|| समीर गायकवाड

भरदुपारी दूरवर उडणाऱ्या टिटव्यांचा टीटीवीटीवटीवचा आवाज, चिंच-िलबांच्या झाडांतनं मधूनच येणारा होल्यांचा आवाज अन् जोडीला सुतार पक्ष्याची टॉकटॉक सोडल्यास रानात दूरवर कुणीच बोलत नसतं. म्लान निळं आकाश बगळ्यासारखं मान वाकवून मातीकडे सुकल्या ओठांनी बघत असतं. वितळत्या उन्हात आभाळाकडं तोंडं करून झाडं मुक्यानं उभी असतात. झाडांची थरथरणारी सावली मागेपुढे होत कवडशांचे डाव मातीत उतरवत असते. त्राण नसलेला वारा आस्ते कदम पानांच्या देठांना कुरवाळत फिरतो, पिकल्या पानांचे अश्रू सोबत घेऊन पुढे जात राहतो. नुकतेच फुटलेले कोंब उष्म्यानं कावरेबावरे झालेले असतात. अवतीभवती थिरकणाऱ्या फुलांच्या रंगीबेरंगी कोमल पाकळ्यांची एव्हाना शुद्ध हरपलेली असते. डोक्याचं ओझं झाल्यागत फुलांचे गुच्छ मातीच्या दिशेने लोंबकळत असतात. भिरभिरणारी फुलपाखरं हरेक फुलांची समजूत घालत, त्यांना सबुरीचा सांगावा देत जलदगतीने फिरत असतात. झाडांच्या सुन्या ढोलीत कोळ्याचे बिऱ्हाड स्वत:च्याच जाळ्यात अडकून पडलेले असते. पिंपळाच्या फांद्यांच्या गुंत्यात तरंगत असणाऱ्या घरटय़ांच्या काटक्या एकेक करून हळूहळू निखळत असतात. चिंचेची पानं गिरक्या घेत मातीवर नक्षी काढत पडत असतात.

बांधावरच्या दगडातल्या कपारीतले सरडे भर उन्हात भक्ष्याची वाट बघत निपचित बसून असतात. वाळलेल्या गवतातले सोनकिडे माती उकरत जमेल तितके खाली जात असतात. वडाच्या बुंध्यावरचे मुंगळे मात्र जगबुडी झाली तरी आम्ही जगणारच याच तोऱ्यात आपापल्या रांगांत कामाला जुंपून असतात. समोरून येणाऱ्या प्रत्येकाला ख्यालीखुशाली विचारत ते आपल्याच नादात एका तालबद्ध लयीत पुढे जात असतात. बांधावरच्या बोरीबाभळी ओशाळवाण्या होऊन एकमेकींच्या फांद्यांना लटका धीर देत खेटून उभ्या असतात. पाटाच्या कडेनं तगलेल्या थोडय़ाशा ओलाव्यासाठी रातकिडय़ांचा आटापिटा सुरू असतो. रात्रीच्या गायनासाठी त्यांचा दिवसाच रियाज सुरूअसतो. जवळच असणाऱ्या ताशीव दगडी विहिरीचा तळ वर येऊन गाळाची आतडीकातडी दिसतात. विहिरीच्या माथ्यावर दबा धरून बसलेले जिद्दी बगळे त्यातल्या पानकिडय़ांचा शोध हळूच सूर मारून घेत असतात. विहिरीत घुमणाऱ्या पारव्यांचा आवाज ऐकून विहिरीजवळच्या झाडाखाली बांधलेले बल उगाच कान टवकारत असतात. आपलं रेशमी शुभ्र अंग थरथरवत उदास झालेल्या विशडाला झुलवत राहतात. बलांच्या गळ्यातल्या घुंगरमाळांचा आवाज ऐकताच गोठय़ात डोळे मिटून बसलेल्या गायी किंचित जाग्या होऊन पोटात काहीही गेलेलं नसलं तरी सवयीप्रमाणे रवंथीस सुरुवात करतात. रवंथीनं हलणाऱ्या जबडय़ामुळं तिच्या िशगावर बसलेलं रानपाखरू उडून जाताच तिच्या अंगावरची चिवट गोचिडं थोडी वरखाली होतात. गायींनाही त्यांची बऱ्यापकी सवय झालेली असते. सावलीतली सगळी गुरं बसल्या जागी मातीवर शेपटी आपटत आपली कैफियत सुनवत राहतात. माती मन लावून त्यांचे मुके बोल ऐकत राहते. खरं तर मातीला स्वप्न पडत असतं.. मृद्गंधात चिंब भिजणाऱ्या चराचराचं!

काळवंडलेली पिकं नेटानं उभी असतात. काही झालं तरी आडवं व्हायचं नाही. काळपट, तेलकट झालेली, ताटकळून गेलेली जुंधळ्याची ताटं दीनवाण्या मुद्रेने ताठ बाण्याचं महत्त्व उनाड वाऱ्याला सांगत असतात. उलून गेलेल्या भुसभुशीत मातीत गवताचे पिवळट मळके कोंब माना टाकून पडलेले असतात. भरकटलेल्या वाऱ्यावर उडत आलेला पानगळीचा पाचोळा अंग चोरून ढेकळाच्या तळाशी दडलेला असतो. कोंदटलेल्या दिशांनी येणारा वारा भकास माळावर येताच त्याला गर्मीने धाप लागलेली असते. मोठाल्या खडकापाशी तो अडखळतो. वाऱ्याला शिवारसमृद्धीचा पत्ता देताना चकवा झाल्यागत एखादी वावटळ स्वत:लाच उडवून देते. वावटळीत उडालेल्या धुरळ्यात मातीचीही स्वप्नं कैद असतात. वावटळ उंच गेली की मातीच्या स्वप्नांचं दु:ख आभाळाला कळतं अन् त्याच्या मनात आर्त घालमेल सुरू होते. दूरवर पांगलेले ढग एकत्र येऊन बंड करतात. सौदामिनी संगं आली तर तिच्यासवे, नाहीतर तिला सोडून ते मेघदुंदुभी वाजवू लागतात. नभातले सगळे मायेचे पूत गोळा होतात. डबडबलेल्या डोळ्यांचे काळेसावळे मेघ गोळा होताच त्यांच्या विरहाश्रूंच्या धारा नभातून पाझरू लागतात. तहानलेल्या वसुंधरेवर वेडय़ावाकडय़ा कोसळू लागतात. बेभान होऊन मेघातून येणारा प्रत्येक थेंब मातीच्या कणाला गोंजारत तिच्या कुशीत शिरतो अन् आपल्या कुशीतला प्रत्येक थेंब माती तृप्ततेने विरघळवत राहते.

चंद्रमौळी घरातला बळीराजा धावतच बाहेर येतो. सुरकुतल्या चेहऱ्याने आभाळाकडं बघत घामेजले हात जोडतो अन् वळवाच्या पहिल्या पावसाच्या सरी ओंजळीत साठवतो. वळवाचे ते थेंब जीवदान देऊन जातात मातीला. मातीतल्या कोंबांना. कोंबातल्या ऊर्मीला. घरटय़ातल्या पिलांना. पडवीतल्या वासरांना. पिकातल्या अखेरच्या धुगधुगीला. सुकलेल्या पानांना. कोमेजल्या फुलांना. तारवटल्या फांद्यांना. अन् कोलमडलेल्या धन्याला! वळवाच्या पावसानं पिकत काहीच नसतं. त्यानं उत्पन्न वाढतं असंही नाही. मात्र वळवाचा पाऊस जिद्द जिवंत ठेवतो. हरत आलेली बाजी हाती आणतो. स्वप्नं बघण्याची उमेद जिवंत ठेवणं ही त्याची देण आहे. उन्हाच्या झळांमुळे यंदाच्या वळवाची ओढ तीव्र होती. कालपरवा ती पुरी झाली. पण पावसाने पार कणाच मोडला. तरीदेखील मातीचा प्रत्येक पूत तिच्यासाठी झिजायला आसुसलेलाच आहे. अस्सल मातीतला माणूस पावसाचा कधीच तिरस्कार करत नाही. भलेही त्यानं त्याचं नुकसान होवो, त्याचे बांध फुटून पाणी वाहो, वा उभी पिके पाण्यावर वाहून जावो. तो पावसावर चिडेल, रागावेल; पण त्याचा तिरस्कार नाही करणार. माती-पाण्याची ही नाळ खूपच घट्ट असते. तिची वीण भूमिपुत्राच्या काळजात ठाम विणलेली असते. ती कधीच ढिली होत नाही. माणसाच्या मनावर पावसाचं गारुड आदिम आहे. नकोसा असलेला पाऊस जरी मनसोक्त कोसळून गेला तरी बळीराजा त्याच्या नावाने बोटे मोडत नाही. कारण हाच पाऊस त्याच्या डोळ्यांतही असतो! तो कधी आत्यंतिक सुखाच्या समयी, तर कधी दु:खाचे कढ झेलताना वाहतो!

पावसालाही मातीचं, भूमिपुत्राचं आकर्षण असतं. कधी तो फार ताणून धरतो तेव्हा मात्र लक्षावधी जीव उस्मरून जातात. मातीची उलघाल सुरू होते. मग पावसाला राहवत नाही. तो कोसळून जातो. पावसाच्या अनेक तऱ्हा आहेत. त्याचीही नानाविध सोंगंढोंगं आहेत. तो कधी पिरपिर करीत पडतो, तर कधी मुसळधार! कधी कधी दिवसभर संततधार, तर कधी चोर- पोलिसासारखा लपंडाव खेळतो. पाऊस वाऱ्यावर डुलत येतो, तर कधी गारांचं थमान घालून जातो! कधी कधी ढगफुटीही होते.

वर्षां ऋतूशिवाय अवेळी बरसून जाणारा वळवाचा पाऊस मात्र वेगळाच असतो. पट्टीच्या मल्लांना मदान मारताना आपण नेहमी पाहतो. पण कधी एखादा नवखा, लेचापेचा गडीही बाजी मारतो आणि मन:पटलावर त्याच्या स्मृती राहतात. तसंच काहीसं वळवाच्या पावसाचं असतं. त्याचं येणं अनेकदा सुखावून जातं. उन्हाने जिवाची काहिली होत असताना आलेला वळवाचा पाऊस वातावरणात शीतलता निर्मितो. हवेतला उष्मा एका फटक्यात दूर करून सगळा आसमंत मोकळा श्वास घेऊ लागतो. वळवाचा पाऊस पडू लागताच झाडं अंग झटकून उभी राहतात. पानांची मरगळ दूर होते. गोठय़ातल्या गायी कान टवकारून अंग थरथरवत सावध होतात. मातीतून उष्णतेच्या वाफा बाहेर पडू लागतात. सर्वत्र मृद्गंध दरवळू लागतो. वळवाच्या पहिल्या पावसाची गाणी पक्षी गाऊ लागतात. या आभाळगाण्यांनी मेघ आनंदून जातात. मातीला उधाण येतं. शेतशिवाराच्या सगळ्या पाऊलवाटांना गहिवरून येतं!

खरं तर आभाळाचंही गणगोत मातीतच असतं. अन् पाऊलवाटांचा आसरा घेत आभाळ मातीत उतरतं! लेखक, कवी त्याला पावसाचं नाव देतो. पण पाऊस म्हणजे तरी काय असतो? वाडवडलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा तो आपलाच एक ‘भाऊबंद’ असतो. त्यांच्या आनंदाश्रूंचाच खारट थेंब असतो! म्हणूनच सारं चराचर व्याकुळ होऊन पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत असतं. ऋतू कोणताही असो; त्यात पर्जन्योत्सुक नभातलं ओझं हळूहळू रितं होत जातं. वसुंधरा तृप्त होते. ही तृप्ती सारस्वतांच्या लेखणीला उभारी देते.. तीत इंद्रधनुष्यी रंग भरते. आयुष्याच्या नागमोडी पाऊलवाटांचा प्रवास मग अक्षरगंधाने भारून जातो. बघता बघता साठा उत्तराची शब्दकहाणी सुफळ होते. इतकी जादू एका वळवाच्या पावसाने होते! वळवाच्या पावसातील आभाळगाण्यांची ही ताकद अनोखी आणि अभूतपूर्व असते!

sameerbapu@gmail.com