सुखी आणि समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली ही मानसिक शांतीमध्ये असते असे म्हणतात. पण सध्याच्या व्यस्ततावादी जीवनशैलीतून ही मन:शांती दिवसेंदिवस लोप पावत आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशांत मन हे अनेक समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे मन शांत झाले तर काही प्रश्न विनासायास सुटतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचेही मत आहे. प्रस्तुत पुस्तकात मानसशास्त्राच्या कसोटीवर उतरेल असे मनाच्या श्लोकाचे ‘मनोपनिषद’ विषद करून सांगितले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी २०७ मनाचे श्लोक लिहिले. त्यात मनाचा थेट उल्लेखच नाहीतर मन नावाच्या अतिचंचल गोष्टीला ताळ्यावर आणण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यांचेच तपशीलवार स्पष्टीकरण करणारे हे पुस्तक आहे. याआधीही मनाच्या श्लोकावर काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत नाही असे नाही. प्रस्तुत पुस्तकात श्लोकांची विषयानुसार विभागणी करून त्यांचे विश्लेषण केले आहे. समर्थाच्या सामर्थ्यांची जाणून करून देणाऱ्या मनाच्या श्लोकाची ही तोंडओळख वाचनीय म्हणावी अशी आहे.‘मनाच्या श्लोकातून मन:शांती’ - सुनील चिंचोलकर, मोरया प्रकाशन, डोंबिवली (पूर्व), पृष्ठे - ३००, मूल्य - १६० रुपये.जातीय दंगलीची कादंबरीही कादंबरी आहे जातीय दंगलींमुळे झालेल्या दुष्परिणामांची मांडणी करणारी. आणि ती लिहिली आहे महाराष्ट्र सरकारमधून शिक्षणाधिकारी या पदावरून निवृत्त झालेल्या वसंत गायकवाड यांनी. त्यांनी याआधी हुंडाबळी या विषयावर कादंबरी लिहिली आहे. लेखकाने म्हटले आहे की, ‘ही कादंबरी कोणा एका राजकीय पक्षाविरुद्ध अगर व्यक्तीविरुद्ध किंवा कोणा धर्माविरुद्ध अगर संघटनेविरुद्ध लिहिलेली नाही.’ ही कादंबरी दंगलींमुळे अस्वस्थ झालेल्या एका संवेदनशील माणसाने लिहिलेली आहे. ही संवदेनशीलता हीच या लेखनामागची मुख्य प्रेरणा आहे. ज्वलंत सामाजिक विषयावर कादंबरीच्या माध्यमातून भाष्य करू पाहण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह नक्कीच आहे. पण त्यामुळे कादंबरी म्हणून हे पुस्तक फारसं मनावर ठसत नाही, एवढं मात्र खरं. ‘सत्यमेव जयते’ - वसंत गायकवाड, कन्याकुमारी पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर, पृष्ठे - २२८, मूल्य - २४० रुपये.