|| मकरंद देशपांडे

असं म्हणतात की, पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं तेव्हा देशांमधील अंतर्गत हिंसा कमी झाली. खून आणि आत्महत्यांचं प्रमाण खूप कमी झालं. कारण माणसातल्या हिंसेच्या ग्रंथींना महायुद्धाच्या रूपानं वाट मिळाली. मानसिक आजारसुद्धा कमी झाले. महायुद्धापेक्षा मोठा मानसिक आजार शक्य नव्हता; उलटपक्षी जे वेडे होणार होते ते सगळे शहाणे झाले.

हल्लीच्या काळात, साधारण गेली तीन दशकं धर्मयुद्ध चालू आहे. मला प्रश्न पडला की, या धर्मयुद्धात मारणाऱ्या किंवा मरणाऱ्या दोन्ही पक्षांत मला समाविष्ट व्हायचं नसेल तर काय करावं लागेल? उत्तर सोपं नव्हतं, पण स्वाभाविक होतं की आपल्याला धर्मापासून दूर व्हावं लागेल. म्हणजे कोणीही कोणालाही धर्मासाठी मारत असेल तर मी त्या हिंसेचा वाटेकरी नाही, कारण मी कोणत्याही धर्माचा नाही.

माझ्या नवीन नाटकाचा नायक पहिल्या प्रवेशात हातात एक पिशवी घेऊन एका पावसाळी मध्यरात्री रस्त्यावरून एकटा चालत असतो. गस्तीवर असलेला हवालदार सातपुते त्याला हटकतो. नायकाच्या पिशवीची तपासणी करतो. पिशवीत हनुमान, गणपती, कृष्ण अशा घरातील देव्हाऱ्यातल्या मूर्ती असतात. ते बघून हवालदार चपापतो. नायक त्याला सांगतो की, तो मूर्तीचं विसर्जन करायला चालला आहे. त्यामागचा कारणही सांगतो. हवालदार हा स्वत: श्रद्धाळू असल्यानं तो नायकाचं मन-परिवर्तन करायचा असफल प्रयत्न करतो. नायक आपले देव त्याच्या स्वाधीन करून नास्तिक होऊन घरी परततो. त्याच्याशी भांडण करून माहेरी गेलेली त्याची पत्नी त्याच रात्री परतते आणि त्याला वाटतं की, नास्तिक होणं त्याला उपयोगी पडलंय. पण पत्नी मात्र घरात रिकामा देव्हारा पाहून घाबरते; आणि पाप लागू नये म्हणून आपल्या पर्समधील देवाचा फोटो काढून देव्हाऱ्यात ठेवते. नायक आपल्या पत्नीला खरं कारण सांगतो. त्याचं म्हणणं पडतं की, लहानपणीच देव आणि भुतं दोघंही आयुष्यात आले. सकाळी उठल्यावर बाप्पा जयजय, झोपताना बाप्पा जयजय. थोडं मोठं झाल्यावर परीक्षेच्या आधी साष्टांग नमस्कार, रिझल्ट चांगला आला नाही तर नाक रगडून नमस्कार.. हे झाले दैवी रिवाज. मग भुतांपासून दूर राहण्यासाठी विभूती. अगदी मित्राकडे दुपारी चार वाजता वाढदिवसासाठी जातानाही कपाळाला किंवा मानेला विभूतीचं बोट. लहानपणापासून देव असो की भूत, दोघांनी घाबरवायचं काम केलं. फक्त परीकथेनी मात्र घाबरवलं नाही. उलट दात तुटल्यावर रडणं थांबवण्यासाठी आई तो तुटलेला दात उशीखाली ठेवायची आणि थोडय़ा वेळाने आई त्याच उशीखालून टॉफी द्यायची.. ‘परीनं दिलंय’, असं सांगून! आणि मग चेहऱ्यावर आनंद , डोळ्यांत पाणी असलं तरीही! मोठं होता होता मात्र आईकडचे, वडिलांकडचे कुलदैवत, शहरातले जागृत, विभागातले पुरस्कृत देवदेवता वाढले आणि भुतांनी, राक्षसांनी मानवी रूपं धारण केली. परी मात्र आपल्या परीकथा घेऊन गायब झाली.

आपल्या नवऱ्याचं आत्मिक स्पष्टीकरण ऐकून बायको आपल्या नवऱ्याच्या पुन्हा प्रेमात पडते. नवरा म्हणतो की देवांना मनातून मुक्ती दिल्यामुळे आता भरपूर जागा रिकामी झाली आहे. परीला परत बोलवायला हवं, कारण तिच्याबरोबर आपलं निरागस बालपण आहे.

दुसरीकडे हवालदार त्या रात्री आपल्या नायकानं सोडलेले देव घेऊन स्वत:च्या घरी येतो. त्यांना आपल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न करतो. त्याच दरम्यान त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. शहरात त्या रात्री खूप पाऊस पडतो. एका ठिकाणी खूप पाणी साचलेलं असतं आणि तिथे एक महिला अडकलेली असते. हवालदार तिला मदत करतो, तिला वाचवतो आणि ती महिला हवालदाराच्या प्रेमात पडते. तीसुद्धा हवालदारच असते.

हवालदार सातपुतेंना वाटतं की, आपल्या नायकाचे देव जागृत आहेत कारण आणखीन एक विलक्षण घटना घडलेली असते. खूप पाऊस पडत होता म्हणून तो एका झाडाखाली थांबला होता. विजेच्या आणि ढगांच्या गडगडाटानं हातातल्या देवांच्या पिशवीला धक्का बसला आणि कृष्णाची मूर्ती तुडुंब भरलेल्या रस्त्यावरच्या पाण्यात वाहायला लागली. हवालदार तिच्यामागे गेला. तेव्हाच आकाशातून वीज त्या झाडावर कोसळली- ज्या झाडाखाली हा उभा होता. त्याचा असा समज झाला- जर श्रीकृष्ण पिशवीतून खाली पडला नसता तर आज तो जिवंत उभा राहिला नसता. देव हा आपल्या खऱ्या भक्तासाठी काहीही करू शकतो.

नाटकाचं नाव ‘जोक’. विषय गंभीर, पण नाव जोक! कारण, मानायचं झालं तर गंभीर किंवा गांभीर्याचं कारण गंभीरतेनं घेतलं नाही तर तो जोकच बनतो. देवाकडून मात्र चमत्कारच हवे असतात. योगायोग हे मानवीय आहेत.

हवालदाराची बहीण आंधळी, पण तिची देवाबद्दल आपल्या भावापेक्षा विरुद्ध विचारधारा. तिला आपल्या नायकाची विचारधारा पसंत पडली. देवावर प्रेम नसून, आदर मात्र भीतीपोटी असतो. कर्तव्य म्हणून पूजा आणि पापं कमी व्हावी म्हणून प्रार्थना. हवालदाराचा तिला आग्रह असतो की, देवावर श्रद्धा ठेवली तर डोळे परत येतील. तिला मात्र आपल्या नायकाला भेटायचं असतं. त्यावर हवालदार भाऊ खूप रागावतो आणि बहिणीवर हात उगारतो.

आपला नायक परीबद्दल विचार करायला लागतो. आता त्याला आपल्या बालपणातला निरागसपणा, गोडवा जपणाऱ्या परीला आठवून, मनात उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण होते. तो परीशी संभाषण करायला लागतो. तिला तिच्या ठावठिकाणाबद्दल विचारतो. तिच्या भावविश्वाबद्दल चौकशी करतो. तिला आपल्या घरी हक्काचं आमंत्रण देतो. त्याच्या बायकोला आपल्या नवऱ्याच्या या वागण्यात खूप प्रेम दिसून येतं. त्याच्यात परीसाठी करुणा उत्पन्न होते आणि करुणेतनं प्रेमाचा जन्म होतो. असं प्रेम ज्यात शत्रुत्व विरघळून जातं. लहानपणी सगळ्यांनी एका पांढऱ्या कॅनव्हास पेपरवर एक डोंगर, डोंगरातनं डोकावणारा सूर्य, पायथ्याशी नदी, नदीकाठी एक घर- ज्याला दरवाजा काढायचा राहून गेलेला, पण त्या घराला एक पायवाट, जी कारण नसताना नदीकडे गेलेली, पण तिथे बोट नाही. कॅनव्हासच्या वरच्या कोपऱ्यात दोन ते चार पक्षी उडताना.. आठवलं? त्या डोंगराला नाव नव्हतं. त्या घरात कोणत्या धर्माचा माणूस राहत होता? त्या पक्ष्याचं नाव? त्या गावाचं नाव? काहीच माहीत नव्हतं म्हणून सगळं काही होतं!

हवालदाराच्या घरातून त्याची आंधळी बहीण आपल्या भावाच्या देवदेवपणाला, देववेडाला कंटाळून, त्या मूर्ती घेऊन घरातून निघते. तिचा भाऊ तिला शोधत आपल्या नायकाच्या घरी येतो. त्याला वाटतं की आपली बहीण नक्की इथेच आली असणार, पण तो एक गोष्ट विसरतो की तिला ह्य़ाचं घर कसं माहिती असणार? आपला नायक मात्र हवालदाराला विश्वासपूर्वक सांगतो की तो हवालदाराच्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचणार कारण ती खऱ्या करुणेनं बाहेर पडली आहे आणि करुणेनी प्रेम उत्पन्न होतं.

हवालदार निघून गेल्यावर मात्र खरंच त्याची आंधळी बहीण आपल्या नायकाच्या घरी पोहोचते. ती घरातून मूर्त्यां घेऊन निघाली, मात्र त्यांना कुठे सोडून द्यायचा दुष्टपणा तिच्या मनात निर्माण झाला नाही. तिला आपल्या नायकाला भेटायची तीव्र इच्छा होती. तिनं देवांनाच सांगितलं की तुम्ही जर खरंच असाल तर मला ज्यांना भेटायचं आहे त्यांच्या घरी घेऊन चला. एका देवळात आरती सुरू होती. ती त्या देवळात थांबली. आरती संपल्यावर तिनं बाजूच्या व्यक्तीला विचारलं, ‘‘ मला सांगाल का ते (आपला नायक) कुठे राहतो? खरं तर आपल्या नायकाच्या नावाचे कितीतरी असतील, पण ती व्यक्ती आपल्या नायकाला ओळखणारी निघाली. बहीण आपल्या नायकाच्या घरी स्वत:च्या विश्वासानी पोहोचली, पण तो विश्वास तिच्या मनात देवासाठी असलेल्या करुणेनं निर्माण झालेल्या प्रेमामुळे होता. आपल्या नायकाची पत्नी देवांना पाहून पाणावलेल्या डोळ्यांनी नवऱ्याला म्हणते, ‘‘आपले देव परिक्रमा करून परतले.’’

‘‘हवालदाराच्या बहिणीचं नाव काय?’’ असं विचारलं असता, तिचं उत्तर ऐकून दोघं स्तब्ध होतात. ती म्हणते, तिचं नाव परिक्रमा! भाऊ तिला ‘परी’ म्हणतो.

आपला नायक खऱ्या अर्थानं परीला आपल्या विश्वात घेऊन आला. हा चमत्कार, योगायोग की इच्छाशक्ती?

या नाटकाचं मंचन करणं अवघड होतं, पण मी ते सोपं केलं. रंगमंचाच्या मधोमध एक मोठ्ठा बेड, त्याला दोन रंगांची चादर- म्हणजे बेडच्या दोन बाजूला दोन घरं. एक हवालदाराचं आणि दुसरं आपल्या नायकाचं. बेडच्या मागे चार फूट उंचीवर रंगमंचाच्या डाव्या विंगेपासून ते उजव्या विंगेला जोडणारा प्लॅटफॉर्म- जो रस्ता होता. सायक्लोवर (पडद्यावर) पाऊस, विजा, ढग, घर दाखवण्यासाठी ग्राफिक अ‍ॅनिमेशनचं व्हिडीओ प्रोजेक्शन वापरलं. पुण्याच्या कायमेरा कंपनीच्या अनुज देशपांडेंनी फारच परिणामकारक असं अ‍ॅनिमेशन बनवून दिलं. आम्ही पाऊस पांढऱ्या रेषांनी दाखवला, काळ्या सायक्लोवर (पडद्यावर) तो प्रभावी वाटावा म्हणून. गंमत अशी की, कलाकारांच्या कपडय़ावर पाऊस पडताना दिसला, शिवाय त्याच्या जोडीला प्रकाशयोजना आणि पावसाचा आवाज, ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट!

असीम हट्टंगडीनं हवालदार सातपुते कट्टर श्रद्धाळू आणि तेवढाच हळवा हवालदार फारच सामंजस्याने आणि बारकाईने सादर केला. क्षिती जोगने आंधळी बहीण साकारताना रंगमंचावर वास्तवता आणली आणि तिनं तिच्यातल्या परीला खूपच नाजूकतेनं पेश केलं. ती शेवटच्या प्रवेशात जेव्हा नायकाच्या घरी पोहोचते, तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी यायचं. मी यातला नायक केला. स्वत:च्या जीवनातल्या बऱ्याच प्रश्नांना माझ्यातल्या लेखकानं उभं केलं. त्याला साकारताना माझ्यातल्या नटाला आकारता आलं जीवनाचं खरं कारण. नेहा जोशी ही गुणी अभिनेत्री नायकाची पत्नी झाली. तिचं प्रेम एवढं खरं असायचं की प्रयोग चालू असताना आपण प्रेक्षक होऊन हिला दाद द्यावी असं वाटायचं. शैलेन्द्र बर्वे ह्य़ानं संगीत किती चांगलं केलं हे लिहिणं कठीण आहे पण ‘परीचा पीस’ आणि शेवटची आरती सभागृहाला एका जादुई विश्वात घेऊन जायची.

‘मेडम्ता’ ह्य़ा मीराबाईच्या जन्मगावी नाटकाचा प्रयोग ठरला. मोरारी बापूंच्या, नऊ दिवस चालणाऱ्या रामकथेच्या एका संध्याकाळी हेमामालिनीचा मीराबाईवर नृत्य कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आपला प्रयोग. बापूंना माझं ‘सर सर सरला’ नाटक फार आवडलं होतं. त्यांनी आयोजक मदन पालीवालांना आवर्जून सांगितलं की मकरंदचं एखादं नाटक घेऊन या.

तिथे गेल्यावर साधारण लक्षात आलं की इथल्या प्रेक्षकांना नाटक हे माध्यम तसं माहिती नाही. त्यातून आलेली भक्तमंडळी ही कट्टर देवभक्त आणि आपण करणार आहोत एका नास्तिकाचं नाटक, तर काही बदल करायला हवा का? हे माझ्या मनातलं बापूंनी ओळखलं. ते म्हणाले, ‘‘मकरंद, तू विश्वासानी आणि मेहनतीनं नाटक बसवलं आहेस, तुझ्याकडे विचार आहे तुझा आणि तुझ्यावर माझा विश्वास आहे. मला तुझा विचार ऐकायचाय. एकही वाक्य बदलू नकोस.’’

दुसऱ्या दिवशी हजारोंच्या संख्येने भक्त बसलेले. बापू मंचापासून पंचवीस फुटांवर, मध्यभागी आसनस्थ. मूर्ती विसर्जनाच्या प्रवेशानंतर मंडपात नीरव शांतता. मी बापूंकडे पाहिलं, बापूंनी आशीर्वादाचा हात वर केला. ‘जोक’ नाटकातला गंभीर विषयाचा हास्यरस हजारो देवभक्तांना कळायला लागला आणि नाटकाचा शेवट- ‘जिथे देव परिक्रमा करून परत घरी आले’ ह्य़ा वाक्यावर भक्तांनी उठून टाळ्या वाजवल्या. बापूंमुळे ‘जोक’चा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला. बापूंनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या रामकथेत आपल्या नाटकातल्या नायकाच्या विचारांचा उल्लेख केला म्हणून बापू श्रेष्ठ आणि खरे संत. कारण संत हा सगळ्यांचा. तो शत्रू, क्रोध, आवडता-नावडता ह्य़ापासून खूप दूर. मनमोकळ्या विचारांचा.

जय बापू! जय देव!

जय मनुष्य! जय इच्छाशक्ती!

mvd248@gmail.com