मकरंद देशपांडे

‘नाटकवाला’ सदर लिहिण्याआधी ठरवलं होतं की, १९८९ ते २०१८ या काळात सादर केलेल्या नाटकांबद्दल वर्षांप्रमाणे किंवा क्रमांकाप्रमाणे लिहू म्हणजे First come First. पण मागच्या सदरातला क्रमांक (‘कस्तुरी’) चुकला. त्याआधी काही नाटकं लिहून मंचितही केली गेली होती. असो. शेवटी झालेल्या गोष्टी, नाटकं, सरलेली वेळ हे नेहमीच आठवणीत गुंतलेले असतात. आठवणीच्या गुंतागुंतीतून जो गुंता पहिला सुटला, तो लिहिला गेला. First come First.

‘जवान त्र्यंबक’ हे नाटक म्हणजे एक भविष्यवाणी. एका गावात त्र्यंबक नावाचा आळशी तरुण दिवसभर उगाच फिरतो किंवा पिंपळाच्या झाडाखाली झोपा काढतो. भर दुपारी त्याला स्वप्नात भूत दिसतं. तेही त्याच्या आळशीपणावर रागावतं आणि त्याला काहीतरी करून दाखव अशी आज्ञा करतं. पण त्यावर त्र्यंबकचा त्याला प्रश्न असतो की, मी काही केल्याने या दुनियेला काही फरक पडणार आहे का? त्यावर भूत सांगतं की, हो, पडणार आहे. एका भूताची भविष्यवाणी आहे की- तू जागा झाल्यावर खूप काही करणार आहेस.. ज्याची दुनियेला गरज आहे.

त्र्यंबक जागा होतो. त्याला कळत नाही, की पडलेलं स्वप्न, भूत आणि भुताची भविष्यवाणी खरी ठरणार कशी? तेव्हा झाडावरचं पिंपळाचं पान त्याच्यावर पडतं आणि तो ते बघतो, तर त्यावर भविष्यवाणी लिहिलेली असते. त्र्यंबक एक मोठा इतिहासकार होऊन येणाऱ्या भविष्यात आपल्या मायभूमीचा  इतिहास तो दुनियेसाठी जतन करून ठेवणार आहे. पानावर यापेक्षा जास्त काही लिहिलं नसल्यामुळे आपण हे कसं करणार, हा प्रश्न जसाचा तसाच राहतो.

पण गावभर उगाचच फिरणारा त्र्यंबक जेव्हा एका ठिकाणी बसून आपण आत्तापर्यंत काय काय नाही केलं याचं ध्यान लावतो तेव्हा त्याला त्याचा मार्ग सापडतो. पिंपळाचं एखादं नवीन पडलेलं पान आणि ते भूत त्याच्या ‘मी’पासून ‘मी’ आणि ‘मी’पासून ‘तू’ या प्रवासात सहाय्यक ठरतं. त्र्यंबक हा जसजसा जागरूक व्हायला लागतो तसतसं त्याची कर्तव्यं त्याला दिसायला लागतात. तो अभ्यास करतो, शिकतो, लग्न करतो आणि अध्यापकाची नोकरी करतो. पण या सगळ्या प्रवासात तो गावातल्या नेत्याचा भ्रष्टाचार उघडा पाडतो. आणि एका शिक्षित, कर्तव्यनिष्ठ  माणसाचा सामना भ्रष्ट नेत्याला करावा लागतो.

भ्रष्ट नेता आपल्या शक्तीचा खूप वापर करतो, पण त्र्यंबक त्याला घाबरत नाही. तो इतिहासातल्या महापुरुषांच्या विचारांच्या जोरावर गावाला जागं करतो.. त्यांच्या अधिकारांसाठी!! नेता त्याला ‘इतिहास आपलाच आहे आणि त्याचा वापर आपल्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे आणि तो मी करतोय, यात काय चुकलं?’ असा उलटा प्रश्न विचारतो. त्र्यंबकचं लक्ष भविष्याकडे आहे. पण त्यासाठी आधी इतिहास हा बरोबर करायला हवा, तो ऐतिहासिक असावा, इतस्तत: असू नये असं त्याला वाटतं. त्याच्या या मोहिमेत त्याची पत्नी त्याला संपूर्ण साथ देते.

नाटक संपताना इतिहास आपल्या जागी पोहचलाय का बघायला भूत परत येतं आणि त्र्यंबकला शाबासकी देतं. हसत हसत त्र्यंबक झोपेतून जागा होतो. ते एक स्वप्न होतं झोपेतलं की जागं करणारी झोप?

त्र्यंबक जागा झाल्यावर पिंपळाच्या पडलेल्या पानांकडे पाहतो. त्यावर काहीही लिहिलेलं नसतं. त्याच्या अंगावरसुद्धा एक पान पडतं. पण त्यावरही काही लिहिलेलं नसतं. पण म्हणून तो आपल्या स्वप्नाची टर उडवत नाही. तो खरंच जागा झालाय. पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून तो जबाबदारीचं पहिलं पाऊल पुढे टाकतो. स्वत:चा आळशी इतिहास पुसून टाकण्यासाठी!

त्र्यंबकसाठी लेखक-दिग्दर्शक अमोल गुप्तेंचा विचार केला, कारण मला जरी त्र्यंबक सुरुवातीला आळशी दाखवायचा होता, तरी येणारी हुशारी व विद्वत्तेचं बीज तर त्यात हवंच होतं. आणि मला अमोल नेहमीच विद्वान वाटला. नवीन नाटकाच्या पहिल्या ‘शो’चं यश हे व्यक्तिरेखा आणि अभिनेता या दोघांची मानसिकता एक असण्यावर असतं.

नटसम्राट डॉ. लागूंनी केला नसता तर तो कसा असायला हवा, हे कदाचित वि. वा. शिरवाडकरांना जसं अपेक्षित होतं ते आपल्यापर्यंत पोहचलं नसतं. किंवा पंडित सत्यदेव दुबे (थिएटरचे दिग्दर्शक आणि गुरू) यांनी  George Bernard Shaw आणि Stella Patric Campbell’ यांच्या पत्रव्यवहारावर आधारित नाटक केलं तेव्हा खरंच Shah आणि Shaw एकच वाटले, तेव्हा.

त्र्यंबक आणि अमोल ही व्यक्तिरेखा व अभिनेत्याची जोडी माझ्या मनात पक्की होती. आणि अमोल माझ्या नाटकांचा भव्य आधारस्तंभ होता आणि अजून आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो- त्याला INT या प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अभिनयाचं बक्षीसही मिळालं होतं. असो. अमोलनी खूप वर्षांनंतर Acting करणं जरा मुश्कील होईल असं सांगितलं त्यावेळी तो Painting करत होता. (खूप चांगला पेंटर.) त्यामुळे मी त्याच्या गळ्यात न पडता दुसरं नाव शोधायला लागलो. नंदू माधव हे नाव डोक्यात आलं आणि म्हटलं, शोध संपला.

नंदूची हुशारी ऐकण्यात आहे. तो तुमचं संपूर्ण ऐकून घेतो. स्वत:चं सांगायची घाई नाही आणि फारच गोड  humour- ज्याने त्र्यंबकला मजेशीर केला. त्र्यंबकमधील आळशीपणाचा त्यानं नट म्हणून हास्यासाठी छान वापर केला. त्याला प्रेक्षकांना हसवायला Gag ची गरज नव्हती. Gag म्हणजे कुणाला गप्प करायचं असेल तर त्याच्या तोंडावर रुमाल बांधला आणि तरीही तो बोलण्याचा प्रयत्न करत राहिला तर त्यातून विनोदनिर्मिती होते, म्हणजे ऌी He has been gaged. नंदूमध्ये Transform होण्याची कला आहे. हळूहळू तो पात्राची मानसिकता पकडतो आणि नाटकात आळशी ते जबाबदार इतिहासकाराची भूमिका सहज पेलतो.

मोना आंबेगावकरने पत्नीची भूमिका केली. तिने नाटकात प्रेम पसरवलं. इतिहासकाराच्या जीवनात वर्तमान जिवंत राहिला तर तो इतिहासात रमू शकतो. हे काम मोनाने चोख केलं.

अभिमन्यू सिंग या बेधडक नटाने भ्रष्ट बाहुबली नेता उभा केला. त्याच्या बिहारी लहेज्यानं हास्याचं पूट जोडलं गेलं. त्याची एन्ट्री खऱ्या मोटरसायकलवरून केली. रात्रीची वेळ. रंगमंचावर अंधार दर्शवणारा निळा प्रकाश. त्यात मोटरसायकलच्या हेडलाइटचा प्रकाश. आणि मग त्यावर बसून येणारा नेता.. प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जायचा.

भुताचं कास्टिंग हे स्क्रिप्ट लिहिताना ‘भुताची एन्ट्री’ असं लिहिल्यावर झालं. लेखन ही प्रक्रिया खूप गमतीशीर असते. खासकरून माझ्यासारखे लेखक- जे बाहेर कुठेही बसून लिहितात- त्यांच्यासाठी. मी पृथ्वी थिएटरच्या जवळपास सर्व कानाकोपऱ्यांत, जिन्यात, विंगमध्ये, ग्रीनरूममध्ये, कॅफेमध्ये, स्टेजवर बसून लेखन केलंय. मला आठवतं, एकदा पृथ्वी कॅफे नवीन माणसाला चालवायला दिला तर तो कॅफेमध्ये, सीटिंग अरेंजमेंटमध्ये काही बदल करत होता. पण माझी बसण्याची एक जागा आहे असं त्याला कळलं तर त्यानं ती भिंत तशीच ठेवली.. ज्याला टेकून मी लिहितो. खरंच, जर जागेबरोबर खूप वर्ष तुम्ही घालवली असतील तर तीही तुम्हाला आपलं करून घेते.

गमतीत असंही बोललं जायचं, की मकरंद गेली कित्येक वर्ष पृथ्वीला दिसतो. कदाचित शशी कपूरसाहेबांनी ‘विल’मध्ये मकरंदचं नावही लिहिलं असेल. असो. तर मी ‘भुताची एन्ट्री’ असं लिहिलं आणि माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात कुणीतरी उभं आहे असं दिसलं. डोकं वर करून पाहिलं तर एक सहा फुटी विशाल देहयष्टीचा, शामवर्णीय तरुण उभा होता. मी लिहिताना नेहमीच एक गोष्ट पाळली, की लिहिताना आपण एक जग निर्माण करतो, पण ते या जगात राहिल्यामुळे!! त्यामुळे मी येणाऱ्या कुणाही व्यक्तीशी थांबून बोलायचो. असं वाटलं की, कदाचित जीवनाच्या विंगेतून यानं एन्ट्री घेतली असावी. त्याच्याशी मी बोललो नाही, फक्त त्याला बघत बसलो. कारण मला असं वाटलं की लिहिण्याआधी भूत अगदी पृथ्वीच्या आवारातल्या, पण कॅफेपासून तीस मीटरवर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून उतरलंय आणि स्क्रिप्टमध्ये शिरू पाहतंय. विनोद जयवंत त्याचं नाव. तो सागर- मध्य प्रदेशचा. व्ही. शांताराम यांच्या ‘दो आंखे, बारह हाथ’वर नाटक करायचं झालं तर विनोदचं कास्टिंग निश्चित! तो गेला तेव्हा त्याला अगदी नजरेआड होईस्तोवर पाहिलं आणि मग डोकं खाली घालून पछाडल्यासारखं लिहून टाकलं नाटक!!!

जय भूत. जय जवान. जय पृथ्वी.

mvd248@gmail.com