‘लोकरंग’मधील (२ फेब्रुवारी) ‘जावे दावोसच्या गावा..’ हा लेख खूप उत्सुकतेने वाचला, पण काहीसा अपेक्षाभंग झाला. दावोस हे गाव कसे आहे, तिथे देशोदेशीची दिग्गज मंडळी का जमतात हे कळले; पण या मंडळींना आमंत्रण पाठवण्याचे निकष काय असतात, विचारांचे जे आदानप्रदान होते, त्यातून आजपर्यंत काय निष्पन्न झाले, या चर्चासत्रांचा सकारात्मक परिणाम झाला का, इत्यादी मुद्दे अनुत्तरित राहतात.

गैरसमज दूर व्हावेत..
‘लोकरंग’मधील आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या सदरातील रॉक संगीतावरचा लेख आवडला. ते  ‘समजून’ घ्यायचे संगीत आहे, त्यामागे तरुणाईची मानसिकता आहे, हे या लेखात सांगितले आहे ते महत्त्वाचे आहे. यामुळे बरेच गरसमज दूर व्हावेत.
सानिया

‘रॉक’ ही एक संस्कृतीच!
‘लोकरंग’मधील ‘लयपश्चिमा’ हे पाश्चात्त्य संगीतावरचं सदर आवडलं. मी मागील काही महिन्यांपासून पाश्चात्त्य संगीत ऐकायला सुरुवात केली आणि तेही अगदी त्या जीवन पद्धतीत जाऊन..! याचं सगळं श्रेय माझ्या पाश्चात्त्य संगीतात ‘किडा’ असणाऱ्या माझ्या एका मित्राला, ज्याने मला अगदी बोट धरून
त्या संगीतातील सौंदर्याची ओळख करून दिली. लेखकाने लेखात मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे की, ‘रॉक’ ही एक संस्कृती आहे, ती इथल्या पांढरपेशा व्यक्तींना झेपणारी नाही. कारण त्यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतात आणि त्या संगीतसंस्कृतीत अक्षरश: घुसावं लागतं. तेव्हा ‘रॉकिंग’ या शब्दाचा खरा अर्थ ते
जगलेल्या भक्तांनाच कळतो. केवळ कपडय़ांची घडी न
मोडता नाटय़संगीत ऐकणाऱ्या मध्यमवर्गाला नाही.
मी स्वत: Rocking  संगीताचा चाहता झालोय. लेख Trance Electronic Trance वरही जरूर लिहा.
– नीलेश तेंडुलकर, रत्नागिरी</strong>
 
बेभरवशी जगणं
‘लोकरंग’ (९ फेब्रुवारी) मधील सारेच लेख चांगले होते. ‘ध’चा ‘मा’ सदरातील अप्पा बळवंत यांचा ‘दगड’ तर अफलातून. तो वाचून जो आनंद मिळाला त्यामुळे एक प्रकारे ‘जगणं’ साजरं झालं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ‘जगणे : साजरी करण्याजोगी गोष्ट’ हा डॉ. सुलभा ब्रह्मनाळकरांच्या लेखाचा उद्देश गंभीर गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा आहे. पण भयंकर आजारातून सहीसलामत पार पडून जगणं संपन्न करण्याची संधी मिळणं, याच्यासारखा आनंद त्या रोग्याला जेवढा आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांना असतो, हे डॉ. ब्रह्मनाळकर यांच्या संवेदनशील लेखातून जाणवलं. मला आठवतं, माझ्या एका कानाची शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन मला त्या कानानं ऐकू येईनासं झालं, याचं जास्त दु:ख त्या डॉक्टरनाच झालं होतं. जन्मत: टाळा नसलेल्याला शस्त्रक्रियेनं डॉक्टर बोलतं करू शकतात तेव्हा त्या मुलाचंच नाही, तर त्याच्या आप्तेष्टांचं जगणंही साजरं करण्याजोगं होतं, हेही मी पाहिलेलं आहे. ‘पण जीवनात ही घडी अशीच राहू दे’ म्हणताना जगणं आणि मरण यांतल्या सीमारेषा जेव्हा अचानक पुसट होऊन जातात तेव्हा ते जगणं किती बेभरवशी आहे याचाच साक्षात्कार होतो. लेखिकेनं सांगितलेलं, नव्हे- अंगावर काटा आणणारं वर्णन केलेला कुत्रा चावण्याचा जीवघेणा प्रकार माझ्या एका सुहृदाच्या १०-१२ वर्षांच्या मुलाच्या बाबतीत नुकताच घडला. रेबीजचं इंजेक्शन देऊनही काही दिवसांनी त्याचा आजार मेंदूपर्यंत पोहोचला आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्याच्यावर पुढचे उपचार सुरू आहेत. ते पालकांना दुरून पाहत बसावे लागतात. कारण त्याला बेशुद्धावस्थेत ठेवून उपचार करावे लागतात. यात दोष कुणाचा? खेळायच्या वयात चेंडू घेऊन पळणाऱ्या त्या निरागस मुलाचा, त्याच्यामागे नसíगकरीत्या धावून हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्याचा, की अशी भटकी कुत्री गल्लोगल्ली दिसत असूनही वेळेवर उपाय करण्यात कमी पडणाऱ्या महापालिकेचा? सगळ्यांच्या सदिच्छेनं त्या भयंकर आजारातून तो मुलगा बाहेर पडेलही; पण त्याचं आताचं बेभरवशी जगणं आजूबाजूच्या लोकांना मरणप्राय यातना देत आहे, त्याचं काय?
 श्रीपाद पु. कुलकर्णी

ते गाणं ‘मुझे जीने दो’मधलं..
२६ जानेवारीच्या ‘लोकरंग’मध्ये ‘रहे ना रहे हम’ या सदरातील संगीतकार जयदेव यांच्यावरील लेखात ‘रात भी है कुछ भीगी भीगी’ या गाण्याचा चित्रपट अनवधानाने ‘रेश्मा और शेरा’ असा लिहिला गेला होता, तो ‘मुझे जीने दो’ असा हवा.                                        
मृदुला दाढे जोशी