१७०६ मध्ये स्कॉटलंड आणि इंग्लंडने Treaty of Union वर शिक्कामोर्तब केले आणि United Kingdom चा जन्म झाला. पण तरीही स्कॉटलंडवर स्कॉटिश लोकांचे राज्य असावे असे अनेक देशप्रेमींना वाटत होते. अखेर १९९८ मध्ये ‘स्कॉटलंडला स्वतंत्र संसद असावी’ या ठरावास मंजुरी देण्यात आली आणि देशपातळीवरचे lr08काही निर्णयवगळता स्थानिक कायदा बनवायचे स्वातंत्र्य स्कॉटलंडला मिळाले. स्कॉटलंडला UK पासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्कॉटिश नॅशनल पार्टीने सार्वमत घेण्याचे आश्वासन दिले. परिणामत: २००७ आणि २०११ च्या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळून ते सत्तेवर आले. सार्वमत घेण्यास संसदेनेसुद्धा मंजुरी दिली आणि संपूर्ण स्कॉटलंडमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले.
आमच्यासारख्या UK चा व्हिसा घेऊन स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या लोकांनासुद्धा सार्वमताच्या निकालाची उत्सुकता होती. जर स्कॉटलंड स्वतंत्र झाले, तर आमचे ‘इमिग्रेशन स्टेटस’ काय असेल? आम्हाला आमचा बोऱ्याबिस्तरा गुंडाळून इंग्लंडला जावे लागेल का? स्कॉटलंडहून आलेल्या ‘इमिग्रंट्स’ना इंग्लंड व्हिसा देईल का? असे अनेक प्रश्न आमच्यासमोर उभे राहिले. अर्थात मायदेशी परतण्याचा मार्ग होताच. पण तरीही भविष्यावर किंचित अनिश्चितता पसरली. मी आणि माझ्या पतीने विचार केला की, आत्ताच निर्णय घेण्यात काही अर्थ नाही. सार्वमताचा निकाल लागला की पुढे काय करायचे ते बघू. कदाचित स्कॉटलंड आम्हाला ‘जा’ म्हणणार नाही, किंवा इंग्लंड आमचे स्वागत करेल असेच आम्हाला वाटत होते. त्यामुळे इथेच राहून पुढे काय होते ते बघायचे ठरले.
थोडय़ाच दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. प्रगतीसाठी स्वातंत्र्य हवे असे वाटणारे लोक  ‘Yes Please’  आणि एकत्र राहूनच प्रगती साध्य करता येईल असे वाटणारे लोक म्हणजे ‘No Thanks’ किंवा  ‘Better Together.’ ‘Yes Please’ वाल्यांचे मुख्य मुद्दे होते की, स्कॉटलंड जेवढा महसूल गोळा करते त्याच्या तुलनेत स्कॉटलंडच्या प्रगतीसाठी खूपच कमी पैसा वापरला जातो. स्वातंत्र्य मिळाले तर सगळाच्या सगळा महसूल आम्ही आमच्या प्रगतीसाठी वापरू. त्याचप्रमाणे स्कॉटलंडची संस्कृती इंग्लंडच्या संस्कृतीपेक्षा खूपच वेगळी आहे, तेव्हा स्वतंत्र स्कॉटलंडमध्ये संस्कृतीचे संवर्धन अधिक चांगले होऊ  शकते. Better Together  वाल्यांचे मुख्य मुद्दे होते की, स्कॉटलंड स्वतंत्र झाल्यास आपल्याला चलन म्हणून ब्रिटिश पौंड वापरता येणार नाही (तसे बँक ऑफ इंग्लंडने स्पष्टच सांगितले होते.), स्कॉटलंडची अर्थव्यवस्था ढासळेल आणि युरोपियन युनियनमध्ये प्रवेशाचा मार्ग तितकासा सोपा असणार नाही. त्याचप्रमाणे एकत्र राहून जी प्रगती साधता येईल ती वेगळे राहून साधता येणार नाही.
सुरुवातीला No Thanks वाले बरेच शांत होते. त्यांना आत्मविश्वास वाटत होता की, स्कॉटलंडचे लोक स्वातंत्र्याच्या विरोधात मतदान करतील. पण जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ  लागला तसतसे Yes Please वाल्यांच्या सततच्या प्रचारामुळे लोकांचे मतपरिवर्तन होऊ लागले. एक्झिट पोलचे निकाली Yes Please कडे झुकू लागले होते. मग मात्र Better Together वाल्यांनी मोहीमच हाती घेतली. आता सोशल मीडिया, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे दोन्ही बाजूंच्या लोकांची मते मांडत होते. टीव्हीवर राजकीय वादविवादांच्या फैरी झडत होत्या. राजकीय वादविवादांमध्ये कधी Yes Please, तर कधी Better Togetherच्या बाजूने निकाल लागत होता.Yes Please वाल्यांचे प्रमाण ४८ % वर येऊन पोहोचले होते. त्यामुळे निकाल कोणत्याही बाजूने जाऊ शकतो अशी भीती दोन्हीकडच्या लोकांना वाटत होती.
आमच्यासारखे लोक मात्र दोन्ही मते ऐकून घेत आपले स्वतंत्र मत बनवायचा प्रयत्न करत होते. UK मध्ये राहणाऱ्या commonwealth देशांच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो, या न्यायाने मलासुद्धा मतदानाचा अधिकार होता. त्यामुळेच दोन्ही बाजू व्यवस्थित समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होते. विविध लोकांशी चर्चा करीत होते. स्थानिक लोकांचे मत विचारत होते. हे सगळे करताना माझ्या लक्षात आले की, बहुसंख्य तरुणवर्ग हा स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, या मताचा होता. खेडोपाडी राहणारा शेतकरी वर्गसुद्धा स्वातंत्र्याच्या बाजूने होता. परंतु पुष्कळशी मध्यमवयीन नोकरदार मंडळी मात्र Better Together च्या बाजूने होती.
हळूहळू मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे सगळीकडे Yes Please, नाही तर No Thanks चे झेंडे झळकू लागले. पुष्कळ लोक आपापल्या घरात, बाहेर, गाडीवर अभिमानाने आपल्या मताचे फलक मिरवीत होते. गुप्त मतदानाची संस्कृती असलेल्या माझ्यासारख्या भारतीयांसाठी ही मोठीच मौजेची गोष्ट होती. विविध ठिकाणी दोन्ही बाजूंची माहितीपत्रके वाटली जात होती. सामान्य माणसांचे शंकानिरसन करण्यासाठी रस्त्यांवर तात्पुरती कार्यालये उभारली गेली होती. मतदानाच्या दोन दिवस आधी शहरातील दोन मुख्य चौकांती Yes Please आणि No Thanks चे प्रचारक मोठय़ा संख्येने आपापले झेंडे फडकावीत होते. परंतु हे सगळे होत असताना कुठेही घोषणा, आरडाओरड, गदारोळ, वाहतुकीची अडवणूक, दोन पक्षांमध्ये भांडाभांडी, माइकवरून जोरजोरात भाषणे असे काहीही घडत नव्हते. सगळे व्यवहार अतिशय शांतपणे आणि सुरळीत चालू होते. भारतात होणारा निवडणूक काळातील गोंधळ बघता मला या परिपक्वतेचे फारच कौतुक वाटले. अशी प्रगती भारतात जेव्हा होईल तो दिवस खरा सुदिन!!
अखेर मतदानाचा दिवस उजाडला. मला आणि माझ्या पतीस घरी रीतसर पत्र आले. पत्रात मतदानाचा दिवस, वेळ आणि स्थान लिहिलेले होते. मतदानास जाताना आम्ही आमच्याबरोबर ओळखपत्र म्हणून वाहन चालवायचा परवाना आणि घरी आलेले पत्र घेऊन गेलो. मतदानाच्या जागी कोठेही पोलीस बंदोबस्त नव्हता, हेसुद्धा मला फारच आश्चर्यजनक वाटले. एका छोटय़ा चर्चची एक खोली या कामास दिलेली होती. मतदानास आलेले लोक व्यवस्थित रांगेत उभे होते. आतील कार्यकर्ते एकेकाला आत बोलावत होते. माझी वेळ आली तेव्हा मी आत गेले. मतदानासाठी आलेले पत्र तिथे दाखविले. तेथील कर्मचाऱ्याने ते पत्र स्वत:च्या ताब्यात घेतले आणि कोणतेही ओळखपत्र न मागता मतदानासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. इतके उत्कृष्ट आयोजन आणि तितक्याच उत्तमपणे जनतेने दिलेली साथ असे दृश्य मी मतदान करताना प्रथमच पाहिले.
मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता. सगळ्या देशाचे डोळे या निकालाकडे लागलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच मतदानाचा निकाल वर्तमानपत्रात वाचला. स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या विरोधात कौल दिला होता. तरीही जवळजवळ ४५ % टक्के लोकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मत दिले होते. खरे तर Better Together वाल्यांचा निसटता विजय झाला होता.Yes Please वाले लोक संख्येने खूप होते, त्यामुळे या निकालाचे पडसाद काय उमटतात याचीच भीती होती; परंतु ग्लासगोमधील किरकोळ निदर्शने वगळता कोठेही निदर्शने झाली नाहीत. जाळपोळ, मारामारी, सोशल मीडियावर शिवीगाळ असे काहीच झाले नाही. कोठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. जनतेने दिलेला कौल मान्य करून सगळे पुन्हा एकदा आपापल्या कामाला लागले. विरोधात लागलेला निकाल पचवायची ही परिपक्वता निश्चितच अतिशय कौतुकास्पद आहे. ही परिपक्वता अंगी बाणवायला प्रथम सुसंस्कृत असावे लागते. आणि स्कॉटलंड हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे, हे मला प्रकर्षांने जाणवले. स्कॉटलंडच्या प्रेमात तर मी येथे आल्याआल्याच पडले होते; परंतु हा अनुभव घेतल्यानंतर येथील संस्कृतीचा, येथील लोकांचा आणि त्यांच्या परिपक्वतेचा आदर वाटू लागला आहे.