणी पाहिलेली रेडय़ांची टक्करच आठवत होती. रेडा हा तसा प्रमाणभाषेतला शब्द झाला. आमच्याकडे त्याला ‘हलगट’ असा शब्द वापरायचे. दिवाळीच्या वेळी गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत या टकरी व्हायच्या. पंचक्रोशीतले रेडे या टकरीसाठी येत. वर्षभर या रेडय़ांना तयार केलं जाई. तुकतुकीत काळ्याशार रंगाचे सजवलेले हे रेडे उन्हात चमकायचे. या रेडय़ांना वर्षभर भरपेट खुराक असे. नदीकाठच्या वाळूत पळवून त्यांच्या पायांतली मजबुती वाढवीत. टकरीच्या आदल्या रात्रभर तोंड वरती झाडाला बांधून ठेवलं जाई. पुंग्या, डफडं वाजवत हे वेगवेगळ्या गावचे रेडे मैदानात दाखल होत. पताका लावून सजलेल्या मैदानात लोक चेकाळलेले असत. लाऊडस्पीकरमधून रेडय़ांबद्दल माहिती व इतर सूचना सुरू असत. कुणाचा रेडा जिंकतोय, यापेक्षा रेडे एकमेकांना भिडतानाचा थरार प्रेक्षकांना हवा असे. गावातले धुरिण फेटे बांधून मैदानात संयोजक म्हणून मिरवत असत. दोन रेडे विरुद्ध बाजूंनी येऊन एकमेकांना भिडत. या टकरीत जोश आणण्यासाठी ‘डडंग डांगचिक..डडंग डांगचिक’ डफडं वाजायचं. (हे म्हणजे वाघा बॉर्डरवर ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ म्हणण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देण्यासारखंच!) फुसफुसणारे दोन बलवान रेडे मग सर्वशक्तीनिशी भिडायचे. शिंगांत शिंगं अडकायची. शिंगांमुळे त्यांच्या पाठी रक्तबंबाळ व्हायच्या आणि लोक टाळ्या वाजवत असायचे. हरलेला रेडा वाट फुटेल तिकडं जिवाच्या आकांतानं पळत सुटायचा. जिंकलेला रेडा त्याचा विजयी पाठलाग करायचा. बऱ्याचदा या धुमश्चक्रीत शेजारच्या शेतातल्या उभ्या पिकाची नासाडी व्हायची. एकदा असाच हरलेला रेडा पळत सुटला आणि नेमका आम्हा लहान मुलांकडे आला. लाकडी कठडा रोवलेला होता, पण बेभान रेडय़ांना कठडा तोडायला फार वेळ लागला नसता. आम्ही पोरं चिरडलोच असतो. पण काही कळायच्या आतच मैदानात फेटेधारी माणसांनी धावाधाव केली आणि त्या रेडय़ांना हुसकून लावलं. तेव्हा त्या रेडय़ाची शिंगांमुळे चिरलेली पाठ आणि काळ्याशार पाठीतून ओघळणारं रक्त मी पाहिलं होतं. मालकाच्या प्रतिष्ठेसाठी रक्तबंबाळ होणारे रेडे काय, किंवा देशाच्या सन्मानार्थ पाय आपटणारे सैनिक काय, दोघेही असहायच वाटतात. आपला खेळ होतो आणि त्यांचा जीव जातो.
आज या परेडच्या टकरीत कुणीही कुणाला दृश्य स्वरूपात रक्तबंबाळ केलेलं नव्हतं. पण वेळोवेळी सीमेवर, बॉम्बस्फोटांत, युद्धात सांडणाऱ्या रक्ताचा गंध या परेडला आहे. जसा भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना फक्त क्रिकेटचा कधीच नसतो. ही साप-मुंगसाची झुंज पाहायला जग उत्सुक असतं. आमच्यातली दुश्मनी जुनाट रोगासारखी घर करून आहेच. कधी आम्ही समझोता करायचा प्रयत्न केलाच तर अनेक संधिसाधू शक्ती डफडं वाजवून पुन्हा टक्कर लावून देतात. त्यामुळे थंडी- ऊन- वाऱ्यात सीमेचं रक्षण करताना सैनिकासोबत मृत्यू असतो. वास्तविक वाघा बॉर्डवरच्या कुंपणापलीकडचा गहूही अलीकडच्या गव्हासारखाच आहे. भारतीय गेटजवळच्या पिंपळावरचे पक्षी पाकिस्तानच्या आभाळात जाताना मी पाहिले. या पिंपळाच्या मुळ्या जमिनीखालून पाकिस्तानच्या मातीतलं पाणी शोषत असणारच. जमिनीवर महाकाय तारांनी अधोरेखित झालेल्या सीमारेषेसारखी कुठलीच रेषा आभाळात दिसत नव्हती. दोन्ही बाजूंच्या घोषणा वेगळ्या होत्या, पण दोन्हीकडच्या माणसांत माणूस म्हणून काहीच फरक नव्हता. तरीही या दोन गेटच्या उघडझापीच्या साक्षीनं हे परेडचं नाटक रोज रंगवलं जातं. याला कारण तो आता एक ‘इव्हेंट’ झालाय. दुकानं बहरलीत. रोज एक जत्रा भरते. पाय आपटत झेंडा चढवण्याचा, उतरवण्याचा ‘शो’ लोक पाहतात. सैनिकांबरोबर सेल्फी काढतात. जोरजोरात घोषणा देऊन थकतात. मग तिथं थाटलेल्या हॉटेलांतून भरपेट फास्टफूड चापतात. आइस्क्रीम फस्त करतात. फ्लॅश चमकवत फोटो काढतात. रंगलेलं नाटक संपतं. नंतरचं रिकामं प्रेक्षागृह भयाण असतं. इथंही अंधार भरून येताना बॉर्डर सैनिकांच्या हवाली करून लोक सुरक्षित आरामदायी स्थळी जायला निघतात.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व यमक आणि गमक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama on border
First published on: 26-04-2015 at 12:16 IST