गिरीश कुबेर यांनी ‘लोकरंग’ (२३ जून)मधील ‘दांभिकांचा मळा’ या लेखात राजकारण्यांच्या ढोंगावर इतके परखडपणे व सडेतोड लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण या ढोंगीपणात अग्रभागी असलेल्या ‘मीडिया’चा यात उल्लेख नाही. राजकारण्यांना एक वेळ आपण माफ करू, कारण राजकारण हा त्यांचा धंदा आहे. पण ‘मीडिया’ हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, त्याचे काय?
१९८४ ला दिल्लीत झालेली शिखांची कत्तल वा १९९२-९३ ची मुंबईतील दंगल या निधर्मी आणि  गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेली दंगल मात्र जातीय व धार्मिक (?); कारण पहिल्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे राज्य होते व गुजरातमध्ये बीजेपीचे राज्य आहे. जे नेते पंतप्रधान होण्यास उत्सुक आहेत त्यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. त्यावर आपण प्रश्न उपस्थित करू शकत नाही. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात राहुल गांधींना पंतप्रधान करण्यास काँग्रेस आतुर आहे हे आपण समजू शकतो. पण त्यांची योग्यता, अनुभव व क्षमता आहे का, याची चर्चा करायची गरज मीडियाला वाटत नाही. एकूण काँग्रेसबद्दल विरोधी लिहिताना सोयीस्करपणे ‘अळीमिळी’ धरली जाते ही वस्तुस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर गिरीश कुबेर यांचा लेख वेगळा वाटला.  
– शशिकांत जोशी, नाशिक .

त्यागातील दांभिकता
गिरीश कुबेर यांचा ‘लोकरंग’ (२३ जून)मधील  ‘दांभिकांचा मळा’ हा लेख अफलातून आहे. हीच दांभिकता िहदी चित्रपटांतील त्यागात वारंवार दिसून येते. शेवटी काय,movies reflects the values and culture of that society
– निरंजन लिमये

सेक्युलर आणि जातीयवादी!
नितीशकुमारांनी एन.डी.ए.चा राजीनामा दिल्यापासून पुन्हा एकदा सेक्युलर आणि जातीयवादी असा वाद सुरू झाला आहे. प्रत्येकजण ‘आम्हीच खरे सेक्युलर!’ असे म्हणून आम्ही जातीयवादी का व कसे नाही, हे ठसवण्याच्या प्रयत्नांत आहे. या गदारोळात सेक्युलॅरिझम आणि जातीयवाद या मूळ संकल्पनाच कोणाला कळलेल्या नाहीत हे स्पष्ट होते.
या दोन्ही संकल्पना परस्परविरोधी नाहीत. ते दोन स्वतंत्र विषय आहेत. सेक्युलॅरिझम म्हणजे कोणत्याही श्रद्धांना, विशेषत: धर्मश्रद्धांना ऐहिक व्यवहारात ढवळाढवळ करायला परवानगी न देणं. म्हणजे मनुस्मृती, शरियत, बायबल वगरेंनी कौटुंबिक कायदेकानू ठरवू नये असं मानणं म्हणजे सेक्युलर असणं. व्यवहारात याच्या नेमकं उलट प्रतिपादन होतं. समान नागरी कायदा मागणारे हे सेक्युलॅरिझमविरोधी समजले जातात.
तसंच ‘जातीयता’- जास्त योग्य शब्द ‘जमातवाद’ म्हणजे आपल्या (किंवा कोणत्याही विशिष्ट) जातीसाठी, जमातीसाठी, धर्मसमुदायासाठी, भाषिकांसाठी वेगळा दावा करणं आणि त्या जमातीबाहेरील लोकांचं नुकसान होत असेल तरी चालेल म्हणणं. म्हणजे स्वत:च्या जमातीसाठी असमर्थनीय मागण्यांसाठी लढा देणारे ते ‘जातीय’!
आता याचा सेक्युलॅरिझमशी कसा आणि कुठे संबंध आला? पण ‘सेक्युलर’ आणि ‘जातीय’ हे शब्द विरुद्धार्थी आहेत असा सार्वत्रिक गरसमज आहे. या संज्ञा शास्त्रीय आहेत आणि त्याचा काटेकोरपणेच वापर व्हायला हवा.
– अरिवद बाळ, कर्वेनगर, पुणे.

अनुचित संदर्भ  
 गिरीश कुबेर यांचा ‘लोकरंग’ (२३ जून)मधील  ‘दांभिकांचा मळा’ हा लेख वाचला. राजकारणी किती दांभिक आहेत हे लिहिताना मध्येच अनिरुद्धबापूंना त्यात घुसडण्याची का आवश्यकता वाटली तुम्हाला? लेखाच्या प्रसिद्धीसाठी हे केलं असावं असा संशय घेण्यास पुरेसा वाव आहे. काय माहीत आहे बापूंबद्दल तुम्हाला? तुम्ही कधी बापूंचा सत्संग पाहिलात का? जिथे सेवेच्या नावावर दांभिकतेचे दर्शन होते? त्यांचा नुसता अर्धवट उल्लेख का? हे असे उथळ संदर्भ देणे अजिबात उचित नाही.
आज कित्येक वष्रे आमचे आपत्कालीन व्यवस्थापनाचे स्वयंसेवक सरकारला मोठमोठय़ा उत्सवांमध्ये मदत करते. (गणेशोत्सव, सिद्धिविनायक उत्सव, महालक्ष्मी उत्सव, गणेशमूर्ती पुनर्वसिर्जन, इ.) मी स्वत: सर्व सेवांमध्ये भाग घेतलेला आहे. आणि या गोष्टी प्रसार माध्यमांमध्ये याव्यात यासाठी आम्ही कधीच प्रयत्नही केलेला नाही. बघा, या गोष्टीत कुठे दांभिकता आढळते का? आज तरुण मंडळी कितीतरी वेळा चुकीच्या गोष्टी करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून बापू त्यांना विधायक कार्यात गुंतवून ठेवत आहेत. इको-फ्रेंडली गणपती असो, आपत्कालीन सेवेची आवश्यक तयारी असो, गांडूळ खत असो, वस्त्र योजनेंतर्गत चरखा चालवणे असो, आध्यात्मिक कार्य असो; या सर्व गोष्टींत आम्ही तरुण मंडळी सहभागी असतो. आमच्या येथील तरुणवर्ग येऊन पाहा आणि मगच शिकवा दांभिकतेचे धडे! आज इंटरनेटच्या माध्यमातून बापूंची बरीचशी माहिती उपलब्ध आहे. कसे सुंदर कार्य शांतपणे चालू आहे ते आधी पाहा. हा तरुणवर्ग स्वत:चे कामधंदे सांभाळून या सर्व गोष्टी करतो. वीकएंडच्या नावाखाली तो हुल्लडबाजी करत नाही. शनिवारी संध्याकाळी सामूहिक उपासना करतो. रविवारी सकाळी परेड प्रॅक्टिस करतो. जुने भारतीय खेळ खेळतो. विविध सेवाकार्य करतो. दारूच्या गुत्त्यांवर ही मुले तुम्हाला कधी दिसणार नाहीत.
तुम्ही यापुढे बापूंचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळावा यासाठी केवळ हा लेखनप्रपंच नसून, बहुधा तुम्ही या सर्व आणि इतर बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत अनभिज्ञ असाल असे समजून त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयास आहे. इतर कुणा गुरूची बापूंशी तुलना करण्यापूर्वी बापूंना समजून घ्या, त्यांची कार्यपद्धती पाहा. मग बघा इतरांमध्ये आणि बापूंमध्ये काय साम्य आहे ते. तुम्ही म्हणाल, सगळ्यांची कार्यपद्धती वेगळीच असतेच. त्यात काय मोठेसे? पण ते तसे नाही. आधी जाणून घ्या. आधी स्वत:हून त्यांच्या कार्याची माहिती नव्हे, तर ज्ञान मिळवा आणि मग बोला. कारण माहिती थिअरीमधून प्राप्त होते, तर पॅ्रक्टिकलने ज्ञान मिळते!  
– स्वप्नील सुरेश कानडे, मालाड, मुंबई.

यथा राजा, तथा प्रजा
‘लोकरंग’ (२३ जुलै)मधला गिरीश कुबेर यांचा ‘दांभिकांचा मळा’ हा लेख वाचला. आपल्याकडे जे जे वाईट आहे त्या सगळ्याला आपली संस्कृतीच जबाबदार आहे असा ठाम (गर)समज लेखकाने करून घेतलेला आहे. पण ‘यथा राजा, तथा प्रजा’ हे सार्वकालिक सत्य असल्याने भारतातल्या सध्याच्या सर्वक्षेत्रीय दांभिकतेचे मूळ आपल्या १९२० नंतरच्या राजकारणात आहे. पण ही दांभिकता फक्त आपल्याकडेच आहे असं नाही. सत्ताकांक्षेने पछाडलेले ब्रिटिशही आपण व्यापारी असल्याची बतावणी करूनच िहदुस्थानात आले. अमेरिका व रशिया यांच्यात ‘शीतयुद्ध’ होतं म्हणजे काय होतं? शत्रुत्व व युद्ध करायचं, पण उघडपणे तसं म्हणायचं नाही, असंच ना! आम्हाला तेल हवंय म्हणून आम्ही आखातात युद्ध करतो, असं अमेरिका म्हणत नाही. युनो, नाणेनिधी वगरे आंतरराष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या संस्था अमेरिकेच्या इच्छेनुसार काम करतात, हे उघड गुपित असूनदेखील तसं जाहीरपणे अमेरिकेसह कोणताच देश म्हणत नाही. महासत्ता होण्याची घाई झालेला चीन तसं कबूल करत नाही. इतकंच काय, पण ‘आम्हाला काश्मीर व अरुणाचल हवंय’ हेसुद्धा कबूल करत नाही. भारतद्वेष हा आमचा एकमेव कार्यक्रम आहे, असं पाकिस्तान उघडपणे म्हणत नाही. याउलट, हिटलरसारखे ज्यूंच्या विरोधात उघडपणे बोलणारे व सत्तेसाठी उघडपणे काहीही करणारे जगाच्या दृष्टीने खलनायक ठरतात. मग प्रश्न असा पडतो की, भौतिक सुख, संपत्ती, पद यांची आस बाळगणं म्हणजे काहीतरी पाप आहे, असं इतर देशांना कोणी बजावलं आहे?
दांभिकतेचे समर्थन करण्याचा हेतू नाही, पण हा प्रकार सर्वत्रच आहे. ‘भ्रष्टाचार हा जागतिक प्रश्न आहे,’ असं इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. दांभिकतेचं तसंच आहे. तेव्हा रक्तशुद्धी आवश्यक असेल तर ती संपूर्ण मनुष्यजातीने करून घ्यायला हवी.
केदार केळकर, दहिसर (प.), मुंबई.