समीर गायकवाड

लग्नाला एक तप उलटून दोन लेकरांची आई झाल्यावरही कामिनीच्या सौंदर्यात तसूभर फरक पडला नव्हता. आताशा समृद्धी श्रीमंतीत रुळलेल्या कामिनीचा गतकाळ वेगळा होता. कामिनी म्हणजे आटीव दुधाची ढेप होती. पाहता क्षणी नजरेत भरेल असं उफाडय़ाचं अंग लाभलेली कामिनी गिर्रेबाज कबुतरासारखी वाटे, पण वास्तव तसं नव्हतं. गावातल्या टोळभरवाची नजर तिच्यावर असायची. ती मात्र भुईवर डोळे खिळवून खालच्या मानेनं जायची. कामिनीचा बाप नावालाच साधू होता. बाकी त्याचं वर्तन विपरीत होतं. गावात जी मोजकी मंडळी दारूच्या आहारी गेली होती त्यात साधूचा नंबर बराच वरचा होता. त्याची कमाई शून्य होती, पण मुजोरी टिकोजीरावाच्या वरची होती. वरतून ‘कोण भितो कर्जाला, कर गं रांडे पुरणपोळ्या’ असा सगळा मामला होता. चार धटिंगण घरी आणायचे आणि त्यांना फुकटचे खाऊपिऊ घालायचे, फालतूचा रुबाब या त्याच्या सवयी. नशेच्या गत्रेत चिचुंद्रीच्या डोक्याला चमेलीचं तेल लावायला तयार असणाऱ्या साधूने बायकोपोरांच्या घासाची चौकशी कधी केली नव्हती. साधूने थोरल्या कामिनीच्या पाठीवर जुळ्या मुली, नंतर मुलगा आणि पुन्हा मुलगी असं लटांबर वाढवलं होतं. साधूच्या नानाविध खोडींपायी वेशीपाशी त्याला अनेकांनी कुटून काढला होता, पण त्याचा पीळ कधीच जळला नव्हता. आई वत्सलाबाईसह कामिनी रोजंदारीनं कामावर जाई. कामावर निघालेली कामिनी वाटेनं चालू लागली की गावभरच्या बुभुक्षित नजरा तिच्यावर खिळत. ज्याची वर्दी येईल त्याच्या रानात या मायलेकी जायच्या. राब राबायच्या. त्यांच्या कष्टावरच चूल पेटायची. मायलेकींना बहुत करून नरसू साळव्यांची वर्दी यायची.

crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
balmaifal story, kids, speak truth, taking care, things, plants, breaking is easy, making is hard, accept fault
बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!

नरसू साळव्याचं दहा एकराचं रान होतं. रानाच्या मधोमध आठ परस खोल असलेली जुनी दगडी ताशीव विहीर होती- जिला कधी पाणी असायचं तर कधी नसायचं. जमीनही फारशी कसदार नव्हती. रान मुरमाड होतं. काळ्या करडय़ा मातीत दगडगोटय़ांची चळत असायची. नांगरट करताना बलांच्या तोंडाला फेसाची तार यायची. दरसाली मातीत बरड यायचीच. नरसूला दोन भाऊ होते. त्यांचंही स्वत:चं शेतशिवार होतं, घरदार होतं. नरसूला चार पोरींच्या पाठीवर दत्तू झालेला. त्यामुळे मुलींच्या मानाने त्याचं कोडकौतुक जास्तीच झालेलं. नरसूच्या आईनं आपल्या नातवाला रोज सहाणेवर घासून बनवलेलं चाटण पाजलेलं. पौष्टिक गोडधोड खाऊ घालून तेव्हापासूनच त्याच्या मानेवर जणू विशड आलेली. जसा दत्तू देखणा होता तशाच त्याच्या बहिणीही लोभसवाण्या होत्या. त्यांचं तारुण्य कुणाच्याही नजरेत भरणारं होतं, त्यामुळे नरसू त्यांना घराबाहेर पडू देत नसे. शेतातली कामं वक्तशीर व्हावीत म्हणून गरज पडेल तेव्हा वत्सलेच्या घरी कामाची वर्दी पोहोच होई. वर्दी मिळताच मायलेकी कामावर येत. अंग मोडून काम करत. कधी कधी हप्ता पंधरवडा सलग कामावर येत तेव्हा घरचं काम समजून त्या काम करत. वत्सलेसोबत कामिनी येणार असली की दत्तूला हुरूप येई. त्याच्या अंगावरचं मांस वाढे आणि काळजातला मोर थुईथुई नाचे! याचं कारणही तसंच होतं.

दत्तू म्हणजे मदनाचा पुतळाच होता. पिळदार अंगयष्टीचा, मजबूत बांध्याचा. उंचापुरा दत्तू पाहता क्षणी नजरेत भरायचा. शेतात राबून त्याचा गोरा रंग रापून गेला होता. धनुष्याकृती पाणीदार डोळ्यात चमक असायची. रेखीव ओठांवरची बारीक मिशांची लव त्याला शोभून दिसे. उभट चेहरा, तीक्ष्ण नाक, भव्य रुंद कपाळ, पातळ निमुळती कानशिलं, ओठांच्या खाली निमुळत्या हनुवटीवर असणारी दाढीची त्रिकोणी लव यामुळे तो एकदम कोरीव दिसायचा. हातात कुदळ घेऊन रानात दारं धरत असला की त्याच्या दुटांगी धोतराचे सोगे वर ओढलेले असत आणि केळीच्या बुंध्यागत घटमुट असलेल्या पडिंऱ्यांकडे लक्ष जाई. उघडय़ा अंगानं कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडत असताना त्याच्या दंडातल्या बेंडकुळ्या वरखाली होत. भरदार छातीचा पिंजरा वरखाली होई. कातळासारखी असलेली पाठ फुलून येई. मोटेनं शेंदलेलं पाणी मोठाल्या घागरीत भरून दुई हातानं आणताना मनगटावरच्या धमन्या टरारून फुगत. खळं करून झाल्यावर बारदाना झटकताना त्याच्या माथ्यावरचे केस वाऱ्यावर उडत. त्यात अडकून पडलेलं कुसं त्याला खुलून दिसे. एकामागोमाग एक पन्नास पोती उचलून त्यांची रास रचणं किंवा बलगाडीत चढवणं हे त्याच्यासाठी किरकोळ काम होतं. ओझ्यानं बलगाडीचं चाक कुठं चिखलात रुतलं की दोन आऱ्यांच्यामध्ये आपला ताटलीसारखा पंजा घालून तो नेटाने बलगाडी ओढून नेई. चाक ओढताना अंगाला वंगण लागलं की त्याच्या गोऱ्या रंगावर तीट लावल्यागत भासे. दत्तू दिसायला जितका देखणा, आकर्षक होता तितकाच मनाने निर्मळ होता. थोडंफार शिकला सवरलाही होता.

तंगीपायी सालगडी ठेवणं परवडेनासं झालं तेव्हा नरसूने दत्तूची शाळा बंद केली आणि कामाचं जू त्याच्या मानेवर ठेवलं. आठवीत असतानाच दत्तूची शाळा सुटली. शाळेसोबत स्वप्नेही मागे राहिली. दिली घेतलेली फुले दप्तरात चुरगाळून गेली. लपूनछपून घेतलेलं मोरपीस वहीच्या पानात दफन झालं. नंतर कधीतरी सारवणात वह्यंना पाय फुटले. मोरपिसाच्या आठवणी उरल्या. हे मोरपीस कामिनीनं दिलेलं. वत्सलेनं जोवर जमेल तोवर कामिनीला शाळेत धाडलेलं. घरात खाणारी तोंडं वाढली तेव्हा कामिनीची आबाळ होऊ लागली. फाटक्या गणवेशात अंग लपेनासं झालं, वह्य-पुस्तके वेळेवर मिळेनाशी झाली. घरातल्या कामापायी दांडय़ा पडू लागल्या. आपल्यामुळे आईला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय याची समज आल्यावर कामिनीनं शाळा सोडून दिली. नेमक्या त्याच वर्षी दत्तूनेही रजा घेतलेली. शाळेत असताना दत्तूला कामिनीचं विलक्षण आकर्षण होतं. तिच्या सौंदर्याची भुरळ पडली नसती तर नवल! कामिनीलाही दत्तू आवडायचा. त्याचं राजिबडं व्यक्तिमत्त्व आणि विनम्रता यांचं तिला अप्रूप वाटे. दोघेही लपूनछपून भेटत. वह्य देताना त्यात खाणाखुणा करत. शाळेच्या मागच्या बाजूस असणारं गुलमोहराचं झाड त्यांच्या भेटीगाठीचं ठिकाण असे. शाळेला सुट्टी असली की दत्तूचं मन लागत नसे. मग कुठल्या तरी निमित्तानं तो साधू काशीदच्या घरापुढून चकरा मारे. कामिनी नजरेस पडली नाही की घालमेल आणखी वाढे. तासन् तास विहिरीत पोहल्यावर त्याच्या अंगातला वणवा शांत होई. नांगरटीस उभं राहिलं की बांधावर कामिनी उभी असल्याचा भास होई. गोफणगुंडा भिरकावताना मागून तिनं हात खेचल्यासारखं वाटे. भाकरी सोडून बसल्यावर तिनं घास पुढे केल्यागत हा आ वासून बसे. मग कावून गेलेला नरसू त्याची आरती करे. मग कुठे दत्तू भानावर येई. कामिनीची अवस्थाही अशीच होती. खुरपायला बसली की हात खिळून जात आणि मनातलं पाखरू दत्तूकडं उडाण घेई. चुलीवर ठेवलेलं कोरडय़ास आटून गेल्यावर घरभर ठसका पसरे, मग कुठं तिचं चित्त जागेवर येई. मात्र जसजसे दिवस पुढे जात राहिले तसतसे त्यांच्यातलं अंतर वाढत राहिलं, अपवाद फक्त त्या दिवसांचा असे- जेव्हा वत्सला आणि कामिनी नरसूच्या शेतात कामावर येत!

कामिनी शेतात आली की जुंधळ्यातल्या मोत्यांना धुमारे फुटत. गव्हाच्या लोंब्यांना उधाण येई. दंडातून वाहणारं पाणी तिच्या पावलांना स्पर्शण्यास आतुर असे. झाडांवरची पाखरं पंख फडफडवत. गोठय़ातल्या गायी अंग थरथरवत. लाली कुत्रीची पिल्लं तिच्या पायात घुटमळत. सगळं चराचर आतुरलेलं असे. दत्तूचं अवघं आकाश इंद्रधनुष्यी होई. काम करताना नकळत तिचा स्पर्श होताच दत्तूच्या अंगांगात नागीण सळसळे. आग दोन्हीकडे समान लागलेली असे. कामिनीचे गाल आरक्त होत. तारुण्यानं मुसमुसलेले ते जीव आगळीक होण्याच्या वळणावर पोहोचले होते. दत्तूला वाटायचं की कामिनीशीच आपलं लग्न व्हावं, पण नरसूच्या भीतीने दत्तूचं प्रेम ओठावर कधी आलंच नाही आणि कामिनीत ती हिंमत असण्याचा प्रश्नच नव्हता. असाच काही काळ गेला. दरम्यान, नरसू सलग काही वर्षे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यांच्या चरकात पिसून निघाला. नापिकीने त्याला कर्ज झालं. सावकारी कर्ज फेडण्याचा सोपा उपाय त्यानं शोधला. बक्कळ हुंडय़ावर डोळा ठेवून गडगंज श्रीमंत असणाऱ्या मेव्हण्याकडं त्यानं दत्तूसाठी मुलीचा हात मागितला!

जगाच्या भाषेत रंगरूपानं डावी असणाऱ्या कुसुमशी दत्तूचं लग्न झालं. विजोड असणारी त्यांची जोडी गावाला खुपण्याचा सवालच नव्हता. त्या काळात आपखुशीऐवजी बाकीच्या गोष्टी नजरेपुढं ठेवून सोयरिकी जमवल्या जात असल्यानं नवरानवरीची मर्जी कुणाच्या खिजगणतीत नव्हती. मनातल्या स्वप्नांना पायदळी तुडवत घाण्याला जुंपलेल्या बलागत दत्तूने संसाराला जुंपून घेतलं. तिकडे साधूने कामिनीचा अक्षरश: सौदा केला. पंचक्रोशीच्या पलीकडे जाऊन पैसेवाल्या विधुर गुणाजीबरोबर कामिनीचा बार उडवून दिला. कुठल्याच अंगानं त्यांची जोडी शोभत नव्हती. साधूच्या निर्णयाविरुद्ध जाण्याची हिंमत वत्सलेत कधीच नव्हती. कामिनीने आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांचा चुराडा करून त्यावर आपल्या घरादाराच्या सुखाचा डोलारा उभा केला. बहिणींची लग्ने तिने थाटात केली. भावास जमीनजुमला घेऊन दिला. गावात आल्यावर कामिनीला वाटे की दत्तूच्या शेतशिवाराकडे फेरफटका मारावा. चोरून त्याला पाहावं, पण नीतीमत्तेच्या जोखडात पाय अडत. कामिनी गावात आल्याचं दत्तूला उशिरा कळे. ती आल्याचं कळताच बहाणा बनवून दत्तू गावात जाई. तोपर्यंत कामिनी तिच्या सासरी परतलेली असे. दोघांची चुकामूक होई. अंधारून आल्यावर हिरमुसलेला दत्तू कास्तकाराच्या भेटीचं निमित्त करून शाळेमागच्या गुलमोहराकडे जाई. तिथं त्याला कामिनीच्या देहगंधाचा दरवळ जाणवे. एरव्ही सुकून गेलेल्या गुलमोहराला दत्तू येऊन गेल्यानंतर नव्याने फुलांची स्वप्ने पडत!

sameerbapu@gmail.com