परवा संध्याकाळी माझ्या मित्राचा, डॉ. राकेश सिन्हाचा फोन आला. ”Sanjay, in next conference, we should now talk on…. mistakes that we made.”  त्याचा सिद्धांत स्पष्ट होता. आम्ही दोघेही आता पन्नाशीच्या पुढचे. आमच्या व्यवसायात बऱ्यापैकी नाव कमावलेले.. आता यापुढे ‘मी अमुक एक सर्जरी कशी करतो?’ How I do it? याऐवजी ‘what I should not have done?’ हे उघडपणे बोलण्याचे वय आले आहे. इतरांच्या चुकांपासून खूप काही शिकण्यासवरण्यासारखे आहे, हे त्रिवार सत्य आहे. स्वत:च्या चुकांमुळे जो शिकतो तो अनुभवसंपन्न शहाणा आणि इतरांच्या चुकांपासून जो शिकतो तो विश्लेषक, विद्वान अशी माझी वर्गवारी आहे.
चुका या घडतातच. त्या पहिलटकराकडूनही घडतात आणि पैलवानांकडूनही घडतात. चुका नाहीत तर काम नाही; पण त्यांचे प्रमाण कमीत कमी आणि त्यांचा परिणाम सौम्यात सौम्य ठेवण्यासाठी विचारी होणे हे खरे प्रगल्भतेचे लक्षण आहे. चुका शस्त्रक्रियेत होतात, निदानात होतात, औषधाच्या योजनेत होतात, संस्थेच्या व्यवस्थापनात होतात, प्रकल्पाच्या संचलनात होतात, पुस्तकाच्या संकलनात होतात, कार्यक्रमाच्या आयोजनात होतात आणि राज्य-राष्ट्राच्या नियोजनातही होतात. चुकांबद्दल मलमपट्टी करणे अयोग्य आणि खरडपट्टी काढणे अश्लाघ्य.
एखाद्या गोष्टीचे आपले ‘होम-वर्क’ कच्चे आणि कमी असेल, तर चुका होतात. आपली तयारी अल्प आणि प्रतिस्पध्र्याचा अंदाज न आल्याने चुका होतात. चुका अविश्वासामुळे होतात आणि फाजील आत्मविश्वासामुळेही होतात. चुका आत्मप्रौढीचे प्रत्यंतर ठरतात आणि आत्मदोषांची परिणती होतात. धृतराष्ट्राच्या व्यंगाने त्या घडतात आणि गांधारीच्या डोळस आंधळेपणानेही त्या घडून येतात. अर्जुनाच्या एकलक्ष्यी वृत्तीमुळे कधी आजूबाजूचे भान सुटते आणि द्रोणाचार्याच्या कावेबाज शिष्यप्रेमामुळेही कधी कधी न भरून येणारी चूक घडते. चुका या कार्यकारण-परिणाम सोपानाच्या पायऱ्या असतात. त्या निसटत्या पायऱ्यांमुळे आपण ठेचकाळतो, अडखळतो किंवा घसरून पडतो.
कधी आपला अभिमान गर्वाचे वस्त्र धारण करून आपल्या डोळ्यांवर पट्टी, कानात कापूस आणि सदसद्विवेक  बुद्धीवर झूल टाकता होतो आणि मग चुका घडतात; तर कधी चुका आपल्या आग्रहाचे अट्टहासात रूपांतर झाल्यामुळे आपल्याला धक्का देतात. कुठे थांबायचे हे ज्याला कळत नाही तो अडखळतो. विजय मिळवण्याच्या युयुत्सू वृत्तीने ज्याचा अबलख वारू उधळतो त्याचा कपाळमोक्ष होतो.
मग काय करायचे? चुका संपवता येत नाहीत, पण त्या संयमात ठेवता येतात. त्यासाठी फार मोठे रॉकेट सायन्सही लागत नाही; तर आयुष्यातल्या साध्या-साध्या गोष्टींनी चुका सांधता येतात आणि कामकाज रांधता येते. शस्त्रक्रिया संपतेवेळी सर्जनने स्वत: जातीने उभे राहून ‘१, २, ३..’ असे मोठय़ाने उच्चारत मॉप काउंट घेतला की, पोटात स्पंज राहत नाही. शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी भूलतज्ज्ञाने मोठय़ाने रुग्णाचे नाव, आजार, करावयाची शस्त्रक्रिया आणि उजवे/डावे अंग याचा उच्चार करून, सर्जनने ‘मम’ म्हणून होकार द्यावा. चुका कमी होतील. व्यवस्थापनात व्यवस्थापकाने चर्चा केल्यावर, सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यावर प्रकल्प फसण्याची शक्यता कमी होईल. पुस्तकाचे प्रूफरीडर्स मोठय़ा आवाजात पुस्तक वाचतात ते उगाचच नव्हे. आज आपण ‘स्पेल-चेक’चा पर्याय निवडतो, पण जे मानवी मेंदूला जमते ते कॉम्प्युटरच्या चिपेला भावेलच असे नाही.
तेव्हा चुकांचा स्वीकार करताना कामावरची निष्ठा, भक्ती आणि प्रीती वाढवणे आवश्यक. विनम्रता, इतरांचा विचार घेण्याची वृत्ती चुकांना आडवा छेद देते, तेव्हा तेही प्रयत्नपूर्वक जोपासणे गरजेचे. कामातील तन्मयता आणि तादात्म्यता अनन्यसाधारण महत्त्वाची आणि  ळी११ ्र२ ँ४ेंल्ल; ३ ऋ१ॠ्र५ी ्र२ ्िर५्रल्ली असे म्हणून पुढे चालत राहणे, इतरांच्या चुकांवर पांघरूण घालताना, स्वत:च्या झाकण्याऐवजी इतरांना समजवण्यासाठी त्यांचे प्रदर्शन करून स्वत:ला गिनिपिग करून घेणे हे उत्तम शिक्षकाचे लक्षण नव्हे का?
..मी राकेशला माझा होकार कळवला.
’‘१ंल्लॠ@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे