|| राम खांडेकर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची २८ जूनला ९८ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करत असताना नरसिंह राव, वाजपेयी यांना विरोधी नेत्यांबद्दल असलेला आदरभाव, स्नेह आणि विरोधकांच्या कर्तृत्वाचे मनमोकळेपणाने कौतुक करण्याची त्यांची उदार वृत्ती यांचे स्मरण करणे अनुचित ठरणार नाही. आज या गोष्टी राजकारणातून पार हद्दपार झाल्या आहेत. यंदा एप्रिल-मे महिन्यात देशवासीयांना दोन ‘आयपीएल’चा आनंद घेता आला. एक- दरवर्षी होणाऱ्या क्रिकेट ‘आयपीएल’चा! तर दुसरा- दर पाच वर्षांनी होणाऱ्या ‘आयपीएल’चा (इंडियन पोलिटिकल लीग)- म्हणजे सार्वत्रिक निवडणुकांचा! दोन्हीमध्ये काही गोष्टींत साम्य होते. दोन्हींचा कालावधी सुमारे दीड महिन्याचा होता. आणि काहीही करून आपण जिंकायचेच, हेच ध्येय दोन्हीकडे होतं. यावेळी निवडणुकीचा प्रचार अतिशय खालच्या पातळीवरून केला गेला, ही गोष्ट लोकांनाही प्रकर्षांनं जाणवली. बुद्धिजीवी लोकांना तर यानंतरच्या निवडणुका कोणत्या वातावरणात होतील याची चिंता वाटू लागल्याचे दिसले. हे सर्व पाहिल्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी २१ जुलै १९७५ रोजी तुरुंगातून त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या एका पत्राची आठवण झाली. त्यावेळी त्यांनी त्या पत्रात व्यक्त केलेले काही विचार आजच्या परिस्थितीशी मिळतेजुळते वाटतात.. ‘‘वृत्तपत्रांतील तुमच्या भाषणाचे वृत्तान्त आणि तुमच्या मुलाखती ज्या धडाक्याने सुरू आहेत, त्याने मी थक्क झालो आहे. आपल्या कृतीच्या समर्थनार्थ उठता-बसता काही ना काही सांगण्याची पाळी आपल्यावर येते, त्याच्या बुडाशी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे अपराधाच्या जाणिवेने त्रस्त झालेले मन आहे हेच सिद्ध होते. मी आणि विरोधीपक्षीय मंडळी म्हणजे कोणी सैतान आहोत असे भासवण्याची तुमची खटपट आहे. तुम्ही जर विहित गोष्टी करावयाचे ठरविले आणि विरोधकांना त्यासाठी विश्वासात घेतले तर आमच्यापैकी प्रत्येकाचे तुम्हाला उत्स्फूर्त सहकार्य मिळू शकेल. तुमचा वीस कलमी कार्यक्रम अमलात आणावयाचा निर्धार केलात तरी हरकत नाही. विरोधकही तुमच्याशी सहकार्य करतील.’’ विरोधी पक्षांनी एक वेळ ताळतंत्र सोडला तर आपण समजू शकतो. कारण त्यांच्याजवळ टीकेशिवाय फारसे काही नसते. पण सत्ताधारी पक्षाकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असण्याची शक्यता असतानाही त्यांनी खालच्या पातळीवर येणे कितपत क्षम्य असू शकते याचा विचार सर्वसामान्य माणूस करीत होता. यावेळी पंतप्रधानांच्या काही वक्तव्यांवर विरोधी पक्षांकडूनच नव्हे, तर प्रसारमाध्यमांकडूनही टीका झाल्याचे वाचनात आले. हे सर्व पाहिल्यानंतर भारताच्या पहिल्या पंतप्रधानांपासून ते वाजपेयी यांच्यापर्यंतचा काळ डोळ्यासमोर येऊन गेला. हा काळ असा होता, की संबंधित व्यक्ती भूषवीत असलेल्या उच्च पदाची प्रतिष्ठा व मोठेपण यांना चुकूनही धक्का लागणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जात होती. राजकारणात वैरभाव नव्हता. लोकशाही परंपरा जपली जात होती. वाजपेयी यांच्यानंतर मात्र सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेची जपणूक करण्याच्या या वृत्तीला उतरती कळा लागल्याची चिन्हे दिसू लागली. म्हणूनच इतिहासात फार मागे न जाता दोन पंतप्रधानांचा, त्यांच्यातील गुणांचा परिचय करून द्यावासा वाटतो. यास निमित्त आहे ते माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा २८ जून रोजीचा ९८ वा वाढदिवस! वाजपेयींपर्यंतचा काळ असा होता, की राज्यकर्त्यांमध्ये.. प्रामुख्याने पंतप्रधानांमध्ये अहंपणा व मीपणा नव्हता. पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असे. त्यांच्यातील नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, माणुसकी यामुळे ते राजकीय क्षितिजावर तळपत. सत्ताधाऱ्यांकडे गमावण्यासारखे खूप काही असते. विशेषत: विश्वास! खरं तर काही न गमावता जास्तीत जास्त कमावण्याचे चातुर्य त्यांच्यात असणे गरजेचे असते. पण अहंपणा, मीपणा आणि विरोधकांबद्दलचा तिटकारा यामुळे गमावण्याची शक्यता अधिक वाढते. विरोधकांमध्ये अहंपणा असणे ही त्यांची निकड असू शकते. कारण त्यांची झोळी रिकामी असल्याने त्यांच्यापाशी गमावण्यासारखे काही नसते. त्यांच्यात हवी असते क्षमता- जेणेकरून ते सत्ताधाऱ्यांच्या झोळीतून बरेच काही काढून घेऊ शकतील. अहंपणामुळे बऱ्याचदा राज्यकर्त्यांकडून बोलण्याच्या ओघात असे काही शब्द निघतात, की जे त्या व्यक्तीचीच नाही, तर पदाची आणि पक्षाचीही प्रतिष्ठा कलंकित करतात. पूर्वी अशा घटना फारशा घडत नसत. पंतप्रधानांना केव्हा केव्हा अशा काही गोष्टी देशहितास्तव कराव्या लागतात, की ज्या पक्ष व सरकारच्या चौकटीच्या बाहेरच्या असतात. काही गोष्टी तर अशा असतात, की ज्यांची स्वत:च्या आणि पक्षाच्या स्वार्थासाठी कुठेही वाच्यता करणे देशहिताचे नसते. अशा अनेक गोष्टी व घटना त्या- त्या व्यक्तीबरोबर काळाच्या पडद्याआड जात असतात. इतिहासही त्याची नोंद घेऊ शकत नाही. नरसिंह रावांशी संबंधित अशा एका घटनेचा उल्लेख करता येईल. या घटनेचा खुलासा स्वत: अटलबिहारी वाजपेयींनी २६ डिसेंबर २००४ रोजी एका सभेत केला होता. मे १९९८ मध्ये वाजपेयी पंतप्रधानपदी असताना पोखरण येथे अणुस्फोट चाचणी करण्यात आली. सर्वानीच त्याचे श्रेय पंतप्रधान वाजपेयी यांना दिले. परंतु प्रत्यक्षातली वस्तुस्थिती वाजपेयी यांनी आपल्या भाषणातून लोकांसमोर मांडली. या सभेची २७ डिसेंबर २००४ रोजी वर्तमानपत्रांतून प्रकाशित झालेली बातमी वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.. ‘मई १९९८ को पोकरण में किए गए परमाणू शक्ती परीक्षण के साथ भारत को परमाणू शक्तीसंपन्न राष्ट्रों की श्रेणी में दाखिल करने का श्रेय भले ही तत्कालीन राजग सरकार ने लूटा हो, पर इसकी भूमिका पूर्ववर्ती कांग्रेस सरकार के मुखिया पी. व्ही. नरसिंह राव ने तैयार की थी। इस बात का खुलासा राजग सरकार के मुखिया अटलबिहारी वाजपेयी ने रविवार को एक साहित्यिक संस्था के शताब्दी समारोह के समापन कार्यक्रम में किया। उन्होंने कहा, एटम का श्रेय लोग मुझे देते हैं, पर इसका श्रेय नरसिंह रावजी को है। छह साल से ज्यादा समय तक इस राज को राज बनाए रखने के कारण का खुलासा वाजपेयीने खूद ही किया। उन्होंने कहा, नरसिंह राव आज नहीं है (मृत्यू- २३ डिसेंबर २००४), इसलिए मैं इस रहस्य का खुलास कर रहा हूं। वे अगर जीवित होते, तो मैं इसका जिक्र नहीं करता, क्योंकि उन्होंने खुद मुझ को ऐसा करने से रोका था। इतना कहने के बाद वे भावूक हो उठे।’ आपण आज ज्या पदावर आरूढ होऊन देशाच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचा पाया पूर्वीच्या पंतप्रधानांनी घातलेला होता, ही भावना पदावर असलेल्या पंतप्रधानांच्या मनात होती. म्हणूनच राव यांच्याबद्दल वाजपेयींना आदर होता. त्यांच्यातील दोष ते काढत नव्हते. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावरून याची खात्री पटेल. वाजपेयींचे ते भाषण शब्दश: देण्याचा प्रयत्न करीत आहे.. ‘कांग्रेस के मित्र शायद भरोसा नहीं करेंगे। साऊथ ब्लॉक में (पंतप्रधानांचे कार्यालय) नेहरुजी का एक चित्र लगा रहता था। मैं आते-जाते वह देखता था। नेहरुजी के साथ सदन में नोंकझोक भी हुआ करती थी। मैं नया था। पीछे बैठता था। कभी कभी तो बोलने के लिए वाक आऊट भी करना पडता था। लेकिन धीरे धीरे मैंने जगह बनाई। मैं आगे बढा। जब मैं विदेश मंत्री था, तब एक दिन मैंने देखा, गलियारी में टंगा हुआ नेहरुजी का चित्र गायब था। मैंने पूछा, यह चित्र कहां गया! किसीने कोई उत्तर नहीं दिया। वह चित्र वहां फिरसे लगा दिया गया। क्या इस भावना की कदर है? क्या यह भावना बंद है? ऐसा नहीं कि नेहरुजी से मतभेद नहीं थे। मतभेद चर्चा में गंभीर रूप से उभर कर सामने आते थे। मैंने एक बार पंडितजी से कह दिया था, आपका मिलाजुला व्यक्तित्व है। आप में चर्चिल भी है, चेंबरलेन भी है। वह नाराज नहीं हुए। शाम को एक बँक्वेट में हमारी मुलाकात हुई। उन्होंने कहा, आज तो आपने जोरदार भाषण दिया। और हंसते हुए आगे चले गए। आजकल ऐसी आलोचना करना दुश्मनी को दावत देना है। लोग बोलना बंद कर देते हैं। जब जिनेवा में मानवाधिकारों के संमेलन में कश्मीर का सवाल उठाने का हमारे पडोसी ने फैसला किया तब उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव की नजर मेरे उपर गई, कि मैं वहां जाकर भारत का प्रतिनिधित्व करू। हमारे पडोसी देश को तो आश्चर्य हुआ। वहां के (जिनेवा में) नेताओं को भी आश्चर्य हुआ। किसी नेता ने कहा कि भारत का लोकतंत्र विचित्र लोकतंत्र है। प्रतिपक्ष का नेता अपनी सरकार के पक्ष को रखने के लिए जिनेवा आता है और एक हमारे प्रतिपक्ष का नेता है, जो देश के भीतर ही ऐसी कठिनाइयां पैदा करता है, जिससे अन्तरराष्ट्रीय बाधाएं और उत्पन्न होती है। कुछ लोगों ने कहा, नरसिंह रावजी सरल आदमी नहीं है। बडे चतुर आदमी है। यह मत समझिए कि देश की एकता का प्रदर्शन करने आपको भेज रहे हैं। उनके मन में यह भी हो सकता है, की जिनेवा में बात नहीं बनी और कश्मीर प्रस्ताव पास हो गया, तो दोष का हिस्सा बतानें के लिए वाजपेयीजी कौ बलि का बकरा बनाने को भेजा है। मैंने इस पर विश्वास नहीं किया।’ आपल्या आधीच्या पंतप्रधानांबद्दल किती हा विश्वास! पंतप्रधान वाजपेयींनी पक्षाची लक्ष्मणरेषा ओलांडून विरोधी पक्षाच्या दोन पंतप्रधानांबद्दल हे गौरवपर उद्गार काढले होते. मनाचा किती हा मोठेपणा! भारतीय संस्कृती आणि पदाची प्रतिष्ठा यांची जोपासना करणारे असे व्यक्तिमत्त्व हल्ली तुम्हाला आढळते का? वाजपेयींपर्यंतचा काळ हा गाजावाजा करून, पोकळ घोषणा करून मोठेपणा मिळवण्याचा नव्हता. पाठ थोपटायची ती जनतेनेच. तीही केलेल्या कार्याची पावती म्हणून! अशी त्या काळी राज्यकर्त्यांची भावना असे. नरसिंह राव जरी पंतप्रधान होते, तरी त्यांची वागणूक मंत्रिमंडळातील आपणही एक सदस्य आहोत अशीच होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनमोकळेपणाने चर्चा होत असे. देशातील दौऱ्यात त्या- त्या राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना आणि परदेश दौरा असेल तर परराष्ट्रमंत्री तसेच दौऱ्यात ज्या विषयाशी संबंधित चर्चा होणार असेल त्या खात्याशी संबंधित मंत्र्यांना ते सोबत नेत असत. २० मार्च १९९३ रोजी रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी नरसिंह राव सकाळी मंगलोरला पोहोचले. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे मंगलोरला पोहोचल्यावर तीन-चार तास शृंगेरी येथे जाऊन आद्य शंकराचार्यासोबत त्यांच्या मठात घालविण्याचे त्यांनी ठरवले. तेव्हा माधवराव शिंदे हे मंत्री नसतानाही सायंकाळी होणाऱ्या रेल्वेच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या सोबत होते. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर मंगलोर-शृंगेरी या प्रवासात माधवराव शिंदेही सोबत असल्याचे मी पंतप्रधानांच्या कानावर घातले होते. त्याचे कारण असे होते की, आधीच्या प्रवाशांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यांचा संबंध रेल्वेच्या कार्यक्रमाशी होता. विमानात बसल्यानंतर त्यांनी शृंगेरीला येण्याची इच्छा व्यक्त केली. ऐनवेळी प्रवाशांच्या यादीत बदल करणे वा क्षमतेपेक्षा हेलिकॉप्टरमध्ये एकही जास्त प्रवासी नेणे शक्य नसते. पण आयत्या वेळी राज्यपाल येत नसल्याचा निरोप आल्याने त्यांच्याऐवजी शिंदे यांना जागा दिली गेली. त्याहून आश्चर्य म्हणजे शृंगेरी मठातील प्रत्येक कार्यक्रमात नरसिंह रावांनी शिंदे यांना सोबत घेतले होते. एवढेच नाही तर त्यांनी शृंगेरी मठ आणि शंकराचार्याचा पूर्वेतिहासही त्यांना समजावून सांगितला होता. गंमत म्हणजे हेच ते माधवराव शिंदे होते, ज्यांनी त्यांच्या विमान वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाशी संबंधित एका घटनेमुळे नैतिकतेचा आव आणत ९ जानेवारी १९९३ रोजी पदाचा राजीनामा दिला होता. नरसिंह रावांनी राजीनामा परत घेण्याची विनंती केल्यानंतरही त्यांनी तो परत न घेतल्याने राजीनामा स्वीकारण्याशिवाय रावांपाशी पर्याय उरला नव्हता. त्यानंतर शिंदे यांनी नरसिंह रावांवर भरपूर तोंडसुख घेतले होते. नंतर ते सोनिया गांधींच्या गटात सामील झाले. काही दिवसांनंतर नरसिंह राव यांच्या कानावर आले की, शिंदे यांची अशी इच्छा होती की रावांनीच आपण राजीनामा स्वीकारणार नाही असे म्हणावयास हवे होते; जेणेकरून शिंदे यांचा मोठेपणा दिसून आला असता आणि त्यांच्या प्रतिष्ठेत भर पडली असती. ही घटना घडल्याला तेव्हा जेमतेम दोनच महिने झाले होते. परंतु नरसिंह रावांनी झालं गेलं विसरून, जसं काही घडलंच नव्हतं असं समजून शिंदे यांना या प्रकारे आदराची वागणूक दिली होती. सायंकाळी मंगलोर येथे मंगलोर-उडपी रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने नरसिंह रावांचा आणखी एक पैलू समोर आला. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ असे की मंगलोर-उडपी रेल्वे प्रकल्पाची सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हापासूनच्या सर्व रेल्वेमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. एवढेच नाही तर मंचावर स्थान देऊन त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. विरोधी पक्षाचे मधु दंडवते, जॉर्ज फर्नाडिस, काँग्रेस पक्षाचे माधवराव शिंदे या समारंभास उपस्थित होते. नरसिंह राव दुसऱ्यांचा आदर करीत. स्वत:चा मोठेपणा ते कधीच मिरवत नसत. ते पंतप्रधान असताना शंकर दयाळ शर्मा यांची राष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली होती. ते राष्ट्रपती झाल्यानंतर औपचारिकता म्हणून नरसिंह राव त्यांना भेटायला गेले होते. ३०-३५ मिनिटे बोलणे झाल्यानंतर नरसिंह राव जाण्यासाठी उठले तेव्हा राष्ट्रपतीही उठून त्यांच्यासोबत निघाले. बैठकीच्या दारापर्यंत आल्यानंतर रावांच्या चाणाक्ष नजरेने राष्ट्रपतींचा (कदाचित कृतज्ञतेच्या भावनेने) निरोप देण्यासाठी मोटारीपर्यंत येण्याचा हेतू ओळखला. राष्ट्रपतींना थोडे बाजूला घेऊन राव यांनी त्यांना हळूच सांगितले की, ‘आप राष्ट्रपती हो। यह शिष्टाचार आपके लिए नहीं है।’ असे सांगून बैठकीच्या दारातूनच त्यांनी त्यांचा निरोप घेतला. एकेकाळी राज्य विधानसभा व लोकसभेत विद्वान, अभ्यासक आणि उत्कृष्ट वक्त्यांची मांदियाळी असे. बरेच लोकप्रतिनिधी संसदेच्या लायब्ररीत तासन् तास घालवीत असत. यातलेच काही संसद सदस्य पुढे राज्यकर्ते होत. त्यामुळे त्यांची प्रशासनावर पकड असे. हा सुवर्णकाळ आज मागे पडला आहे. महान संसदीय परंपरा व चांगल्या प्रवृत्ती लयास गेल्याची चिन्हे दिसत आहेत. नरसिंह राव, वाजपेयी यांच्यासारखे दूरदृष्टीचे, कर्तृत्ववान आणि सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेते आज राजकीय क्षितिजावर कुठे दिसताहेत का? ram.k.khandekar@gmail.com