|| रणधीर शिंदे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि सामाजिक कृतज्ञता निधी यांच्या सहयोगाने व्यासंगी विचारक प्रा. पुष्पा भावे यांच्यावरील ‘पुष्पा भावे : विचार आणि वारसा’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आज (११ एप्रिल रोजी) डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाविषयी. साक्षेपी विचारवंत, व्यासंगी अभ्यासक, समीक्षक, धडाडीच्या कार्यकर्त्यां प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनाला सहाएक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र व सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘पुष्पा भावे : विचार आणि वारसा’ हा त्यांच्या विचारकार्याचे स्मरण करून देणारा स्मृतिग्रंथ प्रकाशित होत आहे. (संपादक : गणेश विसपुते/ वैशाली रोडे) जवळपास ३३६ पृष्ठांच्या या ग्रंथात पुष्पा भावे यांच्या आठवणी, स्मरणे, व्यक्तिमत्त्व, त्यांचे सामाजिक चळवळीतील कार्य, कार्यकत्र्याच्या दृष्टीतून पुष्पा भावे, त्यांची नाट्यसमीक्षेतील कामगिरी व त्यांच्या निवडक लेखनाचा समावेश आहे. ‘व्यक्तिमत्त्व’, ‘स्नेह’, ‘साहित्य-नाट्य’, ‘कार्यकत्र्यांच्या नजरेतून बाई’, ‘विद्यार्थ्यांच्या स्मरणातील बाई’, ‘पुष्पा भावे : निवडक लेखन’, ‘भाषण व मुलाखती’ अशा विभागांतून साठ लेखांचा समावेश या ग्रंथात आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात पुष्पा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेकार्थांनी महत्त्व आहे. १९७० नंतरच्या काळातील सामाजिक, राजकीय चळवळीचे पडसाद या लेखांमधून ध्वनित झाले आहेत. या चळवळींशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुष्पा भावे यांचा संबंध होता. तसेच मराठीतील स्त्रीवादी साहित्य सिद्धांत, चळवळ आणि साहित्यसमीक्षेला पुष्पा भावे यांनी गंभीर परिमाण मिळवून दिले. त्याचबरोबर सामाजिक व वाङ्मयीन चळवळीला संस्थात्मक पाया देण्यात पुष्पा भावे यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. त्यामुळे हा स्मृतिग्रंथ सामाजिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या मोलाचा ठरतो. प्रास्ताविकात संजय गोपाळ यांनी ‘न्याय, समतेसाठी संघर्ष व पर्यायी निर्माणाच्या पाठीराख्या’ अशा शब्दांत त्यांचा केलेला गौरव रास्तच ठरतो. यात सदा डुम्बरे, नीरजा, सलील त्रिपाठी आणि ‘लोकसत्ता’च्या समाविष्ट संपादकीय लेखातून पुष्पा भावे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला आहे. प्रबोधन चळवळीतील पुष्पाताईंचे स्थान आणि त्यांच्या कार्याचे वेगळेपण अधोरेखित केले गेले आहे. ‘संवाद, समन्वय आणि निर्भयतेचे तेजस्वी प्रतीक’असा सदा डुम्बरे यांनी पुष्पा भावे यांचा उल्लेख केला आहे. दृढ विवेकाची प्रबोधन परंपरा आणि अस्वस्थ काळात दीपस्तंभ स्वरूपाचे कार्य करणाऱ्या पुष्पाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू यात उलगडले आहेत. पुष्पाताईंच्या सान्निध्यातील स्नेह्यांनी त्यांच्या सहवास आठवणींना शब्दबद्ध केले आहे. सरोज देशपांडे, रामदास भटकळ, मीना गोखले, मेधा पाटकर, दिलीप माजगांवकर, प्रदीप चंपानेरकर, अनंत देशमुख, गणेश मतकरी यांनी पुष्पा भावे यांचे राजकीय-सामाजिक कार्य, कौटुंबिक बंध, मैत्रभाव, सहकारी, मैत्रीण, मार्गदर्शक अशा नात्यांतील पुष्पाताईंच्या रूपावर प्रकाश टाकला आहे. त्यांची कामातील धडाडी, आणीबाणीतील कार्यकत्र्या, विचारवंत, त्यांच्या जीवनप्रवासाबरोबरच हळुवार, भावुक, रसिक मनाच्या पुष्पाताईंच्या स्वभावदृष्टीवरही यात प्रकाश पडतो. एक व्यक्ती म्हणून त्यांच्या लढाऊपणाबरोबरच त्यांच्या स्वभावदर्शनातील बारकावे या ग्रंथातून समोर येतात. नाट्यसमीक्षा व वाङ्मयलेखन हा त्यांच्या आस्था व जिव्हाळ्याचा विषय. ‘साहित्य-नाट्य’ या विभागात कमलाकर नाडकर्णी, संजय आर्वीकर, प्रतिमा जोशी, श्रृती तांबे यांनी पुष्पा भावे यांच्या वाङ्मयीन लेखनवैशिष्ट्यांचा शोध घेतला आहे. पुष्पा भावे यांनी शोधलेले रंगभूमीचे आयाम, ‘नाटकवाल्या बाईं’ची समीक्षा म्हणून असणारे वेगळेपण त्यातून अधोरेखित होते. संजय आर्वीकर यांनी पुष्पा भावे यांच्या एकंदर नाट्यसमीक्षेतील संस्कृती समीक्षेचा परीघ विस्तारणारी समीक्षावैशिष्ट्ये सूत्ररूपाने सांगितली आहेत. १९७० नंतरच्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींच्या परिप्रेक्ष्यात पुष्पा भावे यांच्या स्त्रीवादाच्या मांडणीमधील वंचितांच्या सबलीकरणाच्या दृष्टीतील नवेपण व संस्कृतीच्या कृतिशील भाष्यकार म्हणून श्रृती तांबे त्यांच्याकडे पाहतात. तर ‘समाजवादी विचार मानणारी, कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न ठेवता राजकीय व सामाजिक चळवळीतील कणखर कार्यकर्ती’ म्हणून बाबा आढाव यांनी त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. ‘कार्यकर्त्यांच्या नजरेतून बाई’ या विभागात महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींतील कार्यकर्त्यांनी पुष्पाताईंच्या सामाजिक कामाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सार्वजनिक जीवनात अखंड बांधिलकीचे कार्यकर्तेपण पुष्पा भावे यांनी कायम जपले. लोकशाही मूल्यांची जपणूक, पुरोगामी चळवळीतील त्यांचा कृतिशील वावर, सुस्पष्ट राजकीय-सामाजिक भूमिका व प्रागतिक दृष्टीचा भाग त्यातून व्यक्त झाला आहे. भाषासाहित्याच्या व्यासंगी व साक्षेपी प्राध्यापिका म्हणून पुष्पा भावे यांनी रुईया महाविद्यालयातून अध्यापनदृष्टीचा वेगळा ठसा उमटविला. पुष्पा भावे यांच्या शिकवणुकीचे मर्म काही विद्यार्थ्यांनी उलगडून दाखविले आहे. वाङ्मय, कला व नाटकाविषयी शिकवण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांच्या रुंदावलेल्या जाणिवांची मनोगते यात आहेत. ‘शिकविले ज्यांनी’ यात पुष्पा भावे यांच्या ‘सोनेरी मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीं’चे स्मरण आहे. ग्रंथात पुष्पा भावे यांचे निवडक लेख, भाषणे, मुलाखतींचा समावेश आहे. साहित्य, नाटक, भाषांतर या विषयांवरील हे लेख आहेत. भाषांतरवोतील मूलभूत प्रश्नांची मांडणी त्यांनी केली. भाषांतरातील लक्ष्यभाषेचे उद्दिष्ट, संस्कृतिविशिष्टता, स्वातंत्र्य, रूपांतरणातील स्वैराचार व दुविधा/पेच त्यांनी मांडले. पुष्पा भावे यांची नाट्यसमीक्षा मराठीतील फार महत्त्वाची समीक्षा आहे. ऐंशीच्या दशकारंभी ‘माणूस’मधून त्यांची समीक्षा प्रसिद्ध झाली आणि परंपरानिष्ठ, भावहळव्या नाट्यसमीक्षेला धक्के बसले. ज्याँ अनुईचा मराठी ‘बेकेट’चा फसलेला प्रयोग, तसेच एलकुंचवारांच्या‘गार्बो’मधील वेगळेपण; मात्र नाटकातील प्रायोगिकतेबरोबरच सुटलेल्या, खटकलेल्या गोष्टींचा निर्देश करायलाही त्या विसरत नाहीत. तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’मधील मानर्वी हिंसेची रूपे, करुणाशोध आणि खोलवरच्या गंभीरतेचे सूत्र त्यांनी उलगडून दाखवले. नवनाट्याच्या संदर्भात मराठी प्रेक्षकांच्या जबाबदारीचे भानही त्यात आहे. ‘आम्हाला भेटलेले श्रीराम लागू’ या ग्रंथाला भावे यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यांचे रंगभानर-चिंतन समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रीय समाज, सामाजिक चळवळी, आधुनिक मराठी वाङ्मयाची प्रस्फुरणे व नाटक यांच्यातील आंतरसंबंधांचा विचार या प्रस्तावनेत आहे. त्यांनी मोठ्या चित्रफलकावर श्रीराम लागू यांच्या नाट्यकारकीर्दीचे समालोचन केले आहे. बदल व स्थित्यंतरांच्या अक्षावर त्यांनी या श्रेष्ठ नटाचा प्रवास न्याहाळला आहे. श्रीराम लागू यांच्या अभिनयातील नवेपण, शब्दोच्चारांवरील हुकमत, वाचिक अभिनयातील खुली प्रसरणशीलता त्यांनी नोंदविली आहे. अभिजातता आणि समकालीनतेचे विलक्षण भान असणाऱ्या श्रेष्ठ कलावंत कामगिरीचे हे पैलूदर्शन आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचा स्थलकालावकाश, दिग्दर्शकीय व अभिनय मिती, प्रेक्षकस्वरूपतेची मूलभूत मांडणी त्यांच्या चिंतनात आहे. मराठी रंगभूमीच्या सामथ्र्य व मर्यादांचा विचार त्यात आहे. ‘तो आपुलिये जाणिवेची कळा वाढवणारी’ आणि र्पािथव नाट्यानुभव पोहोचविणाऱ्या दिग्दर्शकीय भूमिका यांना त्यांनी महत्त्व दिले. आधुनिक मराठी रंगभूमीला नवे रंगभान व दृष्टी देणारी ही समीक्षा आहे. त्यामुळेच ‘मराठी मानस हे साहित्यप्रेमी व नाट्यवेडे आहेच; परंतु त्याला दिवाणखान्याबाहेर काढण्याचे काम पुष्पाताईंनी केले.’ (संपादकीय, दै. लोकसत्ता) हे विधान रास्तच ठरते. आधुनिक वाङ्मयाचे चिकित्सक आणि साक्षेपी परिदर्शन हे पुष्पा भावे यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. या ग्रंथात श्याम मनोहर, प्रतिमा जोशी यांची कथा, लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथासंग्रहाची प्रस्तावना व सुनीता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’ व कथा साहित्यप्रकार यांवरील लेख समाविष्ट आहेत. साहित्य व समाज यांतल्या आंतरसंबंधांची मर्मदृष्टी, आधुनिकतेचा उलगडा, आकलन, अन्वयार्थाच्या नव्या दृष्टीने हे लेख महत्त्वाचे आहेत. परखडपणा व चिकित्सेचे दुर्भिक्ष्य आणि लेखक व्यक्तिमाहात्म्यापायीची मराठीतील ‘दडपणसमीक्षा’ या पार्श्वभूमीवर पुष्पा भावे यांच्या समीक्षेतील परखड स्पष्टता चकित करणारी आहे. ‘हुकूमशाही मनोवृत्तीचं प्रतीक’ म्हणून ‘आहे मनोहर तरी’ची केलेली समीक्षा आजही तितकीच महत्त्वाची आहे. कथा या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्यपूर्णता, भारतीय कथन परंपरा, मराठीतील कथासाहित्याची तात्त्विक चर्चा व या प्रकाराच्या खुल्या संभवशक्यतेची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. तसेच श्याम मनोहर यांच्या साहित्यातील अभिनवतेचे वेगळेपण त्या सांगतात. त्यांच्या साहित्यातील तर्कशास्त्राच्या पलीकडचे सूचन व ‘जसं वाटतं तसं लिहिण्याला दिलेलं महत्त्व’ याचा त्या आवर्जून उल्लेख करतात. बव्हंशी मराठी साहित्य कुटुंबप्रधान आहे; मात्र मनोहर ही कुटुंबव्यवस्था उलटी करून, तिची पुनर्बांधणी करून त्याचे बहुमुखीत्व सांगतात. यात त्यांनी त्यांचे लेखक म्हणून मोठेपण शोधले आहे. ‘चला, एकत्र येऊ या’, ‘योग्य वाटेल ते बोलू या’, ‘नोंद घेण्याजोग्या गोष्टी’ या त्यांच्या भाषणांत समकालीन राजकीय, सामाजिक घडामोडींचे पडसाद आहेत. मानवी स्वातंत्र्य व हक्क, न्याय व अभिव्यक्तीच्या प्रश्नांसंबंधीची मांडणी आहे. सामाजिक चळवळींतील एकजुटीचा विचार त्यात आहे. मुलाखतींमध्ये त्यांचे सार्वजनिक कार्य, चळवळी व लेखनप्रवासाचे कथन आहे. या स्मृतिग्रंथाचे वेगळेपण म्हणजे त्याचे उत्तम निर्मितीमूल्य. प्रशांत गोडबोले, र्मिंलद जोशी व इतर छायाचित्रकारांच्या छायाचित्रांनी ग्रंथास एक प्रकारचे सजीवपण प्राप्त झाले आहे. स्त्रीवादी चळवळ व स्त्रियांच्या लेखनासंबंधी मूलभूत विचार पुष्पा भावे यांनी मांडला. तसेच सत्तरनंतरच्या राजकारण व राजकीय पक्षांसंबंधी परखड लेखन त्यांनी केले. रमेश किणी प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईबद्दलचे लेखन त्यांच्या पुस्तकात आहे. या लेखनाचा संक्षिप्तपणे समावेश या ग्रंथात करता येणे शक्य होते. तसेच ग्रंथारंभी भावे यांच्या एकंदर कार्य व विचारविश्वाची ओळख करून देणाऱ्या लेखाची गरज होती. पुष्पा भावे यांचे सामाजिक कार्य, विचारदृष्टी व आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा हा दस्तावेज साने गुरुजी ट्रस्टने उपलब्ध केला आहे. त्यांच्या विचारांचे कृतिस्मरण महाराष्ट्राला निश्चिातच फलदायी ठरेल. randhirshinde76@gmail.com