महेश एलकुंचवार – maheshelkunchwar@gmail.com

खूप सुंदर, खूप मोठी ज्ञानी माणसे मी पाहिली. त्यांच्याकडून थोडेबहुत मी माझ्या वकुबाप्रमाणे घेतले. त्यांचा जिव्हाळा मला मिळाला. सगळे एकेक करीत हे जग सोडून गेले. पण ह्य सर्वाशी असलेले माझे नाते निश्चित (define) झालेले होते. त्यामुळे ही सर्व मंडळी काळाने नेली तेव्हा दु:ख झाले, पण काही अपुरे राहिले असे मात्र वाटले नाही. अल्काझींच्या जाण्याने मात्र तसे वाटते आहे.

Joseph Mengele nazis Doctor The Disappearance of Josef Mengele
चारचौघांतला ‘क्रूरकर्मा’!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
What A K Antony Said About Son Anil ?
“भाजपात गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे, कारण..”, ए.के. अँटनी यांचं वक्तव्य चर्चेत
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

अल्काझी गेले हे कळल्यावर पहिला विचार मनात आला तो  I am orphaned. एरव्ही माझे विचार मराठीतच येतात; पण हा मात्र इंग्लिश भाषेतच आला. अल्काझींचा आंतरराष्ट्रीय कलावंत परिवार आणि त्यांचे एकूणच ब्रिटिश  cosmopolitan व्यक्तिमत्त्व ह्यमुळे असेल, पण तसे झाले खरे. मी अनुराधा (कपूर)ला फोन करून तसे म्हटले तर ती ‘We are all orphaned, Mahesh!’ असे म्हणाली. त्याच वेळी कळले की, हीच भावना सर्व भारतातल्या नाटय़धर्मीची असणार. इथे भारतातच नव्हे, तर इंग्लंडमध्ये गेली साठ वर्षे स्थिरावलेल्या अलकनंदा समर्थपर्यंत सगळ्यांनाच आपल्यावरचे छायाछत्र गेले अशी ह्यपुढे कायम आपल्याबरोबरच राहणारी खोल अशी जाणीव झाली असणार.

ह्य सगळ्यांचा अल्काझींशी खूप संबंध आलेला होता. भारतातले नाटय़क्षेत्रातले कुठलेही नामवंत व्यक्तित्व घ्या, ते सर्व अल्काझींशी विद्यार्थी म्हणून बांधले गेले होते. त्यांचा अल्काझींशी दाट परिचय होता. प्रदीर्घ काळ त्यांना एकमेकांचा सहवास मिळालेला होता. अल्काझींबद्दल भरभरून बोलावे असे त्या सगळ्यांजवळ खूप होते. त्यामुळे हा लेख नसीरने, सुरेखा (सिक्री)ने किंवा उत्तरा बावकरांनी लिहिला असता तर ते अधिक उचित झाले असते. एकदा नसीरशी बोलताना मी विचारले होते की, अल्काझी कसे आहेत? फार संतापी आहेत का? त्यावर तो म्हणाला, ‘His virtues far outweigh his faults.’ त्यानंतर कितीतरी वेळ अल्काझींच्या गुणसंपदेबद्दल तो जे बोलत होता त्याने आपल्या नशिबी हे काही नव्हते अशी सूक्ष्म कळ माझ्या मनात उठली होती. कारण अल्काझींना मी तोवर पाहिलेसुद्धा नव्हते.

मी त्यांना फार उशिरा भेटलो. १९९२ साली. तोपर्यंत राष्ट्रीय नाटय़विद्यालय त्यांनी सोडूनसुद्धा वर्षे झाली होती. पण तोपर्यंत ते एक महान मिथक झालेले होते. मी नाटकाच्या क्षेत्रात आलो तेव्हासुद्धा ते मिथकच होते व ते काळाबरोबर वाढत वाढत मोठे झाले होते. त्यांच्याबद्दल मी कायमच ऐकत होतो व दरवेळी मला वाटत होते की, आपलीच कशी कधी त्यांच्याशी भेट झाली नाही? आपल्यालाच कसे त्यांच्याकडून काही शिकायला मिळाले नाही? आपले शिक्षण रंगकर्मी म्हणून, लेखक म्हणून, माणूस म्हणून आता कायम अपुरे राहणार, ही खंत कायम मनात असे. एक मोठीच गोष्ट घडली नाही आयुष्यात.. एक कायमचे राहून गेले. ते एखादे वेळी नुसते दिसले तरी किती धन्य वाटेल आपल्याला. पण हे कसले घडणार, हीसुद्धा खात्री मनात होतीच. त्यांचा वावर सगळ्या जगभर.. आणि मी इथल्या मूठभर नाटकातला लहानसा माणूस. ही छोटीशी आशाही मी सोडून दिली होती.

आणि अशात ते अनपेक्षितपणे दिसले. दिल्लीला कुठेतरी माझे भाषण होते- आधुनिक मराठी रंगभूमीवर. मी व्यासपीठावरून समोर पाहिले तर पहिल्याच रांगेत अल्काझी. एखाद्या शिस्तशीर श्रोत्याप्रमाणे कार्यक्रम केव्हा सुरू होतो याची शांतपणे वाट पाहत बसले होते. क्षणभर सुचेचना. काय करू? मी सरळ व्यासपीठावरून खाली आलो व त्यांच्यासमोर वाकून म्हटले, ‘‘मी महेश.’’ ते ताबडतोब उभे झाले व माझ्याशी हस्तांदोलन करत हसून म्हणाले, ‘Finally!!’ मीही म्हटले, ‘Finally.’ त्यांनी सहज रीत म्हणून ‘फायनली’ असे म्हटले असेल, पण मी ‘फायनली’ म्हटले त्यामागे आधीची पंचवीस वर्षे मला वाटत राहिलेली आशा, मी पाहिलेली वाट, उत्कंठा, त्यांच्या अव्यभिचारी कलाजीवनाबद्दल मला वाटत असलेले प्रेम व श्रद्धा.. अशा कितीतरी गोष्टी एकदमच इतक्या उचंबळून आल्या होत्या, की मी ‘फायनली’ म्हटले ते धडपणी माझ्या तोंडून निघाले तरी की नाही, त्यांना ते ऐकू तरी गेले की नाही.. काही म्हणता काही मला आठवत नाही. पण माझ्या आयुष्यातला तो एक अपूर्व सुंदर, अपूर्व समाधानाचा क्षण होता. भरून पावलो, मिळाले, आता आणखी काही नको, काही राहिले नाही असे त्यावेळी वाटले. मग मी भाषण दिले खरे, पण त्या दिवशी मी फक्त त्यांच्यासाठी बोलत होतो.

जबरदस्त कलासाधना केलेली, ज्ञानवंत माणसे माझ्या आयुष्यात खूप आली. त्यांनी मला दिलेही भरभरून. विचार दिला, जीवनदृष्टी दिली, कलासिद्धीच्या वाटेवरचे अनुभव सांगितले, भावनिक पातळीवर खोल जिव्हाळा दिला. त्यांच्याबद्दल विचार करताना कृतज्ञ वाटते. पण अल्काझींना मी पाहिलेही नव्हते तेव्हापासून त्यांना मी माझ्या बाजूने गुरुपद देऊन टाकले होते. त्यांची गुणवत्ता, त्यांची ज्ञानवत्ता, त्यांनी भारतीय नाटय़क्षेत्रात केलेली मूलभूत पायाबांधणी, त्यांचा ललितकला, तत्त्वज्ञान, धर्म, मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानक्षेत्रांतला अधिकार सगळ्यांसारखाच मलाही माहीत होताच. खऱ्या अर्थाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेले, रनेसां व्यक्तिमत्त्व असेच ते होते. पण त्यांच्याबद्दल लिहायचे तर लिहिणाऱ्याचीही तेवढी तयारी पाहिजे. पण असाच गुरू असावा, अप्राप्य प्राप्य व्हावे अशी माणसाला ओढ असते, तसेच माझे त्यांच्याबाबत झाले होते. मी एकदा अमालला (अल्लाना.. अल्काझींची मुलगी) म्हटले, ‘‘मी एकलव्य आहे की नाही माहीत नाही; पण अल्काझी माझे द्रोणाचार्य नक्कीच आहेत.’’ त्यावर ती हसली आणि म्हणाली, ‘‘तर! And so impeccably dressed!’’ तेही खरेच. सुटाशिवायचे अल्काझी डोळ्यासमोरच येत नाहीत.

माझ्या भाषणानंतर माझा निरोप न घेताच ते गेले होते. आता कशाला पुन्हा आपण भेटतो, दिसले हेच खूप झाले अशी स्वत:ची समजूत घालत मी नागपूरला परतलो. एवढी पुंजी छातीशी घट्ट धरून मी समाधानाने आयुष्य काढायला तयार होतो. तर अकस्मात एक दिवस त्यांचे मला एक पत्र. प्रदीर्घ, अप्रतिम डौलदार इंग्लिशमध्ये, स्वहस्ताक्षरात लिहिलेले. त्यांनी चिटणीसाकडून मुद्रांकित केलेले पत्र न पाठवता स्वत: ते पत्र लिहिले ह्यतच खूप गोष्टी होत्या. आपण एवढे महत्त्वाचे वाटतो ह्यंना की जवळचे वाटतो? दोन्ही शक्यता नव्हत्या. पण ज्याला पत्र लिहितो त्याला सन्मान देण्याची ती त्यांची पद्धत होती. इतके अबोल, अंगावर न येणारे, सूचक, अभिजात सौजन्य. त्यानेच मन भरून गेले. पण मन भरून जाण्याचे असे प्रसंग आणखीही पुढे येणार होते.

हे पत्र १९९२ सालच्या मध्यावरचे आहे. त्यांना माझी ‘वाडा’ नाटय़त्रयी दिल्लीला हिंदीत करायची होती. अनेक वर्षे परदेशात राहून दिल्लीला पुन्हा नाटक करायचे ठरवून ते आले होते. नवे विद्यार्थी, नवे नाटक, नव्याने सुरुवात. त्यांचाही उत्साह तरुणासारखाच. मी त्यांना विचारले की, तुम्हाला हिंदी संहिता मिळाली तरी कुठे? कारण तोपर्यंत वसंतराव देवांनी त्रयीतली पहिली दोन नाटकेच भाषांतरित केलेली होती. त्यांनी लिहिले की, पहिल्या दोन्ही भागांचे अनुवाद त्यांना मिळालेले आहेत व तिसऱ्या भागाचा तोंडी अनुवाद त्यांनी उषा बॅनर्जी (सरपोतदार) ह्यंच्याकडून ऐकलेला आहे. आपण कामाला तर लागू. तोपर्यंत तिसऱ्याचाही अनुवाद होईलच. त्यांना तो फार आवडलेला आहे.

आता ही गोष्ट १९९२ मधली. ही त्रयी मराठीत होते तरी की नाही, अशी समजूत. तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यत कुठे नव्हता. चंदूने केलेली त्रयी यायला १९९४ साल उजाडावे लागले. अल्काझी म्हणाले, ‘‘मी मोजकेच प्रयोग करणार. तर तू हो म्हणशील का?’’ माझी मजाल होती का नाही म्हणण्याची? ही संधी कोण सोडील? मी ‘हो’ म्हटले व दिल्लीत तालमी सुरू झाल्या. त्या काळातला आमचा पत्रव्यवहार खूप हृद्य आहे. पण त्याबद्दल लिहिण्याची ही जागा नाही. आणि ती ठेव फार खासगीही आहे.

तिसऱ्या भागाचे भाषांतर वेळेत झाले नाही म्हणून मग दोनच भाग अल्काझींनी केले. प्रयोगाचे आमंत्रण मला आले. मी दिल्लीला गेलो. पुढे जे अल्काझी मी पाहिले त्याने अभिजात सुसंस्कृत वागणे म्हणजे काय, याचा जो प्रत्यय मला आला तो भारतात कुठल्याही लेखकाला येणे जवळजवळ अशक्यच. विमानतळावर कोणीतरी घ्यायला आले असेल म्हणून मी बघत होतो तर साक्षात् अल्काझी. हातात हा एवढा पुष्पगुच्छ. थिजलोच. पण एवढय़ाने होणार नव्हते. मला घेऊन ते आयआयसीला आले व संध्याकाळी भेटण्याचे ठरवून गेले. मी खोलीत गेलो तर तिथे दुसरा पुष्पगुच्छ. खाली त्यांच्या नावाची चिठ्ठी. ‘धन्य ह्यंची!’ असे म्हणून मी टेकतोच आहे तर ह्यंचा फोन.. ‘सगळे ठीक आहे ना? काही गैरसोय नाही ना?’ असे विचारणारा. आता मला गुदमरायला होईल असे वाटू लागले. संध्याकाळी ते मला घ्यायला आले व मी त्यांच्या कारकडे जात असताना ते जेव्हा कारमधून खाली उतरले व माझ्यासाठी कारचा दरवाजा उघडून उभे राहिले, तेव्हा मात्र धरणी दुभंग होऊन आपल्याला पोटात घेईल तर बरे असे मला वाटले. मला असे कोणी वागवण्याची सवयच नव्हती. त्याआधीही आणि त्यानंतरही- लेखकाची एवढी प्रतिष्ठा ठेवणारी व्यक्ती मला भारतात भेटलेली नाही. झाली तर लेखकाची बहुधा अप्रतिष्ठाच होते. अनुभवावरून बोलतो. पण अल्काझींनी मला जसे वागवले त्यानंतर कोणी कसेही वागवो, आपण चांगले काम करीत आहोत, लेखक ही संस्था आदराला पात्र आहे, हे अल्काझींनी न बोलता दाखवले याचे समाधान मनात कायम असते.

प्रयोगानंतर आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो. बरोबर मनोहर सिंह होते. (आता नाहीत ते.) तेव्हा फार बोलणे झाले नाही. पण मी निरोप घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘‘भेटत जा. आलास की भेट.’’ मी म्हटले की, हो. भेटीन. ते म्हणाले, ‘‘भेट. I would very much like it.’’

मला काय! त्यानंतर दिल्लीला गेलो व ते तिथे असले तर त्यांना भेटत असे. या भेटींमध्ये माझ्या पदरात काय पडले ते असे शब्दांत सांगता येत नाही. एकदा तैय्यब मेहेतांच्या एका चित्राचा उल्लेख मी बोलता बोलता केला तर चित्रकलेत ते असे काही शिरले, की दहा वर्षे वाचूनही मला ते कळले नसते. नेमके, अचूक, फापटपसारा नसलेले असे त्यांचे बोलणे व त्यांची निरीक्षणे. एका कॅप्सुलमध्ये इतके काही येत असे. पाश्चात्त्य संगीतातही त्यांचे असेच अवगाहन. एकदा बोलताना विस्कॉन्तिच्या ‘डेथ इन व्हेनिस’ या चित्रपटामध्ये माहलरच्या पाचव्या सिंफनीचा उपयोग त्यातल्या शेवटल्या दृश्यात किती छान केला आहे असे मी म्हटले, त्यावर ते किती वेळ माझ्याकडे रोखून पाहत राहिले व मग पाश्चात्त्य अभिजात संगीत, त्याचा अनेक चित्रपटांत केलेला उपयोग व त्यांचा अन्योन्य संबंध ह्यवर ते बोलत राहिले व मी ऐकत राहिलो. एका तासात एवढा भरघोस ऐवज हातात पडला. हॉटेलवर परत येताना एकच विचार मनात होता, की का नाही हे गृहस्थ आपल्या आयुष्यात आधी आले?

२००४ साली पहिला तन्वीर सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. समारंभस्थळी त्यांना आणायला मी व सतीश आळेकर गेलो होतो. येताना मी व सतीश पुढे (सतीश गाडी चालवीत होते.), मागे अल्काझी व उमाजी. अल्काझी म्हणाले, ‘‘नाटय़त्रयीला कसा प्रतिसाद होता मराठीत?’’ मी म्हटले की, कोमट होता. ज्यांचे मत मी मानतो त्यांना ती विशेष आवडली नाही. काहींना अजिबात नाही. ‘‘आणि वर्तमानपत्रे?’’ त्यांनी विचारले. मी म्हटले, ‘‘काहूर!’’ ते क्षणभर स्तब्ध झाले. मग म्हणाले, ‘‘म्हणजे लोक अजून तयार नाहीत या नाटकासाठी.’’ मी काही बोललो नाही. कारण एव्हाना सर्वच गोष्टी आता इतिहास झाल्या होत्या. पण त्यांचा त्या लेखनावरचा विश्वास मला दिलासा देणारा होता. तो इतका, की बाकीचे गेले उडत. अल्काझींना आवडली आहे त्रयी.. अशी खूणगाठ मी मनातल्या मनात बांधून ठेवली. मला तेवढे पुरे होते.

खूप सुंदर, खूप मोठी ज्ञानी माणसे मी पाहिली, त्यांच्याकडून थोडेबहुत मी माझ्या वकुबाप्रमाणे घेतले, त्यांचा जिव्हाळा मला  मिळाला. सगळे एकेक करीत हे जग सोडून गेले. पण ह्य सर्वाशी असलेले माझे नाते निश्चित (define) झालेले होते. त्यामुळे ही सर्व मंडळी काळाने नेली तेव्हा दु:ख झाले, पण काही अपुरे राहिले असे मात्र वाटले नाही. अल्काझींच्या जाण्याने मात्र तसे वाटते आहे. माझे अल्काझींशी सगळे नाते एकतर्फीच होते का? त्यांना माहीत तरी होते का- की मी त्यांना गुरुपद दिलेले आहे? त्यांच्या जाण्याने माझे काहीतरी कायमचे अपुरे राहिले असे मला वाटते, हे त्यांना कधीतरी कळेल का? त्यांना माझ्यासारखे शंभर भेटले असतील. कोणाकोणाबद्दल ते विचार करणार! पण मला ते भेटले, काही वेळा आम्ही बोललो ते मनापासून, एकमेकांबद्दल सौहार्द बाळगले; पण ह्य नात्याला निश्चित रूप येण्याइतक्या भेटीगाठी मात्र आमच्या झाल्या नाहीत. हरकत नाही. अधुरी स्वप्ने जास्त काळ मनात राहतात.