मुकुंद टाकसाळे आज होळी पौर्णिमा.. आणि उद्या धूलीवंदन. साहजिकच सगळ्यांना शिमगा साजरा करण्याची ऊर्मी, उत्साह हा असणारच. मात्र, सध्या करोना संसर्गाच्या दुसऱ्या तीव्र लाटेमुळे हे सण साजरे करण्यावर चांगलीच बंधने आलेली आहेत. परंतु मनोमन तरी ते साजरे करायला काय हरकत आहे? आणि तसेही होळी दिवशी सगळे माफ असतेच. तर.. यंदाच्या होळीनिमित्ताने राजकीय धुळवडीची ही एक झलक.. एकुणातच विनोदाला सध्या मोठे वाईट दिवस आलेले आहेत. ते गाणं आहे ना.. ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती.. शोधू कुठे? शोधू कुठे? शोधू कुठे?’ तुम्ही ज्वानीच्या आगीची मशाल हाती घेऊन शोधा, नाही तर म्हातारपणाचा मोबाइल टॉर्च पेटवून शोध घ्या; कपाळावर हात नेऊन कितीही नाचानाच केली तरी आजच्या वातावरणात विनोद काही सापडायला तयार नाही. वातावरण असं एकदम ‘खाकी’ ‘खाकी’ झालेलं आहे. सध्या मराठी साहित्य-नाटकांतला विनोद नष्ट झालेला आहे. मग हा विनोद कुठं शोधायचा? तर तो राजकारणात सापडतो. रोजच्या बातम्या वाचल्या तरी हसून हसून पोट दुखू शकतं. खरं म्हणजे आपल्याकडे होळीला रंग खेळण्याची परंपरा नाही, रंगपंचमीला रंग खेळतात. परंतु उत्तरेचा आणि हिंदी सिनेमांचा प्रभाव तरुणांवर बराच असल्यानं तरुण मुलं-मुली होळीलाच रंग खेळायला सुरुवात करतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी नागपूरचे आहेत. उत्तरेकडल्या प्रभावाने ते होळी, धुळवड खेळण्यासाठी एवढे उतावीळ असतात, की त्यांनी या वर्षी होळीच्या आणि धुळवडीच्या पंधराएक दिवस अगोदरच महाआघाडीच्या नेत्यांच्या अंगावर चिखल फेकायला सुरुवात केलेली होती. अत्यंत कार्यतत्पर. ‘उद्याचं काम आज करा, आजचं काम पहाटेच करा’ या संस्कारात ते वाढलेले. त्यांचं राष्ट्रवादीबरोबरचं औट घटकेचं सरकार पहाटेच्या ब्राह्म मुहूर्तावरच स्थापन झालं. (आणि ‘औट’ही झालं.) शिमगा तर ते जवळजवळ रोजच साजरा करत असतात. ‘राजाला रोजच दिवाळी’ अशी म्हण आहे. पण या ‘माजी राजाला रोजच शिमगा’ अशी परिस्थिती आहे. शिवाय संघाचे बाळकडू असल्याने नैतिकतेचा प्रखर अहंकार! कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेनं सरकार स्थापन केलं, त्यामुळे ते रोज ऊठसूट शिवसेनेला नैतिकता शिकवत घालूनपाडून बोलत असतात, हिंदुत्वावरून टोमणे मारत असतात. त्यांचा आवाज तर एवढा बुलंद आहे की त्यांची स्पर्धा रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामींशीच होऊ शकेल. विधानसभेत देवेंद्रजी बोलायला उभे राहिले तर अख्ख्या फोर्टातल्या इमारतींच्या काचा थरथरतात. होळीत लहान मुलं छोटे छोटे ढोल वाजवतात, त्यावरून एक विनोद आठवला. देवेंद्रांप्रमाणेच बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करून आरोप-प्रत्यारोप करीत कुणाच्या ना कुणाच्या तोंडाला काळं फासण्याची अर्णवचीही प्रतिज्ञा असते. तेव्हा मधल्या काळात एक विनोद फेसबुकावर व्हायरल झाला होता. रजनीकांतचे विनोद सर्वाना ठाऊक आहेतच. एकदा मंगळ ग्रहावरून एलियन्स आले आणि म्हणाले, ‘रजनी अण्णा, जरा हळू ढोल वाजवा ना.. मंगळावर पोरांच्या परीक्षा चालू आहेत.’ रजनी अण्णा म्हणाले, ‘दरवेळी माझ्यावर काय आळ घेता रे पोरटय़ांनो? मी ढोल नाही वाजवत. तो अर्णव गोस्वामी तिकडे प्राइम आवरचं डिबेट करतोय.’ रजनी अण्णांच्या उत्तराचा महाराष्ट्रात आणखी एक पाठभेद आहे- ‘तो देवेंद्र तिकडे विधानसभेत भाषण करतो आहे..’- असा. असं म्हणतात, अर्णव निवृत्त झाल्यावर एक ‘विधी महाविद्यालय’ काढणार आहे. त्यात तो ‘झटपट न्यायाधीश बना’ असा क्रॅश कोर्स घेणार आहे. कंगना रनौट निवृत्त झाल्यावर तिथेच एमेरिट्स प्रोफेसर म्हणून शिकवायला जाणार आहे. असो. तर इकडे बॉलीवूडची होळी मोकळ्या मैदानात चालू आहे. रंगाचा तलाव केलेला आहे. कंगना पांढराशुभ्र कुर्ता आणि गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून प्रवेश करते. त्याबरोबर तिथलं मैदान एकदम भरल्यासारखं वाटतं. कारण तिच्याबरोबर एकदम ११ जवान प्रवेश करतात. अमित शहांनी बहाल केलेली वाय सिक्युरिटी मिरवण्यासाठीच कंगना तिथे आलेली आहे. ती आल्याबरोबर सारे चिडीचूप होतात.कर्फ्यू लागल्यासारखी शांतता पसरते. एका कोपऱ्यात गजेन्द्र चौहान आणि मुकेश खन्ना गप्पा मारत उभे असतात. तेवढय़ात तिथं अक्षयकुमार आणि विवेक ऑबेरॉय येतात. चौघे एकमेकांच्या अंगावर भगवा रंग उधळतात. मग कंगना त्यांच्यापाशी जाते. ती गेल्यावर त्या सोळा जणांचा एक वेगळाच गट तयार होतो. पैकी सिक्युरिटी गार्ड वर्दीत असल्यानं आणि ते कंगनाभोवती कडं करून उभे असल्यानं त्या बारा जणांच्या तोंडाला रंग फासण्याचं धारिष्टय़ कुणीच करत नाही. कंगना मात्र मनसोक्त दिसेल त्याच्या तोंडाला काळा रंग फासत असते आणि खिदळत असते. खाली जमिनीवर चिखल होतो. त्यावर अनुराग कश्यप गमतीने तापसी पन्नूला म्हणतो, ‘चिखलात कमळं उगवलीत जणू!’ पण ईडीच्या भीतीने तापसी हसत नाही. तिथे तेवढय़ात सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर येतात. त्यांच्या गाडीतून उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत उतरतात. करोना होऊनही तीरथ सिंहांना बॉलीवूडची होळी बघण्याची दांडगी हौस आहे. त्यामुळे ते बिनमुखपट्टीचे सर्वत्र हिंडू लागतात. त्यांना पाहून नट-नटय़ा भराभर मास्क चढवतात. दीपिकादी नटय़ांना तर तोंड लपवावं की फाटक्या जीन्समधले गुडघे- असा पेच पडतो. त्यामुळे सर्वाची एकच धांदल उडते. त्या धांदलीतही प्रकाश जावडेकर आपल्या खास शैलीत रुंद हसून सर्व नट-नटय़ांना आपल्या खास मराठी इंग्रजीत ‘हॅप्पी होली’ आणि खास मराठी हिंदीत ‘होली मुबारक’ म्हणत इकडे तिकडे हिंडू लागतात. फाटक्या जीन्समधल्या गुडघ्यांचा उल्लेख करणं असभ्यपणाचं आहे हे एव्हाना तीरथ सिंह यांना कळून चुकलं आहे. त्यामुळे कंगनाच्या जवळ आल्यावर तिला ते म्हणतात, ‘मैडमजी, फटी जीन्स में से अपना मस्तिष्क क्यों सब को दिखा रही हैं?’ यावर कंगना हसून म्हणते, ‘तीरथजी, ये फैशनवाली जीन्स नहीं है। होली के लिए जानबुझकर पुरानी फटी हुई जीन्स पहनी है। मेरे संस्कार आप जैसे ही मजबूत है। आप फिक्र मत कीजिए।’ तिचं उत्तर ऐकून ते खूश होतात. कंगनाजवळ ते दोघे पोचतात तेव्हा नेमका तिच्याजवळचा रंग संपलेला असतो. त्यामुळे दोघेही खट्टू होतात. एवढय़ात तिथे राज्यपाल कोश्यारी आपली काळी टोपी आणि पांढरं धोतर सावरत येतात. अनेकांना त्यांची वेशभूषा पाहून जुन्या हिंदी सिनेमातील जीवन या नटाची आठवण होते. त्यांच्या पाठोपाठ तोंडाला मुखपट्टी लावून तीनचाकी रिक्षा चालवत मुख्यमंत्री उद्धवजी येतात. रिक्षातून टुणकन् उडी मारून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उतरतात. आदित्य सराईतपणे बॉलीवूडच्या वातावरणात मिसळतो. तोंडाला मुखपट्टी असल्यानं उद्धवजी आणि संजयजी कुणाशी फारसे बोलत नाहीत. तशीही वाझे प्रकरणानं आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या लेटरबॉम्बनं त्यांची वाचा बंद झालेली आहे. उद्धवजींना महाराष्ट्रातल्या करोनानेच दमवल्यानं त्यांना बाकी राजकारण करायला आजतागायत फुरसत लाभलेली नाही. लॉकआऊट कधी लावायचा, कधी उठवायचा, या खेळातच त्यांचा सारा वेळ जातो. त्यामुळे कुणाशी बोलण्याच्या मन:स्थितीतही ते नसतात. राज्यपाल कोश्यारींच्यात आणि त्यांच्यात (होळीचा) विस्तवही जात नाही. दिल्लीच्या उपराज्यपालांना अलीकडेच मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक अधिकार नव्या कायद्यानं दिल्यानं आता उपराज्यपाल बनून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना- म्हणजे केजरीवालांना छळायला जाण्याची स्वप्नं कोश्यारींना पडू लागलेली आहेत. त्यामुळे त्यांचा चेहरा गुलाबी रंग लावल्यासारखा स्वप्नाळू दिसतो आहे. या बातमीची कुणकु ण लागल्यानं उद्धवजींच्या चेहऱ्यावरचा ताण कमी होऊन त्यांचा चेहरा जांभळा रंग दिल्यासारखा दिसतो आहे. दोघेही एकमेकांकडे पाठ फिरवून दुसरीकडे वळतात. इकडे राष्ट्रवादीच्या कुलाब्याच्या कार्यालयात सर्वाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे. सर्व जण काळजीने काळवंडलेले आहेत. गृहमंत्री अनिलजी देशमुखांच्या चेहऱ्याला रोज देवेंद्रजी काळं फासत आहेत. (एक- दोनदा चान्स मारून किरीट सोमय्यांनीही त्यांच्या चेहऱ्यावर हात मारून घेतला होता.) देशमुखजी पवारसाहेबांना म्हणत होते, ‘‘देवेंद्रजी मला म्हणत होते की, भाजप हा प्रवाही पक्ष आहे. आमची गंगा आहे. त्या प्रवाहात आलात तर तुमची सर्व पापं धुतली जातील.’’ ‘‘मग तुम्ही त्यांना काय उत्तर दिलंत?’’ आवाजात जरब आणत पवारसाहेबांनी विचारलं. ‘‘मी काय बोलणार? मी म्हणालो, आमचे साहेब जिथे जातील तिथे त्यांच्या मागे मागे मी जाणार.’’ अनिल देशमुखांनी उत्तर दिलं. नितीन गडकऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्यासाठी भाजपच्याच तरुणांनी नागपुरात त्यांच्या घरासमोर गर्दी केलेली होती. नुकतीच त्यांनी ‘भारतातले ‘टोलनाके’ बंद करणार’ अशी घोषणा केली होती. व्हॉट्सअॅपवर ‘गडकरी ‘ट्रोलनाके’ बंद करणार..’ असं कुणीतरी पसरवलं. हा-हा म्हणता पसरलेल्या या अफवेतून ही गर्दी जमली होती. इकडे बॉलीवूडच्या मंडळींची होळी रंगात आलेली होती. अचानक देवेंद्रजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस आल्या. त्यांच्याच गाडीतून माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनीही एन्ट्री टाकली. परमबीरांना लवकरच राज्यसभेत घेण्याचं आश्वासन अमितजींनी दिलं असल्याची कुजबुज होती. त्यामुळे त्यांच्याही गालावर गुलाब फुलले होते. ‘आता अमृताजी एक गाणं सादर करतील..’ अशी घोषणा झाली आणि पोलिसांनी लाठीमार करावा तशी तिथली गर्दी पांगली. taksalemukund@gmail.com